Sunday 15 November 2020

नाशिक हे शिक्षणाचे माहेरघर होऊ शकते!!!

 वाचकहो,

काही चुकल्यासारखे वाटते? इतके वर्ष पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून माहीत आहे. मग अचानक नाशिक हे शिक्षणाचे माहेरघर होऊ शकते का? हे मी विचारतोय.. तर नक्कीच होऊ शकते.
कोविड १९ मुळे शिक्षण संस्थांचे स्वरूप बदलले आहे. शिक्षण हे एका इमारतीमध्ये जाऊनच घ्यावे लागते असे नसून ऑनलाईन ने सुद्धा घेता येते. हे खरे आहे की विद्यार्थ्याचे पूर्ण समाधान ऑनलाइन शिक्षण मधून होऊ शकत नाही पण अजून ऑनलाईन शिक्षण व्यवस्था ही बाल्यावस्थेत आहे. येत्या पाच वर्षांत त्याची वाढ चांगली होईल पण त्यासाठी नाशिक शहर खऱ्याअर्थाने स्मार्ट होणे गरजेचे आहे. हाय स्पीड इंटरनेट आणि विविध तज्ञ व्यक्ती, विविध संशोधन करणाऱ्या संस्था, कॉलेज यांच्या मदतीने ऑनलाईन शिक्षणाचे विविध कोर्सेस सुरू झाले तर नाशिक हे एज्युकेशन हब होऊ शकते.

शिक्षण क्षेत्रामध्ये मी विविध प्रयोग करत असतो, त्या संदर्भात वाचन संशोधनही चालू असते. . हे करत असताना एक लक्षात आले की शहराचा विकास त्याची प्रगती त्या शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या मानव निर्देशांकाची वाढ वर अवलंबून असते आणि मानव निर्देशांकाची वाढ ही त्या नागरिकांना किंवा विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिक्षणात असते. विद्यार्थ्यांनी म्हणजेच नागरिकांना कसे शिक्षण मिळाले कुठले शिक्षण घेतले त्याच्यावर अवलंबून असते. ऑनलाइनच्या माध्यमातून जगातील उत्तम कोर्सेस नाशिक मध्ये आणून नाशिकच्या विद्यार्थ्यांना देता येऊ शकतात.

या सर्वांचा विचार करता नाशिक भविष्यात हे एज्युकेशनल हब होऊ शकते का? याचा विचार व्हायला पाहिजे

नाशिक हे शिक्षणाचे माहेरघर होऊ शकता का हे समजून घेण्या आधी संपूर्ण भारतात शिक्षण क्षेत्रामध्ये किती गुंतवणूक होत आहे आणि शिक्षण क्षेत्रात काय आमूलाग्र बदल होत आहेत हे समजून घेतले पाहिजे.

प्राइस वॉटर हाऊस या संस्थेचा सर्वे नुसार भारतात सर्वात जास्त गुंतवणूक जर कुठल्या क्षेत्रामध्ये होणार असेल तर ती म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये. कारण भारत हा तरुणांचा देश आहे.. जवळजवळ 70 टक्केहून अधिक नागरिक हे 30 वर्षाच्या आतील आहे. सर्वेनुसार उच्च शिक्षणाला जाण्याचा प्रमाण भारतात साधारण 13 टक्के आहे जे 2025 पर्यंत तीस टक्क्यापर्यंत जाणार आहे.

भारतात अजून 800 युनिव्हर्सिटी ची गरज आहे. सध्या भारतात 372 युनिव्हर्सिटी आहे. जर आपण चायना चा विचार केला तर एकट्याचा यामध्ये 900 युनिव्हर्सिटी आहे. तर जपानमध्ये 9000 युनिव्हर्सिटी आहे.

सरकारी आकडा सांगतो भारताला अजून 35 हजार कॉलेजची गरज आहे. पन्नास हजार शाळा ची गरज आहे. म्हणूनच सरकार प्रायव्हेट युनिव्हर्सिटी ला मान्यता देते तर प्रायव्हेट स्कूल कॉलेज यांच्यासाठी स्वतंत्र कायदे बनवलेले आहेत. कारण अजूनही भारतात शिक्षणावर जीडीपीच्या 3% एवढा खर्च होतो. या तीन टाक्यांमध्ये सरकारी गुंतवणूक आणि खासगी गुंतवणूक दोन्ही आले.

आता प्रश्न हा आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षणामध्ये गुंतवणूक हवी आहे आणि त्यासाठी नाशिक शहर हे सज्ज होऊ शकते का? या संधीचा फायदा नाशिक शहरासाठी उघडता येऊ शकतो का? तर मला वाटतं नाशिक हे एज्युकेशनल हब होण्यासाठी अत्यंत उत्तम शहर आहे.

सध्या नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला संलग्न आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स चे 85 कॉलेजेस आहेत. मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट 34, B.ed कॉलेजेस 28, इंजिनिअरिंग आर्किटेक्चर कॉलेजेस 15, B.farm 13 तर लॉ कॉलेजेस 4, रिसर्च सेंटर 21, एग्रीकल्चर कॉलेज 1 आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये 17 आयटीआय आणि दोन सरकारी विद्यापीठ आणि एक खासगी विद्यापीठ आहे.

सध्या मुंबई पुणे येथे जमिनीच्या किमती खूप जास्त आहे आणि नाशिकला आजूबाजूला भरपूर जागा उपलब्ध आहेत. समजा जास्तीत जास्त जागा या एज्युकेशन झोन बनवल्या तर बाहेरील विविध शहरातील विद्यार्थी नाशिकमध्ये शिक्षण घ्यायला येऊ शकतील. त्यासाठी नाशिक शहरांमध्ये नवीन दर्जेदार अधिक शिक्षण संस्था उभ्या केल्या पाहिजे. नुकतेच अक्षय कुमार या अभिनेत्याने त्याच्या टायकोंडो इन्स्टिट्यूट साठी नाशिक मध्ये जागा बघितली असे सोशल माध्यमातून समजले.

नाशिक मधील विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक अभ्यासक्रम, कोर्सेस नाशिक शहरातच उपलब्ध करून देता यायला पाहिजे. त्यासाठी त्याला बाहेर शिकायला जायला गरज पडता कामा नये. त्यासाठी उपलब्ध शिक्षण संस्थांनी त्यांचा शिक्षणाचा दर्जा सुधारायला हवा. त्यासाठी त्यांच्याकडे चांगली संधी चालून आलेली आहे ती म्हणजे कोरोनामुळे जी गोष्ट दहा वर्षात होणार होती ती सहा महिन्यात झाली आणि ती म्हणजे ऑनलाइन शिक्षण घेण्याची मानसिकता. ही निर्माण झाली आता पुढचं पाऊल असलं पाहिजे ते म्हणजे विविध ऑनलाइन कोर्सेस नाशिक शहरातून निर्माण व्हायला पाहिजे. पुढील शिक्षणाच्या प्रवास हा हायब्रीड एज्युकेशन या मार्गावर असणार आहे. त्यामुळे नाशिक शहरात जितके ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध होतील त्याचा बेस बाकीच्या शहरातील विद्यार्थी किंबहुना आंतरराष्ट्रीय विद्यार्थीना नाशिक मध्ये आणण्यासाठी होईल.

सध्या पुणेचा शैक्षणिक वातावरण खराब होत चाललेले आहे. पालक मुलांना पुण्याला शिकवण्याला पाठवायला खूप मनापासून तयार नसतात. नाशिकमध्ये अजूनही पब संस्कृती नाही आहे. एक छोटं आणि धार्मिक शहर असल्याने दुसऱ्या शहरातील पालकांचा नाशिक कडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला असतो.

नाशिकला यंत्रांची भूमी बोलले जाते, इंडस्ट्री चांगले आहेत त्यामुळे फिनिशिंग स्कूल, कम्युनिटी कॉलेज यांची वाढ होणे अत्यंत आवश्यक आहे. नाशिकमध्ये पुणे युनिव्हर्सिटी चे स्पेशल कॅम्पस म्हणून नाशिकची निवड केली. त्याचं काम जर लवकर पूर्ण झालं तर अधिक कॉलेजेस याची निर्मिती होऊ शकते.

नाशिकच्या शिक्षणात बदल हवा आहे का? तर हो पण तो दिशादर्शक बदल हवाय, नुकताच बदल नको आहे. कॉलेज हवेत का? तर हो.. स्कूल हवेत का? तर हो.. पण नुकतेच बिल्डींग नको आहे, एज्युकेशन बरोबर दर्जेदारपणा आणि वेगळेपणा हवा आहे. तोच तोच अभ्यासक्रम आता मुलांना द्यायचा नसून तर अभ्यासक्रमांमध्ये विविधता आणणे आवश्यक आहे.
जर नाशिकच्या शिक्षण आणि औद्योगिक संस्थेने एकविसाव्या शतकात लागणाऱ्या कौशल ला चे ट्रेनिंग जर दिले तर नाशिक इंडस्ट्रीचा विकास अधिक जलद गतीने होईल.

हल्ली एमबीए झालेले विद्यार्थी, इंजिनिअर झालेले विद्यार्थी खूप मिळतात पण इंटरनॅशनल स्टॅंडर्ड चे प्लंबर, कारपेंटर मिळत नाही. म्हणून आपल्याला कमुनिटी कॉलेजेस, फिनिशिंग स्कूल हे नाशिक मध्ये जास्तीत जास्त आणले पाहिजे.
नाशिकच्या वैद्यकीय विद्यापीठांमध्ये कॉलेज सुरू होत आहे एक आनंदाची बाब आहे पण त्याहून महत्त्वाचं यामध्ये फिजियोथेरेपी कॉलेज सुद्धा आहे जी सध्या काळाची गरज आहे.

नाशिक मध्ये आयटीआय फारच कमी आहे. जर भारतातील सर्व आयटीआय चा विचार केला तर 11000 वोकेशनल ट्रेनिंग संस्था आहेत. हेच जर आपण चायना बरोबर जर तुलना केली तर एकट्या चायना मध्ये पाच लाख वोकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. नाशिकमध्ये वोकेशनल कॉसेस वाढवले पाहिजे. इंडस्ट्री 4.0 म्हणजेच चौथी औद्योगिक क्रांती आता येत आहे. त्याला लागणारे महत्त्वाचे नऊ क्षेत्रांमधील वोकेशनाल कोर्सेस येण गरजेचे आहे.

नाशिकला एक कृषी विद्यापीठ यायला हवे. भरपूर फिनिशिंग स्कूल यायला पाहिजे, प्रयोगशील शाळांची संख्या वाढली पाहिजे, अनुदानित शाळांनी त्यांचा दर्जा सुधारायला हवा, सर्व महानगरपालिका जिल्हा परिषद च्या शाळेने शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. इंटरनॅशनल स्कूल, रेसिडेन्सी स्कूल ची संख्या वाढली पाहिजे.

सर्व भारतातून, परदेशातून विद्यार्थी नाशिकमध्ये शिकायला येण्यासाठी काय करता येईल याचा विचार व्हायला पाहिजे.. कारण पाचगणीला सध्या जागा उपलब्ध नाही आहेत आणि शिक्षणाचा दर्जा आता फार ढासळलेला आहे.

खाजगी शाळांची संख्या वाढली पाहिजे फक्त त्याचं खूप कमर्शियलायझेशन होता कामा नये.

नवीन कलाकार घडवणाऱ्या इन्स्टिट्यूट सुद्धा नाशिकला हव्या आहेत. एन एस डी, एफ टी आय सारख्या अॅक्टींग स्कूल नाशिक मध्ये आपण आणू शकतो कारण दादासाहेब फाळके नावाचे मोठा ब्रँडिंग आपल्याला कडे आहे . सध्याचे खासदार फिल्म इन्स्टिट्यूट साठी शंभर एकर जागेचा प्रस्तावचा पाठपुरावा ते करत आहे. उद्योजक घडवणाऱ्या संस्था गुजरात मध्ये खूप आहेत, त्या धर्तीवर नाशिक मधल्या तशा संस्था काढायला हव्यात. वायनरी कॉलेजेसची सुद्धा कोर्सेस आपल्या कडे मोठ्या प्रमाणात काढता येऊ शकतात.

नाशिकचा हवा पाणी छान आहे, आजूबाजूला निसर्ग चांगला आहे मुंबई पुणे आणि नाशिक असा गोल्डन ट्रँगल सुद्धा चांगला आहे आणि आता विमान सेवा सुद्धा सुरू झाली आहे. त्यामुळे नाशिक येथे पुढच्या दहा ते वीस वर्षांमध्ये भारतातलं उत्तम एज्युकेशनल हब होऊ शकते असं मला वाटतं.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक
संचालक इस्पॅलियर स्कूल. 


शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...