Friday 21 October 2022

एकविसाव्या शतकात धर्म आणि संस्कृतीचा अर्थ

धर्म-अधर्म-धर्मनिरपेक्षता हे शब्द आपल्याला नवीन नाहीत. त्यांविषयीची चर्चा पूर्वापार चालत आली आहे. चक्रधरस्वामींच्या 'आंधळे आणि हत्ती' या दृष्ष्टांताप्रमाणे या धर्माची हकिगत आहे. त्यात जसा प्रत्येक आंधळा हत्तीच्या ज्या अवयवाला स्पर्श करतो तसा नि तेवढाच हत्ती असं त्याला वाटतं. तसाच प्रत्येकाचा धर्माचा अर्थ आपापल्या अनुभवावर, कुवतीवर, अभ्यासावर अवलंबून असतो. त्यामुळे शास्त्रीय कसोटीवर आधारित अशी 'धर्माची' एक रोखठोक व्याख्या करता येत नाही.

मुळात या धर्माचा उगम झाला कसा? धर्म प्रथम की मानवजात प्रथम निर्माण झाली? आपण सगळे आता विज्ञानयुगात राहतो. डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आपल्याला ठाऊक आहे. पहिले माणूस आला, तो समाजात राहू लागला. एकत्र राहण्याचे फायदे त्याच्या लक्षात येऊ लागले. ती काळाची गरज होती. तो गुहेत राहायचा. वेगवेगळ्या प्राण्यांच्या हल्ल्यांना एकत्रितपणे तोंड दिलं तर आपण वाचू शकतो हे त्याच्या लक्षात आलं. म्हणजे एकत्र राहणं ही त्याची गरज ठरली. मग ते टोळीने राहू लागले. टोळीने राहण्यासाठी काही नियम लागतात. त्यातून नियमांची सुरुवात झाली. इथेच धर्माचा उगम झालेला दिसतो. याचा अर्थ, धर्म म्हणजे समूहात राहणाऱ्या माणसाची जगण्याची व्यवस्था. म्हणूनच गरजेनुसार ती प्रत्येक समूहाची वेगळी असत, बनत, बदलत गेली. मानववंशशास्त्र याच सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष वेधतं. 'सेपियन्स' पुस्तकात, 'माणूस महाबलाढ्य कसा झाला' या पुस्तकात याची छान मांडणी आहे.

त्या काळात विज्ञान विकसित नव्हतं. जगणं म्हणजे काय नि मृत्यू म्हणजे काय या प्रश्नांच्या उत्तरांपर्यंत नव्हे, तर प्रश्नांपर्यंत जायलाही माणसाला बराच काळ लागला असणार. समोरची व्यक्ती आत्ता होती, तिची हालचाल अचानक बंद झाली किंवा झिजत झिजत तिचा नाश झाला..म्हणजे तिचा मृत्यू झाला हे त्याला कळत गेलं असणार. मग त्यातून अनेक संकल्पना निर्माण होत गेल्या. ‘आत्म्या’चा जन्म त्यातूनच झाला असेल, जो पुढे विज्ञानाला आव्हानात्मक ठरत गेला.

'जगण्या'चा विचार करताना माणूस 'धर्मा'पर्यंत पोहोचला. उत्तरोत्तर प्रश्न निर्माण होऊ लागला, 'माणसासाठी धर्म आहे की धर्मासाठी माणूस?' अभ्यासातून अनुकूल उत्तर हेच मिळतं की, 'माणसासाठी धर्म आहे, धर्मासाठी माणूस नाही.' कार्ल मार्क्स म्हणतात, "धर्म ही अफूची गोळी आहे." खरं तर हे विधान नकारात्मक आणि विधायक दोन्ही पद्धतीने वापरलं जातं. पूर्वी वेदना होऊ नये म्हणून अफू वापरली जायची तर आयुष्यातल्या वेदना कमी करण्यासाठी धर्माची गरज आहे असा त्याचा अर्थ होतो आणि धर्म हा नशेसारखा असतो असाही त्याचा नकारात्मक अर्थ होतो पण मुख्य मुद्दा धर्म हा आपल्या डीएनएमध्ये प्रभावीपणे पोहोचला आहे. इथे तारतम्याने विचार करण्याची नितांत गरज असते. कारण प्रांतिक, भौगोलिक, सामूहिक गरजेनुसार विविध धर्म तयार झाले. मुख्य म्हणजे या सर्व धर्मांची रचना करणारे पुरुष होते. म्हणून सर्वांत जास्त अन्याय स्त्रियांवर झालेला आहे. तो जाणीवपूर्वक केला गेला असेल असं नाही. परिस्थितीसापेक्ष गरज आणि समज त्यामागे असणार असं म्हणावं लागतं.

कालौघात परिवर्तन घडत असतं. धर्माबाबतही असंच घडत गेलं. चांगले विचार टिकले, अंधश्रद्धा लयाला गेल्या. उदा. आपला हिंदू धर्म. खरंतर हा धर्म नसून संस्कृती आहे. चांगलं ते ठेवा, चुकीच्या समजुती गाडून टाका. आवश्यक ते पुढच्या पिढीपर्यंत न्या.

आता मनुस्मृतीसारखा ग्रंथ. आजच्या मुलांना त्याचे दाखले देण्याची गरज कितपत आहे? परवाचाच एक प्रसंग, इंग्रजीचे व्याकरण शिकवायला एका पुस्तकात उदाहरण म्हणून मनुस्मृतीचे प्रश्न वाचला. आता हा प्रश्न टाकणं हे कितपत योग्य?

Manusmrti says that every King is a representative of God and as.....we are bound to worship him.

हा प्रश्न इयत्ता चौथीच्या International English Olympiad या खाजगी संस्थेने प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला. 

दहा वर्षांच्या मुलांच्या मनात 'मनुस्मृती' हा शब्द टाकणं हे मला पटलं नाही. जो ग्रंथ असमानतेवर आधारित आहे त्याला शिक्षणात आणणं म्हणजे उलट्या दिशेने जाणं होय. राजा हा देवाचा प्रतिनिधी असतो हे मान्य करणं म्हणजेच वर्णव्यवस्था मान्य करणं. भारतात झालेल्या राजांचं कर्तृत्व अमान्य करणं. 

तारतम्याने काय टाळायचं आणि काय स्वीकारायचं हे आज ठरवायला हवं. 

आज एकविसाव्या शतकात धर्माची गरज आणि स्थान काय? 
धर्माशी निगडित मूल्यं, कायदे, विचार, आचार हे सर्व एकाच ठिकाणी आपल्याला एकत्र सापडतात-'भारतीय संविधाना'त! संविधानात मान्य केलेल्या सर्व गोष्टी एका धर्मात येतात, तो धर्म म्हणजे 'मानवता धर्म.' मानवतेची सगळी मूल्यं त्यात समविष्ट आहेत.

'माणसाने माणसाशी माणसासम वागणे-' हा सर्व मूल्यांचा गर्भितार्थ!

माणसाची व्यक्तिगत आणि सामूहिक प्रगती त्यामुळे उत्तम प्रकारे होते. मला आठवतं, दलाई लामा नाशिकला आले होते. त्यांची मुलाखत घ्यायची मला संधी मिळाली. त्यांना मी एक प्रश्न विचारला होता, तो प्रश्न हा दुसऱ्या दिवशीच्या सर्व वृत्तपत्रांची हेडलाईन ठरली- ' शिक्षणामध्ये धर्माची गरज काय?' त्याच्या उत्तरादाखल दलाई लामांनी शिक्षणाची फार चांगली व्याख्या सांगितली होती, 'टीचिंग व्हॅल्यू विदाऊट टचिंग रिलिजन इज एज्युकेशन!'-'विद्यार्थ्यांना मूल्यं शिकवायची पण कोणत्याही विशिष्ट धर्माचा आधार न घेता!'

-हिंदू धर्मातील सर्व संत-विचातवंतांनी हाच विचार मांडला. भगवद्गीतेपासून अगदी ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, कबीर आदींनी धर्माची आणि माणसाच्या जीवनमूल्यांची आणि संस्कारांची सांगड घातली आहे.

म्हणजेच धर्माचा अर्थ इथे सरळसरळ मूल्यांशी निगडित आहे. मूल्यं म्हणजे माणसाचं हितकारक, समाजोपयोगी वागणं, बोलणं. याच अनुषंगाने ज्ञानेश्वरीत 'स्वधर्म' असा एक शब्द आलेला आहे. स्वधर्माचरण म्हणजे आपल्याला नेमून दिलेलं काम अतिशय मनःपूर्वक, अभ्यासपूर्ण रीतीने पूर्ण करणं. त्यांनी ज्ञानेश्वरीत शेवटी मागितलेल्या पसायदानाचा अर्थ विद्यार्थ्यांना रोजच्या शालेय परिपाठात समजावून सांगण्याची गरज आहे. समर्थ रामदासही ‘मनाच्या श्लोकां’मध्येही ‘सदाचरण’ म्हणजे काय ते सांगतात. 

हे सगळं मुलांना शाळांमधून शिकवलं गेलं पाहिजे. पण आजकाल काय दिसतंय? संस्कारांच्या नावाखाली शाळांमधून दर आठवड्याला एखादी संस्था आपली तथाकथित धार्मिक बैठक घेऊन अवतरते, अगदी सरकारी जीआर येतो-मेडिटेशनच्या नावाखाली शाळाशाळांमध्ये धार्मिक कंडिशनिंग केलं जातं; ते थांबलं पाहिजे. कारण शाळा ही अशी जागा आहे की, तिथे येणारी मुलं ही अतिशय निर्मल असतात. त्यांना सर्व धर्मांचा सन्मान करायला शिकवलं पाहिजे. 

कोणताही धर्म घ्या, त्यातली मूल्यं तपासा, कुठेही 'वावगं' असं काहीच सांगितलेलं नाही.
ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ बायबल घ्या, 'शेजाऱ्यांवर प्रेम करा' असं त्यात सांगितलं आहे.
मुस्लिमांच्या कुराणातही 'एकमेकांची काळजी घ्या.' सांगितलं आहे. कुरणातील असे काही वचन आहेत जे एकमेकां ची काळजी प्रेम करायला सांगतात. हिंदू धर्मही हेच सांगतो. हिंदू संस्कृतीची मांडणी एकत्र सोबत प्रेमाने राहणे हीच आहे. बुद्धधर्माचा संपूर्ण पाया प्रेम आणि करुणेचा आहे. म्हणजे सर्वच धर्मांचं सांगणं 'प्रेम' आहे पण वस्तुस्थिती काय? 

सर्व धर्मांनी प्रेमाच्या आदान-प्रदानाला महत्त्व दिलेलं आहे. धर्माचा गर्भितार्थ फार पूर्वी सानेगुरुजींनी महाराष्ट्राला सांगून ठेवला आहे. 'श्यामची आई' हे पुस्तक लिहिणारे सानेगुरुजी आपल्याला माहीत आहेत. त्यांनी जगातल्या सर्व धर्मांच्या इतिहासावर एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्यात त्यांनी धर्माची गरज याविषयी सुंदर मांडणी केलेली आहे. धर्माच्या नावावर किती वाद झाले, किती कत्तली झाल्या याचं वर्णन त्यांनी या पुस्तकात केलेलं आहे. धर्माची भूमिका महत्त्वाची आहे असं जर आपण मान्य केलं तर मग भांडणं का होतात? हा प्रश्न त्या काळात सानेगुरुजींनी त्या पुस्तकात विचारला आणि उत्तरादाखल त्यांनी 'सर्व धर्मांचं सार हे प्रेम' अशी मांडणी केली. 

'खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे!'

ही त्यांची प्रार्थना या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. माणूस ही माझी जात, मानवता हा माझा धर्म आणि तोच माझा पंथ-हा 'मेसेज' शाळाशाळांमधून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला हवा. संस्कृतीचा अर्थ त्यांना याच वयात समजवायला हवा. धर्माला जोडून येणारी संस्कृती म्हणजे काय? तिच्याही विविध व्याख्या बघायला मिळतात.
मला डॉ.इरावती कर्व्यांची व्याख्या अधिक लक्षणीय वाटते-
‘संस्कारपूर्ण आणि संस्कारमय जीवन जगण्याची देशकालविशिष्ट रीत (जीवनपद्धती आणि जीवनमूल्यं) म्हणजे ‘संस्कृती’’ असं त्या म्हणतात. 

थोडक्यात, धर्मात सांगितलेल्या मूल्यांचा जीवनात इमानेइतबारे उपयोग करणं म्हणजे संस्कृती!

धर्म, संस्कृती, शिक्षण असा जर एकत्र विचार केला तर, मला ठामपणे वाटतं की, विद्यार्थ्यांमध्ये संविधानातली मूल्यं रुजवणं म्हणजे खऱ्या अर्थी त्यांना सर्वधर्मसमभाव शिकवणं होय. जोडीला त्यातून त्यांच्या मनात उदभवणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देणं महत्त्वाचं!
चार्वाकांपासून प्रश्न विचारण्याची आपल्याकडे परंपरा आहे. प्रश्न विचारून स्वतःला बुद्धिप्रामाण्यवादी बनवणं म्हणजेही धर्माची कास धरणं होय. पण तसं होताना दिसत नाही. 

हेच बघा ना मुस्लीम, ज्यू आणि ख्रिश्चन या सर्व धर्मांची मुळं जेरुसेलम या शहरात आहेत. धर्माच्या नावावर इस्रायल देशात जेवढं रक्त सांडलंय तेवढं जगात कुठेच नाही. याचाच अर्थ धर्म ही अफूची गोळी आहे आणि धर्माच्या नावाने प्रेम कमी आणि हत्या जास्त होत आहे. म्हणून या एकविसाव्या शतकात वेळ आलेली आहे की धर्मामधील प्रेम एकमेकांना समजून सांगणं आणि त्याहूनही महत्त्वाचं प्रत्येकाच्या धर्माचा आदर करणं. 

मी जन्माने हिंदू आहे. म्हणून मी त्याबद्दल अधिक लिहीत आहे. या धर्माला भरभक्कम अशी वैचारिक बैठक आहे. उलट, विचारधारा जर संकुचित असेल तर त्या धर्माचं अधिष्ठान असलेल्या माणसाची वा समूहाची प्रगती होत नाही. अर्थात, माणसं विपर्यासाची बळी ठरली नाहीत तर असं घडत नाही. महानुभावादी जे पंथ निर्माण झाले त्यांचा विचार तरी दुसरं काय सांगतो?

मात्र आता धर्माची खरंच गरज आहे का? याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. विपर्यास न करता धार्मिक शब्दाचा अर्थ अवलंबला तर धार्मिक असणं हे खूप चांगलं आहे. आपण म्हणतो, जी व्यक्ती धार्मिक असते ती चांगली असते; पण ही मोठी अंधश्रद्धा आहे. धार्मिक असेल ती व्यक्ती चांगलंच वागेल असं नसतं. माणूस चांगला वागतो किंवा वाईट वागतो याचं महत्त्वाचं कारण असतं गिल्ट कॉम्प्लेक्स. लहानपणापासून मनात तो निर्माण झालेला असतो, त्यावर चांगलं-वाईट असणं अवलंबून असतं. मी देवाला मानतो म्हणून मी चांगला आहे हे म्हणणं त्या काळात चाले पण आता नाही. कारण धर्माच्या नावाखाली धर्माचे कितीतरी ठेकेदार लोकांचं शोषण करतात हे आपण बघतो. माणूस हा देवाला घाबरत नसतो कारण चुकीचं वागलं तर 'पापक्षालन' सांगितलेलंच आहे. पाप धुवून टाकण्याची व्यवस्था ही एक चुकीची व्यवस्था आहे. ख्रिश्चन धर्मात पाप धुण्यासाठी 'कन्फेशन'ची कल्पना आहे. मुस्लीम धर्मातही पाप केल्यानंतर दानधर्म भरपूर करा मग तुम्हाला मुक्ती मिळते अशी व्यवस्था आहे. हिंदू धर्मात तर हा व्यवसायच आहे. गाय दान करा, कुंभमेळ्यात आंघोळ करा, गंगेत स्नान करा...मग मुक्ती मिळेल किंवा पाप धुतले जातील असे सांगितले जाते आणि मग माणूस एक पाप झाला की दुसरा पाप करायला तयार होतो. 

धर्माचा उगम झाला तेव्हा ही व्यवस्था ठीक होती. म्हणजे केलेलं पाप निर्मल मनाने कबूल करून ती कृती पुन्हा करणार नाही हे मान्य केल्यास आयुष्य पुन्हा चांगलं होऊ शकतं प्रत्येकाला सुधारण्याची संधी मिळालीच पाहिजे हा त्या मागचा हेतू. वाल्याचा वाल्मीकि होण्यासाठी ही धार्मिक प्रक्रिया अतिशय उत्तम पद्धतीने मानसिकदृष्ट्याही छान होती. पण आज जे दीड-दोन वर्षांपूर्वी गरजेचं होतं ते आज आवश्यक आहे का? तसं घडतं का? त्या काळात आजचा या क्षेत्रातला व्यापार व्यवसाय नव्हता. तेव्हा त्या गोष्टी, क्रिया-प्रक्रिया खूप छान होत्या. पण जेव्हा तो व्यापार सुरू झालेला आहे-पुजारी, पाद्री, मौला देवाच्या-अल्लाच्या साक्षीने, त्याच्या नावाने लोकांना लाखो रुपयांना गंडवत असतात तो धर्माचा, पापपुण्याचा एक मोठा हिस्सा झाला आहे. त्यामुळे चुकीचे संस्कार समाजात जातात. ते काढून टाकणं, चांगलं आहे ते पुढे आणणं या सारासार विचाराची आज गरज आहे. 

धर्माची दोन महत्त्वाची कामं होती-जीवन तत्त्वज्ञान आणि जगण्यासाठीचे नियम. नियमासंदर्भात धर्माचं महत्त्वाचं काम ‘कोड ऑफ कंडक्ट’. वागण्याचे नियम बनवणं -

कुराणात शरीयतमध्ये कायदा-कानूनची व्यवस्था आहे. माणसाने कसं वागलं पाहिजे हे त्यात सांगितलेलं आहे. बायबलमध्येही कायदा-कानून सांगितलेले आहेत. हिंदू धर्माच्या मनुस्मृतीतही ती व्यवस्था आहे. पण या तिन्हीतली व्यवस्था आज आपण जशीच्या तशी स्वीकारू शकत नाही. स्वीकारायचं म्हटलं तर एखादी स्त्री माझा हा लेखच वाचू शकत नाही. कारण यात दिलंय की स्त्रियांना लिहिण्याचा-वाचण्याचा अधिकारच नव्हता. मुस्लीम धर्मात म्हटलंय की कोणी व्यभिचार करायचा नाही. केला तर त्याला दगडाने ठेचून मारायचं. म्हणजे सायन्टिफिक पद्धतीने आपण हे असं अंमलात आणूच शकत नाही. म्हणून सर्व धर्मांत जे चांगलं सांगितलंय ते ठेवायचं, प्रॅक्टिकली जे शक्य नाही ते बाजूला ठेवायचं. परिवर्तनाचा विचार करून धर्म आणि संस्कृतीची वाटचाल झाली पाहिजे. 

हे सगळे विचार मांडण्याची, एकत्र राहण्यातून अनुकूल ते टिकलं पाहिजे नि प्रतिकूल ते गळून पडलं पाहिजे हा विचार जोरकसपणे रुजवण्याची जागा म्हणजे 'शाळा.'

तिथे संस्कार करा, बुद्धांची प्रेम-करुणेची शिकवण द्या, गुरुनानकांचा प्रेम नि सहकार्याचा अर्थ समजावून सांगा,  ज्ञानेश्वरांची पसायदान प्रार्थना घ्या, चारी वेद म्हणजे नक्की काय ते सांगा..त्यासाठी संविधान उघडा.

खरं तर २०००-४००० वर्षांपूर्वी जेवढे म्हणून धर्मसंस्थापक होऊन गेले त्यांचं मनापासून कौतुक करावंसं वाटतंय. कारण त्या काळात ना माहिती तंत्रज्ञान विकसित झालं होतं, ना विज्ञान विकसित होतं, गुगलबाबा नव्हता. त्यांनी त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं स्वतःच्या बुध्दितमत्तेच्या कसोटीवर शोधली. त्या काळाला ती अनुसरून होती; अप्रतिम होती. त्यामुळेच आज आपण एकत्र आहोत. बंधुभावाचा त्यांनी एकत्र राहण्यासाठी उपयोग केला. धर्माचा उद्देशच आहे, सर्वांनी आनंदाने एकत्र राहणं. त्या काळातल्या त्यांच्या ज्ञानाचं कौतुक करूया-जे चांगलं आहे ते आजही ठेवूया. 

-सर्व धर्मांचं सार आणि उद्देश म्हणजे एकत्र राहणं आणि एकमेकांची प्रगती करणं. आपल्याला भारतीय संविधानात मिळतं. तोच आपला धर्मग्रंथ मानून त्यातली मूल्यं मुलांना शिकवून एकविसाव्या शतकात वाटचाल करूया.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


Friday 7 October 2022

शिक्षणातलं ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व: महर्षी धोंडो केशव कर्वे

 शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख

माझं शिक्षणक्षेत्रातलं पदार्पणच अण्णांच्या संस्थेशी निगडित आहे. घडलं असं, या क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर माझं पहिलं का दुसरं व्याख्यान कर्व्यांच्या 'स्त्री शिक्षण संस्थे'त होतं. तिथे मला अण्णासाहेब कर्वे खऱ्या अर्थाने भेटले. आणि मला शिक्षणक्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली. तो दिवसही आठवतो, माझ्या वडिलांचा वाढदिवस होता, 16 जुलै. कर्व्यांच्या संस्थेमध्ये माझा सबंध दिवसाचा व्याख्यानांचा कार्यक्रम आखलेला होता. तिथल्या मुख्याध्यापकांनी मला कर्वे उलगडून सांगितले आणि मी कर्व्यांशी जोडला गेलो. म्हणजे सर्वार्थाने माझी या क्षेत्रातली पहिली ओळख महर्षी धोंडो केशव कर्वे या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाच्या विचारांशी झाली. सुरुवातच अशी दमदार झाल्यामुळे या क्षेत्रातला माझा वावर निश्चयपूर्वक दृढ होत गेला.

आज अनेक क्षेत्रांत घोडदौड करणाऱ्या स्त्रिया आपण बघतो, घराघरांत त्या घोडदौडीचे उमटणारे अनुकूल पडसाद अभिमानाने अनुभवतो; एकीकडे शिक्षणाला वंचित असलेल्या छोट्या-मोठ्या मुलीही बघायला मिळतात. अशिक्षितांचीही कमी नाही. पण अनुकूलता विचारात घ्यायची तर भारताने बरीच प्रगती केली असं म्हणता येऊ शकतं. आपले प्रयत्न तर आता त्याच दिशेने असतात. आपण इथवर आलो कसे? भारतात या स्त्री शिक्षणाची सुरुवात झाली तो काळ अभ्यासला की त्या काळात विचारवंतांनी नि सुधारकांनी सगळ्या बदलांसाठी जे महाप्रयत्न केले, जे अग्निदिव्य केलं ते समजतं आणि त्यांच्यापुढे नतमस्तक व्हायला होतं. ते प्रयत्न झालेच नसते तर? हा विचारही नकोसा वाटतो. हे प्रयत्न केलेल्या समाजसुधारकांपैकी अत्यंत ठळक आणि महत्त्वपूर्ण नाव म्हणजे महर्षी धोंडो केशव तथा अण्णा कर्वे. पुण्याजवळच्या हिंगणे इथे त्यांनी माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली. आता लिहायला वाक्य सोपं वाटतं; पण तेव्हा?

104 वर्षांचं दीर्घायुष्य लाभलेल्या अण्णांचा कार्यकाळ 18 एप्रिल 1858 ते 9 नोव्हेंबर 1962. मनात योजलेलं समाजहिताचं कार्य करणं तेव्हा त्यांना किती कठीण गेलं असेल? बुरसटलेले विचार आणि अन्यायकारक रूढी-परंपरा यांनी समाज ग्रस्त होता. अण्णा कर्वे यांचे विचार पेलणं आणि पचवणं तत्कालीन समाजाला सहजसाध्य नव्हतं. अण्णा मात्र स्त्री शिक्षणाच्या अनुषंगाने असलेल्या आपल्या ठाम विचारांशी कटिबद्ध होते. विधवाविवाहाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न ही त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात ठरली. स्त्रियांच्या शिक्षणासाठी अविरत झटणाऱ्या अण्णांच्या प्रयत्नांची परिणती 'महिलांसाठी स्वतंत्र विद्यापीठ' काढण्यात झाली.

रत्नागिरी जिल्ह्यातलं मुरुड हे अण्णांचं मूळ गाव. शेरवली गावी त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण कोकणातच झालं. त्यासाठी त्यांना खूप पायपीट करावी लावली. त्यांचं  महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत एलफिन्स्टन महाविद्यालयात झालं. गणित विषयात त्यांनी पदवी संपादन केली. चौदाव्या वर्षीच त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला. तेव्हा त्या 8 वर्षांच्या होत्या. वयाच्या 27 व्या वर्षी राधाबाईंचा बाळंतपणात मृत्यू झाला.

दरम्यान 1891 ते 1914 या प्रदीर्घ काळात अण्णांनी फर्ग्युसन महाविद्यालयात गणित हा विषय शिकवला. आजूबाजूचं प्रक्षोभक वातावरण, स्वातंत्र्याची रणधुमाळी या साऱ्याचा परिणाम त्यांच्यावर होत होता.

मुळात प्रखर बुद्धिमत्ता, संवेदनशीलता, सामाजिक भान यांनी परिपूर्ण. सामाजिक सुधारणांचा ध्यास घेत ते सक्रिय झाले. त्यांनी विधवाविवाह करण्याचं निश्चित केलं. आणि तो विचार अंमलातही आणला. पंडिता रमाबाईंच्या 'शारदा सदन' संस्थेत शिकणाऱ्या गोदुबाई या विधवा मुलीशी त्यांनी पुनर्विवाह केला. ही गोष्ट तत्कालीन समाजाला बिल्कुल मानवणारी नव्हती. परिणामी, अण्णा मुरुडला गेल्यावर त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत करण्यात आला. अर्थात अण्णांना हे सारं अनपेक्षित नव्हतंच. परिस्थितीशी दोन हात करत अण्णा मार्गक्रमण करत राहिले. अण्णांच्या या पत्नी आनंदी कर्वे यांना समाज 'बाया कर्वे' म्हणून ओळखू लागला. अण्णासाहेबांच्या कार्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता.


अण्णांचा पुनर्विवाह ही त्यांची व्यक्तिगत बाब नव्हती. घातक समाजरूढीविरुद्ध उचललेलं ते पाऊल होतं. म्हणूनच त्याला सामाजिक अधिष्ठान होतं. ते एक प्रकारचं 'बंड' होतं. अण्णांनी नंतर पुनर्विवाहितांचा एक मेळावा घेतला. त्यांनी 'विधवाविवाह प्रतिबंधक निवारक' मंडळाची स्थापना केली. अशा विवाहांना विरोध करणाऱ्या प्रवृत्तीला आवर घालणं हे मंडळाचं प्रमुख काम होतं. बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, केशवपन यांसारख्या रूढींत अडकलेल्या महिलांना त्यातून मुक्त होता यावं म्हणून 1896 मध्ये अण्णांनी 'अनाथ बालिकाश्रम' काढला. एकूण अण्णांच्या प्रयत्नांना हळूहळू यश येऊ लागलं. जुन्या चालीरीतींत फरक पडू लागला. लोकांचा दृष्टिकोन काहीसा बदलू लागला.

अण्णांनी उभं केलेलं विधवांचं वसतिगृह हा त्याचाच परिपाक होता. स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्यांना दिली जाणारी दुय्यय वागणूक यांचा त्यांना राग येई. पंडिता रमाबाई आणि ईश्वरचंद विद्यासागर यांच्या विचारांनी आणि कार्याने अण्णा फार प्रभावित झाले होते. थोर तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांचाही पगडा होता.

1907 मध्ये त्यांनी हिंगणे इथे 'महिला विद्यालया'ची स्थापना केली. त्यांची 20 वर्षांची विधवा मेव्हणी पार्वतीबाई आठवले या विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी होत. ही प्रगतिकारक ठिकाणं निर्माण तर झाली पण ती सांभाळणं नि वाढवणं हे एकट्यादुकट्याचं काम नव्हतं. त्यासाठी कुशल मनुष्यबळ गरजेचं होतं. म्हणून अण्णांनी 1920 मध्ये 'निष्काम कर्म मठा'ची स्थापना केली. स्त्रियांना आवडीचं शिक्षण घेता यावं म्हणून आरोग्यशास्त्र, शिशुसंगोपन, गृहजीवनशास्त्र, आहारशास्त्र असे विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले. अर्थात, स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली.

ग्रामीण भागातली स्त्रीही शिकली पाहिजे म्हणून अण्णांनी 'ग्राम प्राथमिक शिक्षणमंडळ' स्थापन केलं, अनेक शाळा सुरू केल्या.

पुढे या तिन्ही संस्थांचं कार्य वाढत गेलं. लोकांना त्यांचं महत्त्व पटत गेलं. सामाजिक परिवर्तन होऊ लागलं. यथावकाश या तिन्ही संस्थांचं एकत्रिकरण करून 'हिंगणे स्त्रीशिक्षण संस्था' निर्माण झाली. तिचं आजचं नाव आहे, 'महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्था'. 1896 साली अण्णांनी सुरू केलेल्या कार्याला 100 वर्षं पूर्ण झाली म्हणून 'महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्था' दरवर्षी शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करणाऱ्या स्त्रीला 'बाया कर्वे पुरस्कार' देते.

हे सगळं आज लिहिताना, वाचताना, अनुभवताना सहजपणे केलं जातं. पण अण्णांनी ज्या काळात सगळी धडपड केली त्या काळात त्यांना समाजाकडून खूप काही भोगावं लागलं. तीव्र सामाजिक रोष पत्करावा लागला. पण अर्थातच ध्येय स्पष्ट असल्याने आणि विचार बळकट असल्याने ते सगळ्याला पुरून उरले. मागे हटण्याचा प्रश्नच नव्हता. अपुरी साधनसामग्री, अपुरा पैसा या प्रश्नांना त्यांनी कष्टाने उत्तरं शोधली. हिंगणे ते फर्ग्युसन कॉलेज ते पायी प्रवास करत असत. पण त्या काळात दहा-पंधरा किलोमीटर चालण्याचं कर्वे यांना काहीच वाटत नसे. अगदी एक रुपया जरी देणगी मिळणार असेल, तर अण्णा पाच-सहा मैल जाऊन तो रुपया घ्यायला तयार असत!! संस्था उभ्या राहतात, त्या अशा भगीरथांमुळे! खुश होऊन ते परत निघाले.

अण्णा असेच एकदा ठाकरसींना भेटायला गेले होते. ठाकरसींनी त्यांना एक लाखाची देणगी देण्याचं आश्वासन दिलं. पुढे तर त्यांनी पंधरा लाखांचं अनुदान दिलं.

या भेटीच्या वेळी त्यांना ठाकरसींनी विचारलं, “कसे जाणार परत घरी?”
“चालत”!! अण्णा म्हणाले.
“म्हणजे? आलात कसे अण्णा?” ठाकरसींनी विचारलं.
“कसे म्हणजे? चालतच आलोय मी?”
अण्णांचं हे उत्तर ऐकून ठाकरसी अवाकच झाले. सात-आठ मैल चालत आलेले अण्णा पुन्हा सात-आठ मैल भर उन्हात चालत जाणार होते!
“नाही नाही अण्णा, तुम्ही चालत जाऊ नका, हे दोन रुपये घ्या आणि टांग्याने घरी जा!” ठाकरसींनी अण्णांना बजावलं. “बरं! बरं!” असं म्हणून अण्णा ते दोन रुपये घेऊन उठले आणि बाहेर पडले. पण ठाकरसींना चैन पडेना.

‘एकेका रुपयासाठी धडपडणारे अण्णा टांग्यासाठी दिलेले दोन रुपये सुद्धा संस्थेच्या मदत निधीत भरतील आणि स्वतः चालत जातील,’ असं त्यांना राहून राहून वाटत होतं! म्हणूनच त्यांनी आपल्या ड्रायव्हरला बोलावलं आपल्या आणि त्याला सांगितल, “पटकन जा, आत्ता जे गृहस्थ आपल्या बंगल्यातून बाहेर पडलेत, ते टांग्याने जात असतील तर परत ये. पण जर ते चालत जाताना दिसले, तर त्यांना आपल्या गाडीतून एरंडवण्याला सोडून ये.”
ड्रायव्हरने लगबगीने गाडी काढली, रस्त्यावर आणली. थोडंसं अंतर जातो न जातो, तोच त्याला दिसलं. अण्णा रस्त्यावरून खरोखरच चालत एरंडवण्याकडे निघाले होते!

प्रत्येक वेळी काही अण्णांना असा अनुभव येत असे असं नाही; संस्थेसाठी निधी जमवताना अनेकदा त्यांना अपमानास्पद वागणूक सहन करावी लागे.

स्त्रीशिक्षणासाठी सर्व काही हे जणू त्यांचं ब्रीद होतं. आजच्या 'मुलगी शिकली प्रगती झाली' या उक्तीचा उगम अण्णांच्या विचारांत सापडतो. स्वतंत्र महिला विद्यापीठाची कल्पना त्यांच्या डोक्यात घोळत होतीच. जपानच्या महिला विद्यापीठाला भेट दिल्यानंतर ते कमालीचे प्रभावित झाले. त्यांच्या डोक्यातली कल्पना दृढ झाली. मग त्यांनी 1915 ला पुण्यात पहिल्या भारतीय महिला विद्यापीठाची स्थापना केली. विठ्ठलदास ठाकरसी यांनी पंधरा लाखांचं अनुदान दिल्याने विद्यापीठाचं नाव 'नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ' असं ठेवण्यात आलं. (एस.एन.डी.टी.)

एखाद्या गोष्टीचा ध्यास असणं आणि नियोजित कार्याला वाहून घेणं याचं अण्णा कर्वे हे मूर्तिमंत उदाहरण होय. इंग्लंड,जर्मनी, जपान, अमेरिका या देशाना भेटी देऊन त्यांनी आपल्या संस्थांची माहिती दिली. भारतातल्या या घडामोडींची जाणीव करून दिली.

बर्लिनमध्ये त्यांनी सापेक्षतावादाचे प्रणेते प्रा.अल्बर्ट आईन्स्टाईन यांची भेट घेतली. तिथली गृहविज्ञान शाखा पाहिली. सहसा कोणाबरोबर फोटो काढून घ्यायला उत्सुक नसलेल्या आईनस्टाईन यांनी स्वत: कर्वे यांच्यासोबत फोटो काढायला लावला. आईनस्टाईन नेहमी ज्या खुर्चीत बसत ती खुर्ची त्यांना बसायला दिली आणि स्वत: दुसर्‍या खुर्चीवर बसले!

टोकियोतलं महिला विद्यापीठ अण्णांनी पाहिलं नव्हे फक्त, स्वतःच्या मनातली संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला. अशा निग्रही माणसांनी मोठी स्वप्नं पहिली नि प्रत्यक्षात उतरवली म्हणून आजचा आपला वर्तमानकाळ सुसह्य आहे. पुढच्या पिढीचा भविष्यकाळ अधिक चांगला होण्यासाठी अण्णांच्या विचारांची आणि कार्याची ओळख आजच्या विद्यार्थ्यांना करून देणं हे आपलं कर्तव्य आहे. अण्णांनी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांत आत्मचरित्र लिहिलं आहे. मराठी (आत्मवृत्त, इ.स. १९२८) आणि इंग्रजी (लुकिंग बॅक, इ.स. १९३६) अण्णांचं आत्मलेखन आपण मुलांपर्यंत पोहोचवायला हवं.

अनेक राष्ट्रांतल्या स्त्रियांनी चालवलेल्या संस्था अण्णांनी पाहिल्या होत्या. अण्णांच्या चाणाक्ष नजरेने टिपलेले आणि संवेदनशील मनाने घेतलेले अनुभव इथे प्रगतीच्या मार्गावरचे टप्पे ठरले नसते तरच नवल होतं. आजही 'कर्वे स्त्रीशिक्षण संस्था' महाराष्ट्रात भरीव कार्य करत आहे.

धोंडो केशव कर्वे यांच्या असामान्य कार्यकर्तृत्वाबद्दल अनेक भारतीय विद्यापीठांनी त्यांना डी.लिट. पदवी प्रदान केली आहे.

‘पद्मविभूषण’ किताबाने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या शंभराव्या वाढदिवशी 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन अण्णांना गौरवण्यात आलं. सर्वसामान्यपणे प्रघात असा आहे, की पुरस्कार स्वीकारणार्‍याने राष्ट्रपतींजवळ जाऊन तो स्वीकारायचा असतो. मात्र, राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद तो प्रघात मोडून दोन पायर्‍या खाली उतरून कर्वे यांच्याकडे गेले आणि त्यांनी कर्वे यांना पुरस्कार प्रदान केला!

अण्णांना एकूण चार मुलगे-
रघुनाथ, शंकर, दिनकर आणि भास्कर. या चौघांनीही पुढे आपापल्या क्षेत्रात  वैशिष्ट्यपूर्ण आणि भरघोस कार्य केलं.

104 वर्षांचं दीर्घायुष्य लाभलेल्या अण्णांनी आयुष्याचा बहुतांश काळ समाजहितासाठी खर्च केला आणि सत्कारणी लावला. या 'भारतरत्ना'चं 9 नोव्हेंबर 1962 रोजी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं.

पण त्यांचं कर्तृत्व मात्र खरोखरच अजरामर आहे.

नेतृत्व-दातृत्व-कर्तृत्व-वृद्धत्व असावं तर ऋषितुल्य महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासारखं.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...