Saturday 23 October 2021

Less is More

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख.

आमची आई नेहमी म्हणत असे, "या हल्लीच्या मुलांना ना कशाचं काही अप्रूप राहिलेलं नाही." आमची 'अप्रूप' म्हणजे काय इथपासूनच सुरुवात..अप्रूप म्हणजे एखादी गोष्ट मिळाल्यावर तिचं वाटणारं महाप्रचंड कौतुक. खरंच ते दिवसेंदिवस कमी होत चाललंय. क्षणापुरती 'सरप्राईज' परंपरा सुरू झाली असली तरी अप्रुपातली आत्मीयता त्यात नाही. 

अलीकडे मुलांना मागताक्षणी किंवा त्याहीपूर्वी सारं मिळत जातं हे त्याचं मुख्य कारण आहे. दहावी चा निकाल चांगला लागला तर काका किंवा मामा यांच्याकडून पहिलं मनगटावरचं घड्याळ मिळायचं ही गोष्ट आमच्या पिढीपर्यंत घडत होती. आताच्या काळात तोवर मुलांची 4-5 घड्याळं वापरून मोडून फेकून झालेली असतात. काही जण तर बालवाडीपासून घड्याळ घालतात. त्यात त्यांचा दोष नाहीये, वापरून फेकून देण्याची म्हणजे युझ अँड थ्रो अशी त्यांची मानसिकता घडण्याला आपणच जबाबदार आहोत. मागितलं की मिळतं हा संस्कार आपणच केला. आजोबांनी खूप काळ वापरलेलं पेन त्यांनी आपल्याला बक्षीस म्हणून दिल्यावर त्याच प्रेमाने ते जपून ठेवायला आपणच त्यांना शिकवायला हवं, नाहीतर "आता असं शाईचं पेन फारसं कोणी वापरतच नाही आजोबा." म्हणत ते नाकारलं जाण्याचीच शक्यता अधिक. म्हणूनच वस्तूंचं, माणसाचं महत्त्व आपणच वेळोवेळी त्यांना सहजपणे समजावून द्यायला हवं. मुळात आपलं वागणं तसं असेल तर ते त्यांना आपोआपच कळत जाईल. 

आता दिवाळीच्या निमित्ताने खरेदी करताना, भेटवस्तू देता-घेताना या सगळ्याचा विचार करूया, एक वेगळं भान बाळगूया. वस्तू आणि माणसं यांच्यातल्या दुवा असलेल्या भावनांची जाणीव ठेवूया. आवश्यक त्याच वस्तू घ्यायला-द्यायला मुलांना शिकवूया, त्याआधी स्वतःला ती सवय लावून घेऊया. बिन गरजेची खरेदी आपणच टाळूया तर तो संस्कार मुलांवर आपोआप होईल. एक मोबाईल असताना दुसरा मोबाईल, असंख्य कपडे, ढीगभर केलेलं ऑनलाईन शॉपिंग…ते करून झाल्यावर मग त्याची जाणीव होऊन कुरकुर करण्याला किंवा हळहळण्याला काहीच अर्थ नसतो. पूर्वीच्या काळात गरजेपुरते कपडे असायचे. त्यामुळे दिवाळीला मिळणाऱ्या नवीन कपड्यांचं अप्रूप असायचं. आता वर्षभर ऑनलाईन खरेद्या सुरू असतात. मग दिवाळीला त्या सार्‍याहून जास्त महागातल्या गोष्टी घ्यायच्या. मुलांच्या मित्रमंडळाच्या वर्तुळात कोणाकडे काय आहे त्याहून अधिक चांगलं आणि अधिक संख्येने त्यांना ते हवं असतं. त्यांच्या या मागणीला आळा घालायला आपणच त्यांना शिकवायला हवं. डझनावारी जीन्स घरात असताना केवळ अमुक एका पॅटर्नची मला हवी ही मागणी करण्यापूर्वीच आपण हे शहाणपण त्यांना देऊया. बाजारातून आणलेल्या महागड्या चॉकलेट्सइतकंच किंवा त्याहून अधिक महत्त्व आई-आजीने केलेल्या नारळाच्या वडीला असतं हे मुलांना जाणवायला हवं.

याचा अर्थ हौस-मौज करायचीच नाही असा अजिबातच नाही. हौसेला मोलच नसतं. हल्ली एकुलती एक मुलं असण्याच्या जमान्यात त्यांना हौसेने सगळं घेण्या-करण्यातच आपलंही सुख सामावलेलं असतं; पण ‘तारतम्य’ हा शब्द त्यांना सांगणं, शिकवणं, त्यांच्या मनात रुजवणं हे आपलंच काम आहे. अन्यथा ती वाहवत जायला वेळ लागणार नाही. एकदा मागितलं की मिळतं हा विचार मनात रुजला तर मोठेपणी हे अवघड होतं. मुलं हट्टी होतात आणि मग या हट्टी मुलाचा एक दिवस हट्टी बॉस बनतो आणि जॉबमध्ये.. नोकरीमध्ये.. ॲडजस्ट करण्याची सवय राहत नाही. वस्तूंना महत्त्व आहे माणसांना महत्त्व नाही असा चुकीचा अतार्किक विचार त्यांचं तत्त्वज्ञान बनतं. 

हे घडू नये म्हणून आजच मुलांवर काम करणं आवश्यक आहे. दिवाळीत घरी केलेला आकाशकंदील आणि हजार-पाचशे रुपयांचा सुद्धा बाजारातून विकत आणलेल्या आकाश कंदील यातला फरक त्यांना कळायला हवा. या वस्तू विक्रेत्यांच्या रोजी-रोटीचा विचार करतानाच आपल्या मुलांच्या मानसिकतेचाही विचार करणं आपलं कर्तव्य आहे. त्यांच्या विचारप्रक्रियेची मूळं घट्ट झाली पाहिजेत. ती योग्य दिशेने विस्तारली पाहिजेत. त्यासाठी आपल्याला चार जास्त कष्ट घ्यायला लागले तरी हरकत नाही. या सगळ्या गोष्टी मुलांसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी प्रतीकात्मक असतात. त्या आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहणार असतात. 

प्रश्न कंदील आणि बाकी कशाचा नसतो. आपण त्यांच्याबरोबर बसून तो करण्यातल्या आनंदाचा असतो. शाळेत त्यांना सांगितलेली प्रोजेक्टस आपण त्यांच्याबरोबर करायला बघतो कारण तिथे मार्कांचा प्रश्न असतो. मग कंदील का नाही? अर्थात, अनेक घरांमधून आता असाही विचार केला जातो. पण जिथे केला जात नाहीये तिथे तो जरुर व्हायला पाहिजे. संकटजन्य परिस्थितीतून जग जात असताना सणा-उत्सवांना अधिक वेगळं वळण देऊन ते निभावायला आपणच मुलांना शिकवलं पाहिजे.
अनावश्यक खरेदी आणि खर्च टाळून तो अनेक गरजू माणसांच्या उपयोगी कसा पडू शकतो त्याचं उदाहरण घालून दिलं पाहिजे. 

वास्तवात ज्यांना खरे ठिगळ लावलेले कपडे वापरायला लागत आहेत त्यांच्याकडे मुलांचं लक्ष वेधलं पाहिजे; तरच महागातल्या जीन्सवरच्या कृत्रिम पॅचचा अर्थ त्यांच्या लक्षात येईल.
नो डाउट ती फॅशन आहे. असेल गरज तर ती स्वीकारायची पण त्याच वेळेस इतरांची गरज भागवायलाही शिकायचं हा संस्कार मुलांवर झालाच पाहिजे. तरच आपल्याबरोबर इतरांची ही दिवाळी आनंदाने साजरी होऊ शकते. त्यात आनंद मानायला मुलांना शिकवा. 

दिवाळीच्या निमित्ताने नवीन कपडे, खेळ, वस्तू यांची खरेदी जरुर होऊ द्या. पण भान राखून संयमाने आणि गरजेच्या गोष्टींची.
तर सरप्राईजबरोबरच ‘अप्रूप’ शब्दालाही त्याचं महत्त्व राखता येईल!

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


Saturday 16 October 2021

पूर्णचंद्र कोजागिरीचा.. अनुभव संपन्न पालकत्वाचा..

परवा माझ्या मुलाचा मित्र घरी त्याच्याबरोबर खेळायला आला. मी फोनवर एकाला भेटायची वेळ देत होतो.. कोजागिरीनंतर भेटूया असं बोलणं चालू होतं.. माझा फोन झाल्यावर माझ्या मुलाचा मित्र म्हणाला, "अंकल कोजागिरी काय असते?" मी त्याला म्हटलं, " नक्कीच सांगतो.. " माझ्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना आमच्या कॉलनीमधली कोजागिरीची गोष्ट सांगायला सुरुवात केली. लहानपणी दणक्यात साजरी व्हायची आमची कोजागिरी. सगळे सण व्हायचे, पण मला ही अश्विन पौर्णिमेला साजरी केली जाणारी कोजागिरी फार आवडायची. 

आई सांगायची," या मध्यरात्री साक्षात लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते आणि 'को जागरती?' असं विचारते."

आता आपण मोठं होता होता, ' कोण सजग आहे, कोण अलर्ट आहे,' हे ती पाहून जाते असा अर्थही काढू शकतो पण तेव्हा मला ते आणि तेच खरं वाटत असे हे खरं! 

अहाहा.. दिवसभर चाललेली ती तयारी... रात्री दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, बेदाणे, वेलची, चारोळी, जायफळ, साखर वगैरे घालून लक्ष्मीदेवीला त्या दुधाचा नैवेद्य दाखवायचा.. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणं पडू द्यायची.. मग ते दूध प्राशन केलं जायचं.. या आटवलेल्या दुधाचे चंद्रकिरणांमुळे गुणधर्म बदलतात. ते आजारी व्यक्तीला दिल्यास त्याला आराम पडतो असं मानलं जातं.. तश्या मान्यता होत्या.

कोकणात या पौर्णिमेला 'नवान्न पौर्णिमा' म्हणतात. पाऊसपाणी झालेलं असतं, नवं पीक आलेलं असतं. मग या दिवशी शेतकरी निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त करतो. 

भारतात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे कोजागिरी साजरी करतात, मात्र आटीव दुधाचं त्या दिवशी सगळीकडे  सारखं महत्त्व दिसून येतं. नाशिक ला आमच्या कॉलनी मध्ये सर्व मित्र मैत्रिणी आणि त्यांचे आई-बाबा एकत्र येऊन दूध पितात हेच आम्हाला खूप भारी वाटायचं.

उत्तररात्रीपर्यंत जागरण करायचं, त्याचं फार मोठं कौतुक असायचं आम्हाला. या दिवशी प्रत्येक कुटुंबातल्या ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची 'आश्विनी' साजरी करायची असते.

आमच्या आईची खासियत होती की ती फक्त दादाला नाही तर, आम्हा सर्व भावंडांना ओवाळत असे. आमचे वडील त्या दिवशी ऑफिसातून लवकर घरी येत. घरात सगळे नातेवाईक नि मित्रमंडळी जमत असत. एकेकाच्या गच्चीवर किंवा अंगणात एकेकाची एकेकटी कोजागिरी नाही साजरी व्हायची कधी.

अजूनही हे आपण करू शकतो. कोरोनाच्या काळात बंधनं आली पण चंद्र तर कुठे गेला नाही ना? तो आहेच नि असणारच, म्हणूनच अजूनही कोजागिरी साजरी होऊ शकते. माणसं जमवण्यावर मर्यादा आहे ना? मर्यादेत जमू. पण अमर्याद ज्ञानसंपादनाला नि आनंदाच्या देवाणघेवाणीला तर मर्यादा नाहीत ना? ती संधी का घालवायची?

त्या निमित्ताने मुलांना धारोष्ण दूध म्हणजे काय ते समजावूया; गायीचं दूध कसं काढतात, ते आपल्यापर्यंत शहरात कसं पोहोचत ते सांगूया. आपण जरी आता छोट्या-छोट्या घरांमध्ये अडकून राहत असलो तरी विस्तीर्ण आकाशातला कोजागिरीचा चंद्र आसमंत कसा उल्हासाने उजळून टाकतो ते दाखवूया ...दूध आटवूया. दूध आटवताना पातेल्यामध्ये बशी का टाकायची? ती उलटी ठेवायची का सुलटी.. अशा अनेक गोष्टी मुलांना शिकवता येतील. या कोजागिरीला मर्यादा पाळत जमेल तितक्यांनी जमूया.. अन्यथा, आपल्या मुलांपर्यंत पोहोचणार कसे हे आनंद? आपण लहानपणी मिळवलेल्या आनंदावर त्यांचाही हक्क आहे. हे आनंद कालातीत असतात.

आज त्यांना फेसबुकवर हजारो मित्रमैत्रिणी मिळतात; पण ती मैत्री 'स्मायली'त अडकलेली. खऱ्या हास्याचं रूप त्यात कसं उमटणार? आपण तो आनंद त्यांना मिळवून देऊया. पार्टीज होतात हल्ली पण कोजागिरी? करत असाल साजरी तर आनंदच, पण नसाल तर कराच..

नाहीतर शेअरिंग या शब्दापासून कोसो दूर राहतील आपली मुलं. हजार मित्र असूनही एकटी पडतील. तसं नको व्हायला, हाय- हॅलो च्या पलीकडची मैत्री कळूदे त्यांना. त्यांनी सोशल असलंच पाहिजे, तेही खऱ्या अर्थाने. 

सगळ्यांनी जमायचं, गाणी गायची.. ते नादमधुर संगीत... ती लय.. यावर तर बंधन नाही ना? गाऊया, ऐकूया, ऐकवूया.. त्यात खंड नको. पण धांगडधिंगा तसंच काही अपवादात्मक ठिकाणी चालणारं मद्यपान यांना हद्दपार करून सौम्य नि शीतल अनुभवाला आपलंसं करूया.. निसर्गानुभव घेत चंद्रकिरणांमध्ये न्हाऊन निघूया…

चंद्राच्या साक्षीने मिळणाऱ्या या उत्साहाचं निमित्त निसटून नको जायला...

अलगद मुठीत गवसणाऱ्या या पूर्णचंद्राची प्रतिमा वर्षभर पुरते आपल्याला, पुढच्या कोजागिरीपर्यंत! अशा आठवणीतूनच बालमन आणि बालपण समृद्ध होतं. 

आयुष्य म्हणजे विविध आठवणी आणि त्यांच्या इमेजेस.. या इमजेस जेवढ्या जास्त आणि आनंदी तेवढं आयुष्य समृद्ध. आपल्या पाल्यांचं आयुष्य समृद्ध करणं हे आई-वडील म्हणून आपल्या हातात असतं.. बिझी आहे, वेळ नाही, नोकरी आहे, डेडलाईन आहेत, अर्जंट काम आहे, बॉसने ओव्हरटाईम दिला.. हे चालूच असतं पण कोजागिरीसारखे प्रसंग वर्षातून कमी येतात.. त्यामध्ये मुलांना स्वतः कामं करू देणं, गप्पांची मैफल जमवणं आणि मुख्य म्हणजे मोबाईलमधून बाहेर येऊन प्रत्यक्ष जीवन अनुभवणं याचा आनंद काही वेगळाच..

पुढे अनेक वर्षांनी प्रौढावस्थेत जेव्हा आपल्या मुलांना या साजऱ्या केलेल्या अनेक कोजागिरी पौर्णिमा आठवतील तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर फुलणाऱ्या हास्याची सुरुवात या कोजागिरीच्या मैफलीनेच होऊद्या...

'चंदा मामा' ते तुझ्यासाठी, 'चांद तारे लेके आऊंगा..' या पूर्ण प्रवासात कोजागिरीचा टप्पा हा फार महत्त्वाचा असतो आपल्या पाल्याच्या बालपणासोबत त्यांच्या तरुणपणातील रोमँटिक पणा जिवंत ठेवण्यासाठी कोजागिरी साजरी करा. 

सचिन उषा विलास जोशी

शिक्षण अभ्यासक



Saturday 9 October 2021

'धोक्याची घंटा कशाला?' आधीच जागं होऊया!

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख.

शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज घेताना मुंबईच्या एका क्रूजवर धाड टाकून पोलिसांनी पकडलं. ही बातमी आल्याबरोबर सोशल मीडियावर जोरात चर्चा सुरू झाली की, "श्रीमंतांमध्ये असंच होतं", "बॉलीवूडमध्ये सगळे ड्रग्स घेतात", "फिल्मस्टारची मुलं तर वायाच गेलेली असतात".. वगैरे..वगैरे..
खरं तर कुठल्याच पालकांना हे मान्य होणार नाही की आपला मुलगा-मुलगी ड्रग्ज घेतात... तरीही ही मुलं तिकडे का वळतात?
मुख्य म्हणजे हे फक्त उच्चभ्रू..'पेज थ्री'मधील कुटुंबातच घडतं का? तर मुळीच नाही.
मी 'एज्युकेशन ऑन व्हील' या सामाजिक संस्थेतर्फे कितीतरी वर्षं झोपडपट्टीमधील शाळाबाह्य मुलांसोबत काम करतो. मी पाहिलं की काही मुलं आयोडेक्स पावाला लावून खातात.. त्यांना त्याने चांगली झोप लागते, व्हाइटनरची नशा करणाऱ्या इयत्ता चौथी पाचवीच्या मुलांचं मी समुपदेशन केलं आहे. स्टेशनरीच्या दुकानात मुलांना व्हाइटनर विकू नका याबाबत जनजागृती केली आहे. मला आठवतं, एकदा नाशिकचे प्रतिष्ठित नागरिक श्री.पटवर्धन यांचा मला फोन आला.
मला म्हणे, "सचिन अरे एक मुलगा आहे, जो खूप दारु पितो, आईला मारतो, त्याचं समुपदेशन कर."
मी म्हटलं, "सर मी शाळाबाह्य मुलांवर काम करतो व्यसनाधीन मुलांवर नाही.. त्याला व्यसन मुक्तीला टाका." तेव्हा ते म्हणे, ''अरे आमच्या कामवालीचा हा मुलगा आहे, पाचवीमध्ये शिकतो.''
मला धक्काच बसला. पुढे त्याला गंगेवर शोधले
. समुपदेशन करून घोटीच्या आश्रमशाळेत दाखल केलं. ट्रीटमेंट केली. त्याच्याशी सातत्याने संपर्कात राहिलो.अर्थातच याचा फायदा झाला.त्याच्याशी नीट संवाद साधला गेल्याने कोणीतरी आपल्याबरोबर आहे ही जाणीव त्याला एक आपलेपणा देऊन गेली, वाममार्ग सोडून तो चांगल्या मार्गाला लागला.
इतकंच नाही तर , पुढे तो दोन वर्षात शाळेत अभ्यासात पहिला आला. तर तीन वर्षांनी जिल्ह्यामध्ये विज्ञान प्रदर्शनात त्याचा पहिला क्रमांक आला. 

सांगायचा मुद्दा हा की, ड्रग्ज किंवा दारु हे व्यसन तरुणपणीच लागतं असं नाही तर शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा लागतं. मुख्य म्हणजे ते पालकांच्या कुठल्याही स्तरावर लागू शकतं. अतिश्रीमंत, उच्चभ्रू पालकांच्या मुलांना सुद्धा आणि अति गरीब वस्तीमधील मुलांनासुद्धा ते लागू शकतं. पण दोघांमध्ये एक समान धागा असतो तो म्हणजे या मुलांच्या पालकांपाशी त्यांच्या मुलांना देण्याकरता 'वेळ' अजिबात नसतो.

आई वडील दोघंही जर मुलांना वेळ देत नसतील, त्यांचं डोळस लक्ष नसेल तर अशा गोष्टी जास्त प्रमाणात घडू शकतात. हे वाचल्यावर "मी पालक म्हणून मुलांना वेळ देत नाही" ही जाणीव होऊन लगेच तुमच्यामध्ये अपराधीपणा जागा होईल. नोकरी सोडू का? असा विचार येईल. तुम्ही हतबल व्हाल, स्वतःला दोष द्याल..पण नोकरी उद्योग दूर ठेवून सतत मुलांबरोबर राहणं म्हणजे त्यांना वेळ देणं नव्हे.
इथेच आपली सर्वांची गोची होते. मुलांना वेळ देणं याचा अर्थच आपण चुकीचा काढतो. अभ्यास केला का? जेवलास का? झोपलास का? क्लासला गेलास का? हे प्रश्न विचारणं किंवा हे करून घेणं याला वेळ देणं समजलं जातं. जास्तीत जास्त आठवड्यातून दोनदा मॉलला फिरवून आणणं, खेळणी विकत घेणं, शाळेची पुस्तकं घेणं, फी भरणं; म्हणजे पालक म्हणून माझं कर्तव्य झालं असा बऱ्याच जणांचा समज असतो. यालाच वेळ देणं समजलं जातं.

पण मुलाला-मुलीला देण्यात येणारा वेळ हा 'क्वालिटी टाईम' असायला हवा. किती वेळ देतो यापेक्षा कसा देतो याला खूप महत्त्व आहे. यामध्ये त्यांच्या अडचणी समजून घेणं, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणं, तुमचे अनुभव शेअर करणं, त्यांचे अनुभव ऐकणं, त्यांच्या मित्र-मैत्रिणींशी बोलणं, त्यांना घरी बोलावणं, त्यांच्याबरोबर 'अभ्यास' हा विषय सोडून सर्व विषयांवर गप्पा मारणं आणि या सर्व गोष्टी मनापासून करणं, त्या करताना तुमचा मोबाईल बाजूला ठेवणं खूप गरजेचं आहे.मुलांना जेव्हा आपण मोबाईल फक्त अभ्यासा पुरता वापरा, कामापुरता वापरा सांगतो, तेव्हा आपल्याला आधी ती गोष्ट साधायला हवी. शक्यतो या वेळेत फोन अटेंड न करणं आपण जमवायलाच हवं.

ही सगळी प्रक्रिया मनापासून साधली तर मुलं तुमच्याशी शेअर करायला लागतात. मग त्यांना एकटं वाटत नाही. आयुष्याचा अर्थ ते तुमच्याबरोबर समजून घेतात. या वेळेला तुमचा बोलण्याचा टोन जर उपदेश देणारा नसेल तर तुमची आणि त्यांची मैत्री होते. ती तुमच्याशी गुजगोष्टी करायला लागतात.अगदी त्यांच्या मनाच्या आतल्या कप्प्यातल्या गोष्टीही अलगद तुमच्यापर्यंत येतात.
मुलं शेअर करायला लागली तर लपवणं बंद होतं. मग ड्रग्ज, व्यसनं या विषयांवरही तुम्ही त्यांच्याशी खुली चर्चा करू शकता. त्या वाईट सवयीचे परिणाम त्यांना समजावून देऊ शकता.
मुलं वाईट मार्गाला लागण्याआधीच धोक्याची घंटा वाजते. मग मुलांना योग्य मार्गावर आणणं सोपं जातं. त्यासाठी तुम्ही स्वतः निर्व्यसनी असाल तर अधिक उत्तम.
मुद्दा एवढाच आहे की शाहरूखचा मुलगा असो किंवा एखाद्या कामवाल्या गरीब कष्टाळू बाईचा; पालकांनी मुलांना 'क्वालिटी टाईम' देणं खूप महत्त्वाचं आहे. एवढं होऊनही मुलं वाईट मार्गाला जात असतील तर सुनील दत्तच्या भूमिकेत येऊन संजय दत्तसारखं ड्रग्जच्या विळख्यातून मुलांना बाहेर काढायला हवं.
त्यासाठी एक सूत्र वापरायला पाहिजे, ते म्हणजे 'LOVE' चं स्पेलिंग 'TIME' म्हणून वाचायला आपण शिकायला हवं. गोष्ट घडून गेल्यावर चुकचुकण्यात, हळहळण्यात काहीच अर्थ नाही, आधीच सतर्क आणि सजग असणं फार आवश्यक आहे आणि मुलं चुकली तरी त्यांना योग्य मार्गावर आणने हे सुद्धा पालकांचं काम आहे. शाहरुख खान जे आर्यन साठी करेल ते पिता म्हणून तो ते करेलच पण आपण लगेच त्याला दोषी ठरवून "हे असेच असतात" हे ही बोलणे योग्य नाही. तरुण मुलांना सुधारण्याची एक संधी असलीच पाहिजे. कायद्याच्या चौकटीत जी शिक्षा होईल ती होईलच.. प्रश्न एवढाच आहे की आपल्या घरात असे होऊ देऊ नका. त्यासाठी मुलांना वेळ द्या.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक



Saturday 2 October 2021

दसरा-दिवाळीनिमित्त चिमुकल्यांच्या हातांना कामं देऊ..

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख

 "आईs फक्त पाच मिनिटं ना.." हे घराघरातलं सकाळचं ब्रह्मवाक्य असतं. "उठ आता. ऑनलाईन असली म्हणून काय झालं, शाळेच्या आधी आवरून नको का व्हायला?"

काळाची गरज म्हणून 'ऑनलाईन' हा शब्द ऍड झाला असला तरी हा संवाद तसा पारंपरिकच! 

तूर्त, के.जी.पासून पीएच.डी.पर्यंत सर्वांचेच ऑनलाईन शिक्षण देण्या-घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता कुठे शाळा सुरू होऊ घातल्यात. सगळ्या सकारात्मक बदलांची अपेक्षा करूया. 

अर्थात या ऑनलाईन पद्धतीचे आभार मानायला हवेत. अन्यथा गेल्या दीड वर्षातलं चित्र काय असतं? कल्पनाही करवत नाही. कोरोना काळात तंत्रज्ञानामुळे आपण इतपत तरी तरलो. पण जेव्हा या तंत्रज्ञानाची पुसटशी ओळखही नव्हती तेव्हा माणसं कशी जगत होती? निखळ आनंदात जगत होती आणि तो अज्ञानातला आनंदही नव्हता. त्यामागे अनुभवातून आलेली समज होती. अनुभवातून शिक्षण हे प्रत्यक्ष देणं असतं, ऑनलाईनमधून माहिती देता येते.

आमच्या निरक्षर पणजीआजीकडून खूप काही शिकायला मिळाल्याचं आजी, आई सांगत आल्या. 'अक्षरवाचन’, ‘अंकलेखन’ यांपासून ही मंडळी कोसो दूर होती. तरीही त्यांचं व्यवहारज्ञान चोख होतं. अगदी जात्यांवरच्या ओव्यांमधून स्त्रिया साहित्यानंदही मिळवत होत्या. हल्ली डिजिटल वॉचचा जमाना आहे पण तेव्हा घड्याळही सर्वांकडे नसे; पण काही अडत नसे, वेळ कळायला सूर्यकिरणं पुरेशी होती. मूल्य आणि संस्कारांबद्दल म्हणायचं तर ते वाखाणण्याजोगे होते. त्या साऱ्या पुण्याईवरच तर आज आपण उभे आहोत. मग कशाला हा सारा शिक्षणाचा महान खटाटोप? सटासट शाळा बंद करूयात की!

तसं अजिबातच नाही. मुळात चांगला असलेला उपयुक्त पदार्थ करताना तो अधिक पौष्टिक व्हावा म्हणून हा सारा पुढचा खटाटोप आहे. मुळातलं साहित्य फेकून नाही द्यायचं. 'जुनं ते सोनं' या न्यायाने पूर्वीचे मूल्यात्मक संस्कार जपायचे नि ते वृद्धिंगत करायचे आधुनिकतेची आणि तंत्राची जोड देऊन. छोट्या छोट्या गोष्टींमधून अभिनिवेषाशिवाय अगदी सहजपणे आपण हे करू शकतो. हा सहजपणा खूप महत्त्वाचा. अन्यथा सगळ्या गोष्टी कृत्रिम ठरू शकतात. पारंपरिक आणि आधुनिकता यांची एकत्र सांगड घालणं महत्त्वाचं.

मुलांमध्ये व्यवहारज्ञान आणायचं असेल तर त्यांना प्रत्यक्ष काम करू देणं हा एकमेव उपाय असतो..त्यासाठी घरातील छोट्या-मोठ्या निर्णयांमध्ये त्यांना सामील करून घेणं, घरातील सर्व कामं करण्यासाठी त्यांना प्रेरणा देणं, त्यांच्यासोबत आपणही काम करणं हा उत्तम मार्ग असतो. पण या ऑनलाईन काळात मुलांना काय आपल्याला पण काम करण्याची सुस्ती आलेली आहे. ही सुस्ती पुढे जाऊन फार धोकादायक बनेल. ती झटकणं आवश्यक आहे.

आता सणांचे दिवस आलेत. नवरात्र, दसरा, दिवाळी येईल. घरीदारी वेगवेगळ्या पदार्थांचा घाट घातला जाईल. पालकांच्या कार्यबाहुल्यामुळे बाहेरूनच पदार्थ विकत आणायची सवय असलेल्या घरांतील मुलांना चकली पाडण्याचा 'सोऱ्या' माहीत असेलच असं नाही. जातं, उखळ यांची तर गोष्टच सोडा. या गोष्टी आपल्या पिढीनेही वापरलेल्या नाहीत. अभ्यंग स्नानासाठी तांब्याचं घंगाळ आता वापरात नाही; जे शास्त्रीयदृष्ट्या खरं तर अत्यंत आवश्यक असतं. असो! 

या सर्व परिस्थितीला आपण थोडा फार शह देऊ शकतो. आपल्या मुलांना या सर्वात सामील करून अनुभवातून शिक्षण द्या त्यासाठी-

''दसऱ्याचं तोरण मुलांना करू द्या,

दिवाळीचा कंदील करून

चकल्या पाडू द्या.

घरकामात त्यांची मदत घ्या. 

उंच झाडूने त्यांना छत झाडू द्या." 

आम्ही स्वतःच कुठे हे सर्व घरी करतो? मुलांच्या आणि त्यातून मिळणाऱ्या स्वतःच्या आनंदासाठी करून तर बघूया थोडं. एरव्ही इतक्या ऍक्टिव्हिटीज घेत असतो मुलांच्या आपण! आता अजूनही रेंगाळणाऱ्या कोरोनाकाळात बऱ्याच प्रमाणात घरी असल्यामुळे हे शक्य आहे आपल्याला. दसरा, दिवाळीच्या निमित्ताने करूया सुरुवात. कारण हे जीवनशिक्षण सणा-उत्सवांपुरतं मर्यादित नाही तर ते अव्याहत मिळणारं आहे. घरगुती कामांपासून बाह्य जगापर्यंत पोहोचणाऱ्या या सगळ्या क्रिया-प्रक्रिया म्हणजे जीवनशिक्षणातले घटक आहेत. पुस्तकी ज्ञान जितकं आवश्यक तितकंच सर्व बाबतींत कृतिशील असणं गरजेचं आहे. 

बाल मेंदूची जडणघडण या कृतिशीलतेने होते. मुलं जेवढं हाताने काम करतील तेवढी मेंदूतील पेशींना चालना मिळेल. ऑनलाईनमुळे आणि अतिरिक्त स्क्रीन टाईममुळे जी मेंदूला मरगळ आली आहे ती काढण्यासाठी या दसरा-दिवाळीचा चांगला उपयोग करून घ्या. मुलांच्या भावनिक बुद्धिमत्तेलाही आव्हान द्या.

माणसाचं जीवन सुख-दु:खांनी व्यापलेलं आहे. कोरोनामुळे त्यातली दु:खाची बाजू अधिकच गहिरी झाली आहे. आपल्या आसपास दु:खी असलेल्या मुला-माणसांनाही आनंद वाटायला मुलांना शिकवा. नकळत होणारा हा संस्कार त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी मोलाचा ठरेल. हे सर्व तुम्ही करत असालही; तर तुमचं अभिनंदन अन्यथा त्यासाठी शुभेच्छा. 

थोडक्यात, अक्षरशिक्षण देता-घेता आपण अस्सल जीवनशिक्षणापासून दूर तर जात नाही ना याचाही वेळोवेळी विचार करूया. अन्यथा भावी पिढ्या भुईमुगाच्या शेंगा झाडावर शोधतील आणि स्वत:पुरत्या आनंदात मग्न राहतील. 

असं व्हायला नको असेल तर कृतिशील जीवनशिक्षणाचा विचार करायलाच हवा.

त्यासाठी दिवाळीनिमित्त घरातील सर्व कामं मुलांवर टाकूया आपण त्यांना मदत करूया. त्यासाठी कौतुक आणि काम करण्याचा आनंद हे सूत्र वापरूया.

चला मग मुलांच्या हाताला कामं देऊ आणि दसरा-दिवाळी सुरू होण्याआधी साजरी करू. 


सचिन उषा विलास जोशी 

शिक्षण अभ्यासक



शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...