Friday 31 January 2020

रोबोट टीचर v/s ह्यूमन टीचर

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्र मधील लेख
प्रत्येक टीचर ने आणि पालकाने वाचावा असा लेख

शिक्षण क्षेत्रात नेहमी एक शब्द ऐकायला येतो, "पूर्वीसारखे हाडाचे शिक्षक नाही राहिले."
आता हे शिक्षक नाही म्हणून भावी पिढी कोण अडवणार असं काहींना प्रश्न पडला असेल म्हणून की काय या हाडांच्या शिक्षकांच्या ऐवजी रोबोट शिक्षकांची निर्मिती केली गेली.

होय या शतकामध्ये रोबोट शिक्षक निर्मिती सुरू झाली. कसे आहेत हे रोबोट शिक्षक? तर या रोबो मध्ये संपूर्ण विषयाची माहिती ऐकायला येते. उदाहरणार्थ जर तुम्हाला रसायनशास्त्र चा रोबोट टीचर बनवायचा असेल तर संपूर्ण रसायनशास्त्राची माहिती किंवा ज्या इयत्तेसाठी हा रोबो टीचर पाठवायचा असेल त्या इयत्ते ची संपूर्ण माहिती त्यामध्ये प्रोग्रामिंग द्वारे फीड केली जाते आणि तो रोबो क्लासरूममध्ये शिकवतो. हे रोबो मानवी आवाजात बोलतात. थोडीफार हालचाल करतात. विशिष्ट पद्धतीने प्रश्न विचारले तर उत्तर सुद्धा देतात.

खरंच हे मशीन आहे पण शिक्षण क्षेत्रात याचा उपयोग चांगला होतोय. ज्या घरांमध्ये आई-वडिलांना वेळ नाही तिथेही रोबो मुलांना विविध विषयाची माहिती द्यायचे काम करतात. समजा घरी कोणी इंग्रजी बोलत नसेल तर हे मशीन तुमच्या मुलाशी इंग्रजी मध्ये बोलेल. जर वर्गात शिक्षक उत्तर द्यायला कंटाळा करत असेल तर हे रोबोट टीचर कितीही प्रश्न विचारा ते न कंटाळता उत्तर देतील.

हे रोबोट विद्यार्थ्यांचे संवाद सुधारून देतात. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी रोबोट टीचर हे अत्यंत उपयोगाचे साधन आहे. ऑटिस्टिक मुलांसाठी याचा जास्त उपयोग होऊ शकतो. अभ्यासामध्ये मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी रोबोट टीचर बेसिक पासून तयारी करू शकतो जर त्याला तसे प्रश्न विचारले तर..

बऱ्याच वेळा विद्यार्थी ह्यूमन टीचरला प्रश्न विचारायला घाबरतात. रोबोट टीचर बाबत तसे होत नाही. तो चिडत नाही ना मारत नाही.. त्यामुळे विद्यार्थी जलद शिकू शकतात. या रोबोट टीचर ला फक्त टीचिंग साठी प्रोग्राम केले असल्याने तो त्याचे काम प्रामाणिकपणे करतो. सुट्टी घेणे, उशिरा वर्गात जाणे, विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करणे असल्या गोष्टी त्याच्याकडून होणार नाही. सर्वात महत्त्वाचे ते अपडेट असतात किंवा त्याच्या विषयाची नवीन माहिती आली की एका क्लिकवर न्यू वर्जन नावाखाली काही क्षणात ऑटो अपडेट होतील.

मोठ-मोठ्या शैक्षणिक संस्था या वन टाइम इन्व्हेस्टमेंट म्हणून हे रोबोट टीचर विकत घ्यायला लागले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार दरवर्षी पगार वाढ आणि सहावे वेतन देण्यापेक्षा हे परवडते.

आता काही कंपन्यांनी तर पर्सनल रोबोट टीचर बनवले आहेत. म्हणजे समजा तुम्हाला पाल्याला शिकवायला वैयक्तिक रोबोट टीचर विकत घ्यायचा असेल तर तुम्ही तुमचा आवाज त्याला देऊ शकता. उदाहरणार्थ, समजा तुमचा मुलगा आईचे सर्व ऐकतो तर आईच्या आवाजाचे नमुने घेऊन त्या पद्धतीचा हुबेहूब आवाज रोबोट टीचर काढून मुलांना शिकवतो.. त्या विषयाची माहिती देतो. जर कोण्या लहान मुलाची आई आजारी असून जर तिचा मृत्यू जवळ येत असेल तर तिच्या आवाजाचे नमुने घेऊन आईच बोलते आहे असे रोबो बनवत आहे. जेणेकरून त्या अनाथ होणाऱ्या मुलाला पुढे आयुष्यभर आईच्या आवाजातून जगातली सर्व विषयाची माहिती मिळत जाईल. एकंदरीत रोबोट टीचर हा गरीब विद्यार्थ्यांपासून ते विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वांसाठी उपयुक्त आहे. पण प्रश्न हा आहे की तो ह्यूमन टीचर ची जागा घेऊ शकतो का?

रोबोट टीचर हा ह्यूमन टीचर ला पर्याय होऊ शकतो का? तर तो पर्याय होऊ शकत नाही. हे होऊ शकते की काही प्रमाणामध्ये ह्यूमन टीचर चे जॉब चे प्रमाण कमी होईल. आता का हे पर्याय होऊ शकत नाही त्याचे मुख्य कारण म्हणजे रोबोट टीचर विद्यार्थ्यांमध्ये भावना विकसित करू शकणार नाही. जसे मी सातत्याने आधी लिहिले आहे की, रोबोट टीचर माहिती उत्तम सांगू शकतात. पण माहिती आणि ज्ञान यामध्ये मोठा फरक आहे. माहिती त्याला म्हणतात जी बाहेरून दिली जाते.. ज्ञान त्याला म्हणतात जे आतून येते. येथे ह्यूमन टीचर श्रेष्ठ ठरतात.

अजून एक महत्त्वाचा मुद्दा.. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता क्रिटिविटी आणायची असेल तर तिथे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स उपयोगाचे होत नाही तर इमोशनल इंटेलिजन्स उपयोगाचे होते. येथे सुद्धा ह्यूमन टीचर श्रेष्ठ ठरतो.

शिक्षकाने विद्यार्थ्यांना समजून सांगणे फार महत्वाच आहे. समजावून शिकवणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या पातळीवर जाऊन सम होणे आणि अधिक सोप्या पद्धतीने त्याला शिकवणे. हे शिकवताना त्याची सामाजिक भावनिक स्थिती समजावून त्याला समजेल असे शिकवले तर तो / ती विद्यार्थी प्रगती करते. येथे सुद्धा ह्यूमन टीचर श्रेष्ठ ठरतो कारण भावना आणि माहिती याचे संयोग करून ज्ञाननिर्मिती तोच करू शकतो.

विद्यार्थी प्रगती तेव्हाच करतात जेव्हा त्यांना प्रेरणा मिळते त्यांचे चारचौघांमध्ये कौतुक होते. वर्गांमध्ये शिकवताना जेव्हा टीचर म्हणतात, "तुला जमतय", "तू करू शकतो", "शाब्बास मला तुझा अभिमान आहे", वेरी गुड.. तर त्याला प्रोत्साहन मिळते आणि तो विद्यार्थी जलद गतीने शिकू शकतो. इथेसुद्धा ह्यूमन टीचर श्रेष्ठ ठरतात.

सर्वात महत्वाचे मुलांच्या सर्वांगीण विकासाची भावनिक बुद्धिमत्ता वाढीसाठी मुलांनी जिवंत लोकांशी सातत्याने संवाद साधणे हे बाल मेंदू जडणघडणीसाठी आवश्यक आहे. मुलांच्या भावविश्वात आई वडिलांनंतर शिक्षक सर्वात जास्त संवाद साधतात. शिक्षकांचा संवाद ऐवजी मशीन संवाद जास्त झाला तर मुलं सुद्धा मोठ्यापणी रोबो बनतील. शरीर सजीवांचे पण मेंदू रोबो सारखा अशी पिढी घडेल. आधीच विविध गॅझेट जसे मोबाईल, टीव्ही, व्हिडिओ गेम, आयपॅड, मुलांचा मेंदूचा ताबा घेतलेला आहे त्यात रोबोटने ताबा घेतला तर विद्यार्थी भावनाशून्य व्यक्तिमत्व बनेल.

2040 मध्ये सर्वात जास्त पगाराची नोकरी त्यांना असणार आहे ज्यांची भावनिक बुद्धिमत्ता सर्वात जास्त आहे. EQ वाढवायचा असेल तर ह्यूमन टीचर ची आवश्यकता आहे. याचाच अर्थ ह्यूमन टीचर चा रोल येत्या काही वर्षात बदलणार आहे. आता ह्यूमन टीचर असे हवे आहे जे विद्यार्थ्यांमध्ये चार कौशल्य विकसित करतील. एक) क्रिटिविटी, दोन) क्रिटिकल थिंकिंग, तीन) कमुनिकेशन, चार) कॉल्याब्रेशन.

आता ह्यूमन टीचरने माहिती द्यायची नाही.. माहिती त्याला गुगलवर किंवा रोबोट कडून मिळेल. टीचरने आता त्या माहितीचे पृथक्करण करून विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्यातून ज्ञान निर्मिती करायची आहे. समजा शिवाजी महाराज केव्हा जन्मले अथवा डॉक्टर आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय आहे हे सांगणारे टीचर नको असून समाजाला आता असे टीचर हवे आहे की जे विद्यार्थ्यांमध्ये शिवाजी महाराज यांचे गुण विकसित करतील.. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्या मुलामुलींमध्ये रुजूवतील.

त्यामुळे जे टीचर हा लेख वाचत आहे त्यांनी आजपासून आपली भूमिका बदलणे आवश्यक आहे. वर्गात शिकवायला गेल्यावर पुस्तकी माहिती बरोबर त्या मुलांमध्ये ऐक्याची भावना, सांघिक भावना, भारतीय होण्याची भावना विकसित करा. वर्गात गणित शिकवताना प्रत्येक गणिताच्या पायरी बरोबर "तुला जमतय", "प्रयत्न कर.. व्हेरी गुड", असे म्हणा.
वर्गात शिकवताना अप्रगत विद्यार्थ्यांना मायेच्या पाठीवरून हात फिरवावा.. त्यासाठी त्यांच्याशी कनेक्ट वाढवा म्हणजे तुमची नोकरी तर टिकेल पण त्याहूनही जास्त नवी पिढी सृजनात्मक घडण्यास अधिक आनंद मिळेल. आता वेळ आली आहे की प्रत्येक ह्यूमन टीचरने स्वतःची भावनिक बुद्धिमत्ता वापरून विद्यार्थ्यांना अनुभवातून शिक्षण देत त्यांच्यामध्ये सृजनात्मक बुद्धिमत्ता विकसित करण्याची.. कारण एवढेच काम रोबोट टीचरने ह्युमन तिच्यासाठी उर्वरित ठेवले आहे.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक

Friday 17 January 2020

मुलं खोटं का बोलतात?

प्रत्येक पालकाने वाचावा असा शिक्षक अभ्यासात सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख

"मला सर्व सहन होते, पण खोटे बोललेले सहन होत नाही", अशी वाक्य कमी अधिक प्रमाणात प्रत्येक पालक वापरत असतात. खरंतर दोन तीन वर्षाचे गोंडस बाळ एक दिवस खोटं बोलायला लागते तेव्हा आपले धाबे दणाणतात.

खरं तर मुलं खोटं का बोलतात?
आता तुमचं मूल दोन-तीन वर्षाचे असेल आणि ते खोटं बोलत असेल तर ते निरर्थक खोटं असते. याला 'खोटं बोलणं' म्हणता येणार नाही. मनातले विचार ते सहज व्यक्त करत असतात.

तीन वर्षांपासून ते पाच वर्षापर्यंतच्या मुल सुरुवातीच्या काळात शब्दांशी खेळत असतात. त्यांच्यात कल्पनाशक्ती जास्त असते पण कल्पना आणि व्यवहार किंवा प्रत्यक्ष घटना यामध्ये जास्त फरक करता येत नाही. मिळालेली माहिती व स्वतःची कौशल्य यांचे एकत्र करून ते "बाता" मारत असतात. या खोट्या बोलण्यात एक निष्पापपणा लपलेला असतो. अशा वेळेस पालकांनी या मुलांना रोजच्या जीवनात घडणाऱ्या घटना त्यांना जशाच्या तशा सांगण्याची सवय लावली तर त्यांच्या थापा कमी होतात. जेव्हा ते थापा मारतात तेव्हा त्यांची जाणीव करून दिली तर मुलांचे खोटे बोलणे कमी होते.

सहा ते आठ वर्षाची मुलं खोट बोलतात तेव्हा त्यांना थापांचा आधार असतो. या वयातील मुलं खोट बोलतात त्यामागे महत्त्वाचं कारण म्हणजे पालकांच्या अति चौकशा. जेव्हा पालक अति चौकशा करतात, प्रश्न विचारतात तेव्हा याचे उत्तर देण्यापेक्षा "खोटं बोला" असा विचार त्यांच्या मनात येतो. त्यांना खोटे बोलणे सोपे वाटते. याचा अर्थ पालकांनी प्रश्नच विचार विचारू नये असे नाही. पण जेव्हा खूप खोलात जाऊन.. कोर्टात उभे केले सारखे आपण प्रश्न विचारत असू तर अशा पालकांची मुलं उत्तरे देण्यापेक्षा खोटं बोलणे पसंत करतात.

आठ वर्षाच्या पुढील मुलं जे खोटं बोलतात त्याचे मुख्य कारण म्हणजे भीती. सात-आठ वर्षापुढील सर्व मुलांना सत्य आणि कल्पना यातील फरक चांगला कळतो. काय खरं आहे आणि काय खोटं आहे यातील फरक सुद्धा व्यवस्थित समजतो. या वयापासून पुढील सर्व मुलं खोटे बोलतात याचे कारण आधीपासून पालक मुलांना अति शिस्तीमध्ये वाढवत असतात. शिस्त टाळण्यासाठी शिक्षा टाळण्यासाठी मुलं खोटं बोलतात. आता इथे प्रश्न येतो की मग मुलांना शिस्तच लावायची नाही का? तर शिस्त लावायची पण शिस्तीच्या नावाखाली अति कडकपणा येऊ द्यायचा नाही. ज्या घरात शिस्त असते तिथले मुलंसुद्धा खोटं बोलतोय पण त्याचे प्रमाण फार कमी असते. खरंतर मुलं आजिबात खोटं बोलणार नाही असं काही होत नाही.

ज्या घरात अतिकडक शिस्त असते तिथले मुलं हमखास खोटे बोलतात व त्याचे प्रमाण जास्त असते व त्याचे रुपांतर स्वभावात होते. खोट बोलणे हा त्यांचा स्वभाव बनतो. अशा घरातील मुलं पुढे मग शिस्तीचा प्रश्न नसलाही किंवा शिक्षा मिळणार नसलीही किंवा खोटं बोलण्याची गरज नसताना सुद्धा खोटं बोलतात कारण त्यांचा तो स्वभाव बनतो. स्वभाव बदलण्यासाठी सुरुवात कुठून होते हे तर शिक्षा चुकवण्याच्या प्रयत्नात पासून. एखादी गोष्ट बाबांना आवडत नाही.. बाबा ओरडतील.. शिक्षा करतील.. हे कळल्यावर मुले ती चूक करूनही "मी केलीच नाही", हे बोलून मोकळे होतात. यासाठी पालकांना विशेष मेहनत घ्यावी लागेल. सर्वप्रथम मुलं खरंच बोलतील अशी परिस्थिती निर्माण करावी लागते. उदाहरणार्थ समजा मुलाच्या हातून काचेचा फ्लावर पॉट फुटला आहे. हे तुम्हाला माहीत असेल तर, "तू फ्लॉवर प्लॉट फोडला का?" असा प्रश्न विचारला तर तो उत्तर "नाही" असेच खोटे देणार आहे. त्यापेक्षा बोला "मला माहितीये तुझ्या हातून फ्लॉवर पोट फुटला आहे", असे वाक्य आले की आपोआप सॉरी त्याच्या तोंडून येईल. पालकांनो वस्तू फुटू शकतात पण विश्वास तुटत नाही.

खरं सांगण्याने शिक्षा कमी होते.. हा विचार सुद्धा मुलांना तुमच्या वागण्यातून, बोलण्यातून, व्यवहारातून समजला पाहिजे. उलट खरं सांगितले की घरातून आधार मिळतो हे मुलांना लक्षात आणून दिले पाहिजे. सर्वात महत्त्वाचं की मुलं जेव्हा चूक कबूल करतात आणि खरंच सांगतात तेव्हा त्याचा खरा बोलण्याचे कौतुक व्हायला पाहिजे. भले तुम्ही त्या वेळेस त्याचे कौतुक करु नका. पण दोन-तीन दिवसात त्या प्रसंगाची आठवण करून "तू तेव्हा खरं बोलला याचे मला छान वाटले", असे सांगा. याने सातत्याने खरं बोललं पाहिजे याचे संस्कार जातात.

एकत्र कुटुंब जर असेल तर अशावेळी मुलांच्या खरं बोलण याबाबत सर्वांची एक मत हवे. मुलांच्या खोट्या बोलण्यावरून आई-वडिलांनी आणि आजी-आजोबांनी वेगवेगळी भूमिका मांडली तर मुलं सोयीचा अर्थ काढतात. मोठे भांडत बसतात आणि मुलांचे खोटे अधिक वाढते.

घरात खेळीमेळीचे वातावरण, उत्तम संवाद, भरपूर मोकळीक आणि चुका करायला मान्यता असेल तर अशा घरातील मुलं खोटं बोलण्याच्या भानगडीत पडत नाही.

समजा तुमचा मुलगा-मुलगी क्वचित खोटं बोलत असेल तर ठीक आहे पण सातत्याने खोटं बोलत असेल तर ती तुम्हाला घाबरत आहे. अति शिस्त आणि भीतीमुळे मुलं खोटं बोलण्याचा आहारी जातात. पण काही घरात अतिकडक शिस्त नसते व तिथे ही मुलं खूप खोटं बोलतात अशा घरात जिथे मुळीच शिस्त नाही आहे.. जिथे मुलांनी आई-वडिलांचे ऐकले पाहिजे पण तिथे आईवडीलच मुलांचे ऐकतात.. त्यांना घाबरतात.. किंवा अति आंधळे प्रेम करतात.. तिथले मुलं अधिक खोटं बोलतात. त्यांना माहिती असते की आईला काहीही सांगितले तरी त्याच्यावर ती विश्वास ठेवतील. अशा आईवडिलांनी त्यांच्या मुलांना तरुण वयात पटकन कसे वाया जायचे याचे वातावरण बनवून ठेवले असते. अशा पालकांनी त्यांचे पालकत्व बदलणे आवश्यक आहे.

असे पालक ओळखणे खूप सोपे आहे.. जेव्हा सहावी, सातवी इयत्तेच्या पुढील विद्यार्थ्यांना शाळा काही कारणाने त्यांच्या भल्यासाठी शिक्षा करते.. (मारण्याची शिक्षा नव्हे) त्यांना दोषी ठरवून सुधारण्यासाठी काही उपाययोजना करते.. अशा वेळेस जे पालक आपल्या मुलांना पाठीशी घालून शाळेशी वाद घालतात असे पालक हे असतात. अशा पालकांनी धोक्याची सूचना समजून अतिदक्षते खाली पालकत्व सुधरावे. कारण योग्य शिस्त ही प्रेमाची पहिली कृती आहे. खूप शिस्त मुलांना खोटं बोलायला प्रेरित करते. अजिबात शिस्त नाही तर तिथे मुलं बिघडायला प्रेरित करते. तर योग्य शिस्त ही मुलांना घडायला मदत करते.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


Friday 10 January 2020

मुलांना गोष्ट का आणि कोणती सांगायची?

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्र मधील लेख 

गोष्टी लहान मुलांचा जीव की प्राण.. लहान मुलांना काय मोठ्यांना सुद्धा गोष्टी ऐकायला खूप आवडतात.
आपल्या व्यक्तिमत्त्वाला घडवण्यात, संस्कार करण्यामध्ये विविध गोष्टी, कथा यांचा पगडा आहे. साधारण आपण दोन तीन वर्षाचे झालो की गोष्टी ऐकायला लागतो.
आजी-आजोबा, आई-वडील, काकू, मामा मामी, ताई-दादा, टीचर, शेजारचे सर्वजण लहान मुलांना त्यांच्या त्यांच्या परीने गोष्ट सांगत असतात.

लहान वयात मुलांनी भरपूर गोष्टी ऐकल्या पाहिजे. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी याचा महत्त्वाचा वाटा असतो. गोष्ट ही मुलांची कल्पनाशक्ती विकसित करते. एका सर्वेनुसार जगात जे जे व्यक्ती सृजनात्मक कार्य करत असतात त्यांच्या बालपणी त्यांनी खूप गोष्टी ऐकल्या असतात. ज्यांना नवनवीन काहीच सुचत असते, नवीन आयडिया येत असतात कारण बालपणी विविध गोष्टी ऐकण्यात ते रमले असतात.

आता हे कसे घडते? तर आजचे बाल मेंदू मानसशास्त्र सांगते की जेव्हा बालक गोष्ट ऐकत असतो तेव्हा तो/ती कानाने ऐकत असली तरी ते मेंदूच्या मनाच्या पटलावर व्हिजव्हलाझेशन करत असतात. ते डोळ्यासमोर तसेच चित्र समोर आणत असतात. गोष्टी सांगणारा जेवढे जास्त तपशील सांगेल तेवढे अधिक स्पष्ट चित्र बालक डोळ्यासमोर आणून त्यामध्ये एकाग्र होतात.
याच्यातून मेंदूमधील व्हिजव्हल कॉर्टेक्स तसेच सृजनात्मक विचार करण्याच्या पेशींना चालना मिळते व त्या पेशींचे कनेक्शन इतर विविध पेशींशी होते ज्याला सिन्याप्स निर्मिती म्हणतात. जेवढे सिन्याप्स निर्माण होतील तेवढे हा ही बालिका मोठ्यापणी क्रिएटिव थिंकींग ची बनण्याची शक्यता जास्त असते. म्हणून लहान मुलांना गोष्टी सांगितल्या पाहिजे.

गोष्टींमधून फक्त कल्पनाशक्तीचा विकास होतो असे नाही तर शब्दसंग्रह सुद्धा वाढतो. सातत्याने नवनवीन शब्द कानावर पडतात याचा अर्थ मुल स्वतः लावतात. ज्याच्यातून मुलांची विचार करण्याची क्षमता वाढते. आता इथे पालकांना एक गोष्ट नीट समजली पाहिजे की गोष्टी ऐकल्याने ही वरील सर्व प्रक्रिया घडते पण रेडीमेड गोष्टी टीव्हीवर पाहिल्याने अथवा मोबाईलवर पाहिल्याने घडत नाहीत. उलट जास्त कार्टून, टीव्हीवरील आयत्या गोष्टी पाहिल्याने कल्पनाशक्ती दाबली जाते. कारण सहाजिकच आहे की रेडिमेट टीव्हीवरील गोष्टी व त्याच्यावरील चित्र हे आयते मेंदूला मिळतात आणि मेंदू विचार करणे सोडून देतो. उदाहरणार्थ समजा टीव्हीवरील गोष्टीमध्ये जंगल दाखवले असेल तर एक-दोन व्हिजव्हल येतात जे डोळ्यासमोर आयते जातात. यामध्ये मनाच्या पटलावर विचार प्रक्रिया होत नाही आणि हीच गोष्ट सांगणारी व्यक्तीं जेव्हा बोलतो "एक घनदाट जंगल असते" अशा वेळेस बालक स्वतःचे व्हिजव्हलाईज करतो. तो/ती तिच्या पद्धतीने घनदाट जंगलाची कल्पना विकसित करते आणि यामधूनच कल्पनाशक्तीला चालना मिळते.

आता "गोष्ट" ही ऐकण्याचा अनुभव असल्याने तिचे सादरीकरण उत्तम होणे आवश्यक आहे. भाषा मुलांना आकर्षित करणारी हवी तेव्हाच ते जास्त एकाग्र होऊन ऐकतात. जेव्हा सांगणारा व्यक्ती ती रंजन करून सांगतो त्यासाठी काही टिप्स मी देतो. जसं गोष्ट सांगताना आवाजाचा चढ-उतार फार महत्त्वाचा असतो. कुठला शब्द हळू आवाजात तर कुठला शब्द जोर देऊन सांगणे ही कला आहे..जी हळूहळू अनुभवातून येते. दुसरी टिप्स, गोष्ट सांगताना चेहऱ्यावर हावभाव आणणे आवश्यक आहे, ज्यातून मुलांची समरसता वाढते. गोष्ट सांगताना तुम्ही विविध पपेट बाहुल्यांचा वापर करू शकतात.

मुलांना कुठल्या गोष्टी सांगाव्या? तर ज्या गोष्टींमध्ये मूल्य असतील अशा सर्व गोष्टी.. ज्यामध्ये खूप हिंसा, अंधश्रद्धा असतील तर सर्व टाळाव्या. कधीकधी भुताच्या गोष्टी किंवा राजाच्या गोष्टी मध्ये राक्षस येतात.. जर अशा गोष्टी सांगितल्या की आवर्जून सांगा, "या जगात भूत राक्षस हे नसते". इसापनीती, विक्रम वेताळ, पंचतंत्र या लहान मुलांना सांगाव्या चाललेल्या पण त्याचबरोबर नवनवीन लेखकांनी लिहिलेल्या खास करून गेल्या दहा वर्षांमध्ये ज्या गोष्टींचे पुस्तक आले आहेत याचा संदर्भ आजच्या जगाशी आहे त्या सुद्धा गोष्टी आवर्जून सांगावे. पारंपरिक गोष्टी सांगताना जर सांगणाऱ्याने आजच्या युगाशी त्याला करनेक्ट करून सांगितलं तर ते अधिक प्रभावशाली होते.

गोष्ट कोणी सांगावी? तर लहान मुलांना गोष्ट कोणीही सांगू शकतो. आपल्या स्वतःच्या मुलाला-मुलीला गोष्ट सांगण्यासाठी तुम्ही शिक्षक असले पाहिजे हे मुळीच आवश्यक नाही. आजी-आजोबांच्या गोष्टींचा पगडा हा बालमनावर जास्त असतो असं मला वाटते.

मुलांचे भावविश्व अधिक समृद्ध आणि उत्तम करण्यामध्ये "एकदा काय झाले", "एक आटपाट नगर होते", यांचा मोठा वाटा आहे. पालकांनो मोबाईल टीव्ही च्या नादात ते नष्ट करू नका. मुलांना वयानुसार भरपूर गोष्टी सांगा कारण गोष्टी ऐकायला वयाची कुठली अट नसते.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...