Wednesday 29 June 2022

भारतातल्या पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ पद्मभूषण ताराबाई मोडक

बालवाडीतली छोटी छोटी मुलं आणि ताराबाई मोडक यांचं नातं फार घनिष्ट होतं. त्यांची बालगोपालांबद्दलची आस्था अगदी आतून उमलून आलेली असे. शिक्षिकेपेक्षाही आई-आजीची भूमिका त्या बजावत असत. अगदी सहजपणे त्या त्यांच्यात मिसळून जात.


एकदा काय झालं, शाळा सुटल्यावर त्या आपलं काम करत शाळेच्या कार्यालयात बसल्या होत्या. शाळा सोडून थोडा वेळ झाला नाही तोच समोरून एका छोट्या मुलाला एक बाई मारत मारत शाळेकडे घेऊन येत होती. तो पोरगा बिचारा रडत ओरडत होता. ताराबाईंना कळेना हा काय प्रकार आहे. त्या बाईने त्यांच्यासमोरच त्या मुलाला आणून उभं केलं. ती त्या छोट्या मुलाची आई होती. त्यांच्याच बालवाडीतला तो मुलगा होता.

ताराबाईंनी त्या मुलाला विचारलं, "ताई, अहो काय झालं एवढं? का त्याला मारताय, ओरडताय?" "काय सांगू बाई, चोरी केली याने. या बघा शाळेतल्या छोट्या छोट्या लाकडी वस्तू घेऊन आला घरी." ती बाई सांगू लागली.
तिने त्या वस्तू टेबलावर ठेवल्या. खेळण्यातलं छोटं लाकडी जातं, छोटे लाकडी चमचे..अशा काही लहानसहान वस्तू होत्या. वस्तू छोट्या होत्या पण त्या आईचा संताप मोठा होता. तिला भविष्यात चोर झालेला आपला मुलगा नजरेसमोर दिसत होता, ती हवालदिल झाली होती. त्याच्यावर खूप चिडली होती.
ताराबाईंना सगळा प्रकार लक्षात आला; त्या मंदशा हसल्या. म्हणाल्या, "ताई, तुम्ही बसा बरं आधी इथे. शांत व्हा, पाणी प्या. ह्यालाही शांत करू, मग बोलूया आपण."

त्या बाईला कळेना, 'या इतक्या शांत कशा? मुलाने चोरी केलीय, तरी चिडत कशा नाहीत?'

ताराबाई खूप शांतपणे म्हणाल्या, "पहिली गोष्ट म्हणजे याने चोरी केलीय हे वाक्य डोक्यातून काढून टाका. ही चोरी नव्हे." "म्हणजे?"
"अहो बालवाडी म्हणजे त्याचं दुसरं घर आहे. त्याने फक्त त्याला आवडलेल्या वस्तू एक घरातून दुसऱ्या घरात नेल्यात. याला चोरी नाही म्हणत." "अहो बाई, असं कसं म्हणता? यातूनच त्याला चोरी करायची सवय लागेल ना? बिघडेल की तो. पुढ़े मलाच दोष देईल आणि मी संस्कार केले नाहीत म्हणून." तिला बहुतेक ती आईचा कान चावणाऱ्या गुन्हेगाराची गोष्ट आठवत असावी.

"असं काहीही होणार नाही. तुम्ही अगदी निर्धास्त असा. असं करायचं नाही इतकंच त्याला समजावा. बाकीचं मी बघते. मारूबिरू तर अजिबातच नका बरं!" त्यांनी त्या लेकराला जवळ घेतलं आणि त्या मायलेकराला घरी धाडून दिलं.

दुसऱ्या दिवशी मुलं बालवाडीत आली. नेहमीप्रमाणे हसत-खेळत-गाणी म्हणत शाळा पार पडली. शाळा सुटायची वेळ जवळ आली. ताराबाईंनी काय केलं, एक मोठी टोपली घेतली आणि त्या प्रत्येक मुलामुलीसमोर गेल्या; म्हणाल्या, "कोणाकोणाच्या खिशात बघू बरं काय काय वस्तू लपल्या आहेत? काढा बरं बाहेर, या टोपलीत टाका."

हळूहळू एकेक एकेक करत अनेक वस्तू टोपलीत जमा झाल्या. ती  टोपली चक्क भरली की! ताराबाईंना बरोबर अंदाज आला होता, हा मोह काही कालच्या त्या एकाच मुलाला फक्त झालेला नसणार, अनेक मुलं आवडलेल्या वस्तू अशा घरी नेट असणार. मग ताराबाईंनी मुलांना समजावलं की 'घरच्या वस्तू घरी नि शाळेतल्या शाळेत.'

पटलं ते मुलांना आणि मग हळूहळू ती टोपली भरणं बंद झालं. 'चोरी' म्हणजे काय ते काळण्याचंही ते वय नव्हतं, हे ताराबाई जाणत होत्या. बालमानसशास्त्र लक्षात घेऊन मुलांशी वागावं लागतं हे त्यांना माहीत होतं.


ताराबाई मोडक प्रसिद्ध बालशिक्षणतज्ज्ञ होत्या. 19 एप्रिल 1892 ते 31 ऑगस्ट 1973 हा त्यांचा जीवनकाळ. इंदोरला केळकर घराण्यात त्यांचा जन्म झाला. उमाबाई नि सदाशिवराव त्यांचे आईवडील. दोघेही समाजकार्य करत. त्यांच्याकडून ताराबाईना बुद्धिमत्तेचा वारसा लाभला. त्या ग्रॅज्युएट झाल्यावर कृष्णा मोडक यांच्याशी त्यांचा नोंदणी पद्धतीने विवाह झाला. त्यांना मुलगी झाली, तिचं नाव प्रभा.

1922 मध्ये राजकोट इथे 'बार्टल फिमेल ट्रेनिंग कॉलेज'मध्ये लेडी सुपरिटेंडन्ट म्हणून त्या रुजू झाल्या. या कॉलेजात या पदावर काम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत.

त्यानंतर त्यांनी गिजुभाई बधेका यांच्या साहाय्याने भावनगर इथे मोंन्टेसरीच्या तत्त्वांवर आधारित 'गीता शिक्षण पद्धती' निश्चित केली. हा त्यांचा बालशिक्षण कार्याचा प्रारंभ. शिक्षण आणि संस्कारांचा खरा पाया मुलांच्या बालवयातच घातला पाहिजे या मतावर त्या ठाम होत्या. म्हणूनच त्यांनी पूर्वप्राथमिक शिक्षणासंदर्भात नवं पाऊल उचललं. शिक्षणक्षेत्र हे कार्यक्षेत्र म्हणून त्यांना खुणावत राहिलं. 1923 ते 1932 ही नऊ वर्षं त्यांनी दक्षिणामूर्ती शिक्षणसंस्थेत प्राध्यापिका म्हणून काम केलं.

त्यांनी भारतात शास्त्रीय बालशिक्षणाचा पाया घातला. 1933 पासून त्यांनी शिक्षणाबाबतची शिक्षणपत्रिका काढायला सुरुवात केली. गिजुभाई आणि ताराबाईंची ही शिक्षणपत्रिका म्हणजे एक क्रांती ठरली. या प्रयत्नांमुळे बालशिक्षणाचं लोण भारतभर पसरलं. या पत्रिकेत ताराबाईंनी पाचशेहून जास्त लेख लिहिले. त्यातून नव्या पिढीला बालशिक्षणासंदर्भात बौद्धिक विकासाची दिशा मिळाली. त्यांनी मुलांसाठीही खूप लेखन केलं. चारशेहून अधिक गोष्टी, गाणी, नाटुकली ही त्यांची लेखनसंपदा. गिजुभाईंबरोबर 105 पुस्तकं त्यांनी संपादित केलेली आहेत.

ताराबाईंचा प्राचार्या ते बालशिक्षणतज्ज्ञ हा प्रवास लक्षणीय आहे. त्यांनी 1936 साली 'नूतन बालशिक्षण संघाची' स्थापना केली.

ज्या काळात स्त्री शिक्षणापासून वंचित होती, त्या काळात ताराबाई नि गिजुभाईंनी बालशिक्षणाचा प्रयोग राबवला. त्यांनी त्यासाठी मोंन्टेसरी पद्धतीचा बारकाईने अभ्यास केला. भारतीय संदर्भांनुसार त्या तत्त्वांमध्ये बदल घडवून आणले. ताराबाईना म्हणूनच 'भारतातल्या मॉन्टेसरी' म्हटलं जातं.

त्या पुरोगामी होत्या म्हणून त्या प्रार्थना समाजाच्या सदस्य होत्या. कर्मकांडाला त्यांचा कायम विरोध राहिला. प्रारंभी त्या अमरावतीला शाळेत रुजू झाल्या होत्या, त्यांनी एक इंग्रजी माध्यमाची शाळाही काढली होती. शिक्षणक्षेत्रात अनेक प्रयोग करत असताना त्यांनी एक फार महत्त्वपूर्ण नि मोठं पाऊल उचललं ते म्हणजे मुंबईत दादर हिंदू कॉलनी इथे 'बाल अध्यापक मंदिर' सुरू केलं. तसंच 'शिशुविहार'ची स्थापना केली.

आजवर अनेक बालवाडी शिक्षिका या अध्यापन केंद्रातून तयार झाल्या आहेत.

ताराबाईंच्या मनात आणि डोक्यात अखंडपणे बालशिक्षण आणि बालकांचा विकास हा विचार चालू असे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागाकडे त्यांचं लक्ष वेधलं गेलं आणि 1945 मध्ये त्या बोर्डीला आल्या. बोर्डी आणि कोसबाड या ग्रामीण भागात आदिवासी पाड्यांमध्ये त्यांचे बालशिक्षणविषयक नवीन प्रयोग सुरू झाले. अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत गरजा पूर्ण होण्याची वानवा असणारी इथली छोटी मुलं शाळा आणि शिक्षण यांपासून कोसो दूर होती. त्या मुलांसाठी काही अनुकूल असं करायला सिद्ध होताना ताराबाईना अनुताई वाघ यांच्यासारख्या समविचारी आणि उत्तम सहकारी लाभल्या आणि दोघींच्या मेहनतीने त्या परिसरात एक वेगळं असं शिक्षणविश्व निर्माण झालं. दोघींनी अमाप कष्ट घेतले. मुलं शाळेत येत नाहीत तर तिथल्या स्थानिक अडचणी समजून घेत तिथल्या दुर्गमतेला छेद देत शाळा मुलांपर्यंत नेली. कुरणशाळा, घंटाशाळा, अंगणवाडी असे विविध प्रकल्प राबवले. ही सोपी गोष्ट नव्हती. स्थानिक पातळीवरच्या विरोधापासून अनेक व्यावहारिक, अगदी प्राथमिक पातळीवर अडीअडचणींना तोंड देत त्या मुलांच्या, अंगणवाडी शिक्षकांच्या ताई होऊन राहिल्या.

बालशिक्षणाची मेख त्यांनी समाजाला उलगडून दाखवली, पटवून दिली. 'लहान पोर ते, त्याच्याकडे काय लक्ष द्यायचंय, खेळेल, बागडेल, वाढेल.' हा पालकांचा दुर्लक्षित दृष्टिकोन बदलण्याचा त्यांनी जीवापाड प्रयत्न केला. हेच बालवय आयुष्यभराच्या दृष्टीने फार महत्त्वाचं असतं, तेव्हाच मुलांच्या मेंदूची जडणघडण होत असते हे त्यांनी लोकांना पटवलं.

देशभरात ताराबाईच्या कार्याची कीर्ती पसरली, सरकारलाही दखल घ्यावी लागली; 1962 साली ताराबाई मोडक यांना 'पदमभूषण' पुरस्काराने गौरवण्यात आलं.

ताराबाई आणि अनुताई यांच्या कार्याचं परिणामस्वरूप म्हणजे आजमितीला सर्वदूर वाढत चाललेली पूर्वप्राथमिक शिक्षणाची गरज, त्याला मिळणारी मान्यता आणि होत असलेला विस्तार! जगात शास्त्रीय बालशिक्षण मॉन्टेसरींनी सुरू केलं. ते भारतात आणलं गिजुभाईंनी. त्याला भारतीय संदर्भ देत ते ग्रामीण भागात पोहोचवलं ताराबाईंनी. अनुताई वाघांनी ते उचलून धरलं आणि शास्त्रीय पद्धतीने ते सिद्ध होत असताना सर्वात मोठं शास्त्रीय पाऊल उचललं प्रा. रमेश पानसे यांनी. त्यांनी मेंदू आधारित शिक्षणपद्धती जगाला पटवून दिली. अशा या बालशिक्षणाच्या शास्त्रीय मार्गावरून होत असलेल्या प्रवासात ताराबाई मोडक या 'मैलाचा दगड' ठरतात.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


Wednesday 22 June 2022

विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहं आणि विविध शाळांचे प्रणेते: राजर्षी शाहू महाराज

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख.


शाहू महाराजांचा काळ तसा अलीकडचा; म्हणजे फार जुना नव्हे. 1874 ते 1922 हा त्यांचा कालखंड. राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. कागलचे जहागीरदार जयसिंगराव घाटगे आणि त्यांच्या पत्नी राधाबाई यांचे ते सुपुत्र. त्यांचं मूळ नाव यशवंतराव. ते दहा वर्षांचे असताना कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी यांची राणी आनंदीबाई हिने 18 मार्च 1884 रोजी त्यांना दत्तक घेतलं आणि ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज झाले.

असा त्यांचा मुळात कोल्हापूर संस्थानाशी संपर्क आला. उत्तरोत्तर त्यांनी कोल्हापूरचा विकास हेच जीवनाचं ध्येय ठरवलं. नंतर छत्रपती म्हणून त्यांनी जणू कोल्हापूरच्या प्रगतीची धुरा खांद्यावर घेतली. एकाधिकारशाही आणि हुकूमशाहीला ते पूर्ण अपवाद होते. शाहू महाराजांनी कायम लोकशाहीचा, सामाजिक समतेचा पुरस्कार केला. बहुजनसमाजाचं हित ही आपली जबाबदारी मानली.

आधुनिक काळाशी जुळवून घेत, आवश्यक तिथे रूढी-परंपरांना छेद देत धडाडीने त्यांनी आपलं समाज सुधारणेचं कार्य अखंडपणे चालू ठेवलं. अनेक धाडसी निर्णय घेतले. छत्रपती म्हणून त्यांच्या हाती अधिकार तर होतेच आणि तशीही त्यांनी कधी विरोधाला धूप घातली नाही.

"एक वेळ गादी सोडीन पण बहुजन समाजाचा उद्धार करण्याचं कार्य सोडणार नाही" असं ते म्हणत.

मुळात राजकोटनंतर धारवाड इथे त्यांचं शिक्षण झालं. धारवाड इथे लक्ष्मीबाई यांच्याबरोबर एप्रिल 1891 मध्ये त्यांचा विवाह झाला. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी कोल्हापूर संस्थानच्या राज्यकारभाराची सूत्रं हाती घेतली.

शिक्षण नसेल तर आयुष्य अंधकारमय होतं, शिक्षणाच्या अभावामुळे माणसं प्रगतीपासून वंचित राहतात, अडाणी असणं हा आयुष्यात खूप मोठा अडसर ठरतो; हे ओळखून त्यांनी समाजात शिक्षणाचा प्रसार करायचं ठरवलं; आणि या दृष्टीने वेगाने पावलंही उचलली.

अर्थात, प्रस्थापित समाजरचनेला शह देत उगीच नव्याची उठाठेवही त्यांनी केली नाही. आहे त्या संरचनेचा अनेकदा स्वीकार करूनही सुधारणा घडवून आणण्याचा, परिस्थितीकडे नव्याने पाहण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. गरजेनुसार नवीन पावलं उचलली. इ.स. 1901 मध्ये त्यांनी मराठा विद्यार्थ्यांसाठी 'व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग'ची स्थापना केली. त्यांनी पुढे निरनिराळ्या जातीधर्माच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या वसतिगृहांची स्थापना केली.

त्यांनी स्थापन केलेली वसतिगृहं-

दिगंबर जैन बोर्डिंग (१९०१), वीरशैव लिंगायत वसतिगृह (१९०६), मुस्लिम बोर्डिंग (१९०६), मिस क्लार्क होस्टेल (१९०८), दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग (१९०८), नामदेव बोर्डिंग (१९११), पांचाळ ब्राह्मण  वसतिगृह (१९१२), गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह (१९१५), इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९१५), रावबहादूर सबनीस प्रभू बोर्डिंग (१९१५)

ज्या शहरात, ज्या ठिकाणी शिक्षण मिळतं तिथे जवळपास राहण्याची सोय नसणं ही बहुजन समाजातल्या बहुसंख्य विद्यार्थ्यांची मोठी अडचण असायची. ती लक्षात घेऊन महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरांत त्यांनी उघडलेल्या वसतिगृहांमुळे अनेकांची सोय झाली आणि शिक्षणाच्या प्रक्रियेला फार मोठी चालना मिळाली.

इ.स. 1902 मध्ये, म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या 45 वर्षं आधी त्यांनी सरकारी नोकऱ्यात मागासवर्गीयांसाठी 50% जागा राखीव ठेवण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी कोल्हापुरात अनेक नवे प्रयोग राबवले. त्या कामगिरीमुळे महाराष्ट्रातल्या शैक्षणिक उलाढालीसाठी शाहू महाराजांचं नाव प्रकर्षाने घ्यावं लागतं.

बहुजन समाजातल्या माणसांच्या जगण्यातल्या आणि प्रगतीतल्या अभावांची नस ओळखून त्या दृष्टीने त्यांनी सामाजिक सुधारणांचे अनेक उपक्रम राबवले. कोल्हापुरात त्यांच्या प्रेरणेने 'सत्यशोधक समाजाची' पुनःस्थापना करण्यात आली. मुख्य म्हणजे त्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं आणि खेड्यांमधून चावडी, धर्मशाळा, मंदिरं अशा इमारतींतून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले.

बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी शाहू महाराजांनी निपाणी इथे ‘डेक्कन रयत संस्थे’ची स्थापना केली; हे फार मोठं महत्त्वाचं पाऊल ठरलं असं रयत संस्थेच्या पुढील कामगिरीवरून म्हणता येतं.

शाहू महाराजांनी शिक्षणासंदर्भात एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि प्राथमिक शाळेसाठी फी माफीची घोषणा केली. शिवाय 21 नोव्हेंबर 1917 रोजी काढलेल्या जाहीरनाम्यानुसार कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचं करण्यात आलं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 60-65 वर्षांनी शिक्षण सक्तीचं झालं. मात्र शाहू महाराजांनी त्यांच्या काळात प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं होतं. म्हणजे आर.टी.ई. ऍक्टची खरी सूरवात शाहू महाराजांनी केली म्हणायला हवं.

शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचं साधन असून शिक्षणाच्या माध्यमातून शोषणमुक्त समाजनिर्मितीचं ध्येय शाहू महाराजांपुढे होतं. कोल्हापूर संस्थानातील सर्व प्रजाजन साक्षर होऊन आपली स्थिती ओळखून प्रगती साधण्यास समर्थ व्हावं, याकरता सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा राजर्षींनी केला. केवळ शाळा काढून भागणारे नाही, त्या शाळांत पालकांनी मुलांना पाठवलं पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. पालकांना त्यांनी याबाबत सक्ती केली. मुलांना न पाठवणाऱ्यांवर दंड आकारला. पहिल्या नव्या सक्तीच्या शाळेची सुरुवात 4 मार्च 1918 रोजी ‘चिखली’ गावी केली. या कायद्याची अंमलबजावणी कसोशीने केली गेली. संस्थानात सर्वसाधारण लोकसंख्या असणाऱ्या प्रत्येक गावात प्राथमिक शाळा सुरू करण्यात आल्या. शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणावरील खर्चासाठी विशेष तरतूद केली.

त्यांनी दुय्यम आणि उच्च शिक्षणावरही भर दिला. राजाराम हायस्कूल आणि राजाराम महाविद्यालयाकडे विशेष लक्ष दिलं. सरकारी शाळेत शिवाशिव पाळू नये आणि सर्व जातिधर्माच्या विद्यार्थ्यांना एकत्र बसवावं, असा वटहुकूम काढला. ज्या शाळा या हुकमाचं पालन करणार नाहीत त्यांचं आर्थिक साहाय्य आणि इतर सवलती बंद करण्याची तंबी दिली. लोकशिक्षण हाच लोकशाहीचा पाया आहे, हे तत्त्व राजर्षींनी प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत पाळलं, म्हणून प्रत्येक जातीने आपापल्या स्त्री-पुरुषांना चांगलं शिक्षण दिले पाहिजे, यावर त्यांचा कटाक्ष होता.

मुलींच्या शिक्षणासाठी शाहू महाराज विशेष आग्रही होते. तत्कालीन वर्णव्यवस्थेने शूद्र आणि सर्व स्त्रिया यांना शिक्षणाचा अधिकार नाकारून त्यांच्यावर अन्याय केला; परंतु कोल्हापूर संस्थानाचा स्त्री शिक्षणविषयक दृष्टिकोन मुळातच पुरोगामी होता. शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मागासलेल्या जातीच्या प्रौढ स्त्रियांसाठी त्यांनी आपल्या दरबारामार्फत मोफत सोय केली. मुलींच्या उच्च शिक्षणाच्या बाबतीत उदार दृष्टी ठेवली. राजाराम महाविद्यालयात शिकणाऱ्या सर्व मुलींना त्यांनी मोफत शिक्षण दिलं. त्यांनी उपेक्षित समाजातील अनेक होतकरू तरुणांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य दिलं. कोल्हापूर संस्थानातच नव्हे तर संस्थानाबाहेरही राजर्षींनी विद्यार्थी आणि संस्था यांना सढळ हाताने देणग्या आणि शिष्यवृत्त्या दिल्या.

म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणविषयक कायदा होता करता अगदी अलीकडे लागू झाला. पण शाहूंच्या काळात ही गोष्ट त्यांनी कधीच करून दाखवली होती. 'सगळ्या सोयी सवलती घ्या पण आपल्या मुलाबाळांना शिकवा बाबांनो, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नका.' हे धोरण त्यांनी त्या काळात अवलंबलेलं होतं. आजही शाळाबाह्य मुलांची परिस्थिती गंभीर आहे. पाच कोटी विद्यार्थी शिक्षणव्यवस्थेत नसून ते त्या प्रक्रियेच्या बाहेर आहेत. अशा वेळी आपण शाहू महाराजांना मिस करत आहोत. आज त्यांच्या कार्याचं प्रकर्षाने जाणवतं. त्यांनी त्यांच्या काळात त्यांच्या कार्याला सुरुवात केली नसती तर आज परिस्थिती आणखी हाताबाहेर गेलेली दिसली असती. पाच कोटी शाळाबाह्य मुलांची संख्या वीस-पंचवीस कोटी झाली असती.  

शाहू महाराज द्रष्टे होते. म्हणजे दूरदृष्टीने विचार करून जनतेच्या विकासासाठी ते पावलं टाकत असत.

आज शिक्षणक्षेत्रात एक दरी निर्माण होऊन ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ असे भाग झालेले आहेत. ज्यांच्याकडे इंटरनेट आणि स्मार्टफोन आहे ते ‘आहे रे’ गटात आहेत आणि ज्यांच्याकडे नाही ते ‘नाही रे’ गटात आहेत. ते शिक्षणापासून वंचित आहेत. म्हणजे पूर्वीचे वंचित आणि आत्ताचे वंचित यांची परिस्थिती वेगळी असली तरी अखेरीस ते शिक्षणापासून वंचितच; आणि आज शाहू महाराज नसल्यामुळे ही दरी आणखी वाढत चालली आहे. आज शाहू महाराज असते तर परिस्थिती वेगळी असती. त्यांनी सरकार कडून वंचित विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयीसुविधा करून घेतल्या असता. शिक्षणावर सहा टक्के खर्च करण्याचा आदेशच काढला असता.

ज्या गोष्टींकडे आपण आज प्रगतीची पायाभूत धोरणं म्हणून पाहतो त्या त्यांनी कधीच तत्कालीन जनतेसाठी खुल्या करून दिल्या होत्या. इतकंच नव्हे तर आवश्यक ती तत्त्वं त्यांनी कायद्याच्या रूपांत बांधून टाकलेली होती. पुनर्विवाहाचा कायदा, विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता, आपल्या संस्थानातील महार वतनं रद्द करणं आणि अस्पृश्यांच्या नावावर रयतवारीने जमीन करणं, अस्पृश्यांकडून वेठबिगार पद्धतीने काम करून घेण्यास कायद्याने बंदी घालणं ही त्यातली काही निवडक उदाहरणं. त्यांनी आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला तसंच त्यांनी असे काही विवाह घडवून आणले. प्रतिकूल परिस्थितीत वेळप्रसंगी विवाहबंधन झुगारून देण्याची तजवीजही त्यांनी घटस्फोटाचा कायदा अंमलात आणून केली.

त्यांच्या प्रत्येक वैचारिक टप्प्यावर त्यांची कृतिशीलता अनुभवायला मिळते. मुळात त्यांनी सर्व नवीन विचारधारांना जी बंधनकारक अशी कायद्याची चौकट दिली तिच्यामुळे सर्व घडामोडींना ठाम अशी बळकटी येत गेल्याचं दिसतं. त्यांच्या योजना फक्त कागदावर कधीच राहिल्या नाहीत. वसतिगृह, शाळा यांनी गरजेनुसार मूर्त रूप धारण केलं. तत्कालीन समाजाची धाटणी लक्षात घेऊन वेळोवेळी त्यांनी काढलेल्या शाळा याचं द्योतक आहेत.

प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, पुरोहित शाळा, पाटील शाळा, उद्योग शाळा, युवराज/सरदार शाळा, संस्कृत शाळा, सत्यशोधक शाळा, सैनिक शाळा, बालवीर शाळा, डोंबारी मुलांची शाळा, कला शाळा..
वेगवेगळ्या समाजासाठी, समूहासाठी गरजेनुसार वेगवेगळ्या शाळा. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याकरता शिष्यवृत्ती देण्याची योजना शाहू महाराजांनी राबवली.

शिक्षणक्षेत्रात तर त्यांनी भरीव कामगिरी केलीच, पण ज्या बाबीमुळे अनेक माणसांच्या जगण्यावर प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष परिणाम होत असे अशा जाचक रूढी, प्रथा, परंपरांपासून त्यांची मुक्तता करण्यासाठी त्यांनी पावलं उचलली. वतनदारांच्या जाचातून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी खेड्यातील कुलकर्णी वतनं त्यांनी रद्द केली आणि त्या जागी पगारी तलाठी नेमले.

अस्पृश्यता पाळली जाऊ नये याकडे काटेकोरपणे लक्ष दिलं. त्यांना शाळा, दवाखाने, पाणवठे, विहिरी अशा ठिकाणी समानतेने वागवावं असे आदेश काढले. शाहू महाराज इंग्लंडच्या सातव्या एडवर्डच्या राज्यारोहण समारंभाला गेले होते. या कार्यक्रमाच्या वेळी केंब्रिज विद्यापीठाने त्यांना LLD पदवी बहाल केली. शाहू महाराजांना 'राजर्षी' ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली.

राजश्री शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची दृढ मैत्री होती. शाहू महाराजांनी आंबेडकरांना अनेकदा आर्थिक मदतही केली होती. शाहू महाराज आणि आंबेडकर एकमेकांचा खूप आदर करत असत. सामान विचारधारा आणि समान तत्त्वांच्या आधारावर ही मैत्री फुलत गेलेली होती. बहुजन समाजाचं हित हे दोघांचंही ध्येय होतं.

26 जून हा शाहू महाराजांचा जन्मदिवस 2006 सालापासून महाराष्ट्र शासनाने 'सामाजिक न्याय दिन' म्हणून साजरा करण्याचं घोषित केलं. केवळ त्या एका दिवसापुरतं त्यांचं आणि त्यांच्या कृतिशील तत्त्वांचं पालन आणि स्मरण करून भागणार नाही, पुढे पूर्ण वर्षभर जर ती तत्त्वं आणि मूल्य आपण सर्वांनी जाणीवपूर्वक अंगी बाणवली तर महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने सर्वांगीण भलं झाल्यापासून राहणार नाही.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


Thursday 16 June 2022

गौतम बुद्धांची शिक्षण प्रणाली

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख.

अमेरीकेतील टेक्सास शहरांमध्ये एका सोळा वर्षाच्या मुलाने पिस्तुल ने शाळेमध्ये अंदाधुंद फायरिंग केली ज्यामध्ये इयत्ता दुसरी ते पाचवीच्या 19 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. अशा बातम्या वाचल्या नंतर मनात पहिलं येतं की आपण विद्यार्थ्यांना कुठे घेऊन चाललो आहे. मुलं जे समाजात पाहतात, जे त्यांना दिसतं त्यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडत असतं. सगळीकडे हिंसा मारामारी याचेच जर वातावरण असेल तर मुलं तशीच बनणार आहे. म्हणून जेव्हा ही बातमी वाचली तेव्हा मी एका न्युज चॅनल वर म्हटले होते की, "आता शाळेत मुलांना बुद्ध शिकवावा लागेल.. कारण जगाला युध्दाची नाही बुध्दाची गरज आहे."


होय, जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. कारण जगाचा इतिहास बघितला तर लक्षात येतं की गेल्या पाच हजार वर्षांत इतकी युद्धं झाली आहेत; सरासरी काढली तर महिन्याला एक युद्ध इतकी निघेल. ही युद्धं कुठेतरी थांबली पाहिजेत; आणि त्यासाठी आपल्याला मुलांवर, विद्यार्थ्यांवर काम करावं लागेल. असं काम करणं शाळेच्या माध्यमातूनच शक्य आहे. शाळेच्या माध्यमातून मुलांना शांतीचा संदेश द्यावा लागेल. असा संदेश ज्यांनी कृती-उक्तीतून लोकांना दिला, असे बरेच महापुरुष आपल्याकडे होऊन गेले; पण खऱ्या अर्थाने विश्वशांतीचा संदेश दिला तो भगवान गौतम बुद्ध यांनी!

शालेय पातळीवर त्यांच्या विचारांचा समावेश आपण करतोच. मूल्यसंस्कार म्हणून आपण ते विचार सोपेपणाने मुलांपर्यंत पोहोचवत असतो. बालवयातच हे संस्कार त्यांच्यावर व्हावेत याची आपण खबरदारी घेतोच आहोत. बुद्धाचे विचार त्यांना सांगणं क्रमप्राप्त आणि महत्त्वाचं आहे; कारण एकविसाव्या शतकातील विद्यार्थ्यांकडे क्रिएटिव्हिटी, कम्युनिकेशन स्किल, एकत्र काम करण्याचं कौशल्य, आनंदी राहण्याची वृत्ती या गोष्टी असायलाच हव्यात. यातली एकही बाब सोपी नाही. हे गुण अंगी बाळगावे लागतात. सगळे गुण माणसाच्या आत असतात; ते शोधावे लागतात. आनंदी राहण्यासाठी आपली विचारसरणी तशी हवी. तशी विवेकी विचारसरणी गौतम बुद्धांच्या शिकवणुकीतून, तिच्या पालनातूनच आपल्याला मिळवता येते. विवेकाचा अर्थ समजणं ही तर फार मोठी गोष्ट आहे. अर्थात, ती अशक्य नाही. अगदी लहानपणापासून मुलांना त्या मार्गावरून नेण्याची गरज आहे. त्या बुद्धांचे विवेकी विचारा सोबत ध्यान शिकवावे लागेल.

विद्यार्थ्यांना मेडिटेशनची अत्यंत आवश्यकता आहे. ध्यानधारणा म्हणजे काय ते आपणच त्यांच्यापर्यंत न्यायला हवं. ध्यानधारणेतून आपण आपल्यापर्यंत पोहोचत असतो. आपण आपल्याला ओळखू लागतो. शालेय पातळीवर खासकरून इयत्ता पाचवीच्या पुढे जर मुलांना ध्यानधारणा शिकवली, तर नक्की उपयोग होतो. धर्मनिरपेक्ष पद्धतीने गौतम बुद्धांनी जे विपश्चना तंत्र विकसित केलं-आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करून ध्यानधारणा करायची- हे तंत्र मुलांना शिकवणं गरजेचं आहे.

विपश्चना म्हणजे दिवसेंदिवस फक्त मौन पाळणं नव्हे. शब्दाशब्दाचे सोयीस्कर असे एकेरी उडते अर्थ लावून आपण आपल्यासाठी बरेच भ्रम निर्माण करत असतो. त्याने आपण उगीचच गोंधळ तेवढा वाढवत असतो. तसं न करता आपण इथे विपश्चनेचा अर्थ लक्षात घ्यायला हवा, समजून घ्यायला हवा. शब्दांचे अर्थ, त्याचे पुढ़चे-मागचे संदर्भ लक्षात घेऊन आपल्या आत रुजवायला लागतात.

ही गौतम बुद्धनिर्मित एक योगसाधना आहे. विपश्चना म्हणजे विशिष्ट पद्धतीने निरखणं, अंतर्मुख होणं, स्वतःच्या आत डोकावणं. त्यातून अवतीभवतीचंही यथार्थ ज्ञान प्राप्त करून घ्यायला स्वच्छ आणि शांत मनाने तयार होणं आणि मग प्राप्त झालेल्या ज्ञानाचा अर्थपूर्ण जीवनासाठी उपयोग करणं अशी ती सारी प्रक्रिया आहे.

विपश्चना ही जीवनातल्या सत्यांपासून पळून जायला शिकवत नाही. तर, जीवनातल्या सत्याला वास्तव रूपात स्वीकारायला शिकवते. भूतकाळातल्या चिंता आणि भविष्यकाळातल्या विवंचना यांत अडकण्याऐवजी बुद्ध आपल्या शिष्यांना वर्तमानाकडे डोळसपणे पाहायला शिकवतात. जे जसं आहे ते तसंच स्वीकारायला शिकवतात. त्यातूनच तटस्थता साधत जाते. तटस्थता म्हणजे हार मानणं नव्हे तर एक प्रकारची अलिप्तता अंगी बाणवणं.

या प्रक्रियेतून एक प्रकारची अद्भुत, अंतर्गत, अनामिक अशी शांती लाभून मन कमालीचं निर्विकारी, संयत आणि तरंगविरहित असं शांत होतं. बऱ्याच मोठमोठ्या कंपन्यांमध्ये हल्ली कर्मचाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या मनःशांतीसाठी विपश्चनेचा आधार घेतला जातो. अगदी कॉर्पोरेट लेव्हलची ऑफिसेससुद्धा याला अपवाद नाहीत.
पण आपण मोठ्यांना ध्यानधारणा शिकवण्याच्या प्रक्रियेत आपण लहान विद्यार्थी विसरून जातो आणि  मग टेक्सास शहरातील शाळेमध्ये अंदाधुंद पिस्तूल ची फायरिंग होते.

बुद्धांच्या आचार-विचारांमागे अलौकिक सामर्थ्य, कुशाग्र बुद्धिमत्ता, असामान्य प्रतिभा यांबरोबरच स्वानुभवाचं अधिष्ठान आहे. सिद्धार्थापासून गौतम बुद्ध म्हणून उदयाला येऊन सामर्थ्य सिद्घ करेपर्यंतच्या काळावधीतली त्यांची जडणघडण लक्षणीय आहे. मुळात सिद्धार्थ जात्याच दयाळू आणि प्रेमळ. त्याला शिकार करणं, लढाई करणं या गोष्टी आवडायच्या नाहीत. एखाद्या जातीचं धार्मिक कर्तव्यच लढाई करणं आहे ही गोष्ट त्याला पटत नसे.

सगळे विवाद फक्त आपसात चर्चा करून सोडवले पाहिजेत, कोणीही कोणत्याही मुद्द्यावर लढू नये असं त्याचं ठाम मत होतं. 'स्वतः जगा आणि दुसऱ्याला जगू द्या' असं सिद्धार्थ सगळ्यांना सांगत असे. म्हणजे आता जो ‘जिओ और जिने दो’ हा नारा आधुनिक शैक्षणिक धोरणाचा पाया ठरतो आहे; त्याचा पाया बुद्धांनी घातला आहे आणि ही काही कुठेही दोन हात करता येत नाहीत म्हणून शोधून काढलेली पळवाट नव्हती. खरं तर सिद्धार्थ धनुर्विद्येत आणि नेमबाजीत निष्णात होता. 'अहिंसा हा मानवाचा परमधर्म आहे, हिंसा करणं पाप आहे' असं त्याचं प्रामाणिक मत होतं. म्हणून तो शस्त्र उचलण्याच्या विरोधात होता.

हा सिद्धार्थ म्हणजे राजा शुद्धोदन आणि राणी मायदेवीचा पुत्र; त्याच्या मावशीने म्हणजे दुसऱ्या आईने गौतमीने त्याला सांभाळलं म्हणून त्याचा उल्लेख गौतम असा केला जातो. क्षत्रीय कुळात इ.स.पू. 563 मध्ये लुम्बिनी इथे बुद्धाचा जन्म झाला. समृद्धीत वाढत असलेला हा संवेदनशील आणि अलौकिक प्रतिभेचा राजपुत्र संकट आणि दुःख यांपासून खूप दूर होता.

पण अखेर त्याला दिसलेल्या तीन दुःखद घटनांनी त्याच्या मनोवृत्तीत जे परिवर्तन झालं, त्याला जी अंतर्मुखता लाभली, ती सिद्धार्थला 'बौद्ध धर्माचे प्रणेते गौतम बुद्ध' या स्थानापर्यंत घेऊन गेली.

त्याचा यशोधरेशी विवाह झाला. त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं. मात्र सिद्धार्थ वैवाहिक जीवनात रमेना. तो वृत्तीने अधिकाधिक विरक्त होत चालला. साऱ्या वैभवाचा, वैवाहिक जीवनाचा, पत्नी आणि पुत्राचा त्याग करून त्याने गृहत्याग केला. संन्यासदीक्षा ग्रहण केली. अत्यंत कठीण तपश्चर्या केली.

अखेर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. अस्थिरता संपून ज्ञानाचा उदय झाला. त्यांना चार सत्य गवसली,

- जगातल्या सर्व दुःखाचं मूळ आसक्ती आहे.
- तिचा त्याग केल्याशिवाय मनाला सुख लाभणार नाही.
- अशा प्रकारे दुःख निर्माण होण्याचं मूळ कारण आणि त्यातून मुक्त होण्याचा अष्टांगिक मार्गही गवसला. हे दिव्य ज्ञान प्राप्त झालेल्या सिद्धार्थला लोक 'गौतम बुद्ध' म्हणून संबोधू लागले.

ज्या वृक्षाखाली त्यांना बोध म्हणजे ज्ञानाची प्राप्ती झाली त्या वृक्षाला पुढे 'बोधिवृक्ष' म्हणून संबोधण्यात येऊ लागलं. ज्ञानप्राप्तीचा आणि सुखप्राप्तीचा मध्यम मार्ग त्यांना गवसला होता. कोणतंही अतिरेकी असं त्यागाचं टोक न गाठता ज्याला वाटत असेल त्याने सुखा साठी 'जीवनाचं योग्य ज्ञान', सत्कृत्य करण्याचा निश्चय, मृदु भाषा, चांगली कृत्यं, उपजीविकेचं प्रामाणिक साधन, यथार्थ प्रयत्न, उच्च विचार आणि मनाची न ढळणारी शांतता या गोष्टींचा सतत अभ्यास केला पाहिजे असं बुद्ध सांगतात.

'प्राणिमात्रांवर दया करा, कोणत्याही प्रकारची हिंसा करू नका, सर्वांशी समानतेने वागा, खोटं बोलू नका. दारु पिऊ नका, परोपकार करा, लोभ धरू नका, सत्याने वागा, आपलं आचरण शुद्ध आणि पवित्र ठेवा; 'हा भगवान बुद्धांचा सरळ साधा उपदेश आहे. सामान्यजनांना तो कळावा म्हणून संस्कृत भाषेत तो न करता ते पाली भाषेत करत असत.

बुद्धांच्या एकूण सर्व उपदेशात मला स्वतःला अतिशय गरजेचा आणि कमालीचा उपयुक्त वाटतो तो शांतीचा उपदेश. अनेक कंगोरे असणारी ही मनःशांती आपण समजून घेतली आणि ती प्राप्त होण्यासाठी मनःपूर्वक प्रयत्न केले तर, जगताना तिचा अवलंब केला तर, आपलं मनुष्यजीवन सार्थकी लागलं असं आपण म्हणू शकू.

ही बुद्धप्रणित शांतता समजून घेण्यासाठी आधी बुद्धाची बुद्धिवादी नैतिकता समजून घ्यायला हवी.

'बुद्धाने काय सांगितलं होतं' ते पुनःपुन्हा आठवण्याची आज नितांत आवश्यकता आहे. आज मानवजात सामूहिक अशांततेकडे वाटचाल करू लागली आहे. या संकटातून मार्ग काढायचा झाल्यास बुद्धाच्या शांततेचा विचार प्रत्येकाच्या मनात रुजायला हवा. त्यांनी सर्वांना बुद्धिवादी नैतिकता सांगितली. त्यांनी धर्माच्या व्याख्या केल्या नाहीत. तर, नीतीवर आधारलेला समाजच कसा शांत आणि सुखी असतो हे दाखवून दिलं. कधीही स्वतःला धर्मप्रवर्तक म्हटलं नाही. 'मी जे सांगितलं तो अंतिम शब्द होय' असा आग्रह त्यांनी कधीही धरलेला नाही. त्यांनी सांगितलेल्या कितीतरी गोष्टी आधुनिक विज्ञानाच्या निकषांवर टिकून राहणाऱ्या होत्या.

मागील दहा हजार वर्षांमध्ये ज्यांनी आपली बुद्धिमत्ता वापरून मानवजातीच्या उत्थानासाठी महान कार्य केली अशा, जगातल्या सर्वोच्च 100 विश्वमानवांची यादी इंग्लंडमधल्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केली. त्या यादीत विद्यापीठाने बुद्धांना अग्रक्रम दिला होता.

आचार्य रजनीश (ओशो) बुद्धांबद्दल म्हणतात, "बुद्धांनंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव भारताने वा जगाने आजपर्यंत निर्माण केला नाही."

गौतम बुद्धांची तत्त्वं खऱ्या अर्थाने आणि सखोल समजून घ्यायला हवीत; केवळ शाब्दिक उदोउदो काही कामाचा नाही. प्रबुद्ध व्यक्तींनी भरलेलं प्रबुद्ध समाजजीवन हे बुद्धांचं स्वप्न होतं. ते नुसते अशा स्वप्नांचे द्रष्टे नव्हते तर अशा समाजाचे निर्माते होते हे लक्षात घ्यायला हवं.

आणि अशा समाजाची त्यांनी सांगितलेल्याच दिशेने प्रगती साधायला हवी. हे आपल्या हातात नक्कीच आहे.

पुतळ्यापलीकडे जात तत्त्वांपर्यंत पोहोचणं हे आपलं कर्तव्य आहे; आणि त्या कर्तव्यपूर्तीची सुरुवात प्रारंभी म्हटल्याप्रमाणे पुढच्या पिढीवर लक्ष केंद्रित करून करायची आहे. मुळात आपण तर या गोष्टी अंगीकारायच्याच आहेत; पण शांतता आणि विपश्चना यांचे अर्थ कृतिशील रीतीने विद्यार्थ्यांच्या मनात घट्टपणे रुजवायचे आहेत. असं घडलं तरच बुद्धप्रणालीचा गाभा असलेला 'विवेक' आपल्याला नीटपणे कळला असं म्हणता येईल.

ज्या शिक्षणातील ज्ञानरचनावादावर आपण चर्चा करतो ती पद्धत गौतम बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना शिकवण्या मध्ये वापरत होते. त्यांचे त्यांच्या शिष्या सोबतचे भावनिक संबंध, तसेच प्रवचन सांगण्याची पद्धत जर पाहिली तर शिष्या सोबत चर्चा करणे आणि प्रश्न निर्माण करणे आणि याचे उत्तर शिष्या कडूनच काढून घेणे ही त्यांची सचोटी होती. चर्चेतून ज्ञानाकडे जाणं हे गौतम बुद्धाने त्यांच्या सर्व शिष्यानं सोबत केलं. त्यामुळेच बुद्ध विचार जगात सर्वत्र पसरला. हीच समजावून शिकवण्याची पद्धत  आता शैक्षणिक धोरणात ज्ञानरचनावाद म्हणून शिक्षकांना आपण सांगत असतो. विद्यार्थ्यांना या पद्धतीने शिकवायला आपण शिक्षकांना प्रेरणा देतो की वर्गात विद्यार्थ्यांसोबत चर्चा करा आणि चर्चा तून ज्ञानाकडे जा. हाच बुद्धांचा शैक्षणिक विचार आहे.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक



Saturday 4 June 2022

स्त्री शिक्षण आणि महात्मा जोतिबा फुले

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख.


'तुम्ही स्त्रीला शिक्षण देताय म्हणजे वाईट मार्गाला लावताय'
'स्त्री ही अज्ञानाची खाण आहे'
'स्त्रीला शिकवणं म्हणजे मूर्खपणा आहे'


ही तीन वाक्यं वाचून झटका बसला? तुम्हाला राग आला? हे काय लिहिलंय असं वाटलं? पण भारतात दोनशे-अडीचशे वर्षांपूर्वी समाजाची अशीच धारणा होती. स्त्रीला शिक्षणाचं दार उघडं करून दिलं महात्मा जोतीराव फुले यांनी. त्यांनी शिक्षणाचं महत्त्व अभूतपूर्व पद्धतीने सांगितलं-

'विद्येविना मति गेली
मतिविना नीति गेली
नीतिविना गती गेली
गतिविना वित्त गेले
वित्ताविना शूद्र खचले
इतके अनर्थ एका
अविद्येने केले...

शिक्षण घेण्याचा अधिकार फक्त उच्चवर्णीय समाजाला आणि तोही फक्त पुरुषांनाच होता. जोतिबा फुले यांचा हा निष्कर्ष एखाद्या कवितेसारखा मांडलेला असला तरी तो समाजाचा खरा चेहरा दाखवतो, तत्कालीन सामाजिक संरचना उलगडून दाखवतो; दुर्दैवाने आजही भारतातल्या काही भागात तो लागू होतो. मी 'चाकं शिक्षणाची' या फिरत्या शाळेमार्फत झोपडपट्टीतल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणतो त्या प्रक्रियेत लक्षात येतं की अजूनही अनेक मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं. अशा वेळी जोतिबांचं कार्य किती महत्त्वाचं होतं हे लक्षात येतं. आज स्त्री शिकली, स्वतःची माणूस म्हणून तिने प्रगती केली. ती शिकल्याने कुटुंबाची प्रगती झाली आणि देश प्रगतीपथावर गेला. या सगळ्यामागे जोतिबा आणि सावित्रीबाई यांचं खूप मोठं योगदान आहे.

जोतीरावांनी ज्या वर्षी शिक्षणाचं कार्य सुरू केलं ते 1848. हे अमेरिकेतल्या स्त्री मुक्तीच्या चळवळीचं वर्ष होतं. याच वर्षी कार्ल मार्क्स यांचा कम्युनिस्टांचा जाहीरनामाही प्रसिद्ध झाला. या दोन घटनांबरोबर भारतामध्ये स्त्री मुक्तीचं, स्त्री शिक्षणाचं दार उघडलं.

भारत हा जातीव्यवस्थेत अडकलेला देश आहे. त्याचबरोबर अंधश्रध्दा, अविवेकी परंपरा, बुरसटलेले विचार हे जोतिबांच्या काळात प्रचंड प्रमाणात होते. शूद्रांवर कसे अन्याय होत हे हल्लीच्या पिढीला कोणी सांगितलं तर विश्वास ठेवणार नाही कोणी. शूद्राची साधी सावली पडली तरी विटाळ मानणारा समाज माणसाला माणूस म्हणून वागवत नव्हता. अशा काळात जोतिबांनी यामागचं कारण शोधलं. अस्पृश्याना गुलामगिरीचं जीवन का सहन करावं लागलं याचा सखोल अभ्यास केला. आणि या सगळ्यामागे त्यांना अज्ञान हे प्रमुख कारण सापडलं. उच्चवर्णीयांची चुकीची मानसिकता तसंच रूढी आणि परंपरांमधून आलेले विचार तर होतेच पण मुख्य कारण अज्ञान होतं. म्हणून जोतिबांनी स्त्रियांना, अस्पृश्य, शूद्र, आदिवासी बांधवांना शिक्षण द्यायचं ठरवलं आणि या कार्याची सुरुवात त्यांनी घरातून केली. जोतिबांनी त्यांच्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाईंना शिकवलं. तिचं स्वतंत्र असं व्यक्तिमत्त्व घडवलं. सावित्रीनेही त्यांना मोलाची साथ दिली. या दोघांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला.

शिक्षण हे समाज बदलण्याचं प्रभावी साधन आहे. समाजात परिवर्तन घडवायचं असेल तर सर्वांना समान शिक्षण मिळालं पाहिजे; हे त्यांनी ओळखलं होतं आणि यासाठी त्यांनी कार्य सुरू केलं. त्यांनी पुणे शहरात 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्याआधी, शाळा कशी हवी, शाळेत काय शिकवलं पाहिजे याचा सखोल अभ्यास केला. अहमदनगर इथे मिशनरी शाळा चालवणाऱ्या मिस फॅरोट यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं. त्यांनी सावित्रीबाईंना शिक्षक म्हणून नियुक्त केलं. काम सोपं नव्हतं. प्रवाहाच्या उलट्या दिशेने पोहण्यासारखं कार्य होतं. विरोध प्रचंड होता. 1848 पूर्वी स्त्रिया नि शूद्रांना शिक्षणाचा अधिकारच नव्हता. इंग्रज सरकार शिक्षणासाठी जे प्रयत्न करत होतं त्यांचा फायदा फक्त उच्चवर्णीयांना होत होता. शूद्र आणि मुलींच्या शिक्षणासाठी इंग्रजांनी काही केलं तर त्यांना छुपा विरोध व्हायचा. संबंधित शाळा बंद पडायच्या. पुरोगामी विचारांचे लोक फार कमी होते; अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच.

अशा काळात जोतिबांनी समाजव्यवस्थेच्या विरोधात जात अहमदनगरहून परत येताच पुण्याला पहिली मुलींची शाळा सुरू केली. या शाळेत वाचन, अंकगणित, व्याकरण असे विषय शिकवले जात. समाजविरोधातल्या या उलाढालींचा परिणाम म्हणजे त्या काळातल्या सनातन विचारसरणीच्या लोकांनी पुण्यात फुले कुटुंबाला त्रास द्यायला सुरुवात केली आणि जणू धर्मच बुडाला आहे असं वातावरण निर्माण केलं. तरी जोतिबा आणि सावित्रीबाई मागे हटले नाहीत. जर तेव्हा ते मागे हटले असते तर तुमची-माझी आई, बहीण हा लेख वाचूच शकली नसती. देश अंधश्रधेच्या जाळ्यात अडकून राहिला असता.

सावित्रीबाईंवर चिखल, दगड, शेण यांचा मारा होऊनसुद्धा त्या आपल्या निश्चयावर ठाम राहिल्या. त्या तेव्हा फक्त अठरा वर्षांच्या होत्या. तर, जोतिबा एकवीस वर्षांचे होते. आज जेव्हा वीस-बावीस वर्षांचा तरुण भरकटताना आपण पाहतो तेव्हा या फुले दाम्पत्याचं कौतुक वाटतं. मानसशास्त्रीय भाषेत ज्याला भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्ता म्हणतात ती या दोघांकडे प्रचंड होती. म्हणूनच ते एवढं मोठं कार्य उभं करू शकले. त्यांनी समाजाला प्रगतीच्या दिशेने नेलं. त्या काळी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांकडे स्वच्छ कपडेही नसत. आंघोळीला पाणी नसे. कारण शूद्रांना सार्वजनिक ठिकाणी पाणी घेण्याचा अधिकारच नव्हता. अशा परिस्थितीत या दोघांनी विद्यार्थ्यांना तीही मदत केली; आंघोळीसाठी पाणी उपलब्ध करून देणं, कपडे पुरवणं या गोष्टींसाठीही तेव्हा विशेष प्रयत्न करावे लागत होते. सगळे प्रयत्न करून फुले दाम्पत्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावली. मुलींना शाळेत येण्यासाठी सुरक्षा मिळावी म्हणून शाळेत शिपायांची भरती केली. अनेक अडचणींवर मात करत शाळा चालू ठेवली.

प्रारंभी एक पटसंख्या असलेली शाळा पुढे अठ्ठेचाळीस पटसंख्येपर्यंत पोहोचली. पुढे बुधवारपेठ, रास्ता पेठ, वेताळपेठ अशा ठिकाणी शाळा सुरू झाल्या. अस्पृश्यांची मुलं- मुली शिकू लागली. परिवर्तनाचं चक्र वेगात फिरू लागलं. पण अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच होत्या. मुलामुलींना तुम्ही एकत्र बसवून शिकवता म्हणूनही त्रास दिला गेला; दोन-अडीचशे वर्षांपूर्वी हा विचार मांडण सुद्धा पाप समजलं जायचं. जोतिबा फक्त शाळा काढून थांबले नाहीत तर तळागाळातल्या लोकांनी वाचलं पाहिजे म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी सार्वजनिक वाचनालय सुरू केलं. महार, मांग विद्यार्थ्यांना सार्वजनिक ठिकाणी ब्राह्मण समाज येऊ द्यायचा नाही; म्हणून त्यांच्यासाठी वाचनाची खास सोय करण्यात आली. जोतिबांच्या या सगळ्या कार्याची दखल इंग्रज सरकारला घ्यावी लागली. शाळेचं नाव सर्वदूर पोहोचू लागलं. विद्यार्थी वाढले, वर्तमानपत्रांमध्ये कौतुक होऊ लागलं. समाजाचं मतपरिवर्तन होऊ लागलं. बरेच समाजसुधारक जोतिबांच्या कार्याला मदत करू लागले. इंग्रज सरकारने जोतिबांचा जाहीर सत्कार केला.

जोतिबांच्या शैक्षणिक कार्यामुळे सरकारने धोरणं बदलली. 1830 मध्ये उच्चवर्णीयांना फक्त शिक्षण नि शाळा उपलब्ध करून देण्याचं इंग्रजांचं धोरण होतं. ईस्ट इंडिया कंपनीने मद्रास सरकारला शिक्षणविषयक धोरणामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की, 'शिक्षणात अशा सुधारणा झाल्या पाहिजेत की ज्यांनी वरिष्ठ वर्गाची नीती नि बुद्धिमत्ता यांची पातळी उंचावेल. ज्यांना फुरसत आहे आणि ज्यांचं समाजात वजन आहे अशाच लोकांच्या शिक्षणाची आपण काळजी वाहिली पाहिजे. त्यामुळे त्या जातीच्या कल्पनात मोठा बदल घडून येईल. तसा फरक खालच्या बहुसंख्य जातींमध्ये जलद गतीने घडून येणार नाही.' म्हणजे इंग्रज सरकारही अस्पृश्यांना शिकवायच्या मनस्थितीत नव्हतं. मात्र जोतिबांच्या कार्यामुळे चौतीस वर्षांनी म्हणजे 1864 साली त्यांना त्यांच्या धोरणात बदल करावा लागला. ईस्ट इंडिया कंपनीने 'वूड खलिता' पाठवला, त्यानुसार कोणत्याही सरकारी शाळेत किंवा कॉलेजमध्ये जातीचं कारण सांगून कोणासही प्रवेश नाकारण्यास बंदी करण्यात आली. हा कालखंड आपल्याला लक्षात घ्यायला हवा. स्त्रीला, अस्पृश्यांना, दलित, कुणबी, शूद्र यांना शिक्षणाची गरज नाही किंबहुना त्यांना त्याचा अधिकारच नाही असा तेव्हा समाजाचा विचार होता. गरिबी, अंधश्रद्धा आणि जातीव्यवस्था मानणाऱ्या लोकांचा हा काळ. स्वतंत्र नसलेला तेव्हाचा तो भारत. तिथे प्रकाशाची ज्योत जोतिबानी लावली. म्हणून त्यांचं कार्य इतर शिक्षणतज्ज्ञांच्या कार्याहून महान आहे.

बाकीच्यांनी शिक्षण घेणाऱ्यांसाठी आपले विचार मांडले. जोतिबांनी तळागाळापर्यंत शिक्षण नेलं. हजारो पिढ्या शिक्षणापासून वंचित असणाऱ्यांना त्यामुळे शिक्षण मिळू लागलं. म्हणूनच जोतिबा नि सावित्रीबाई यांच्या शिक्षणकार्याची तुलना कोणाच्याही कार्याशी होऊ शकत नाही.

त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन पुढे विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी धोंडो केशव कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बरंच कार्य केलं आणि प्रगतीसाठी समानतेचं दार सर्वांसाठी उघडलं. जोतिबांच्या कार्यामुळे इंग्रज सरकार जोतिबांचे शैक्षणिक विचार अंमलात आणू लागलं. ब्रिटिशांनी जो 'हंटर शिक्षण आयोग' नेमला होता त्या आयोगाला जोतिबांनी मार्गदर्शन केलं. 'हंटर शिक्षण आयोगा'ला सांगितलं की शिक्षक प्रशिक्षित हवा. तो शेतकरी समाजातून आलेला असला तर अधिक उत्तम. शिक्षणाने विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारज्ञान निर्माण करता यायला हवं. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे प्राथमिक शिक्षण सक्तीचं हवं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पासष्ट वर्षांनी शिक्षणाचा मोफत आणि सक्तीचा कायदा आला. जोतिबांनी त्या काळातच सरकारला सांगितलं होतं की प्राथमिक शिक्षण सक्तीचं करा.

त्या काळी सरकार उच्च शिक्षणाला अधिक महत्त्व देत असे; पण जोतिबांचं लक्ष प्राथमिक शिक्षणावर केंद्रित असे. आता जगातले बरेच नोबेल पारितोषिक विजेते, अर्थतज्ज्ञ सांगतात की गरिबीचं मूळ प्राथमिक शिक्षण न मिळण्यामध्ये आहे. जोतिबा हे उत्तम अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी त्याचा अभ्यास केला होता. जोतिबांनी बरीच ग्रंथनिर्मिती केली. बरंच अभ्यासपूर्ण लिखाण केलं. काव्य, नाट्य, निबंध, लेख लिहिले. 'गुलामगिरी', 'शेतकऱ्याचा आसूड' यांचे लिखाण केले.
शिवाजीमहाराजांवरचा पोवाडा लिहिला.  सांगायचा मुद्दा हा की जोतिबांच्या सामाजिक कार्याला वैचारिक बैठक होती. मुळातून खोलात जाऊन प्रश्नांची उत्तरं शोधून अंमलबजावणी करणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल1827 साली झाला. साधारण त्यांच्या जन्मापूर्वी म्हणजे शंभर वर्षापूर्वी भारतात ईस्ट इंडिया कंपनी याने त्याचं काम सुरू केलं आणि त्यांचा मृत्यू  28 नोव्हेंबर 1890 साली झाला. यांच्या 63 वर्षांच्या आयुष्यात चाळीस वर्ष त्यांनी समानता आणि शिक्षण यावर काम केलं आणि जन समूहाचे शिक्षण ही मानसिकता आणि कार्य महाराष्ट्रात रुजवलं.

आज पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात आलं आहे. त्यांच्या कार्याचा हा सन्मान आहे. आता स्त्री शिकू लागली म्हणून त्यांचं कार्य थांबलं असं होत नाही, तर अशा कामाची अधिक गरज निर्माण झाली आहे असं वाटतं. आता कायद्याने समानता आली आहे पण जागतिक स्तरावर ती समानता अस्तित्वात असणं गरजेचं आहे. अजूनही स्त्रीभ्रूणहत्या पूर्णपणे थांबलेली नाही. मुलींना न पाठवता मुलांना परदेशात शिकायला पाठवणारे पालक भेटतात तेव्हा वाटतं अजूनही परिस्थिती तशीच आहे. फक्त प्रश्नांचं स्वरूप बदललं.

ते बदललेलं स्वरूप काहीसं छुपं असल्यामुळे अधिक त्रासदायक आहे; आणि म्हणूनच मागे जात जोतिबांच्या वैचारिक बैठकीतच त्या प्रश्नाच्या उत्तराची नस शोधणं आवश्यक आहे. ती नस सापडली की खुल्या झालेल्या समानतेच्या उत्तराची अर्थपूर्ण आणि काटेकोर अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. म्हणून या एकविसाव्या शतकात फुलेंचा विचार शिक्षणात अजून प्रखरतेने रुजवायला हवा.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक



शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...