Saturday 25 September 2021

तुम्ही श्यामची आई आहात?

श्यामच्या आईचा आदर्श ठेवून शिकूया मनातून भावनिक संवाद कसा करावा: आजच्या पाल्याची गरज

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या भाषणात मला श्यामच्या आईचा एक किस्सा ऐकायला मिळाला. सानेगुरुजी बाहेरगावी शिकायला असताना ते वार लावून जेवायचे. वार लावून जेवणं म्हणजे गरीब परिस्थितीमुळे जेवणाची मेस न लावता आठवड्यातील प्रत्येक दिवशी दानशूर लोकांकडे जेवायला जाणं; जसं सोमवारी एका व्यक्तीकडे तर मंगळवारी दुसऱ्या व्यक्तीकडे. हे वार लावून जेवणाचे दिवस ठरलेले असायचे.. पूर्वीच्या काळी खूप सारे विद्यार्थी या व्यवस्थेचा फायदा घेत असत. त्यामुळे त्यांना परगावी किंवा शहरात राहून शिक्षण घेणं शक्य होत असे. एक दिवस काय झालं, श्यामचं ज्यांच्याकडे जेवण ठरलं होतं ते कुटुंब अचानक बाहेरगावी गेलं आणि त्यादिवशी श्यामला म्हणजे सानेगुरुजींना उपाशी राहायची पाळी आली. श्याम जेव्हा त्यांच्या घरी गेला तेव्हा  घराला कुलूप होतं. आता जेवण कसं आणि कुठे मिळणार हा प्रश्न श्यामला पडला. रात्री उपाशी राहण्याची वेळ आली. त्याच्याजवळ बाहेर जेवणासाठी पैसे नव्हते. त्याने मनात विचार केला की, रस्त्यामध्ये विठ्ठलाचं मंदिर लागतं. रात्री पुजारी नसतो.. मंदिरातील ताम्हनात कोणी ना कोणी पैसे टाकत असतं. ते मंदिरातील पैसे घेऊ आणि त्यामधून काही खायला विकत घेऊ. त्या विचाराने शाम मंदिरात गेला आणि ताम्हनातले पैसे काढण्यासाठी त्याने हात पुढे केला.. तेवढ्यात त्याला आवाज ऐकू आला. हा आवाज त्याच्या आईचा होता. तो दचकला, त्याचा हात आपोआप पाठी आला. नक्कीच हा भास होता.. पण आई म्हणाली,  "थांब श्याम, तू चोरी करतो आहेस!" श्याम तिथेच थांबला आणि पैसे न घेता घराच्या दिशेने चालू लागला. आई मनातून त्याला सांगत होती.. "श्याम तू चुकत होतास बाळा, अरे कितीतरी लोक आयुष्यभर उपाशी राहतात. एक वेळचं जेवतात.. तुला तर फक्त एक रात्र उपाशी राहण्याची वेळ आली.. सहन कर ना रे.." 

इथे मला सर्व पालकांना हे सांगायचं आहे की या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक पाल्याला अशी, मनात दडलेली,मनातून बोलणारी आई हवी आहे. मनातून संवाद साधणारे बाबा हवे आहेत.  

कारण आजकाल मुलं गैरमार्गाला जाऊ शकतात असं सभोवताली वातावरण आहे. या पिढीतील पालकांसमोर मुलं वाढवतांना जेवढी आव्हाने आहेत,  तेवढी आधी कधी नव्हती. एकुलतं एक बाळ, पालकांचं व्यस्त राहणं, स्पर्धा, सोशल मीडिया आणि सामाजिक मूल्यांचा ऱ्हास यामुळे या पिढीतील मुलांसमोर बरीच प्रलोभने आहेत. यासाठी पाल्य आणि पालकांचं नातं हे भावनिक, घट्ट आणि मैत्रीपूर्ण हवं. तरच पाल्याच्या मनात बोलणारी आई जागा घेऊ शकते. 

मुलं पालकांना घाबरून किंवा बाबा आपल्याला मारतील या भावनेने काही वाईट कृत्य करत नसेल तर ते  फक्त पालक उपस्थित असतील तेव्हाच घडतं. जेव्हा मूल मोठं होत.. त्याला शिंग फुटतात.. ते स्वतःचा निर्णय घेऊ शकतं, अशा वेळी मग ते  कुठलंही कृत्य करण्याआधी वडिलांना काय वाटेल याचा विचार करत नाही. कारण लहानपणी अति धाक किंवा मारण्याच्या भीतीपोटी ते फक्त गैरकृत्य करत नव्हतं. 

इथेच तुमच्या पालकत्वाचा कस लागतो. तुमच्या मुलाबरोबर किंवा मुलीबरोबर उत्तम तऱ्हेचा भावनिक पातळीवर संवाद तुम्ही साधू शकत असलात तर, तेवढं मैत्रीपूर्ण नातं तुमच्यात असलं तर ..  तो किंवा ती गैरकृत्य आई-वडिलांना वाईट वाटेल म्हणून करणार नाही. मुलं धजावणारच नाहीत असलं तसलं काही करायला. कारण मोठं होताना त्यांचा तोल सांभाळायला त्यांच्या मनात दडलेली आई पुढे होऊन त्याला सावरते, त्याच्याशी बोलते आणि   प्रत्यक्ष तिथे उपस्थित नसतांना सुद्धा त्या पाल्याला मार्गदर्शन करत असते. होता करता ते मूल मोठं झालं की स्वयंपूर्ण होतं. मनात दडलेल्या आईचा हात मग प्रत्येक वेळी आधारासाठी नाही, तर आशीर्वादासाठी पुरेसा ठरतो. मात्र त्यासाठी निसरड्या वयात आईने मनःसंवाद साधावा लागतो. 

अशी श्यामची आई सर्वांमध्ये निर्माण होणं ही काळाची गरज आहे. 

आज-काल पंधरा सोळा वर्षांच्या मुली प्रेमात पडतात. शरीरसंबंध ठेवतात. तेव्हा आई-वडिलांचा मुलीशी कसा संवाद असेल याचा विचार करावा. जेव्हा घरात प्रचंड कडक नियमांची बरसात होत असते तिथे मुलं थोडी वयात आली की नियम मोडण्याच्याच मानसिकतेमध्ये असतात. स्वातंत्र्य म्हणजे घरच्यांचे नियम तोडणं असे चुकीचे विचार त्यांच्या मनात निर्माण होतात. सुज्ञ पालक घरात नियम कमी आणि संवाद जास्त, भावनिक संबंध उत्तम आणि मैत्रीपूर्ण ठेवत असतात.

मग अशा घरात तरुण वयात आलेली मुलगी आईला सांगते की , "आज कॉलेजमध्ये मला एकाने डेटला येतेस का विचारलं", बघा इथे संवादाचं दार उघड होतं. आई तिला योग्य सल्ला देते, सावरते, पुढेही अनेकदा ती अप्रत्यक्षपणे मनातून तिच्याशी संवाद साधते. 

मुलं विश्वासाने जेव्हा आईला सांगतात तेव्हा मोठ्या अडचणी येण्यापासून ती वाचू शकतात. आई-वडील योग्य समुपदेशन करू शकतात. 

जेव्हा आई वयात आलेल्या मुलाला सांगते की "तू कॉलेजला भरपूर मैत्रिणी कर पण कोणाचाही गैरफायदा घेऊ नको. रस्त्यावरून कुठल्याही मुलीला छेडू नको. जेव्हा तू कुठल्या मुलीला छेडशील तेव्हा समज तू तुझ्या बहिणीला किंवा आईला छेडत आहेस." या पद्धतीचे संस्कार आज मुलांवर करण्याची वेळ आली आहे. तरीही अनेकदा आजकालचे पालक पाल्याच्या चुकीच्या कृत्यांचं समर्थन करताना दिसतात. 

माझा मुलगाच कसा योग्य, समोरचा कसा चुकीचा हे पटवून देण्यासाठी कुठल्याही पद्धतीत भांडतात. शिक्षकांशी उद्धट बोलतात. अशा वेळी चुकीच्या कृत्यांना पालकांनी दिलेली ही मूक संमती असते. पुढे जाऊन हे मूल वाईट वळणावर जाण्याची शक्यता असते. तसं होऊ द्यायचं नसेल तर सर्व पालकांनी श्यामच्या आईचा आदर्श ठेवून त्यांच्या पाल्याशी भावनिक नातं गुंफावे. वादातून संवादाकडे.. संवादाकडून सुसंवादाकडे वाटचाल करावी. 

ती कशी.. पुढच्या लेखात पाहू.. आत्ता एवढंच की तुमच्या मुलाशी तुमचं भावनिक नातं घट्ट आहे का हा प्रश्न स्वतःला विचारा!! 

सचिन उषा विलास जोशी 

शिक्षण अभ्यासक



Friday 17 September 2021

सुजाण पालकत्वाची मेख

सकाळ वृत्तपत्रांमधील शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा लेख.

संध्याकाळी एके ठिकाणी रस्त्यावर डोंबाऱ्यांचा खेळ चालू होता. एक लहान मुलगी तोल सावरत दोरीवरून चालत होती. बघणाऱ्यांच्या जीवाचा थरकाप होत होता. ती जर खाली पडली तर तिला लागू शकेल, तिचा पाय फ्रॅक्चर होऊ शकेल..असे विचार मनात येत होते पण ती मुलगी मात्र अतिशय आत्मविश्वासाने चालत होती. हा आत्मविश्वास तिला ढोलकीच्या आवाजामुळे मिळत होता, तो तिचा आधार होता. तो आवाज तिला सांगत होता, 

" बाळ, तू पडणार नाहीस. मी आहे, तू आत्मविश्वासाने या दोरीवरून तोल सांभाळून चालू शकतेस." तो ढोलकीचा आवाज तिला आंतरिक प्रेरणा देतो. कारण ती ढोलकी वाजवणारे दुसरे तिसरे कोणी नसतात ते त्या चिमुकलीचे आई किंवा वडील किंवा दोघेही असतात. ते तिला ढोलकीवर थाप मारून आत्मविश्वास आणि प्रेरणा देतात.

प्रश्न हा आहे की आपल्या ढोलकीचा आवाज आपल्या पाल्यापर्यंत पोहोचतोय का?की प्रेरणा देणे या प्रकाराची आपल्याला जाणीवच नाहीये? मोटिव्हेट करणं आपल्याला माहीतच नाही का?पालक म्हणून आपण आपल्या पाल्याचं कौतुक कधी , किती आणि कसं करावं, याचा आपण किती आणि कसा विचार करतो? 

मुलांना वाढवताना पालकांकडून केलं जाणारं कौतुक सर्वांगीण विकासासाठी फार महत्त्वाचं ठरतं. सातत्याने नवं काही करण्याची ऊर्मी त्यामुळे टिकून राहते. मूल लहान असताना आपण त्याच्या बऱ्याच गोष्टींचं कौतुक करतो. पण खरी कौतुकाची प्रकर्षाने आवश्यकता असते मुलाच्या तिसरी ते कॉलेज पर्यंतच्या शैक्षणिक प्रवासात. त्या काळात ही गरज अधिक असते. तेव्हा मुलं विविध गोष्टी, विविध प्रयोग स्वतः करून पाहत असतात. अति उत्साहात असतात किंवा काही जण घाबरतात, तेव्हा पालकांनी योग्य भूमिका घ्यायला हवी. त्यांच्यातला आत्मविश्वास प्रमाणात राखणं खूप महत्त्वाचं असतं. नवीन प्रयोग करताना मुलं कधी चुकतात, पडतात, तर कधी यशस्वी होतात. यामध्ये पालक म्हणून तुमची प्रतिक्रिया खूप महत्त्वाची असते. आपल्याला सोप्या वाटणाऱ्या गोष्टी मुलांना अवघड वाटू शकतात. त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांच्या प्रयत्नांना कौतुकाची थाप मिळते तेव्हा मुलांच्या मेंदूला चालना मिळते. 

आपल्या मेंदूमध्ये दोन फंक्शन्स नेहमी ऍक्टिव्हेट असतात. एक रिवॉर्ड फंक्शन आणि दुसरं पनिशमेंट फंक्शन. जेव्हा पालक मुलांचं खरंखुरं कौतुक करतात तेव्हा रिवॉर्ड फंक्शन ऍक्टिव्हेट होतं आणि त्यातून कायमस्वरूपी मोटिव्हेशन मिळतं. असं अनेक प्रसंगांतून साठत आलेलं मोटिव्हेशन पुढे आत्मविश्वासात रूपांतरित होतं. 

मात्र इथे पालकांनी एक मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे. कौतुक हे खऱ्या प्रयत्नांचं आणि वयानुरूप हवं. चुकीच्या गोष्टींचं कौतुक हे मुलांमध्ये नकारात्मक भावनांची निर्मिती करतं. मुख्य म्हणजे आपण जेव्हा प्रयत्नांचं कौतुक करण्याऐवजी मुलाच्या कृतीचं करतो , तसंच अगदी छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक करतो, तेव्हा पुढे मोठेपणी चुकीचे अतार्किक विचार त्याच्या मनात निर्माण होऊ शकतात. खास करून मुलांच्या चुकीच्या वर्तणुकीचं किंवा मेहनत न घेता मिळालेल्या यशाचं जेव्हा कौतुक होतं, तेव्हा मुलांच्या मनात हा विचार रुजतो की ,' माझ्या प्रत्येक कृतीचं कौतुक व्हायलाच हवं.' जेव्हा कुठल्याही विचारांना ' च ' लागतो, तेव्हा अतार्किक विचारांचा जन्म होतो, खऱ्या प्रयत्नांना महत्त्व न देता माणूस मनाच्या कौतुकात मग्न होतो. मग ही कौतुकाची सवय झालेली मुलं मोठी झाली की त्यांची इच्छा असते की, माझ्या बायकोने, माझ्या नवऱ्याने, बॉसने माझं कौतुक केलंच पाहिजे. मुख्य म्हणजे प्रत्येक गोष्टींचं कौतुक व्हायला हवं. ते मिळालं नाही, झालं नाही की अशा व्यक्ती नैराश्यात जगतात. 

थोडक्यात काय, तर लहानपणी केलेलं अति कौतुक भविष्यात चुकीच्या, अतार्किक विचारांना जन्म देत असतं तर कमी कौतुक भविष्यात आत्मविश्वासाचा अभाव निर्माण करत असतं. त्यामुळे लहानपणी योग्य प्रमाणात, योग्य वेळी, योग्य प्रयत्नांचं कौतुक होणं गरजेचं आहे. 'पालकत्व ही कला आहे' असं उगीच नाही म्हटलं जात.पालकांना ही कला अवगत झाली तरच पाल्याची वाढ योग्य दिशेने होत राहील. यालाच म्हणतात ढोलकी वाजवण्याची कला. कौशल्य विकसित करण्याच्या नि होण्याच्या काळात योग्य जागी ढोलकीवर थाप पडली पाहिजे. तरच मुलांना फाजील आत्मविश्वासाला किंवा न्यूनगंडाला सामोरं जावं लागणार नाही. म्हणूनच 'तारतम्य' फार महत्त्वाचं असतं. 

ढोलकीवर काय, किंवा पाठीवर काय, थाप कधी , कशी , किती प्रमाणात द्यायची हे पालक- शिक्षकांना ठरवता आलंच पाहिजे. 

सचिन उषा विलास जोशी 

शिक्षण अभ्यासक



Friday 10 September 2021

सरकार मायबाप शाळेचा श्रीगणेशा केव्हा?

"जब से कोरोना महामारी चल रही है तब से स्कूल बंद है।"  हे वाक्य इयत्ता सहावी ते आठवीच्या 42 टक्के विद्यार्थ्यांना नीट वाचता येत नाही. इयत्ता तिसरी ते पाचवीमधील 69 टक्के विद्यार्थ्यांना हे वाक्य वाचताच आलं नाही, तर ग्रामीण भागातील 77 टक्के विद्यार्थ्यांना हे वाक्य वाचता आलं नाही. कोरोनाआधी ही परिस्थिती 45 ते 50 टक्के होती. पाचवीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरीचं वाचन जमत नव्हतं. आता ऑगस्ट 2021 मध्ये ही संख्या 77 टक्के झाली आहे.  

"कुठे नेऊन ठेवलाय भारत माझा?" होय, महामारीमध्ये जी गोष्ट उशिरा बंद करायची होती आणि लवकर चालू करायची होती तिचं उलट झालं. याचं कारण शिक्षणाला अत्यावश्यक सेवेत आपण कधीच धरत नाही. 

अझिम प्रेमजी युनिव्हर्सिटी, भारत ग्यान विज्ञान समिती, एम.व्ही फाउंडेशन या संस्थेने नुकताच स्कूल लॉकडाऊन वर सर्व्हे केला. जो स्पष्ट सांगतोय, जर आता शाळा चालू झाल्या नाहीत तर शालेय विद्यार्थ्यांचं आयुष्यभराचं नुकसान होईल. आसाम, बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तमीळनाडू, पंजाब, उत्तर प्रदेश अशा भारतातील 15 राज्यात हा सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेनुसार फक्त शहरी भागातील 24 टक्के विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने नियमित शिकत आहेत. याचाच अर्थ 76 टक्के शहरी विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाच्या बाहेर आहेत किंवा अधून मधून शिक्षण घेत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ग्रामीण भागातील फक्त आठ टक्के विद्यार्थी नियमित ऑनलाईन शिक्षण घेत आहेत.

गंमत अशी की, शहरातील 70 टक्के पालकांकडे तर 51 टक्के ग्रामीण पालकांकडे स्मार्टफोन आहे तरीसुद्धा ते मुलांना ऑनलाईन शिक्षण नीट उपलब्ध करून देऊ शकत नाहीत. याचं मुख्य कारण व्यवस्थित नेटवर्क नाही, डाटा परवडत नाही, पालकांना स्वतःचा स्मार्टफोन त्यांच्या नोकरीसाठी लागत असतो.. अशा अनेक कारणांनी विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाच्या बाहेर आहेत. फक्त 11 टक्के विद्यार्थ्यांकडे स्वतःचे स्मार्टफोन, संगणक, आयपॅड आहेत. टेक्नॉलॉजी जर सर्वांना उपलब्ध झाली तर ती गरीब-श्रीमंत दरी मिटवून सर्वांना समानतेच्या पातळीवर आणते. पण त्या टेक्नॉलॉजीचं साधन जर मूठभर लोकांकडेच राहिलं तर ही दरी प्रचंड वाढते. खरंतर, सरकारने सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना टॅबलेट देऊन त्यामध्ये अभ्यासक्रम समाविष्ट करून द्यायला हवे होते. गेले 500 दिवस विद्यार्थी 'मिड डे मील' भोजन- योजनांपासून वंचित आहेत. त्यात करोडो रुपयांची बचत झाली असेल. तो पैसा या टॅब्लेटकडे वळवावा अन्यथा सरकारने त्वरित शाळा चालू कराव्यात. 

या सर्व्हेनुसार ग्रामीण भागातील 97 टक्के तर शहरी भागातील 91 टक्के पालक, शाळा चालू करण्याची मागणी करतायत. सरकारने शाळा चालू केल्या तर पालक पाठवायला तयार आहेत. शाळा चालू करण्याबाबतचा निर्णय संस्थाचालक आणि पालकांवर सोपवावा. समजा चुकून कोणी विद्यार्थी कोरोनाबाधित झाला तर त्यासाठी कोणीही शासनाला जबाबदार धरणार नाही. मुख्य म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियावाले 'ब्रेकिंग न्यूज' म्हणून शासनाला जबाबदार धरणार नाहीत. अशी सामंजस्याची भूमिका घेतली की सर्व SOP चं काटेकोर पालन करून शाळा सुरू होऊ शकतात. 

या सर्वेनुसार 58 टक्के विद्यार्थी शिक्षकांना प्रत्यक्ष वा ऑनलाईन पद्धतीने भेटलेले नाहीत. शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. 58 टक्के विद्यार्थी जर शिक्षकांनाच विसरून गेले, त्यांचं भावनिक नातं तकलादू झालं तर याचा थेट परिणाम भविष्यात शिक्षण घेण्यावर होईल. काही शिक्षक जीवाचा आटापिटा करून वस्ती पाड्यांवर जाऊन विद्यार्थ्यांच्या घरी भेटी घेत आहेत, कारण तेवढेच भावनिक नातं घट्ट राहावं. भावनिक नातं जितकं चांगलं.. शिकणं-शिकवणं तितकं सोपं. आपल्याला शिकण्या शिकवण्याचं हे तंत्र शाबूत ठेवायचं असेल तर शाळा चालू व्हायला हव्यात. 

71 टक्के ग्रामीण विद्यार्थ्यांनी तर कुठलीही परीक्षा दिली नाही. परीक्षा देऊनच विद्यार्थी हुशार आहे की नाही हे समजतं असं नाही पण परीक्षेच्या भीतीने तरी भारतातील विद्यार्थी अभ्यास करतात. (जे अतिशय चुकीचं आहे.) परीक्षाच नाही त्यामुळे मुलं अभ्यासच करत नाहीत. या सर्व्हेनुसार नियमित अभ्यास करणारे शहरी भागातील फक्त 24 टक्के विद्यार्थी तर 8 टक्के ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत. तेसुद्धा या विद्यार्थ्यांचे पालक कदाचित जागरुक असतील किंवा  चांगले शिक्षक किंवा शाळा त्यांच्या संपर्कात असतील. 

एकूणच परिस्थिती फार भयंकर आहे. बाल मेंदू जडणघडणीचा हा काळ जर, निर्णय दिरंगाईच्या लाल फिती खात असतील तर, ही उद्याची पिढी या सरकारला माफ करणार नाही. तिसऱ्या लाटेची वाट बघत आपण भावनिक, सामाजिक, आर्थिक नुकसान करत आहोत. ज्या क्षणी तिसरी लाट येईल त्या क्षणी शाळा बंद करा पण आता शाळा उघडा. 

80% खाजगी बजेट स्कूल जर कायमस्वरूपी आर्थिक अडचणीमुळे बंद झाल्या तर सरकारला जीडीपीच्या किमान 8 टक्के खर्च करावा लागेल. जो आता 1.5 टक्के करतं आहे आणि तो खर्च करूनही आजही सरकारी शाळेच्या भिंती पडल्या आहे, कंपाउंड नाही, विद्यार्थ्यांना शुशी करायला मुतारी नाही. सामाजिक संस्थाच्या पैशातून बिचारी शिक्षक लोकसहभागातून बांधून घेतात. त्यामुळे भारतातील जेमतेम टिकलेली शिक्षणपद्धती आहे ती अजून डगमगीत करायची नसेल तर सरकारने शाळा चालू कराव्यात नाहीतर
"जब से ये सरकार आई है, तब से हमारे बच्चों का भविष्य अंधेरे मे है।" असं पालक वाचणार नाहीत, तर लिहितील. म्हणून सरकार मायबाप आता शाळा चालू कराव्यात ही विनंती. 

सचिन उषा विलास जोशी 
शिक्षण अभ्यासक


Thursday 9 September 2021

कोरोना आला आणि भारतामध्ये शिक्षक 'दीन' झाला*

 शिक्षक दिनानिमित्त सकाळ वृत्तपत्र मधील  शिक्षण अभ्यासक  सचिन उषा विलास जोशी यांचा लेख

खरं तर भारतातील शिक्षक कोरोना आधीसुद्धा दीनच होता. म्हणजे 5 सप्टेंबरला शिक्षक किती महान असतात याचे गोडवे गातात पण व्यवहारात शिक्षकांना तेवढा सन्मान मिळत नाही. *जे प्रोफेशन जगातल्या इतर प्रोफेशन्सना घडवतं त्या शिक्षकी पेशाला आदर, मान, सन्मान रोजच्या जगण्यात नसतो.* हल्ली विद्यार्थी, पालक यांच्या मनात शिक्षकांविषयी प्रेम दिसत नाही. संस्थाचालकांना वाटतं, शिक्षक म्हणजे आपले नोकरच आहेत. हवं ते काम सांगा. राजकारण्यांना वाटतं शिक्षक म्हणजे मोठी वोट बँकच आहे. आपली राजकारणातली कामं सांगायचं हक्काचं व्यासपीठ. सरकारला वाटतं, कोणत्याही योजना अंमलात आणायच्या असतील तर  'बिनपगारी फुल अधिकारी' म्हणजे शिक्षक. त्यांना हल्ली अशैक्षणिक कामांत इतकं अडकवून ठेवलं जातं की ते शिकवायचं विसरून जातील.

*एवढं होऊनही शिक्षक वस्त्या- वस्त्यांत, गावा- गावांत, पाड्यांवर शिकवतात. ग्रामीण ते शहरी भागात सगळीकडे शिक्षक ज्ञानदानाचं कार्य करतात.* पालकांनो, तुम्ही जर या पेशाला 

मान -सन्मान दिला नाही तर, संस्थाचालकांनी त्यांना चांगला मोबदला दिला नाही तर या पेशात उत्तम दर्जाचं मनुष्यबळ येणार नाही. जेव्हा चांगले, ज्ञानी शिक्षकी पेशातून निघून जातील किंवा हा पेशा 'करिअर' म्हणून निवडणार नाहीत. मग तुमची आमची मुलं 'घडतील' कशी? *हो, अशी परिस्थिती आली आहे.* 

कोरोनामुळे कितीतरी खाजगी शाळा बंद पडल्या. *पालकांच्या आणि सरकारच्या चुकीच्या दृष्टिकोनामुळे शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली.* आज बरेच शिक्षक शेतावर काम करतायत. पार्ट टाइम ट्युशन्स घेतायत. तर बाकी वेळ छोट्या- मोठ्या दुसऱ्या नोकऱ्या शोधतायत. ज्या शाळा उत्तम ऑनलाईन शिक्षण देण्यात यशस्वी झाल्या, त्या शाळेतील शिक्षकांना सुद्धा स्वतःला तंत्रज्ञानावावर आधारित नवं कौशल्य शिकायला खूप संघर्ष करावा लागला; पण त्यांनी तो केला. *पहिले ऑनलाईन स्क्रीन शिकण्याचा संघर्ष.. मग नेटवर्क मिळवण्याचा... घरातील सर्व सदस्यांसमोर शिकवण्याचा.. मग गुगल क्लासरूमवर विद्यार्थ्यांना कंट्रोल करण्याचा.. मग त्या विद्यार्थ्यांच्या जवळ त्यांच्या महान आया बसलेल्या असतात, फक्त शिक्षकांच्या चुका काढण्यासाठी..त्यांना न चिडता, हसून समजून घेऊन-बऱ्याच वेळा अपमान गिळून-पुन्हा आनंदी मूडने शिकवायला सुरुवात करणं.. अशा अनेक संघर्षातून आपले हे शिक्षक गेले.* विद्यार्थ्यांना चुकीची माहिती जाऊ नये म्हणून एक व्हिडिओ अनेक वेळा रेकॉर्ड केला, तो शंभर वेळा एडिट केला आणि विद्यार्थ्यांना शेअर केला.


*पालकांनो, विचार करा की आपल्या चिमुकल्यांना ऑनलाईन शिक्षण मिळालं नसतं तर ही दोन वर्षं कशी गेली असती? असा विचार करा की या टिचर्सनी स्वतः मध्ये बदल केला नसता तर? तुमच्या मुलांचा किती लर्निंग लॉस झाला असता..* मुख्य म्हणजे या शिक्षकांमध्ये 50 वर्ष वयाचे उत्तम गणित, शास्त्र शिकवणारे शिक्षक आहेत. *ज्या वयात आराम करायचा असतो त्या वयातील ज्येष्ठ अनुभवी शिक्षकांना हे सर्व नवीन कौशल्य शिकावं लागलं.* यातल्या बऱ्याच शिक्षकांना मी ओळखतो, जे फक्त विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आणि त्यांच्या प्रेमापोटी शिक्षकी पेशाला समर्पित केल्यामुळे त्यांनी ऑनलाईन शिक्षणाचं कौशल्य आत्मसात केलं. त्यांची मुलं मोठी झाली आहेत, चांगली नोकरी करतात. त्यांनी वडिलांना / आईला सांगितलं की या वयात दहा- दहा तास स्क्रीनवर काम करण्यापेक्षा नोकरी सोडून द्या. तुमच्या तब्बेतीवर परिणाम होतो. चार तास शिकवण्यासाठी स्क्रीनवर सहा तास अधिकचा वेळ खर्च करावा लागतो. *तेव्हा हे शिक्षक म्हणतात, "अरे बाळा, तुझ्या टिचर्सनी पंधरा - वीस वर्षांपूर्वी असा विचार केला असता तर? तुला आज चांगली नोकरी लागली असती का रे?"*


वाईट याचं वाटतं की ज्या घरात दुसरं कोणी कमावणारं नसतं, आणि या शिक्षकांच्या पगारावर घर चालतं, तेव्हा त्यांची परिस्थिती बघवत नाही. बऱ्याच संस्थाचालकांनी नाईलाजाने शिक्षकांचा पगार 50% केलाय. त्यांची पण मजबुरी आहे. आधीच बँकेचं कर्ज काढलेलं, त्यात बऱ्याच संस्थाचालकांनी शिक्षकांचं घर चालावं म्हणून अधिकचं कर्ज काढलं. *भारतात 66% विद्यार्थी खाजगी शाळेत शिकतात. त्यांचे लाखो शिक्षक कोरोनामुळे दीन होत आहेत.  म्हणून मी म्हणालो, ''शिक्षक दिनाला शिक्षक  'दीन' होत आहे.''*


हे थांबवायचं असेल तर त्या प्रत्येक शिक्षकाच्या पाठीशी उभे राहा. या कोविडमध्ये त्यांनी असामान्य कर्तव्य बजावलं आहे. *तंत्रज्ञान महान शिक्षकांची जागा घेऊ शकत नाही  पण महान शिक्षकांच्या हाती जेव्हा तंत्रज्ञान जातं, तेव्हा परिवर्तन होतं.* समाज म्हणून आपण सर्वांनी या महान शिक्षकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. *कितीतरी सरकारी शिक्षकांनी कोविड काळात नोकरी केली त्यामुळे त्यांना प्राणही गमवावे लागले.* आपण इतकं असंवेदनशील होऊन चालणार नाही की शिक्षक 'दीन' होतोय आणि आपल्याला काही फरक पडणार नाही. *अशीच असंवेदनशीलता दाखवली तर उद्याची पिढी दीन झालेली तुम्हाला चालेल का?* नाही ना? मग चला, खऱ्या अर्थाने शिक्षकदिन साजरा करू.. *तुमच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांना फोन करा, मेसेज नाही, फोनच करा.. आणि मनापासून 'Thank you' म्हणा आणि 'sorry' सुद्धा..*

*"आम्ही तुम्हाला चुकीचं आणि लागेल असं बोललो असू तर माफ करा. तुम्ही ग्रेट आहात.'' बघा, शिक्षक काय म्हणतील...* 

*फोन ठेवल्यावर ते फक्त डोळे पुसतील.*

टीप: "दीन" चा अर्थ दुबळा, गरीब, बिचारा..

आणि "दिन" म्हणजे दिवस 

*सचिन उषा विलास जोशी* 

शिक्षण अभ्यासक

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...