Wednesday, 18 June 2025

तिसरी भाषा आणि तीन महत्त्वाचे प्रश्न :

तिसरी भाषा आणि तीन महत्त्वाचे प्रश्न :

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा लेख


महाराष्ट्र सरकारचा तृतीय भाषा निर्णय NEP 2020 आणि बाल मेंदू विकासाला ला सुसंगत आहे का? 
भाषातज्ज्ञ तिसऱ्या भाषेला विरोध का करतात? 
आणि AIच्या युगात अनेक भाषा शिकणे किती आवश्यक? 
या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण सविस्तर समजून घेणार आहोत.



भारतीय शिक्षण क्षेत्रात भाषाशिक्षण केवळ शैक्षणिक गरज नसून, सांस्कृतिक समज, बहुभाषिक संवादक्षमता आणि सामाजिक समावेशासाठी एक महत्त्वाचा आधार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने घेतलेला तृतीय भाषा धोरणाबाबतचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020), राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023 (NCF 2023) आणि SARTHAQ अंमलबजावणी आराखडा यांच्याशी पूर्णतः सुसंगत आहे.

NEP 2020 आणि NCF 2023 या दोन्ही धोरणांमध्ये Foundational Stage मध्ये तिसऱ्या भाषेसंदर्भात पुढीलप्रमाणे स्पष्ट उल्लेख आढळतो:
NEP 2020 – पॅरा 4.16:
“Children will be exposed to different languages early on (but with a focus on the home/local language/mother tongue), starting from the Foundational Stage onwards, for oral exposure, but reading and writing in other languages will begin in the later stages.”

याचा अर्थ, Foundational Stage मध्ये तिसऱ्या भाषेचा श्रवण/संवादात्मक पातळीवर अनुभव देण्यात यावा, परंतु वाचन-लेखन नंतर सुरू करावं.

NCF 2023 मध्ये:
Volume I, Section 2.3.4 – “Children will be engaged in listening to and speaking multiple languages through songs, stories, poems, and simple conversations from the early years.”

NCF-FS, Chapter 3: Language and Literacy Development – तिसऱ्या भाषेचा अनुभव “through natural and informal contexts” म्हणून घेण्याचा प्रस्ताव आहे.
थोडक्यात NEP 2020 – पॅरा 4.16, NCF 2023 – Volume I, Section 2.3.4 व NCF-FS, Chapter 3 या सर्व ठिकाणी Foundational Stage पासून तिसऱ्या भाषेचा संवादात्मक आणि अनौपचारिक अनुभव द्यावा असा स्पष्ट उल्लेख आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्रात तिसरी भाषा इयत्ता पहिलीपासून अनौपचारिक पद्धतीने शिकवण्याचा नुकताच शासन निर्णय झाला.

महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांना तृतीय भाषा निवडण्याची मुभा दिली आहे. ही मुभा NEP 2020 मध्ये अधोरेखित केलेल्या विद्यार्थीकेंद्रित, लवचिक आणि समावेशक शिक्षणपद्धतीचे मूर्त रूप आहे. प्रत्येक विद्यार्थी वेगळ्या पार्श्वभूमीचा, भाषेचा व अनुभवाचा असतो. त्यामुळे एकसंध भाषा धोरण न ठेवता, विविधतेचे स्वागत हे परिवर्तनशील शिक्षणव्यवस्थेचे लक्षण आहे. हे करताना कुठे मातृभाषेला डावले नाही. मराठी माध्यम शाळांसाठी पहिली भाषा ही मराठी आहे. इतर माध्यमांसाठी दुसरी भाषा मराठी आहे. तर तिसरी ही अनौपचारिक भाषा असेल.
म्हणजे विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच विविध भाषांचा अनुभव द्यावा व इयत्ता 3 नंतर वाचन-लेखनाचा प्रारंभ करावा, असे धोरण सुचवले आहे. तीन-भाषा सूत्रात लवचिकता राखून भाषा बदलण्याची मुभाही दिली आहे.

NCF 2023: पायाभूत स्तरापासून बहुभाषिकतेचा आग्रह
Foundational Stage पासून गाणी, गोष्टी, संवाद यांद्वारे भाषांशी नातं निर्माण करावं, आणि वाचन-लेखन इयत्ता 3 पासून सुरू करावं, असा स्पष्ट दृष्टिकोन मांडला आहे. मेंदूच्या संज्ञानात्मक, सामाजिक आणि भावनिक विकासात याचा उपयोग होतो.

मेंदू विकास व मानसशास्त्रीय पाया:
शिशुवस्थेतील मेंदू विकास शिक्षणासाठी निर्णायक असतो. संशोधन सांगते की, मेंदूचा 80% विकास 8 वर्षांपूर्वीच होतो. या कालावधीत बहुभाषिक श्रवण आणि संवादाने मेंदूतील सिनेप्स वाढतात, स्मरणशक्ती आणि भाषिक कौशल्य विकसित होते. त्यामुळे तिसरी भाषा शिकवण्याचा सर्वोत्तम काळ हा पायाभूत स्तराचा (इयत्ता बालवाडी ते 2 री) असतो. फक्त शिकणे औपचारिक नसते तर फक्त कानावर शब्द पडणे एवढे मर्यादित असते.

भाषा शिकवण्याची पद्धत:
भाषा शिक्षण म्हणजे शब्दांची पाठांतर नव्हे, तर भाव, अर्थ, आणि संवादाची प्रक्रिया आहे. मुलं गाणी, गोष्टी, संवाद, चित्रं, नाट्य आदींच्या माध्यमातून भाषा आत्मसात करतात.
NEP 2020 व NCF 2023 नुसार
तिसरी भाषा ‘अनौपचारिक, संवादात्मक, आणि अनुभवाधारित’ पद्धतीने शिकवावी.
बहुभाषिकतेचा वापर करून भाषा संवेदनशीलता निर्माण केली जावी यासाठीच तिसरी भाषेचा निर्णय झाला आहे.

अंमलबजावणीसाठी युक्ती:
शिक्षक कन्नड, उडिया, पंजाबी,हिंदी इत्यादी भाषांतील लोकगीते वर्गात गायला शिकवणे. चित्रे असलेली गोष्ट वाचून तिसऱ्या भाषेतील शब्द वापरून एक साधी गोष्ट तयार करणे.
विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या भाषांतील नमुने वापरून नाट्य सादरीकरण करायला लावणे.
शिक्षक वर्गात साप्ताहिक भाषिक सत्र (Language Lab periods) घेऊ शकतात उदाहरणार्थ आठवड्यातून एक वेळेस तिसऱ्या भाषेतील गोष्ट, गाणं, चित्रफीत दाखवावी. अशा वर्गांना ‘भाषा आनंद शाळा’ म्हणावे.
तसेच वर्गशिक्षक पालकांकडून त्यांच्या भाषेतील गोष्टी, म्हणी गोळा करणे. शाळांमध्ये विविध भाषा जाणणारे शिक्षक असल्यास, तिसऱ्या भाषेचा वापर करत शाळा-अंतर्गत संवाद साधावा.

प्रत्येक तिसऱ्या भाषा शिक्षकाने मासिक एक अनुभव नमुना तयार करून इतरांसोबत वाटावा.
पालक-शिक्षक मेळाव्यात मुलांनी तिसऱ्या भाषेतील 2 मिनिटांची सादरीकरणे करणे.
यासाठी शिक्षकांसाठी मार्गदर्शन आवश्यक आहे. SCERT आणि DIET यांच्यामार्फत "बहुभाषिक अध्यापन" विषयावर शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित करावे लागेल.

सर्वात महत्त्वाचे मूल्यांकनाचा लवचिक दृष्टिकोन बाळगावा आणि तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मध्ये स्पष्ट म्हटले आहे.
एवढं असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये हिंदी अनिवार्यला विरोध झाला आणि आता तिसऱ्या भाषेला सुद्धा विरोध आहे.

महाराष्ट्रात तिसऱ्या भाषेला विरोध का होतो?
याचे कारण भाषिक अस्मिता आणि सांस्कृतिक संरक्षण आहे.
महाराष्ट्रातील बहुतांश विरोध हिंदीला तिसऱ्या भाषेच्या रूपात अनिवार्य करण्याच्या प्रयत्नांवर केंद्रित आहे. भाषातज्ञ यांचा यामागील मुख्य युक्तिवाद म्हणजे:
भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून, एक सांस्कृतिक ओळख असते. जर हिंदीसारखी शक्तिशाली भाषा तिसऱ्या भाषेच्या रूपात लहान वयात शिकवली गेली, तर ती स्थानिक भाषेचे – विशेषतः मराठीचे – वाचन, लेखन व बोलण्याचे स्थान झपाट्याने घेऊ शकते. या प्रक्रियेला भाषातज्ञ "linguistic replacement" किंवा "language attrition" म्हणतात.
आणि काही अंशी ते खरे सुद्धा आहे.

दुसरे कारण शैक्षणिक तणाव आणि बहुभाषिक दबाव:

NEP 2020 भलेही तिसऱ्या भाषा अनुभवावर भर देतो, तरी शाळेतील शिक्षकांची क्षमता, उपलब्ध TLM, व शिक्षक प्रशिक्षण हे मर्यादित आहेत. त्यामुळे शिक्षक अधिक ओळखीच्या भाषांना प्राधान्य देतात – जसे की हिंदी. यामुळे स्थानिक/आदिवासी भाषांना आणि मराठीला प्राधान्य मिळत नाही.

भाषातज्ञांची मते आहेत की:
हिंदी ही 'dominant language' आहे, जी संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी स्थानिक भाषेवर वर्चस्व गाजवते.
“Dominant languages tend to replace weaker or minority languages in the absence of strong policy protection.” (UNESCO, 2003)
हे आपल्याला मुंबईत बघायला मिळते. महाराष्ट्रात मुंबई असून सुद्धा काही मराठी माणसं सुद्धा एकमेकांशी मुंबई मध्ये हिंदीतच बोलतात.

'असर रिपोर्ट' व तिसऱ्या भाषेच्या गरजेबाबत विचार.

असर रिपोर्टनुसार शालेय साक्षरतेची स्थिती काय?
2022 च्या असर (Annual Status of Education Report) नुसार: इयत्ता 5 मधील सुमारे 40% विद्यार्थी इयत्ता 2 च्या वाचन स्तरावरच आहेत. म्हणजेच त्यांना मूलभूत वाचन क्षमता – जसे की साधी वाक्ये वाचणे, समजून घेणे – यामध्ये अडचण आहे.
ही परिस्थिती असताना याचा अर्थ तिसऱ्या भाषेची गरज आहे का?
सोप्या शब्दांत सांगायचं तर महाराष्ट्रातील 40% विद्यार्थ्यांना व्यवस्थित मराठी इंग्रजी वाचता येत नाही तर तिसरी भाषा चा लोड द्यावा का?

NEP व NCF म्हणतात की तिसरी भाषा ही सुरुवातीला गाणी, गोष्टी, चित्रफीत, संवाद या माध्यमातून द्यावी – म्हणजे शिकवणं नव्हे, तर सादर करणं असे सुचवते.

मला असे वाटते तिसरी भाषा व मूलभूत शिक्षण यांचं संतुलन करावे लागेल.
मूलभूत साक्षरता (FLN) हे NEP चं प्राथमिक लक्ष आहे (पॅरा 2.2).
तिसरी भाषा जर योग्य पद्धतीने, अनौपचारिक, मजेदार पद्धतीने शिकवली गेली, तर ती मेंदू विकासास पूरक ठरते.
मात्र कडकपणाने पाठांतर, लेखन आदींचा आग्रह टाकल्यास ती उलट शिक्षणात अडथळा ठरू शकेल. जी भीती भाषा तज्ञ यांना आहे आणि ती योग्य आहे.

महाराष्ट्रात तिसऱ्या भाषेला विरोध मुख्यतः मराठी भाषेच्या सांस्कृतिक सुरक्षिततेसाठी व शिक्षण तणाव कमी करण्यासाठी आहे.

मात्र, NEP च्या मार्गदर्शक तत्वांनुसार तिसऱ्या भाषेचा अनुभव जर योग्य वयात, योग्य पद्धतीने दिला गेला, तर तो उपयुक्त ठरू शकतो, पण त्यासाठी शिक्षक-प्रशिक्षण, शैक्षणिक साहित्य, पालक सहभाग आणि धोरणात्मक संतुलन आवश्यक आहे.
जर मूलभूत वाचनच येत नसेल, तर तिसरी भाषा 'शिकवणं' नव्हे, तर 'अनुभव देणं' गरजेचं आहे.

दुसरा एक दृष्टिकोन असा आहे की जरी महाराष्ट्रात सुमारे 40% विद्यार्थ्यांना मूलभूत वाचन कौशल्यात अडचणी आहेत, तरी उरलेले 60% विद्यार्थी त्यांच्या इयत्तेनुसार दोन भाषा आत्मविश्वासाने बोलू व लिहू शकतात. आपण समजू हे प्रमाण पुढे काही वर्ष तसेच राहिले तर अशा विद्यार्थ्यांसाठी जर तिसरी भाषा शिकण्याची ती संधीच नाकारली, तर हे त्यांच्या भाषिक क्षमतेला डावलणं ठरेल. जे विद्यार्थी भाषिकदृष्ट्या सक्षम आहेत, त्यांच्या क्षमतेनुसार प्रगतीची दारे उघडण्याऐवजी ती बंद करणं हे त्यांच्या हक्कांवर अन्याय करणं ठरेल.

कृत्रिम बुद्धिमत्ता च्या युगात एक भाषा पुरेशी की अनेक भाषा आवश्यक?

आज आपण एका अभूतपूर्व तंत्रज्ञानयुगात जगत आहोत – कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI). संवाद, अनुवाद, शिक्षण यापासून ते सर्जनशील लेखन, संगीत, आरोग्यसेवा अशा सर्वच क्षेत्रांत एआयचे प्रभावी अस्तित्व दिसते. भाषाशिक्षणाचाही अपवाद नाही.

पूर्वी नवीन भाषा शिकणे म्हणजे वर्षानुवर्षे सराव, ग्रंथ, शिक्षक आणि सातत्य असे सगळं आवश्यक होतं. पण आज AI आधारित लाइव्ह ट्रान्सलेशन टूल्स जसे की Google Translate, ChatGPT Voice Mode, Microsoft Translator, iTranslate, DeepL AI, इ. तुम्हाला कोणतीही भाषा रिअल टाइममध्ये समजून सांगतात, आणि संवाद सुलभ करतात.

मग प्रश्न असा: अनेक भाषा शिकणं गरजेचं आहे का?
नवीन तंत्रज्ञानामुळे एक भाषा पुरेशी होऊ शकते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला कुठलीही एक भाषा चांगली अवगत असेल, भले ती मराठी, गुजराती, तामिळ तरी ChatGPT, Google Lens किंवा Apple Vision Pro सारख्या उपकरणांच्या साहाय्याने तुम्ही फ्रेंच, जपानी, स्पॅनिश, चायनीज किंवा अगदी भारतीय आदिवासी भाषांमध्येही अनुवाद करून ऐकू शकता किंवा बोलू शकता.

लवकरच  AI मुळे Multilingual Learning होऊ शकते. नुकताच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. त्यामुळे महाराष्ट्रात इंजिनिअरिंग डॉक्टर याचे अभ्यासक्रम शिक्षण आता मराठीतून मिळायला सुरुवात होत आहे. हे सर्व ज्ञान मराठीतून आणण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा मोठ्या प्रमाणात वापर केला आणि सर्व जगातील ज्ञान आपल्याला मातृभाषेतून आता मिळाला फारच सोपं झालं आहे.
आता नवीन संशोधन हे दाखवत आहे की AI ला भाषाशिक्षणात भागीदार बनवलं, तर मुलं आणि प्रौढ दोघंही अधिक सहजतेने आणि आनंदाने भाषा शिकू शकतात. उदाहरणार्थ, Duolingo सारख्या अ‍ॅप्समध्ये AI आधारित gamified भाषाशिक्षण दिलं जातं, जिथे चुकल्यावर AI चूक समजावतो, उदाहरण देतो, आवाजात सुधारणा करतो.

आधुनिक तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं आहे की, आता असे डिव्हाईस उपलब्ध आहेत जे कानाला लावले किंवा डोळ्यांवर गॉगल घातले, की समोरची व्यक्ती कोणत्याही भाषेत बोलत असली तरी तिचं भाषण तुम्हाला तुमच्या मातृभाषेत लाईव्ह ऐकायला मिळतं.

उदाहरणार्थ, AI-सक्षम स्मार्ट ग्लासेस किंवा इअरबड्स हे समोरचं भाषण लगेच ओळखतात, त्याचं अचूक भाषांतर करतात आणि तुमच्या कानात रिअल टाइममध्ये तुमच्या भाषेत सांगतात. यात Google Pixel Buds, Timekettle Translator Earbuds, Meta AI Glasses यासारखी उपकरणं आघाडीवर आहेत.

हे उपकरण केवळ संवाद सुलभ करत नाहीत, तर भाषेची अडचणच दूर करतात. त्यामुळे भविष्यात फक्त एक भाषा चांगली आत्मसात केली, तरी जगभराशी सहज संवाद साधणं शक्य होणार आहे.

मग तरीसुद्धा तिसरी भाषा का शिकावी?

तंत्रज्ञानाने संवादासाठी एक भाषा पुरेशी केली आहे, पण अनेक भाषा शिकणे हे केवळ गरज नसून एक संस्कृतिक, बौद्धिक आणि सामाजिक समृद्धीचं साधन आहे. एआय तुमचं काम सोपं करतो, पण भाषा शिकण्याचं सौंदर्य आणि खोलपणा माणूसच अनुभवू शकतो.

थोडक्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समजून त्याला आत्मसात करूया.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


तिसरी भाषा आणि तीन महत्त्वाचे प्रश्न :

तिसरी भाषा आणि तीन महत्त्वाचे प्रश्न : शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा लेख महाराष्ट्र सरकारचा तृतीय भाषा निर्णय NEP 2020 आणि बाल मे...