Wednesday, 6 November 2019

विद्यार्थ्यांना विसरभोळे कोण बनवतो?

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख

शाळेतील बर्‍याच विद्यार्थ्यांना का वाटते की, “आपण अभ्यासात हुशार नाही!" विद्यार्थ्यांच्या मनात नेहमी विचार येतो की, “माझी स्मरणशक्ती चांगली नाही, मला गणित अवघड जाते.“ मी हुशार विद्यार्थी/विद्यार्थींनी नाही..मी मठ्ठ आहे.. इत्यादी.

असे विचार विद्यार्थ्यांच्या मनात का येतात? याचा पालक म्हणून, शिक्षक म्हणून आपण कधी विचार केला आहे का? या नकारात्मक भावनांचा शिक्षणपध्दतीशी काय संबंध आहे हे आपण नीट समजवूून घेऊ.

“गोबल्स” नावाचा हिटलरचा सल्लागार होता. त्याची एक पॉलिसी होती. एखादी गोष्ट खोटी असेल तर ती समाजात खरी आहे. असे सातत्याने बिंबवतात. पहिले समाज म्हणते ही गोष्ट खोटी आहे, पण सातत्याने बिंबवून नंतर समाज समजायला लागतो की, ही गोष्ट खरी आहे. आपण पण विद्यार्थ्यांशी वागतांना असेच बोलतो. आपण विद्यार्थ्याला बोलतो तु मूर्ख आहेस का रे? पहिले तो/ती नाही म्हणतो. पण पहिलीत, दुसरीत, तीसरी इयत्तेपासून सातत्याने लेबल लावले जाते. की तु मूर्ख आहे. तुला अक्कल नाही, तुला समजत नाही, मग पाचवी पासून तो /ती स्वत:ला समाजायला लागते की, मी मूर्ख आहे. ती मान्य करते की, मला अक्कल नाही.

लक्षात ठेवा पालकांनो, आपण विद्यार्थ्यांना जे समजतो तेच स्वत:ला तसेच समजतात.

तुम्ही जसे आपल्या मुलांबद्दल विचार कराल तसेच ते घडत जातात. तुम्हाला वाटत असेल की, आपला मुलगा/मुलगी विसरभोळी आहे. ते सर्वांसमोर, वर्गासमोर त्याला दहा दा बोलून दाखवले तर तो/ती विसरभोळीच बनणार आहे.

तुम्हाला वाटतयं त्याला परिक्षेत आठवणार नाही. तर त्याला खरंच परिक्षेत आठवणार नाही. तुम्हाला वाटतंय तो/ती चुकणार आहे आणि त्याला त्याची सातत्याने जाणिव करुन दिली तर तो/ती चुकणारच आहे. कारण ‘यश हे माणसाच्या इच्छेपासून सुरु होते.’

वैद्यकिय शास्त्राचा जनक हिप्पोक्रिटसने २४०० वर्षापूर्वी म्हणाले, “माणसाचं यश आणि अपयश मेंदूतुन निर्माण होते.” लहान मुलाचा मेंदू कम्प्युटर सारखा असतो. त्याला जे इनपुट द्याल तेच आऊटपुट मिळते. म्हणून नेहमी विद्यार्थ्यांशी विधायक बोलले पाहिजे तरच विद्यार्थी खर्‍या अर्थाने हुशार बनतील. त्याच्यांत एक आत्मविश्‍वास राहिल.

असंख्य विद्यार्थ्यांचे समुपदेशन केल्यावर एक गोष्ट लक्षात आली की, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्‍न येत असतो. तो म्हणजे, “मी कसा आहे?’‘ याचे उत्तर तो आपल्याला आलेल्या अनुभवातून, त्याला मिळालेल्या यश-अपयशातून आणि सर्वात महत्त्वाचं कुटुंबाने, शाळेने, शिक्षकांनी त्याच्याविषयी प्रकट केलेले मत यातुन या सर्वांच्या आधारे तो स्वत:विषयी तो एक इमेज बनवतो. त्याची इमेज विधायक बनली तर प्रगती होते आणि इमेज नकारात्मक बनली तर प्रगती खुंटते. मग विद्यार्थी बोलतात की, मला गणित अवघड जाते, माझी स्मरणशक्ती चांगली नाही, मी हुशार नाही, मी विसरभोळा आहे. विद्यार्थ्यांची इमेज बनविण्यात पालकांची आणि त्याहुनही जास्त शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे.

बरेच शिक्षक एक वैज्ञानिक वास्तवतेपासून दूर असतात. ती वास्तविकता म्हणजे विद्यार्थ्यांकडे त्यांचे शिक्षक कोणत्या दृष्टीने पाहतात आणि त्यांंच्या विषयी कोणते मत बाळगता त्यावर त्या विद्यार्थ्यांची संपूर्ण वर्तवणुक ठरत असते. म्हणून शिक्षकांनी नेहमी विद्यार्थ्यांना नेहमी प्रेरीत केले पाहिजे. त्यांना निगेटीव्ह लेबल चिटकवले नाही पाहिजे.

लहान मुले सिमेंट प्लास्टर सारखी असतात. आपण जे बोलु ते शब्द मेंदूत कायमचे चिपकले जातात. विद्यार्थ्यांचे नेहमी कौतुक केले पाहिजे. शाळेत, वर्गात, घरात त्याचे/तीचे कौतुक होईल अशा संधी उपलब्ध करुन दिल्या पाहिजे. “तुला जमंतच” ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजली पाहिजे. त्यासाठी शाळेत-घरात नेहमी उत्साही वातावरण, विधायक बोलणे, प्रयत्नाचे कौतुक व्हायला हवे.

एका गणित प्राध्यापकाने एक प्रयोग केला त्याने 30 विद्यार्थ्यांचे दोन ग्रुप केेले. 15 विद्यार्थ्यांच्या एका ग्रुपला एका वर्गात बसविले आणि दुसर्‍या 15 विद्यार्थ्यांच्या गु्रपला दुसर्‍या वर्गात बसविले. ते प्राध्यापक पहिल्या वर्गात गेले आणि तेथे फळ्यावर एक गणित मांडले. गणिताचा प्रश्‍न लिहून ते म्हणाले हे जगातील सर्वात सोपे गणित आहे. ज्याला गणित जमत नाही त्याला सुध्दा हे गणित सोडवता येईल. हे सांगून ते दुसर्‍या वर्गात गेले. दुसर्‍या गु्रपला पण तेच गणित फळ्यावर मांडले आणि विद्यार्थ्यांना सांगितले हे जगातील सर्वात अवघड गणित आहे. खुद्द आईनस्टाईनला सुध्दा हे गणित सोडविता आले नव्हते. पाहु कोणाला गणिताच्या एखाद्या दोन पायर्‍या जमता का? थोड्या वेळाने ते प्राध्यापक दोन्ही वर्गात गेले. जिथे सांगितले होते की, हे जगातले सर्वात सोपे गणित आहे तेथील 15 पैकी 13 विद्यार्थ्यांना ते गणित बरोबर सोडविता आले. दुसर्‍या वर्गात जिथे सांगितले होते की, हे जगातील सर्वात अवघड गणित आहे तेथील 15 पैकी 14 विद्यार्थ्यांना ते गणित सोडविता आले नाही. काय झाले असेल या विद्यार्थ्यांना? काय घडले असेल त्यांच्या मनात? एकदा का मनाला हे पटले की एखादी गोष्ट आपल्याला जमु शकत नाही तर त्यांना ती जमत नाही. आपल्या बोलण्यावागण्यातुन विद्यार्थ्यांना समजले की, ही कठीण गोष्ट आहे आणि यात आपण अपयशी होवू तर विद्यार्थी मनाच्या पातळीवर तसाच विचार करतात. त्यांची ठाम समजूत होते की, आपल्याला हे जमू शकत नाही.

मला असे वाटते मुलांमध्ये “मला जमू शकते,“ “आय कॅन डू “ ही भावना खोलवर विद्यार्थ्यांमध्ये जेव्हा शिक्षक रुजू होतील तेव्हा विद्यार्थी खऱ्या अर्थाने हुशार बनायला सुरुवात होतील.. त्यांना असं वाटणार नाही की मी विसरभोळे आहे.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक

Friday, 1 November 2019

मुलांना राग का येतो?

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्र मधील लेख

पालक झाल्यानंतर आणि मुलं तीन-चार वर्षांची पुढे झाल्यानंतर प्रत्येक आई-वडिलांना त्यांच्या मुलांचा / मुलींचा रागाचा सामना करावा लागतो. प्रत्येक मूल हे रागावते, चिडते. प्रत्येकाचे थोडे अधिक प्रमाण कमी-जास्त असते. रागाच्या तऱ्हा सुद्धा वेगवेगळ्या असतात.

मुळातच लहान मुलांना राग का येतो यावर बरेच संशोधन झाली. लहान मूल भाषेद्वारे किंवा बोलून त्यांच्या भावना व्यक्त करू शकत नाही. त्यांना नक्की काय हवे असते ते त्यांना व्यक्त करता येत नाही म्हणून त्यांना राग येतो.. असे काही संशोधन सांगते.

मुलांना जे हवे असते ते करायला नाही मिळाले आणि आपण त्यांना विरोध केला की मुलं रागावतात आणि रडतात. त्यांना मोठ्यांना पटवून समजून सांगता येत नाही. त्यांना त्यांचे मुद्दे नीटपणे व्यक्त करता येत नाही आणि ते सर्व मग शरीरा द्वारे व्यक्त होते.

जसे हात-पाय मारणे, आदळआपट करणे, मोठ्याने ओरडणे, उशी खाली डोकं ठेवून रुसून बसणे हे सर्व भावना व्यक्त करण्याचे प्रकार आहे. हे अतिशय नैसर्गिक असते. अशा वेळेस मोठ्यांनी समजूतदारपणा दाखवून त्यांना शब्दाने व्यक्त होण्यासाठी मदत करावी. पण अशा वेळेस आपण त्याला किंवा तिला अधिक रागवतो. रागवून ऐकले नाही तर फटके देतो. फटके दिल्याने तो / ती अधिक रडते. त्या वेळेस काही पालक अजून त्याला किंवा तिला मारतात. या सर्व क्रिया मधून त्याच्या / तिच्या मेंदूमधील मज्जापेशी व त्यांचातून निर्माण होणारे कनेक्शन सिन्याप्स यांना कायमची हानी पोहोचते.

जे मूल सातत्याने मार खाऊन ऐकतात त्यांना पुढे खोटे बोलण्याची सवय लागते. तर काहींना मार खाण्याची इतकी सवय होते की आपण देत असलेला शिक्षेची त्यांच्या वर्तणुकीवर काही परिणाम होत नाही.

मुलांना जिथे जिथे नाही म्हणायचे असते तिथे पालकांनी नाहीच म्हणावे. "नाही' चे रूपांतर हो मध्ये होऊ द्यायचे नाही. मुलं रडली किंवा रागवली की आपण त्यांचे ऐकतो व "हो" म्हणतो. मग त्यांना चांगलं समजते की जोपर्यंत मी रडत नाही. राग येत नाही तोपर्यंत आई-बाबा माझं ऐकणार नाही आणि यातून त्याला याची सवय लागते. मग हळूहळू या सवयीत रूपांतर स्वभावामध्ये होते. म्हणून एकदा नाही म्हटलं की नाहीच भूमिका ठेवा.

दुसरे जेव्हा तो / ती राग करत असेल तेव्हा त्याच्याशी तेवढा वेळ बोलू नका. तो शांत झाल्यावर त्याच्याशी संवाद साधा. त्याला जवळ घ्या. तो / ती रडत असेल.. तमाशा करत असेल.. अशा वेळेस त्याच्याशी आर्ग्युमेंट करू नका. सल्ला तर मुळीच देऊ नका. त्याला सांगा या पद्धतीने तुझे म्हणणे ऐकून घेतले जाणार नाही.. तू शांत झाल्यावरच आपण बोलू..

शक्यतो आपले पालकत्व हे खूप "नाहीचे" नको म्हणजे मुलांना प्रत्येक गोष्टीत हे करू नको ते करू नको असे म्हणणारे नको. मुलं विचार करतात शक्यतो आई-बाबा आपल्याला नाही म्हणत नाही पण नाही जेव्हा म्हणतात तेव्हा ते नाहीच असते. मुलं साम्यजसपणे पणे वागतात.

समजा मुलं अजिबात ऐकत नसेल आणि प्रश्न संस्कार मूल्य रुजवण्याचा असेल तर अशा वेळेस त्याला सांगा जर तू हे ऐकले नाही तर मी तुझ्याशी बोलणार नाही. तो / ती म्हणेल ठीक आहे.. कट्टी .. नको बोलू..
तो पाहील आई सकाळ झाली बोलली नाही, दुपार झाली, रात्र झाली बोलली नाही.. मग तो वाटेल ते ॲडजस्टमेंट करतो आणि तुमचं ऐकतो कारण त्याला मनापासून वाटत असते की आईने बोलले पाहिजे.

समजा मुद्दा खूप गंभीर असेल तर म्हणा, "मी आज जेवणार नाही" तेव्हा तो म्हणेल ठीक आहे पण तो / ती बारीक नजर ठेवून असेल की तुम्ही जेवता की नाही? तो पाहिल की रात्र होऊन गेली आणि अजूनही आई जेवली नाही तर मग तो वाटते ती ॲडजस्टमेंट करतो आणि तुमचं ऐकतो कारण त्याला वाटत असते की आईने जेवले पाहिजे. या पद्धतीने त्याचा हट्टीपणा हाताळू शकतात.

मुळातच मुलांचा राग हा क्षणिक असतो. त्याला खूप महत्त्व द्यायचं नाही आणि त्या रागाचे कौतुक तर मुळीच करायचे नाही. जसे की माझ्या मुलाला राग आला की तो कोणाचे ऐकत नाही.. मग तो खरच कोणाचे ऐकत नाही. कारण हे वाक्य तो पॉझिटिव्ह घेतो व त्याची सेल्फ इमेज तशी बनते. आपण मुलांचे रागाची तुलना त्याच्या आजोबा किंवा वडिलांची करतात. ते सुद्धा चुकीचे आहे. ते सुद्धा मुलं कौतुक म्हणून घेतात. याला नकारात्मक कौतुक म्हणतात. तो / ती जेव्हा लहान असतो तेव्हा त्याच्या रागाचे कौतुक केले जाते व तो मोठा झाला की तोच राग रुद्र स्वरूप धारण करतो. मुलांच्या भावना हाताळता आल्या तर राग हाताळता येतो.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


Sweden Scales Back on Screens in Education, While India Leans In: A Tale of Two Systems

Sweden Scales Back on Screens in Education, While India Leans In: A Tale of Two Systems By Sachin Usha Vilas Joshi, Education activists  For...