Monday, 21 February 2022

चला कोरोनाला विसरून परीक्षेला सामोरे जाऊ..

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वाचावा असा शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी लेख

विद्यार्थ्यांनो तुम्ही वर्षभर या कोरोना काळात अभ्यास केला, त्याबद्दल तुमचे अभिनंदन. परीक्षेपूर्वी ची तयारी मनासारखी झाली असली तरीही प्रत्यक्ष परीक्षेला सामोरे जाताना अनेकांना अडचणी येतात. मुख्य अडचण म्हणजे लिखाणाचा सराव झाला नाही त्यामुळे वेळेत पेपर पूर्ण होईल की नाही याची भीती.. पण मित्रांनो बोर्ड परीक्षा मंडळ ने तुम्हाला परीक्षेसाठी अधिकचा वेळ दिला आहे. त्यामुळे वेळेत पेपर पूर्ण होईल की नाही ही चिंता आता बंद करा आणि परीक्षेच्या तयारीला लागा.

विद्यार्थी मित्रांनो परीक्षा अटळ आहे, तिला धीराने सामोरे जायला हवे. त्यासाठी अभ्यास करून जय्यत तयारी करायलाच हवी. परीक्षेला सामोरे जाताना सहजतेने, निर्भयपणे, योग्य निर्णय घेत वाटचाल करावी लागते.... कारण परीक्षा ही फक्त मार्कंची, तुमच्या अभ्यासाची चाचणी नसते तर मानसशास्त्रीय शक्तींची ही चाचणी असते. तुमच्या मनाची ताकद, स्मरणशक्ती, एकाग्रता याची सुद्धा ही चाचणी असते.

काही विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाताना खंतावलेले, धास्तावलेले आणि अति भीती बाळगतात त्यामुळे त्यांच्या हातून पेपर सोडवताना छोट्या छोट्या चुका होतात. त्या चुका टाळण्यासाठी काही गोष्टी पाळायला हव्यात आणि काही गोष्टी टाळायला हव्यात.

परीक्षेमध्ये कुठल्या गोष्टी पाळायला हव्यात आणि कुठल्या टाळायला हव्यात त्या पुढीलप्रमाणे....

१. परीक्षा जवळ आल्यानंतर नवीन कोणताही अभ्यास करू नये. त्यामुळे नवीन टॉपिक समजून घेण्यात वेळ वाया जाईल आणि तो टॉपिक समजला नाही तर टेन्शन घेऊन आत्मविश्वास कमी होईल.

२. परीक्षा जवळ आल्या नंतर झालेल्या अभ्यासातील उजळणी करावी. नमुना सराव प्रश्नपत्रिका सोडवाव्यात.

३. परीक्षेच्या आदल्या दिवशी पुरेशी झोप घ्या. किमान सहा तास झोप हवी. सर्वात महत्त्वाचं परीक्षेच्या आदल्या दिवशी टप्प्याटप्प्याने झोपू नका. जसं रात्री दहा वाजता झोपलात आणि बारा वाजता उठला.. पुन्हा एक दीड तास अभ्यास केला मग पुन्हा झोपलात.. पुन्हा तीन चार वाजता उठलात आणि पुन्हा झोपलात..मग सकाळी उठलात.. असं मुळीच करू नका. परीक्षेच्या काळात तुमच्या मेंदूला सलग पाच ते सहा तास झोप हवी. जेवढा मेंदू तुमचा रिलॅक्स असतो तेवढं स्मरणशक्ती साथ देत असते. परीक्षेत भराभर तेव्हाच आठवतं जेव्हा तुमचा मेंदू रिलॅक्स असतो आणि रिलॅक्सेशन साठी रात्रीची सलग झोप अत्यंत आवश्यक.

४. ज्या विषयाचा पेपर आहे. त्या विषयाची धावती उजळणी करावी, उजळणी करताना केवळ लघु मुद्द्यांची नोंदीची वही नजरेखालून घाला. अमुक प्रश्न येईल, तमुक प्रश्न येईल म्हणणाऱ्या कडे पूर्ण दुर्लक्ष करा.

५. परीक्षेच्या काळात आणि परीक्षेच्या दिवशी चिडखोर , संतापी आणि अप्रसन्न वृत्तीच्या व्यक्तींना भेटण्याचे टाळावे. आपला मूड आनंदी उत्साही राहणे अत्यंत आवश्यक.

६. परीक्षेचे जे सेंटर आले आहे त्या शाळा-महाविद्यालयांमध्ये गेल्यावर जेथे शांत वातावरणात आणि सावली आहे अशा जागी थांबावे. कोरोनामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच सेंटर मिळालेले आहे. त्यामुळे जसं क्रिकेट खेळताना होम पिच असेल तर आपण शतक मारतो तसंच तुमच्या परीक्षेबाबत होईल. तुमच्या शाळेमध्ये परीक्षा द्यायची असल्याने तुमचा आत्मविश्वास अजून नक्की वाढेल याची खात्री आहे.  

७. एन वेळी घरी फोन करावा लागला आणि तुमच्या जवळ मोबाईल नसेल किंवा मोबाईल ची जवळ ठेवण्याची मान्यता नसेल तर वडील आई यांचा मोबाइल नंबर आणि शाळेतील मुख्याध्यापकांचा मोबाइल नंबर आपल्याजवळ हवा. बऱ्याच मुलांना घरचे नंबर सुद्धा पाठव नसतात कारण की त्यांच्या मोबाईल मध्ये नंबर सेव्ह असतात म्हणून एका कागदावर कंपास बॉक्स मध्ये ते नंबर लिहिलेले हवे. 

८. आपण ज्या भागाची जय्यत तयारी केली आहे त्याचीच आठवण परीक्षेच्या काही मिनिटे आधी करावी म्हणजे आत्मविश्वास कायम राहण्यास मदत होते.

९. काही अपरिहार्य कारणांमुळे मनावर ताण असल्यास जवळच्या मित्रांशी, घरच्यांशी बोलून मन मोकळे करा. कुढत बसू नका.

१०. परीक्षा काळातील घरातील, परिसरातील वादविवाद, भांडणे यांच्याकडे दुर्लक्ष करा. तुमच्या मित्र-मैत्रिणींनी काय टोमणे मारले असतील, चेष्टा केली असेल तर लगेच विसरा. या काळात तुमची परीक्षा आणि तुमचं मानसिक स्वास्थ्य तेवढच महत्त्वाचा आहे. परीक्षा नंतर मित्राने केलेली चेष्टा आठवणार सुद्धा नाही पण त्याने तुमचा गेलेला मूड हा डायरेक्ट कायमस्वरूपी परीक्षेवर परिणाम करतो म्हणून या गोष्टी हसण्यावर नेऊन लगेच विसरणे.

११. वेळेचे नियोजन करताना शेवटची 10 मिनिटे उत्तरपत्रिका तपासण्यासाठी मोकळे सोडा.

१२. पेपर संपला की सरळ घरी या. मित्रांबरोबर चर्चा करू नका. तुमचे उत्तर बरोबर असले तरी तुमचा स्वतःवर विश्वास नसतो. मग उगाचच मनामध्ये शंका निर्माण होते. काय बरोबर काय चुकलं हे तपासू नका. सर्व पेपर झाल्यानंतर त्याची चर्चा करायची असेल तर करा पण तीन तासाच्या पेपर नंतर लगेच नको.

१३. बोर्डाच्या धोरणानुसार प्रत्येक प्रश्नपत्रिकेतील 20% प्रश्न सोपे असतात. 60 % प्रश्न सर्वसाधारण व विद्यार्थ्याना सोडविता येण्यासारखे असतात तर उरलेले 20%  प्रश्न हे कठीण असतात. त्यामुळे उत्तीर्ण होणे अजिबात अवघड नाही. आणि खरं सांगतो कोव्हिड मुळे परीक्षा थोडी सोपी असणार आहे पण तुमचा अभ्यास होणे अत्यंत आवश्यक.

१४. परीक्षेचा अर्थ एवढाच आहे की ठराविक कालावधीत निश्चित माहिती अचूक वेळी आठवून लिहिणे. विद्यार्थ्यांनो मनावर खूप ताण आला तर त्यावेळी आकलन शक्ती, निर्णयशक्ती यावर विपरीत परिणाम होतो. 

१५. जर तुम्ही मेडीटेशन करत असाल तर दहा ते पंधरा मिनिटाचे मेडिटेशन तुम्ही करू शकतात किंवा दहा मिनिट डोळे शांत बंद करून.. श्‍वासावर लक्ष देऊन.. कल्पनाशक्तीच्या जोरावर visualization करायचे की तुम्ही परीक्षा हॉलमध्ये चालला.. तुम्हाला भराभर आठवतंय.. तुम्ही फास्ट लिहित आहात.. तुमचा पेपर वेळेत पूर्ण होत आहे आणि समाधानाने परीक्षेच्या हॉल मधून बाहेर आलात. असं मनाच्या पातळीवर डोळे बंद करून visualization करायचे. याने तुमच्या सुप्त मनामध्ये पेपर उत्तम लिहाण्याचे प्रोग्रामिंग होते.

१६. परीक्षाकाळात अभ्यासात वेळ घालवण्याऐवजी मंदिरात जाऊन नवस करणे, बुवा बाबांना भेटणे, एक एक तास पूजा मंत्र म्हणणे टाळावे. परीक्षा काळात चुकून सुद्धा स्वतःचे भविष्य अजिबात वाचू नये.

१७. विद्यार्थ्यांनी सोबत पाण्याची बॉटल आणि त्यात ग्लुक्लोज टाकून नेला तर अधिक उत्तम. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डिहायड्रेट होणार नाही याची काळजी घ्यावी.

१८. उत्तरपत्रिका लिहिताना अचानक विसरायचे झाले, किंवा शब्द निसटणे, मुद्दा विसरणे असे झाले तर घाबरू नका. हे स्वाभाविक आहे पण अडचण कुठे होते तर त्यानंतर तुम्ही तुमच्या मनात नकारात्मक विचार करतात आणि पुढे मग आठवत नाही. म्हणून अशी वेळ आली तर अजिबात नकारात्मक विचार न करता मनामध्ये पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करावा. जसे, "मला आठवेल..नक्कीच आठवेल.. मी आठवण्याचा प्रयत्न करतो आहे", असं मनात विचार आला की तुम्हाला आठवायला नक्कीच लागेल.

१९. सर्वात महत्त्वाचं, परीक्षा काळामध्ये पालकांनी आपल्या पाल्याला किती मार्क अपेक्षित आहे याची चर्चा करू नये. हा वेळ टार्गेट ठरवण्याचा नसून तर भावनिक आधार देण्याचा असतो.

२०. अचानक आठवलं नाही तर काय कराल? 
काही विद्यार्थ्यांना पेपर लिहिता लिहिता एखादा मुद्दा आठवेल की नाही याची भीती असते तर काही विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरं आठवत नाही आणि तिथेच अडकून बसतात त्यानंतर त्यांची लिखाणाची गाडी पुढे जात नाही. त्यात त्यांनी तिथे नकारात्मक विचार सुरू केला तर पुढे येत असलेल्या प्रश्नाच्या उत्तरांना सुद्धा ते गोंधळतात, आत्मविश्वास कमी होतो.

मित्रांनो, उत्तर पत्रिका लिहिता-लिहिता अचानक ब्लँक होणे, शब्द निसटणे, मुद्दा विसरणे, हे स्वाभाविक आहे. पण अडचण कुठे होते तर त्यानंतर तुमच्या मनात नकारात्मक विचार घोळू लागतात आणि पुढे काहीच आठवत नाही. अशा विद्यार्थ्यांनी खालील पद्धतीने विचार केला तर त्यांना नक्की आठवायला लागते. समजा जर असे झाले की परीक्षा हॉलमध्ये उत्तरपत्रिका लिहिताना अचानक आठवले नाही तर मनातल्या मनात स्वतःला खालील पद्धतीने प्रश्न विचारा आणि विधायक विचार करा. 

सर्वप्रथम घाबरून भांबावून जाऊ नका. दोन मिनिटे शांत बसा, थोडे पाणी प्या. चुकून सुद्धा डोक्याला हात लावून बसू नका. ही नकारात्मक देहबोली आहे. मनावरचा ताण हलका करण्यासाठी स्वतःशी मनातल्या मनात बोला.. "आठवेल मला नक्की आठवेल", "मी आठवण्याचा प्रयत्न करून पाहतो".. मग थोडा विचार करा तुम्ही शाळेत कसे जातात? किती विषय आहेत? आज कोणत्या विषयाचा पेपर आहे? तो विषय कोण शिकवतो? जे प्रश्न येत नाही तो धडा कोणता? शाळेत.. कॉलेजला तो कसा शिकवला होता? क्लासमध्ये तो कधी शिकवला होता का? कसा शिकवला होता? त्या धड्याचे प्रश्न लिहिले ती वही कोणती? व्यवसाय मला सोडवली होती का? असे प्रश्न कुठल्या परीक्षेत सोडवला होता का? कधी मित्रमैत्रिणींबरोबर चर्चा झाली होती का? धड्याच पान आठवण्याचा प्रयत्न करा.. अतिशय शांतपणे तुम्ही स्वतःला असे प्रश्न विचारले तर हळूहळू तुम्हाला आठवू लागते. मुद्दे स्पष्ट होऊ लागतात आणि संपूर्ण धड्याचा धडा आठवतो. या पद्धतीने विचार केला तर केवळ पंधरा वीस सेकंदात तुम्हाला आठवायला मदत होते. प्रश्नांचे उत्तर आठवेल परंतु तुम्ही जमणार नाही.. आठवणार नाही.. मी विसरून गेलो.. असे नकारात्मक विचार करतात. नकारात्मक विचारांनी नकारात्मक भावना आणि आचार निर्माण होतात आणि तुम्हाला खरच आठवत नाही. यापुढे कधीही उत्तरपत्रिका लिहिताना अचानक आठवले नाही तर मुळीच नकारात्मक विचार करायचा नाही. मनातल्यामनात बोलायचे.. "आठवेल, नक्कीच आठवेल", "माझी स्मरणशक्ती चांगली आहे", "माझा अभ्यास झालेला आहे", वरील दिलेले प्रश्न स्वतःला विचारावेत. नक्कीच तुम्हाला संपूर्ण उत्तर भराभरा आठवतील.

सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.

सचिन उषा विलास जोशी


शिक्षण अभ्यासक

No comments:

The Empty Classroom: India's Silent Education Emergency

Article by Sachin Usha Vilas Joshi India has made remarkable strides in expanding access to education—almost every village has a primary sch...