Tuesday, 22 February 2022

मंदिराबाहेर दीनदुबळ्यांमध्ये देव शोधणारे: संत गाडगेबाबा

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख.

संतांच्या शिक्षणासंदर्भातल्या विचारधनाचा मागोवा घेताना संत गाडगेबाबांचे विचार दिशादर्शक तर ठरतातच पण ते कालातीत अशा मूल्यव्यवस्थेची अखंड पाठराखण करत सध्याच्या शिक्षणपद्धतीचा पाया ठरतात.

नाशिकमध्ये गाडगेबाबांना प्रत्यक्ष पाहिलेली, भेटलेली अनेक माणसं आजही समक्ष रीतीने आणि सक्षमपणे मूर्तिमंत गाडगेबाबा आपल्यासमोर उभे करतात. त्यांपैकी एका आजोबांनी एक किस्सा सांगितला- 

हे आजोबा तेव्हा लहान होते. शाळेत जात असत. सहावी-सातवीत असतील. नाशकात होस्टेलमध्ये राहत असत. अनेकदा दुपारी मित्रांबरोबर पुस्तकं घेऊन समोरच्या बागेत अभ्यासाला जात. एक दिवस अभ्यास करताना सगळयांना खूप झोप आली. म्हणून "दहा मिनिटं आराम करूया" म्हणत हे सगळे मित्र डोळ्यांवर आपापलं पुस्तक ठेवून स्वतःपुरता अंधार करत आडवे झाले. पाहा बरं! जी पुस्तकं प्रकाश देतात, त्यांच्या आधारे या मुलांनी स्वतःपुरता चक्क काळोख निर्माण केला. काही क्षणांतच काय झालं, खराट्याचे सपासप फटके त्यांच्या अंगावर बसू लागले. खडबडून जागे होत उठून बसतात तो काय, साक्षात गाडगेबाबा त्यांना जागं करत होते; "झोपा कसल्या काढताय? उठा, जागे व्हा. बाकी काही करायचं नसेल तर हा झाडू घ्या-चला, स्वच्छता करा." चौथी नापास इतकं शिक्षण घेतलेल्या या डेबूजीने या झोपी गेलेला मुलांना जागं केलं.. त्यांना मेहनतीचा अर्थ समजावले कारण त्यांनी अखंड कामात असण्याचा वसा घेतलेला होता. या बाबाचा दशसूत्री संदेशच मुळी हा होता- 

भुकेलेल्यांना : अन्न,

तहानलेल्यांना: पाणी, उघड्यानागड्यांना: वस्त्र,

गरीब मुलामुलींना: शिक्षण, 

बेघरांना: आसरा,

अंध, पंगू, रोग्यांना: औषधोपचार,

बेकारांना: रोजगार,

पशु, पक्षी, मुक्या प्राण्यांना: अभय,

गरीब तरुण तरुणींचं : लग्न,

दुःखी आणि निराशांना : हिंमत,

यांची ही दशसूत्री खरा भारत घडवण्याची गुरुकिल्ली आहे. यामध्ये सामाजिक बांधिलकीला स्थान आहे. आजकालचं विद्यार्थ्यांचं आयुष्य हे व्यक्तिकेंद्रित झालं आहे. ‘इट्स माय लाईफ’ या चुकीच्या मूल्यावर आपण सगळे चाललो आहोत. या ठिकाणी गाडगेबाबांचं ही दशसूत्री जेव्हा शिक्षणव्यवस्थेत उतरवली जाईल तेव्हा येणारा समाज स्वत:पुरता विचार न करता तो इतरांसाठी विचार करेल. आनंदी समाजाचा हा पाया आहे. हाच आजचा रोकडा धर्म आहे. बाबा म्हणायचे, "गोरगरीब आदिवासी मुलांना शिक्षण द्या. पैसे नाही म्हणाल तर जेवणाचं ताट मोडा.हातावर भाकरी खा,बायकोले लुगडं कमी भावाचं घ्या,पण मुलाले शाळेत घातल्याविना राहू नका. एवढं सगळं झालं की समाज प्रगतीच्या मार्गावरून चालू लागलाच म्हणून समजा की! लागतंच काय दुसरं?"

गाडगे बाबांनी साक्षर आणि निरक्षर समाजामधील फरक पाहिला. त्यांनी हेरले की जनसामान्यांच्या दारिद्र्याच्या मुळाशी निरक्षरता आहे.. अज्ञान आहे. बाबा स्वतः शिकले नव्हते. वडील वारल्यानंतर त्यांना लहानपणी आपल्या आईसोबत मामाच्या घरी आश्रयाला राहावे लागले. मामाही निरक्षर होते. त्यांचा शेतीचा व्यवसाय होता, शेतीसाठी सावकारांकडून कर्ज काढावे लागत असेल तर या संबंधित सावकारांच्या दिवाणजी कशावर तरी अंगठा घेत, हा अंगठा कशावर घेतला हे समजत नसे, मामांचा सावकार व दिवानजी वर पूर्ण विश्वास होता. मामांनी प्रामाणिकपणाने कर्जाचे हप्ते फेडले तथापि सावकारी विचाराने मामांची सर्व जमिनी कर्जात गेली. निरक्षरपणा मुळे बाबांवरील झालेला भयंकर दुष्परिणाम बाबाने अनुभवला म्हणून बाबांनी मानवी जीवनात शिक्षणाला फार महत्त्व दिले. 

संत गाडगे महाराज आपल्या कीर्तनातून सतत सांगायचे की जे लोक दरिद्री आहेत त्यांचे मूळ कारण त्यांना शिक्षण नाही. आता प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क मान्य केला पण आजही शाळावाह्य मुलांची समस्या मोठी आहे. इयत्ता पाचवी, आठवीला शाळा मध्येच सोडून द्यायचं प्रमाण खूप मोठं आहे. आता तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्येच लिहिले आहे की इयत्ता आठवी मध्ये शाळा सोडण्याचे प्रमाण तीन कोटी हुन अधिक मुलांचे आहे. अशा वेळेस गाडगेबाबांचे विचार प्रत्यक्षात उतरवणं किती महत्त्वाचं हे समजतं. शिक्षणाचं महत्त्व ते अतिशय सोप्या पद्धतीने जनतेला पटवून देण्यात ते माहीर होते.

एका गाडग्यात सारी हिंमत एकवटून कृतिशील समाजकार्याचा वसा कळत्या वयापासून पुढे आयुष्यभर निभावणाऱ्या या डेबूजी झिंगराजी जानोरकरचा जन्म अमरावती जिल्ह्यातल्या कोतेगाव (शेंणगाव) इथे 23 फेब्रुवारी 1876 रोजी झाला आणि 20 डिसेंबर 1956 ला अमरावतीत गाडगेबाबांचं निधन झालं. 

दरम्यानचा जीवनकाल दीनदुबळ्यांच्या गरजा भागवण्यात, शिक्षणाचा जीव तोडून प्रसार करण्यात आणि वणवण करून जनसमूहापर्यंत पोहोचून चार खडे बोल सुनावत लोकांना शहाणं करण्याचा प्रयत्न करण्यात गेला. 'सेवा परमो धर्म:' म्हणत खऱ्या धर्माची-माणुसकीची शिकवण देणाऱ्या संत गाडगेबाबांचे शिक्षणविषयक विचार अभ्यासताना आपण बौद्धिक पातळीवर पुनःपुन्हा शहाणे होतो. ते म्हणत, “मी कोणाचा गुरु नाही, माझा कोणी शिष्य नाही.” स्वच्छता हा देव मानणारा, हा त्या परमेश्वराचा परमभक्त कधीही देवळात गेला नाही. मूर्तिपूजा त्यांना मान्यच नव्हती. "स्वच्छतेला देव मानणं", हा विचार खरं तर विद्यार्थ्यांवर शाळेपासूनच बिंबवला पाहिजे. त्यांनी माणसात देव शोधला. शिक्षणावर त्यांची अढळ श्रद्धा होती. शिक्षण हे समाज परिवर्तनाचं साधन आहे असं ते म्हणत. शिक्षणामुळे आपण या जगात कशासाठी आलो आहोत ते कळतं. अंधश्रद्धेवर त्यांनी आपल्या वाणीने अखंड प्रहार केले. कृतीने त्या उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला. 

एकदा गंगेवर ते ओंजळीत पाणी घेऊन घेऊन डोक्यावरून पाठी फेकत होते. 

लोकांनी विचारलं, "बाबा, हे काय करताय?" 

"माझ्या अमरावतीतल्या शेताले पाणी देतो."

"असं कसं पोचल बाबा इतक्या दूर?"

"का बरं?" म्हणे, "तुम्ही देता ते अन्न, पाणी पार स्वर्गात तुमच्या पितराले पोहोचतं तर माझ्या शेताले का न्हाई पोहोचणार?"

असा अंधश्रद्धेचा पार इस्कोट करून टाकी बाबा! ते नेहमी कीर्तनात म्हणत, "मंदिरात देव नाही, पुजाऱ्याचं पोट असतं."  त्यांनी देव नाकारला नाही. पण देवाचा खरा अर्थ शोधला. ज्यांच्यापाशी जराही भोंदूपणा नव्हता अशा सगळ्या खऱ्या संतांनी हेच केलं. देव ही संकल्पना फार सोप्या पद्धतीने उलगडून दाखवली. हे विचार मुलांपर्यंत पोहोचले पाहिजेत. नाहीतर विद्यार्थी डॉक्टर, शास्त्रज्ञ होतील पण प्रॅक्टिस चालत नाही म्हणून वेगवेगळ्या पूजा करतील. वैज्ञानिक दृष्टिकोन हा शिक्षणाचा पाया आहे. राज्यघटनेतच तसं नमूद केलं जे गाडगेमहाराज कृतीतून करून घ्यायचे.

"सत्यनारायण कुठून आला?" विचारत गाडगेबाबा. त्याला लोकांनी तयार केलेला देव म्हणत. 

ते कीर्तनात म्हणत, "मघाशी तुम्ही ती पोथी ऐकलीच असंल. त्या कलावती का लीलावतीच्या साधुवाण्याची बोट समुद्रात बुडाली. पार गेली रसातळाला. त्या बाईने सत्यनारायणाचा प्रसाद खाताच झटकन ती बोट आली सुकीठाक ठणठणीत पाण्यावर. काय?" उपरोधाने विचारत, "आहे का न्हाई हा देवाचा चमत्कार? गेल्या दोन महायुद्धात फ्रान्स-अमेरिकेच्या शेकडो मोठमोठ्या बोटी महासागरात बुडाल्या आहेत. त्या बाहेर काढण्याची ही सोपी युगत अजून त्यांना कुणी सांगितली कशी न्हाई कोण जाणे! बंदरावर एक मोठा सत्यनारायण केला की त्याचा प्रसाद सगळ्यांनी खाल्ला की भराभर बुडालेल्या बोटी बाहेर येतील की नाही? सांगा तुम्ही. विलायतची भानगड लांबची. मुंबई बंदरात बुडालेली रामदास बोट तरी पूजा घालून कोणा भगताने बाहेर आणून दाखवावी. बाबांनो, भोळसटांना ठकवून पैसे काढण्याचा हा एक लबाडीचा धंदा आहे. त्याच्या नादी लागू नका.” असं कळकळीने सांगत असत. 

प्रबोधनकार ठाकरे यांनी गाडगे महाराजांचं एक छोटेखानी चरित्र लिहिलं आहे. त्यात गाडगेबाबांचं विचारसंचित उलगडून दाखवताना त्यांनी अनेक दाखले दिले आहेत. सत्यनारायणाचा दाखलाही यात वाचायला मिळतो.

‘आपल्या नजरेसमोर शेकडो अमंगल, अनीतिमान आणि अन्यायी गोष्टी घडतात. चालायचंच हे असं, त्याला कोण काय करणार? अशा बेदरकार वृत्तीने आपण कानाडोळा करून पुढे जातो. डेबूजी तसल्या घटनेचं निरीक्षण, चिंतन-मनन करत तिथेच उभा राहायचा आणि चटकन हवा तो धोका पत्करून ती घटनेची गाठ सोडायला, फोडायला किंवा तोडायला धावायचा. 

‘एका नाक्षर बौद्धाचा मुलगा मुंबईला कामावर गेला होता. पुष्कळ दिवस त्याचे खुशालीचे पत्रच नव्हते. एकदा ते आले. खेड्यात वाचणारा शहाणा कोण? तर, कुळकर्णी महाराज! 

‘दादा पाया पडतो, वाचून दाखवा.’ त्याचे ते पत्र कुळकर्ण्यांनी घेतले. 

‘ही माझी लाकडे फोड, मग दाखवतो वाचून.’ 

‘पण पोरगा खुशाल तर आहे ना दादा?’

‘आधी लाकडे फोड मग सांगेन पत्र वाचून.’ 

तास-दीड तास खपून त्याने दीड-दोन गाडाभर लाकडे फोडून रचली. 

‘पोरगा खुशाल आहे ना दादा तेवढं तरी सांगा.’ पण प्रत्येक विनवणीला शिवी हासडली जात होती आणि काम पुरे करण्याची दटावणी. जीव कासावीस होऊन तो घामाघूम होऊन वैतागून खाली बसला. ‘पत्र परत द्या.’ म्हणाला. त्याने दिले नाही. तेवढ्यात डेबूजीची स्वारी तिथे आली. त्याने सगळे पाहिले होते. 

‘आण रे बाबा इकडे तुझी कुऱ्हाड’ डेबूजीने पुढची सारी लाकडे फोडली आणि कुळकर्णी महाशयांकडे नजर रोखून म्हटले, ‘काय देता का न्हाई पत्र त्याचे त्याला परत?’ त्यांनी पत्र परत केले. डेबूजी त्या माणसाला म्हणाला, ‘आपण दोघेही गाढव. आपण शिकलो असतो तर आपली ही अवस्था झाली असती का? शिक्षणाशिवाय माणूस धोंडा.' या वेळेपासून डेबूजीने आपल्या कीर्तनात शिक्षणाच्या माहात्म्यावर जोरदार प्रवचनं करण्याचा सपाटा चालू ठेवला.’

त्यांची व्याख्यानं द्यायची पद्धत तर आजच्या शिक्षकांनी खरंच शिकली पाहिजे. ते लोकांना प्रश्न विचारून विचारून प्रबोधन करत असत. लोकांना प्रश्न विचारायचे आणि त्यांच्याकडून उत्तरं काढून घ्यायची. 

शिक्षणाच्या संदर्भात समाजमन जागृत करताना गाडगेबाबांच्या अखेरच्या कीर्तनातला पुढील संवाद लक्षवेधी आहे -

हे लोक का गरिबीत राहिले? 

एक तर याहिले नाही विद्या. 

काय नाही?

- वि ऽ द्या. ..

ज्याले विद्या नसेल त्याले खटाऱ्याचा बैल म्हटलं तरी -

- चाले ऽ ल. ... !

या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीतून ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ तयार होतो. त्यातून ते ‘जिज्ञासा’ जागृत करत असत. हा वैज्ञानिक दृष्टिकोन तयार करण्याचा पाया आहे. हे चौथी शिकलेला बाबा ने कृतीतून समजावून दिले. शिक्षणाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा. हा त्यांचा ध्यास आणि अट्टाहास होता. गाडगेबाबांच्या सगळ्याच कृती आणि सगळेच प्रयत्न कायम यशस्वी होत आले कारण त्यामागे फार मोठा विचार आणि चिंतन असे. प्रश्नोत्तरातून प्रबोधन’ ही पद्धत फ्रॉईडपासून मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी मांडली. रॅशनल इम्होटिव्ह थेरपीचे जनक डॉ.अल्बर्ट आलीस यांचा आरईबीटीचा पायाच मुळी प्रश्नोत्तराचा आहे. याच्यातूनच माणूस विचार करू लागतो. वास्तविक दोघांचा दुरान्वयानेही काही संबंध नाही. पण तुलना यासाठी की गाडगेबाबांनी किती मोठी विचार करण्याची पद्धत आपल्याला दिली आहे. हे विचार जर आज शिक्षणपद्धतीत आणले तर आपली शिक्षणपद्धती खऱ्या अर्थाने प्रगत होईल.

बऱ्याच समाजसुधारकांनी त्यांचं मार्गदर्शन घेतले होते. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांनीही त्यांची भेट घेतली होती. गाडगेबाबांच्या नावाने अमरावती विद्यापीठ आहे.

खरंतर गाडगेबाबा हा सगळा प्रत्यक्षात उतरवायचा विषय आहे. भावनिक बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता, बुद्ध्यांक यांबद्दल अलीकडे बरीच चर्चा सुरू असते. गाडगेमहाराजांचा माणूस समजून घेण्याचा आभाळाएवढा प्रयत्न पाहिला की या सर्व संकल्पनांचा त्यांनी किती सहजपणे विचार केला होता हे प्रकर्षाने लक्षात येतं. त्या अनुषंगाने पायाभूत अशी सगळी मूल्यं त्याकाळी लागू होती पण ती जास्त प्रमाणात आत्ताच्या काळात लागू होतात. आता उलट आंतरराष्ट्रीय अंधश्रद्धा मोडीत काढायचं आधुनिक आव्हान आपल्या समोर आहे. 

बाबा हे कर्ते सुधारक होते, त्यांनी केवळ शिक्षणाचा प्रचार केला नाही तर शिक्षण संस्था व गरीब अनाथ विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृह काढलेत व लोकांना प्रेरणा दिली. इतकेच नव्हे तर त्यासाठी लागणारा निधी गोळा करून दिला. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांची शैक्षणिक कार्याबाबत बाबा नेहमी भेट घेत असत. १९३९ मध्ये सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केलेल्या शाळेच्या उद्घाटन समारंभ होता, त्यादिवशी रात्री तिथे बाबांच्या किर्तनाला अपार जनसमुदाय लोटला होता. बाबांनी कीर्तनात सांगितले मुलांना निरक्षर ठेवणे पाप आहे आणि दुसरं पाप म्हणजे नशा करणे.  भाऊराव लोकांचे भले करावयास निघाले, त्यांना मदत करा, शैक्षणिक कार्याला मदत करणे हीच देवाची खरी भक्ती आहे.. हीच देवाची महापूजा होय.. यादुसरे पुण्य नाही.

बाबा कधीच देवळात गेले नाही. त्यांनी शिक्षणालाच, स्वच्छतेला, गरिबांच्या मदतीला देव कार्य मानले.

अशा या फकिराने पैसा उभा करून शंभरहून अधिक धर्मशाळा बांधल्या हे सर्वज्ञात आहे. सर्व धर्मशाळातून गाडगे महाराज मिशनतर्फे आजही रोज मोफत दुपारी चार वाजता जेवण मिळतं; ही चार ची वेळ का.. महिती आहे? कारण दोन्ही वेळचं एकदम मिळावं म्हणून. आपल्या विद्यार्थ्यांना हे सगळं माहीत व्हावं या हेतूने इस्पॅलियर स्कूलकडून दरवर्षी एक उपक्रम राबवला जातो. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सेंड-ऑफच्या दिवशी ठीक चार वाजता आम्ही मुलांना घेऊन गाडगेबाबा धर्म शाळेत जातो, गाडगेबाबांचे विचार त्यांना समजावून सांगितले जातात. मुलांच्या हातून तिथे अन्नदान करून गोर गरिबांचा आशीर्वाद घेतला जातो. 

हा आशीर्वादही कृतिशील व्हावा आणि संत गाडगेबाबांनी फार पूर्वीच सुचवलेल्या शैक्षणिक वैज्ञानिक मार्गावरून आधुनिक भारताची ही वाटचाल व्हावी ही सदिच्छा!

सचिन उषा विलास जोशी

शिक्षण अभ्यासक




Monday, 21 February 2022

चला कोरोनाला विसरून परीक्षेला सामोरे जाऊ..

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वाचावा असा शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी लेख

विद्यार्थ्यांनो तुम्ही वर्षभर या कोरोना काळात अभ्यास केला, त्याबद्दल तुमचे अभिनंदन. परीक्षेपूर्वी ची तयारी मनासारखी झाली असली तरीही प्रत्यक्ष परीक्षेला सामोरे जाताना अनेकांना अडचणी येतात. मुख्य अडचण म्हणजे लिखाणाचा सराव झाला नाही त्यामुळे वेळेत पेपर पूर्ण होईल की नाही याची भीती.. पण मित्रांनो बोर्ड परीक्षा मंडळ ने तुम्हाला परीक्षेसाठी अधिकचा वेळ दिला आहे. त्यामुळे वेळेत पेपर पूर्ण होईल की नाही ही चिंता आता बंद करा आणि परीक्षेच्या तयारीला लागा.

विद्यार्थी मित्रांनो परीक्षा अटळ आहे, तिला धीराने सामोरे जायला हवे. त्यासाठी अभ्यास करून जय्यत तयारी करायलाच हवी. परीक्षेला सामोरे जाताना सहजतेने, निर्भयपणे, योग्य निर्णय घेत वाटचाल करावी लागते.... कारण परीक्षा ही फक्त मार्कंची, तुमच्या अभ्यासाची चाचणी नसते तर मानसशास्त्रीय शक्तींची ही चाचणी असते. तुमच्या मनाची ताकद, स्मरणशक्ती, एकाग्रता याची सुद्धा ही चाचणी असते.

काही विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाताना खंतावलेले, धास्तावलेले आणि अति भीती बाळगतात त्यामुळे त्यांच्या हातून पेपर सोडवताना छोट्या छोट्या चुका होतात. त्या चुका टाळण्यासाठी काही गोष्टी पाळायला हव्यात आणि काही गोष्टी टाळायला हव्यात.

परीक्षेमध्ये कुठल्या गोष्टी पाळायला हव्यात आणि कुठल्या टाळायला हव्यात त्या पुढीलप्रमाणे....

१. परीक्षा जवळ आल्यानंतर नवीन कोणताही अभ्यास करू नये. त्यामुळे नवीन टॉपिक समजून घेण्यात वेळ वाया जाईल आणि तो टॉपिक समजला नाही तर टेन्शन घेऊन आत्मविश्वास कमी होईल.

२. परीक्षा जवळ आल्या नंतर झालेल्या अभ्यासातील उजळणी करावी. नमुना सराव प्रश्नपत्रिका सोडवाव्यात.

३. परीक्षेच्या आदल्या दिवशी पुरेशी झोप घ्या. किमान सहा तास झोप हवी. सर्वात महत्त्वाचं परीक्षेच्या आदल्या दिवशी टप्प्याटप्प्याने झोपू नका. जसं रात्री दहा वाजता झोपलात आणि बारा वाजता उठला.. पुन्हा एक दीड तास अभ्यास केला मग पुन्हा झोपलात.. पुन्हा तीन चार वाजता उठलात आणि पुन्हा झोपलात..मग सकाळी उठलात.. असं मुळीच करू नका. परीक्षेच्या काळात तुमच्या मेंदूला सलग पाच ते सहा तास झोप हवी. जेवढा मेंदू तुमचा रिलॅक्स असतो तेवढं स्मरणशक्ती साथ देत असते. परीक्षेत भराभर तेव्हाच आठवतं जेव्हा तुमचा मेंदू रिलॅक्स असतो आणि रिलॅक्सेशन साठी रात्रीची सलग झोप अत्यंत आवश्यक.

४. ज्या विषयाचा पेपर आहे. त्या विषयाची धावती उजळणी करावी, उजळणी करताना केवळ लघु मुद्द्यांची नोंदीची वही नजरेखालून घाला. अमुक प्रश्न येईल, तमुक प्रश्न येईल म्हणणाऱ्या कडे पूर्ण दुर्लक्ष करा.

५. परीक्षेच्या काळात आणि परीक्षेच्या दिवशी चिडखोर , संतापी आणि अप्रसन्न वृत्तीच्या व्यक्तींना भेटण्याचे टाळावे. आपला मूड आनंदी उत्साही राहणे अत्यंत आवश्यक.

६. परीक्षेचे जे सेंटर आले आहे त्या शाळा-महाविद्यालयांमध्ये गेल्यावर जेथे शांत वातावरणात आणि सावली आहे अशा जागी थांबावे. कोरोनामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच सेंटर मिळालेले आहे. त्यामुळे जसं क्रिकेट खेळताना होम पिच असेल तर आपण शतक मारतो तसंच तुमच्या परीक्षेबाबत होईल. तुमच्या शाळेमध्ये परीक्षा द्यायची असल्याने तुमचा आत्मविश्वास अजून नक्की वाढेल याची खात्री आहे.  

७. एन वेळी घरी फोन करावा लागला आणि तुमच्या जवळ मोबाईल नसेल किंवा मोबाईल ची जवळ ठेवण्याची मान्यता नसेल तर वडील आई यांचा मोबाइल नंबर आणि शाळेतील मुख्याध्यापकांचा मोबाइल नंबर आपल्याजवळ हवा. बऱ्याच मुलांना घरचे नंबर सुद्धा पाठव नसतात कारण की त्यांच्या मोबाईल मध्ये नंबर सेव्ह असतात म्हणून एका कागदावर कंपास बॉक्स मध्ये ते नंबर लिहिलेले हवे. 

८. आपण ज्या भागाची जय्यत तयारी केली आहे त्याचीच आठवण परीक्षेच्या काही मिनिटे आधी करावी म्हणजे आत्मविश्वास कायम राहण्यास मदत होते.

९. काही अपरिहार्य कारणांमुळे मनावर ताण असल्यास जवळच्या मित्रांशी, घरच्यांशी बोलून मन मोकळे करा. कुढत बसू नका.

१०. परीक्षा काळातील घरातील, परिसरातील वादविवाद, भांडणे यांच्याकडे दुर्लक्ष करा. तुमच्या मित्र-मैत्रिणींनी काय टोमणे मारले असतील, चेष्टा केली असेल तर लगेच विसरा. या काळात तुमची परीक्षा आणि तुमचं मानसिक स्वास्थ्य तेवढच महत्त्वाचा आहे. परीक्षा नंतर मित्राने केलेली चेष्टा आठवणार सुद्धा नाही पण त्याने तुमचा गेलेला मूड हा डायरेक्ट कायमस्वरूपी परीक्षेवर परिणाम करतो म्हणून या गोष्टी हसण्यावर नेऊन लगेच विसरणे.

११. वेळेचे नियोजन करताना शेवटची 10 मिनिटे उत्तरपत्रिका तपासण्यासाठी मोकळे सोडा.

१२. पेपर संपला की सरळ घरी या. मित्रांबरोबर चर्चा करू नका. तुमचे उत्तर बरोबर असले तरी तुमचा स्वतःवर विश्वास नसतो. मग उगाचच मनामध्ये शंका निर्माण होते. काय बरोबर काय चुकलं हे तपासू नका. सर्व पेपर झाल्यानंतर त्याची चर्चा करायची असेल तर करा पण तीन तासाच्या पेपर नंतर लगेच नको.

१३. बोर्डाच्या धोरणानुसार प्रत्येक प्रश्नपत्रिकेतील 20% प्रश्न सोपे असतात. 60 % प्रश्न सर्वसाधारण व विद्यार्थ्याना सोडविता येण्यासारखे असतात तर उरलेले 20%  प्रश्न हे कठीण असतात. त्यामुळे उत्तीर्ण होणे अजिबात अवघड नाही. आणि खरं सांगतो कोव्हिड मुळे परीक्षा थोडी सोपी असणार आहे पण तुमचा अभ्यास होणे अत्यंत आवश्यक.

१४. परीक्षेचा अर्थ एवढाच आहे की ठराविक कालावधीत निश्चित माहिती अचूक वेळी आठवून लिहिणे. विद्यार्थ्यांनो मनावर खूप ताण आला तर त्यावेळी आकलन शक्ती, निर्णयशक्ती यावर विपरीत परिणाम होतो. 

१५. जर तुम्ही मेडीटेशन करत असाल तर दहा ते पंधरा मिनिटाचे मेडिटेशन तुम्ही करू शकतात किंवा दहा मिनिट डोळे शांत बंद करून.. श्‍वासावर लक्ष देऊन.. कल्पनाशक्तीच्या जोरावर visualization करायचे की तुम्ही परीक्षा हॉलमध्ये चालला.. तुम्हाला भराभर आठवतंय.. तुम्ही फास्ट लिहित आहात.. तुमचा पेपर वेळेत पूर्ण होत आहे आणि समाधानाने परीक्षेच्या हॉल मधून बाहेर आलात. असं मनाच्या पातळीवर डोळे बंद करून visualization करायचे. याने तुमच्या सुप्त मनामध्ये पेपर उत्तम लिहाण्याचे प्रोग्रामिंग होते.

१६. परीक्षाकाळात अभ्यासात वेळ घालवण्याऐवजी मंदिरात जाऊन नवस करणे, बुवा बाबांना भेटणे, एक एक तास पूजा मंत्र म्हणणे टाळावे. परीक्षा काळात चुकून सुद्धा स्वतःचे भविष्य अजिबात वाचू नये.

१७. विद्यार्थ्यांनी सोबत पाण्याची बॉटल आणि त्यात ग्लुक्लोज टाकून नेला तर अधिक उत्तम. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डिहायड्रेट होणार नाही याची काळजी घ्यावी.

१८. उत्तरपत्रिका लिहिताना अचानक विसरायचे झाले, किंवा शब्द निसटणे, मुद्दा विसरणे असे झाले तर घाबरू नका. हे स्वाभाविक आहे पण अडचण कुठे होते तर त्यानंतर तुम्ही तुमच्या मनात नकारात्मक विचार करतात आणि पुढे मग आठवत नाही. म्हणून अशी वेळ आली तर अजिबात नकारात्मक विचार न करता मनामध्ये पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करावा. जसे, "मला आठवेल..नक्कीच आठवेल.. मी आठवण्याचा प्रयत्न करतो आहे", असं मनात विचार आला की तुम्हाला आठवायला नक्कीच लागेल.

१९. सर्वात महत्त्वाचं, परीक्षा काळामध्ये पालकांनी आपल्या पाल्याला किती मार्क अपेक्षित आहे याची चर्चा करू नये. हा वेळ टार्गेट ठरवण्याचा नसून तर भावनिक आधार देण्याचा असतो.

२०. अचानक आठवलं नाही तर काय कराल? 
काही विद्यार्थ्यांना पेपर लिहिता लिहिता एखादा मुद्दा आठवेल की नाही याची भीती असते तर काही विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरं आठवत नाही आणि तिथेच अडकून बसतात त्यानंतर त्यांची लिखाणाची गाडी पुढे जात नाही. त्यात त्यांनी तिथे नकारात्मक विचार सुरू केला तर पुढे येत असलेल्या प्रश्नाच्या उत्तरांना सुद्धा ते गोंधळतात, आत्मविश्वास कमी होतो.

मित्रांनो, उत्तर पत्रिका लिहिता-लिहिता अचानक ब्लँक होणे, शब्द निसटणे, मुद्दा विसरणे, हे स्वाभाविक आहे. पण अडचण कुठे होते तर त्यानंतर तुमच्या मनात नकारात्मक विचार घोळू लागतात आणि पुढे काहीच आठवत नाही. अशा विद्यार्थ्यांनी खालील पद्धतीने विचार केला तर त्यांना नक्की आठवायला लागते. समजा जर असे झाले की परीक्षा हॉलमध्ये उत्तरपत्रिका लिहिताना अचानक आठवले नाही तर मनातल्या मनात स्वतःला खालील पद्धतीने प्रश्न विचारा आणि विधायक विचार करा. 

सर्वप्रथम घाबरून भांबावून जाऊ नका. दोन मिनिटे शांत बसा, थोडे पाणी प्या. चुकून सुद्धा डोक्याला हात लावून बसू नका. ही नकारात्मक देहबोली आहे. मनावरचा ताण हलका करण्यासाठी स्वतःशी मनातल्या मनात बोला.. "आठवेल मला नक्की आठवेल", "मी आठवण्याचा प्रयत्न करून पाहतो".. मग थोडा विचार करा तुम्ही शाळेत कसे जातात? किती विषय आहेत? आज कोणत्या विषयाचा पेपर आहे? तो विषय कोण शिकवतो? जे प्रश्न येत नाही तो धडा कोणता? शाळेत.. कॉलेजला तो कसा शिकवला होता? क्लासमध्ये तो कधी शिकवला होता का? कसा शिकवला होता? त्या धड्याचे प्रश्न लिहिले ती वही कोणती? व्यवसाय मला सोडवली होती का? असे प्रश्न कुठल्या परीक्षेत सोडवला होता का? कधी मित्रमैत्रिणींबरोबर चर्चा झाली होती का? धड्याच पान आठवण्याचा प्रयत्न करा.. अतिशय शांतपणे तुम्ही स्वतःला असे प्रश्न विचारले तर हळूहळू तुम्हाला आठवू लागते. मुद्दे स्पष्ट होऊ लागतात आणि संपूर्ण धड्याचा धडा आठवतो. या पद्धतीने विचार केला तर केवळ पंधरा वीस सेकंदात तुम्हाला आठवायला मदत होते. प्रश्नांचे उत्तर आठवेल परंतु तुम्ही जमणार नाही.. आठवणार नाही.. मी विसरून गेलो.. असे नकारात्मक विचार करतात. नकारात्मक विचारांनी नकारात्मक भावना आणि आचार निर्माण होतात आणि तुम्हाला खरच आठवत नाही. यापुढे कधीही उत्तरपत्रिका लिहिताना अचानक आठवले नाही तर मुळीच नकारात्मक विचार करायचा नाही. मनातल्यामनात बोलायचे.. "आठवेल, नक्कीच आठवेल", "माझी स्मरणशक्ती चांगली आहे", "माझा अभ्यास झालेला आहे", वरील दिलेले प्रश्न स्वतःला विचारावेत. नक्कीच तुम्हाला संपूर्ण उत्तर भराभरा आठवतील.

सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.

सचिन उषा विलास जोशी


शिक्षण अभ्यासक

Friday, 11 February 2022

कृतिशील शिक्षणाचे पुरस्कर्ते- आचार्य विनोबा भावे

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्र मधील लेख

जर तुम्हाला तुमची जमीन कोणी दान करायला सांगितली तर कराल का? मग तो किंवा ती कितीही मोठी प्रतिष्ठित व्यक्ती असो...तुम्ही एकतर देणार नाही किंवा त्यात तुमचा फायदा शोधाल किंवा ज्याला दान देणार त्याच्या संस्थेला निदान तुमचं दान द्यायला सांगाल, पण जगात एक अशी व्यक्ती होऊन गेली की जिने चाळीस लाख एकरपेक्षा अधिक जमीन श्रीमंतांकडून घेऊन गरीब आणि गरजूंना शेतकऱ्यांना मोफत वाटली. या चळवळीला नाव होतं 'भूदान चळवळ' जगात एवढ्या प्रमाणात दान मागून वाटलेल्या जमिनीचा विक्रम एका व्यक्तीच्या नावावर आहे आणि ती व्यक्ती म्हणजे भारतीय आध्यात्मिक विचारवंत, तत्त्वज्ञानी आचार्य विनोबा भावे. जमीनदारांना आचार्य म्हणायचे की, ''तुम्ही तीन भाऊ असाल तर चौथा भाऊ मला समजा आणि माझ्या वाटणीचा जमिनीचा हिस्सा मला द्या.'' त्यावेळेस दान देणारी व्यक्ती विनोबांच्या नावे जमीन करून देत असे आणि विनोबा गरजू शेतकऱ्यांना जमीन त्यांच्या नावे करून द्यायचे. हे फक्त व्हायचं विनोबांच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या जोरावर. त्यांचा भारतीय संस्कृती आणि वेद, भगवद्गीता यांचा सखोल अभ्यास होता. 

त्यांना आपल्या सर्वांसाठी भारतीय विचारसरणीची शिक्षणपद्धती आणायची होती. जिच्यात भावनिक बुद्धिमत्तेला प्रथम स्थान असलं पाहिजे असं त्यांना वाटायचं. त्यांची इच्छा होती की १५ ऑगस्ट १९४७ ला जसा झेंडा बदलला त्याच वेळी शिक्षण सुद्धा बदललं पाहिजे. त्यावेळी तसं घडलं नाही आणि त्याचे परिणाम आपण आजपर्यंत भोगतोय. इंग्रजांची 'घोका आणि ओका' शिक्षणपद्धती अजूनही आपण कमी अधिक प्रमाणात अवलंबतो आहोत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणते की आय.क्यु.बरोबर शिक्षणात इ.क्यु.ला महत्त्व देण्याची गरज आहे; हेच विनोबा सांगत. 

आचार्य विनोबा म्हणायचे की, ''शिक्षण हे दानकार्य आहे. ज्यामध्ये अहंकाराला अजिबात स्थान नको. विद्यार्थ्यांना शिकवणारा शिक्षक नम्र हवा आणि विद्यार्थीसुद्धा नम्र हवा. जेव्हा दोघंही नम्र असतात तेव्हा शिकण्या-शिकवण्याची प्रक्रिया चालू होते. शिक्षण-विद्यार्थ्यांनी एकाच वेळी देवाला प्रार्थना करायची 'तेजस्वी नावधीतमस्तु' याचा अर्थ आमच्या दोघांचं शिक्षण तेजस्वी बनो.'' ते पुढे म्हणतात, ''या प्रार्थनेत शिक्षक हे 'मी तुला शिकवतोय' असं म्हणत नाहीत. 'आपण दोघंही शिकत आहोत' असं म्हणतात.'' आजचा ज्ञानरचनावाद हेच सांगतो की 'टीचर्स हे फॅसिलेटर्स' आहेत. शिक्षकाने शिकवायचं नाही विद्यार्थ्यांबरोबर एक्स्प्लोर करायचं. तेजस्वी नावधीतमस्तु सारखे. 

विनोबांचा आग्रह होता की, ''शिक्षणामध्ये परिश्रमाला विशेष महत्त्व असलं पाहिजे. परिश्रमाच्या अवतीभवती शिक्षण असलं पाहिजे.'' खासकरून लहान विद्यार्थ्यांच्या बाबतीत ते खूप आग्रही होते. हा मुद्दा आजच्या शिक्षणपद्धतीत असणं आवश्यक आहे. आजकालच्या मुलांना शारीरिक श्रमच घ्यावे लागत नाहीत. चाईल्ड ओबेसिटीचं प्रमाण वाढलं आहे. विनोबा म्हणायचे, ''मुलांना शारीरिक कामं करायला द्यावीत.'' इथे शारीरिक कामं आणि मैदानी खेळ यांत फरक आहे. आजचं विज्ञान सांगतं की पहिल्या सहा ते आठ वर्षात मुलं जेवढे पाच इंद्रियांचे अनुभव घेतील तेवढी मेंदूची उत्तम जडणघडण होईल. हेच सगळं विनोबा भारतीय अध्यात्माच्या आधारे समजावून सांगायचे. 

विनोबांनी 'शिक्षा के मूलभूत तत्त्व' या नावाने पुस्तक लिहिलं. त्यामध्ये ते लिहितात की शिक्षण त्रिसूत्रीयुक्त असलं पाहिजे. शिक्षणामध्ये तीन गोष्टी हव्या. एक योग, दुसरा उद्योग आणि तिसरा सहयोग. 

ते म्हणतात, ''योगाचा अर्थ केवळ आसन करणं, व्यायाम करणं असा नसून आपल्या मनावर नियंत्रण करायला शिकणं हा आहे.'' सध्या बऱ्याच शाळांमध्ये योग शिकवले जातात पण मनावर नियंत्रण करायला विद्यार्थ्यांना शिकवत नाहीत. ‘अतिरिक्त स्क्रिन टाईम’च्या या युगात मनावर नियंत्रण आणायला शिकवणं ही काळाची गरज आहे. त्यासाठी मेडिटेशन-ध्यान हा उत्तम उपाय असल्याचं विनोबांनी कधीच सांगून ठेवलं आहे. 

शिक्षणामध्ये दुसरा महत्त्वाचा विषय ते सुचवतात उद्योग. विद्यार्थ्यांमधल्या गुणांचा विकास करायचा असेल तर अभ्यासाबरोबर काही उद्योग विद्यार्थ्यांना करायला देणं गरजेचं आहे. प्रॅक्टिकल ट्रेनिंग्जवर भर द्यायचे. अनुभवातून शिक्षणाला ते खरं शिक्षण समजायचे. उद्योग म्हणजे फक्त चरखा चालवायला देणं नाही असा त्यांचा विचार होता. त्यांच्या मते आधुनिक यंत्र, वर्कशॉप हे प्रत्यक्ष चालवणायचा अनुभव विद्यार्थ्यांना देणं. ते म्हणायचे, ''श्याम' हा हिंदुस्थानचा वर्ण आहे. आपण सगळे 'श्यामवर्ण' आहोत. भगवान कृष्णाचा वर्ण 'श्याम' होता. म्हणून 'श्यामसुंदर' वर्ण भारतात प्रचलित आहे. 'कृष्ण' या शब्दाचा अर्थ होतो 'शेती करणारा....शेतकरी' जो शेती करतो त्याच्या शरीराचा रंग जो आहे तो वर्ण कृष्णाचा आहे. म्हणून आपली शिक्षणव्यवस्था अशी हवी की विद्यार्थ्यांचा शाळेपासून शेतीशीही संबंध हवा. शाळेला लागून २-३ एकर शेती हवी इथे विद्यार्थी एकत्रित शेती करतील.'' हे समजावताना ते पंडित नेहरुंचं वाक्य सांगतात. नेहरु इंग्रजीमध्ये म्हणतात 'नेशन्स डिके व्हेन दे लूज कॉन्टॅक्ट विथ नेचर' राष्ट्र जेव्हा निसर्गाशी असलेल्या नात्यापासून, त्याच्या स्पर्शापासून दूर जातं तेव्हा ते क्षीण बनतं. म्हणून विनोबा म्हणतात, ''शेती ही शाळेपासून शिकवली तर विद्यार्थी नेहमी निसर्गाशी संपर्कात राहतील.'' 

पाहा..किती मोठी गोष्ट विनोबा समजावतात. आज शेतकऱ्यांची परिस्थिती आपण सर्वच जाणतो. निसर्गाशी नाळ तुटत आली आहे. विनोबांचं हे तत्त्व आपण धरून ठेवलं असतं; त्याचा ऱ्हास होऊ दिला नसता तर आज शेतीची अवस्था एवढी वाईट झाली नसती. दुसरा महत्त्वाचा मुद्दा. जेव्हा लहान मुलं मातीला स्पर्श करतात, शारीरिक कष्ट करतात तेव्हा मेंदूमानसशास्त्र सांगतं की, त्यांच्या मेंदूच्या पेशींची घट्ट जुळणी होत असते. विनोबांचा जो आग्रह आहे की उद्योग शिकवताना प्रत्येक व्यक्तीचा संबंध शेतीशी यायलाच हवा. तो आपण आज प्रत्यक्ष शिक्षणात आणूया. शाळेत जागा नसेल तर गच्चीवर छोटी बाग बनवा. पण विद्यार्थ्यांना निसर्गाशी संपर्कात आणा. 

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा रिपोर्ट प्रसिद्ध झाला त्यामध्ये शाळेत विद्यार्थ्यांना कोलॅबरेशन शिकवा असं सांगितलं आहे. खास प्रेस कॉन्फरन्स घेऊन सर्व जगातील शाळेच्या प्रिंसिपल्सना आव्हान केलं आहे की जगात शांती हवी असेल तर शाळेत कोलॅबरेशन म्हणजेच सहकार्य शिकवा. विनोबा भावे याचा आग्रह १९४७ पासून धरतायत. ते म्हणतात, ''शिक्षणामध्ये तिसरी महत्त्वाची गोष्ट आणा ती म्हणजे सहयोग-सहकार्य. आपल्या सर्वांना एकत्र जगायचं आहे. एकत्र आनंदी जगण्यासाठी एकमेकांना सहकार्य करायला शिकवा. मी महाराष्ट्रीय, मी तमीळ, मी पंजाबी असं न शिकवता 'मी भारतीय' असं शिकवा. 'मी भारतीय आहे' हे सर्वांत छोटी मागणी आहे. सर्वांत मोठी मागणी म्हणजे विद्यार्थ्यांना 'विश्वमानुष:' मी विश्वमानव आहे हे शिकवा. आपण आज भारताचं, त्याच्या प्रांतांचं गीत म्हणतो पण वेदांमध्ये पृथ्वीसुक्त आहे, भारतसुक्त नाही. नाना धर्माणां पृथिवीं विवाचसमू'- ही पृथ्वी आपल्या सर्वांची मातृभूमी आहे. यामध्ये अनेक धर्म आणि अनेक भाषा आहेत. या वास्तविकतेला समोर ठेवून विद्यार्थ्यांनी 'विश्वमानुष:' बनलं पाहिजे.'' हे सांगताना विनोबा एक जयजयकार द्यायला सांगतात. 'जयजगत्।' आणि पुढे म्हणतात, ''जय जगत्' ही माझी सर्वांत मोठी मागणी आहे पण किमान तुम्ही 'मी भारतीय आहे' एवढं तरी म्हणा.'' 

याचाच अर्थ विनोबांची इच्छा होती की 'भारतीय' शब्दाहून वेगळा विचार नको. भारतीयांच्या खाली उतरू नका जसे मी मराठी, मी हिंदू, मी मुसलमान...

अतिशय महत्त्वाचा आणि एकविसाव्या शतकाला लागू होणारा मुद्दा ते शिक्षणात आणायला सांगतात. नुसताच सांगत नाहीत तर 'सहयोग' गुण कसा आणायचा यासाठी ते सर्वांना सुचवतात की, ''विद्यार्थ्यांना आधीपासून दुसऱ्यांमधले फक्त गुण शोधायला शिकवा. मनुष्य म्हणजे गुण-दोषांनी भरलेला आहे. समोरच्यातले फक्त गुणच दिसतील असं शिक्षण विद्यार्थ्यांना द्या.'' भावनिक बुद्धिमत्तेचा महत्त्वाचा मुद्दा विनोबा शिक्षणात आणायला सांगतात. अजूनही वेळ गेलेली नाही. विनोबांचे शिक्षण विचार आजही एकविसाव्या शतकात लागू होतात. 

विनोबांचा म्हणजे विनायक नरहरी भावे यांचा जन्म ११ सप्टेंबर १८९५ रोजी कोकणातल्या पेणजवळील गोगादे गावात झाला. ते भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि 'भूदान चळवळी'चे प्रणेते होते. त्यांना महात्मा गांधींचे उत्तराधिकारी म्हणूनही ओळखलं जातं. १९४० मध्ये गांधींनी वैयक्तिक सत्याग्रह पुकारला होता. त्यावेळी 'पहिले सत्याग्रही' म्हणून महात्मा गांधी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली होती. आचार्यांचं गीताप्रवचन प्रसिद्ध आहे. ते जिथे भाषण करायचे तिथे लगेच त्याचं लिखित स्वरूपात रूपांतर व्हायचं.

त्यांचे शिक्षणविषयक विचार हे खरंच व्यावहारिक आणि आजच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला लागू होणारे आहेत. शिक्षणाच्या माध्यमासाठी त्यांचा मातृभाषेचा आग्रह होता. त्यामागे एक व्यावहारिक दृष्टिकोनही होता. ते म्हणायचे, ''विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत मातृभाषेतून शिकवा. फक्त विज्ञानातल्या ज्या संकल्पना आहेत त्यासाठी इंग्रजीतले शब्द तात्पुरते वापरा. हळूहळू त्या शब्दांना मातृभाषेतले शब्द येतील.'' हे समजावताना ते म्हणतात, ''आपली भाषा ही विस्कळीत भाषा आहे आणि पुढे अजून विकसित होईल. ज्ञानेश्वरांनी बाराव्या शतकात 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ लिहिला आणि इंग्लडच्या 'कँटरबरी टेल्स'शी तुलना केली तर 'ज्ञानेश्वरी'मध्ये जेवढे शब्द आहेत त्याच्या एक चतुर्थांश म्हणजे चौथा हिस्सा पण 'कँटरबरी टेल्स'मध्ये नाही. 

आत्ताच अर्थसंकल्प जाहीर झाला ज्यामध्ये e-content  मातृभाषेतून बनवण्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे. हाच मुद्दा विनोबा त्याकाळी सांगत होते. 

१९४७ साली जे महात्मा गांधी म्हणाले, विनोबांनी ज्याचा आग्रह धरला तो मातृभाषेतून शिक्षण हा विचार जर आपल्याकडे राबवला गेला असता तर आज भारत विज्ञानात, इनोव्हेशनमध्ये पुढे गेला असता. 

विनोबा हे गांधीवादी होते. महात्मा गांधींच्या 'नयी तालीम' या शिक्षणप्रणालीचे पुरस्कर्ते होते. फक्त त्यांचा जोर भारतीय अध्यात्मावर अधिक होता. आचार्य म्हणायचे, ''शिक्षक हा सर्वोत्तम सल्ला देणारा असावा. वैयक्तिक आयुष्यात जेव्हा समस्या येतात तेव्हा आपण आईवडील, भाऊ-बहीण, पती-पत्नी, इतर यांच्याकडे सल्ला मागतो पण आपल्या शिक्षकांकडे सल्ला मागायला जात नाही. भारतीय समाज उत्तम सल्ला देणारी शिक्षक ही व्यक्ती हरवून बसत आहे.'' ते म्हणतात, ''शिक्षकामध्ये तीन गुण असावेत. प्रेम, ज्ञान आणि तटस्थता.''

आचार्य विनोबा भावे हे स्वतः असे राष्ट्रीय शिक्षक होते. त्यांचे शिक्षण विचार प्रत्येक पालक, शिक्षक आणि शिक्षणप्रेमी यांनी वाचून अंमलात आणायला हवेत. 

सचिन उषा विलास जोशी

 शिक्षण अभ्यासक



Friday, 28 January 2022

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि शैक्षणिक विचार

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधल लेख

भारताला संत आणि विचारवंतांची फ़ार मोठी परंपरा लाभली आहे. आपण या संतांनी, विचारवंतांनी, समाजसुधारकांनी जो विचार मांडला तो आजच्या शिक्षणक्षेत्राला कितपत लागू पडतो ते पाहणं ही एक रंजक गोष्ट आहे. जीवनशिक्षण, लोकशिक्षण, समाजशिक्षण, क्रमिक शिक्षण, अक्षरशिक्षण..अशी अनेकानेक बिरुदं गरजेनुसार मिरवत मूल्यांचा प्रवास एका फार मोठ्या वैचारिक अभिव्यक्तीद्वारे अगदी वैश्विक पातळीवर आधुनिकतेपर्यंत येऊन ठेपलेला आहे. त्यातल्याच काही मोजक्या संतांच्या-विचारवंतांच्या उद्बोधनाचा शिक्षण आणि पालकत्वाचा विचारवेध आपण इथे घेत आहोत.


महाराष्ट्रात ग्रामपातळीवर भजन-कीर्तनाच्या माध्यमातून अखंडपणे लोकशिक्षणासाठी ज्यांच्या चिपळ्या थिरकल्या, आवाज कडाडला आणि त्यातून त्यांची उद्बोधनाची तळमळ अतिशय प्रभावीपणे जनमानसापर्यंत पोहोचली त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा वेध घेऊया.

आजच्या आधुनिक अशा विज्ञानयुगातल्या विचारांची आणि पर्यायाने शिक्षणाची नाळ या राष्ट्रसंतांच्या वैचारिक प्रक्रियेशी कशी जुळलेली आहे हे पडताळून पाहणं मोठं उद्बोधक ठरतं. त्यांचं सामाजिक भान अनुभवणं गरजेचं ठरतं. तुकडोजी महाराजांचं पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे.  त्यांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी विदर्भात अमरावतीतल्या यावली इथे झाला. 1968 मध्ये त्यांचं देहावसान झालं. समाजातील मूलभूत समस्यांना जाणून त्यावर उपाय करणं हे तुकडोजी महाराजांच्या कार्याचं वैशिष्ट्य होय. त्यामुळे तत्कालीन राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद यांनी ‘गुरुकुंज’ आश्रम इथे त्यांना ‘राष्ट्रसंत’ ही उपाधी दिली.

संत परंपरा बघता तुकडोजी महाराजांचा काळ तसा अलीकडचा. म्हणजे त्यांच्याच काळात भारत स्वतंत्र झाला. त्यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असे दोन्ही काळ अनुभवले. ब्रिटिशांच्या काळातच विद्यालय-महाविद्यालय-विद्यापीठ यांची ओळख भारताला झाली होती. पुढे हा शैक्षणिक प्रवास खरं तर अनेक दिशांनी प्रगती करत राहिला. क्रमिक शिक्षण, ठरावीक अभ्यासक्रम, इंग्रजीबरोबर इतर स्थानिक भाषांतूनही शिक्षण या गोष्टींकडेही भारत वळला. तरीही संत परंपरेची नस पकडून विचारांच्या अभिव्यक्तीसाठी तुकडोजी महाराजांनी भजन-कीर्तनाचा उपयोग का केला? तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जिथे अगदी सांदीकोपऱ्यात खेड्यापाड्यात माणसं राहत होती तिथे ही संतमंडळी पोहोचून जनतेला आपल्या भजन-कीर्तनातून चार उद्बोधक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असत. त्यांनी मराठी, हिंदी भाषेत रचना केलेल्या आहेत. 

आपल्या गद्य-पद्य लेखणीतून चिपळ्या किंवा खंजिरी या वाद्यांच्या सहाय्याने भजनाच्या माध्यमातून परंपरागत अनिष्ट रूढी, जातिधर्मपंथभेद, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, हरिजन मंदिर प्रवेश बंदी अशा समाजघातक रूढींवर कठोर प्रहार करून त्यांनी ईश्वराचं विशुद्ध स्वरूप लोकांसमोर मांडलं. त्यामुळे सर्वधर्मीय, सर्वपंथीय लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले. 

गावं स्वयंपूर्ण बनून तिथले लोक उद्यमशील आणि निर्व्यसनी कसे होतील याचं प्रात्यक्षिकच त्यांनी करून दाखवलं. गावागावात शिक्षणाचं महत्त्व पटवून सांगितलं. त्याबरोबर बलसंवर्धन, शिक्षण, आयुर्वेद आणि कृषिसंवर्धनाचे धडे दिले. त्यांनी आदर्श समाजरचनेला सहाय्यभूत अशी संघटना निर्माण केली. महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिलं. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात आणि दास्यात ठेवणं कसं अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे सांगितलं. विद्यार्थीदशेतील मुलं-मुली यांच्या विकासावर त्यांचा कायम भर राहिला. ते म्हणतात, 
“नुसते नको उच्चशिक्षण आता व्हावा कष्टिक बलवान, सुपुत्र भारताचा.’
आजचा शिक्षणाचा कृतिशील विचार तरी दुसरं काय सांगतो, सुचवतो? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पूर्वीच ही संकल्पना मांडून ठेवली आहे.
अनेक नवनवीन कल्पना, संकल्पना आपल्या रचनांमधून ते मांडताना दिसतात. आपले सगळे विचार समाजाला समजावून सांगण्यासाठी भजन-कीर्तनाला बळ देणारं त्यांचं शब्दसामर्थ्य त्यांना चांगलंच उपयोगी पडलं. मनःपूर्वक, अगदी आतून तुकडोजी महाराज भजन करू लागले की अवघं वातावरण त्यांच्या खड्या आवाजाने दुमदुमून जाई. ते असे तल्लीन होत, भजनी एकरूप होत, इतक्या वेगात जलदगतीने भजन करत की त्यांच्या हातातल्या दोन्ही चिपळ्या जणू एक होत. सगळीच एकतानता साधत असे; विचारांची आणि अभिव्यक्तीचीही. असं प्रत्यक्ष त्यांचं भजन ऐकलेले सांगतात.
ते एका भजनात म्हणतात:
"विठ्ठल रखुमाई घरी दारी
पुंडलिक ही मुलं गोजिरी
त्यांना सेवेचं फूल मी वाहिलं
त्यांना प्रेमाचं फूल मी वाहिलं
माझं गावच मंदिर शोभलं."
याचा अर्थ घरीदारी विठ्ठल रखुमाई असल्याचं ते सांगतात. गोजिऱ्या मुलांना त्यांनी देव मानलं आहे. त्यांनाच सेवेचं फूल वाहिलं आहे. सारं गावच या मुलांमुळे मंदिर झालेलं आहे. 

आजचा ज्ञानरचनावाद नेमकं हेच सांगतो, ‘शाळा विद्यार्थीकेंद्री असावी’ हाच विचार तुकडोजींनी आपल्या विचारांत मांडला आहे. ‘मुलांना सेवेची फुलं वाहिली’ म्हणजे दुसरं काय? आजचा अर्थ हाच आहे की शाळेतल्या विद्यार्थ्यांना मन लावून शिकवलं तर इतर कुठे देव शोधायला जायची गरजच नाही. देवाच्या चरणी फुलं वाहणारे पुजारी हेच फक्त पुजारी नाहीत तर कष्टकरी पुजारी, शेतकरी पुजारी, मजूरही पुजारी, कलावंत पुजारी, गावातले शिक्षकही पुजारी. म्हणजे थोडक्यात, ते कर्मयोगच आचरायला सांगतात.
ज्याने इमानदारीने आपलं काम केलं त्याला वेगळं देवाचं नाव घ्यायची गरज नाही. ज्याने प्रामाणिकपणे काम केलं तो मंदिरात गेला काय..नाही केला काय..फरक पडत नाही..म्हणून ते भजनात म्हणतात: 

"सच काम किया जिसने जग मे , उसने प्रभु नाम लिया…न लिया..."

आजच्या शिक्षकांनी हे सर्व लक्षात घ्यायची निश्चित गरज आहे. सगळे शिक्षक म्हणतील, “आम्ही करतोच आमचं काम मनापासून.” तरीही मग आज पाचवीतल्या साठ टक्के मुलांना दुसरीचं ज्ञानही प्राप्त झालेलं नाही. असं का बरं? म्हणजेच आपण आपले प्रयत्न वाढवायला हवे आहेत. तुकडोजी महाराजांनी सुचवल्याप्रमाणे गावाला मंदिराचं रूप आणायचं असेल तर गावातला प्रत्येक माणूस शिकला पाहिजे, शहाणा झाला पाहिजे.
जीवनशिक्षणही माणसाला शहाणं करतं पण अक्षरशिक्षण त्याची पहिली पायरी आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, “शिक्षण देऊन केली दिवाळी.” म्हणजे आपण लाडू, पेढे, जिलबी खाऊन-वाटून दिवाळी साजरी करतो मात्र गावाला शिक्षण देऊन साजरी होते ती खरी दिवाळी. ‘जीवाभावाने जवं मी पाहिलं माझं गाव.’ तेव्हा कळलं की ‘ज्याच्या ह्रदयात प्रकाश पडला आहे तोच दिवाळी करू शकतो आणि हा प्रकाश शिक्षण देतं.’ म्हणूनच तुकडोजी महाराज म्हणतात,
"शिक्षण देऊन केली दिवाळी, अज्ञानाची करूनी होळी, तुकड्या म्हणे मन रंगलं, आता खोटंनाटं नाही राहिलं, माझं गावच मंदिर शोभलं".

असा गावखेड्यांनीच आपला देश घडलेला आहे, खरा भारत खेड्यात आहे हे समजून उमजून त्यांनी ‘ग्रामगीता’ लिहिली. केवळ आध्यात्मिक उन्नतीवर भर न देता मनुष्याच्या सर्वांगीण विकासावर भर देणं हे राष्ट्रसंतांचं वैशिष्ट्य. ‘ग्रामगीता’ ही त्यासाठी लिहिलेली सर्मसमावेशक सूची आहे.

मनुष्याने देवाच्या भरवशावर स्वस्थ बसणं तुकडोजी महाराजांना मान्य नाही. भविष्य बघणं, बुवाबाजी करणं हे सारं थोतांड आहे असं ते म्हणतात. चांगलं कर्म करणं माणसाचं भविष्य बदलू शकतं हा त्यांचा विचार आहे. महाराजांनी प्रयत्नवादी कर्मच श्रेष्ठ मानलं आहे. ते ‘ग्रामगीते’ त म्हणतात,
क्रियेवीण मार्गचि नाही | कर्तव्य नरा देवपद देई |
तुकड्या म्हणे बना निश्चयी | प्रयत्नवादी ||
त्यांना ईश्वरसत्ता मान्य असली तरीही देवभोळेपणा, अंधश्रध्दा यांच्या ते तीव्र विरोधात होते. अंधश्रद्धा निर्मूलनाबद्दलचे त्यांचे व्यक्त होणारे विचार हे आता शालेय शिक्षणात आले आहेत. आज विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करायला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सांगतं. त्याचा पाया तुकडोजी महाराजांनी घातला.

तुकडोजी महाराजांनी जपानसारख्या देशात जाऊन विश्वबंधुत्वाचा विचार मांडला. आजचं आपलं नवं शिक्षण 'ग्लोबल सिटीजन' हाच विचार मांडतं. तुकडोजी महाराजांची स्वतःची वैचारिक बैठक अगदी पक्की होती आणि विचार अर्थातच प्रगल्भ होते. २००५ मध्ये नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव देऊन विद्यापीठाचा नामविस्तार केला गेला. त्यांनी गावोगाव ‘गुरुदेव सेवामंडळं’ स्थापन केली. त्यांद्वारे आजही अनेक कार्यकर्ते मानवतेचा वसा घेऊन काम करत आहेत.
राष्ट्रसंत हे अध्यात्म क्षेत्रातील विज्ञानवादी संत होत. ‘मानवतेचा संबंध हा मानवाच्या जगण्याचा मूलाधार आहे.’ असं ते जनतेला ठणकावून सांगत. आपला परिचयही त्यांनी- 
"मानवता है पंथ मेरा
इन्सानियत है धर्म मेरा"
असाच करून दिला आहे. हा विचार आज शाळेमध्ये शिकवण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कारण मोठेपणी आपण जाती-धर्मांवर भांडतो आणि मानवता हाच धर्म आहे हे विसरतो.

पुढे ते म्हणतात,
"है जिसकी जुबा मे प्रेम भरा कटुता पटुता का गर्व नही"
हे खरं जगणं, ही खरी माणुसकी. इथे दुसऱ्याचा विचार येतो आणि स्थितप्रज्ञ वृत्तीही.
त्यांनी जनतेला आत्मजागृत केलं. ‘जनसेवेतच ईश्वरसेवा आहे आणि ही मानवतेची उपासना आणि राष्ट्रसेवा आहे.’ अशी शिकवण त्यांनी जनतेला दिली. 
नवं शैक्षणिक धोरणही याच सर्व मूल्यांना धरून आहे. स्वत्वाचा शोध घेऊन त्याचा विकास साधणं महत्त्वाचं असतं. शिक्षणपद्धतीचा उद्देश मुलाच्या आत काय दडलं आहे ते शोधण्याचा आहे. वैश्विक मानवतेची कास धरण्याआधी स्वतःला नीट समजून घ्यायला पाहिजे. सिद्ध करायला हवं. त्यासाठी स्वतःची ओळख पटायला हवी. 
गुलाब गुलाब असतो. मोगरा मोगरा असतो. आपल्याला त्याचा गुलाब करता येणार नाही किंवा गुलाबाचा मोगरा; आणि तशी गरजच नाही. प्रत्येकाचं काही ना काही वैशिष्ट्य असतं. ते त्याच्या आत दडलेलं असतं. पालक शिक्षकांचं काम ते हुडकून काढण्याचं असतं. 
विवेकानंदही हेच म्हणतात, “बाहेरची माहिती आत कोंबणं म्हणजे शिक्षण नाही. ते ज्ञानाशी निगडित असतं आणि ज्ञान हे आत असतं. त्याचा शोध घ्यायला पाहिजे.”
तो शोध घेणं फक्त मानवालाच जमतं. 

माणसाच्या या वैशिष्ट्याकडे तुकडोजी महाराज सर्वांचं लक्ष वेधतात-
" खाना पिना सोना मजा करना पशु भी जानते ।"
एकविसाव्या शतकातला विचार हाच आहे. आता साक्षरता हे शिक्षण राहिलेलं नाही. कौशल्य हे शिक्षण नाही; आत दडलेलं हुडकून काढणं हाच आता शिक्षणाचा अर्थ उरला आहे. सर्वांगीण विकासाचा तो पाया आहे. नवीन शैक्षणिक धोरणात याची अतिशय व्यवस्थित मांडणी केलेली आहे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी नेमकं हेच म्हटलेलं आहे-
मानव जनम कुछ और है,
बिरले इसे पेहेचान ले..।।

सचिन उषा विलास जोशी 
शिक्षण अभ्यासक




Friday, 14 January 2022

शिक्षणाबाबत 'ओशों'चे क्रांतिकारी विचार

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधल लेख

आपल्याकडे बरेच मोठे विचारवंत, समाज सुधारक, संत होऊन गेले. महाराष्ट्रात तर संतांची परंपराच आहे. या सर्वांनी विविध विषयांवर त्यांचे परखड मत मांडले. त्याच्यातील जे मत.. विचार हे शिक्षण संदर्भात होते किंवा त्यांच्या प्रबोधनातील जे विचार आजच्या शिक्षणाला लागू होतात अशा सर्व भारतीय विचारवंतांचा, संतांचा, समाजसुधारकांचा आणि त्यांच्या विचारांचा आपण अभ्यास करणार आहोत.

शिक्षणाबाबत भारतीय विचारवंतांचे विचार आणि नवं शैक्षणिक धोरण यांच्यातला ताळमेळ अभ्यासताना रजनीश ओशो यांचे शिक्षणविषयक क्रांतीकारी विचार ठळकपणे लक्षात येतात. ‘गुलाब ‘गुलाब’ असतो, मोगरा ‘मोगरा’ असतो. गुलाबाला मोगरा करता येत नाही; तर मोगऱ्याला गुलाब. एकमेकांशी तुलनाच होऊ शकत नाही. माळ्याचं काम एवढंच असतं उत्तम खत-पाणी घालणं. मुलांच्या शिक्षणाबाबत पण असंच असतं.’ हा प्रभावी विचार मांडला रजनीश ओशो यांनी.
ओशो हे अशा काही दुर्मिळ तत्त्वज्ञानांपैकी एक असतील ज्यांनी शिक्षणाचा इतका खोलात जाऊन विचार केला. त्यांनी सांगितलं की, ‘जगात अनेक प्रकारच्या क्रांती झाल्या पण मनुष्य आत्तापर्यंत आनंदी होऊ शकला नाही. आता एकच क्रांती व्हायची शिल्लक आहे ती म्हणजे ‘शिक्षणक्रांती.’ त्यांनी शिक्षण या विषयावर अनेक भाष्यं केली, व्याख्यानं दिली. त्यावर ‘शिक्षणक्रांती’ नावाचं त्यांचं पुस्तक सुद्धा प्रसिद्ध आहे. जे नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आज सांगतं ते रजनीश ओशोंनी चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी सांगितलं. 

त्यांच्या शिक्षणाबाबत विचारामागे फक्त तत्त्वज्ञान नसून बालमानसशास्त्र आहे. जे प्रत्यक्ष अंमलात आलं तर प्रत्येक व्यक्ती एक अद्भुत होऊ शकते. ते म्हणतात, ‘पहिल्या पाच-सहा वर्षांत माणसाचं पन्नास टक्के शिक्षण पूर्ण होतं.’ आता हाच त्यांचा विचार व्यक्त करत मज्जामेंदूशास्त्र सांगतं की पहिल्या आठ वर्षांत माणसाच्या ऐंशी टक्के मेंदूची जडणघडण होते. जितकी मेंदूच्या पेशींना चालना मिळेल तेवढा मेंदू तल्लख होतो. हाच विचार ते तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र यांच्या सहाय्याने लोकांना समजावून देत असत. 
ओशो म्हणतात, ‘आत्तापर्यंत शिक्षक यावरच जोर देत आले आहेत की बांधीव उत्तरंच द्या; कारण तेच बरोबर आहे.’ पुढे ते म्हणतात, ‘भविष्यातील शिक्षकांना उलट जोर यावर द्यावा लागेल की मेहेरबानी करून बांधीव उत्तर देऊ नका. नवीन उत्तर शोधा.’ आता हेच त्यांचे विचार हा ज्ञानरचनावादाचा पाया आहे. शिक्षणातलं ज्ञानरचनावादाचं महत्त्वाचं सूत्र आहे की ‘विद्यार्थी त्यांची ज्ञाननिर्मिती स्वतः करतील.’ म्हणजे जे ओशोंनी सांगितलं की ‘भविष्यातील शिक्षक विद्यार्थ्यांना स्वतःचं उत्तर सांगायला प्रोत्साहित करतील.’ ते आजच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट आहे.

ओशो त्यांच्या एका भाषणात म्हणतात की, ‘भूतकालीन ज्ञान देणं ही तांत्रिक गोष्ट आहे आणि भविष्यातला नागरिक घडवणं ही सर्जनात्मक प्रक्रिया आहे.’ हे अगदी खरं आहे की आज सर्व भूतकालीन माहिती-ज्ञान गुगलवरून मिळतं पण भविष्यातले नागरिक घडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यावर खूप सर्जनात्मक काम करणं अपेक्षित असतं. त्यासाठी ओशो म्हणतात की,मेमरीला-स्मृतीला शिक्षणाच्या केंद्रापासून हटवावं लागेल.’ याचाच अर्थ घोका आणि ओका ही शिक्षणपद्धती बंद करून संकल्पना समजण्यावर आपल्याला भर द्यावा लागेल. ते म्हणतात, ‘आपल्या साऱ्या परीक्षा या निव्वळ स्मरणशक्तीच्या परीक्षा आहेत. विविध स्तरांवर बुध्दितमत्तेचा कस लागणाऱ्या परीक्षा नाहीत. परीक्षांमधून आम्ही फक्त याच गोष्टीची माहिती करून घेतो की कोणती व्यक्ती बरोबर पुनरावृत्ती करू शकते पण नुसती पुनरावृत्ती करणारा माणूस प्रत्यक्ष जीवनात हरवूनच जाईल कारण जीवन रोजचं नवे नवे प्रश्न उभे करत असतं.’ 
थोडक्यात, ओशोंना म्हणायचं होतं की ‘विद्यार्थ्यांना जीवनाच्या प्रश्नांचा थेट सामना करू द्या.’ 21 अपेक्षित’ सारखं जीवन नसतं. हेच नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सांगतं. त्याच्या उद्दिष्टातच म्हटलं आहे की ‘विद्यार्थ्यांमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिन्ग स्किल-समस्या सोडवण्याचं कौशल्य-विकसित करणं हे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे.’ हेच तर ओशो सांगतात. 

मी जसं सुरुवातीला म्हटलं की ओशोंनी शिक्षणावर खोलात भाष्य केलं याचा अजून एक नमुना म्हणजे ते म्हणतात, ‘या जगात एवढा द्वेष आणि तिरस्कार कुठून आला तर त्याची सुरुवात वर्गात पहिल्या येण्याच्या स्पर्धेने होते.’ ते म्हणतात, ‘आमचं शिक्षण चेहरे दुःखी बनवतं, पराभूत बनवतं; उदास बनवतं.’ वर्गात एका विद्यार्थ्यांला सन्मानित करण्यासाठी तीसपैकी एकोणतीस विद्यार्थ्यांना आपण हरणं शिकवतो. ‘तू नाही येऊ शकत पहिला.’ या विचाराने त्याच्यामध्ये हिनतेची भावना निर्माण होते. त्याला अपयशी होणं कंडिशनल केलं जातं. एका विद्यार्थ्याला वर्गात पहिलं आणून इतर विद्यार्थ्यांच्या मनात स्पर्धा निर्माण होते. स्पर्धेमधून कधीही प्रेम निर्माण होत नाही, निर्माण होतो तो फक्त द्वेष. किती खोलात ओशोंनी सगळा विचार केला आहे. मानसशास्त्रीयदृष्ट्या हा विचार अगदी बरोबर आहे म्हणून बरेच शिक्षणतज्ज्ञ म्हणतात ‘मेरिट लिस्ट काढून टाका.’ ओशोंनी द्रष्टेपणाने शिक्षणाबद्दलचे विचार मांडले म्हणून त्या संदर्भातही ओशो महत्त्वाचे ठरतात.

ओशोंच खरं नाव चंद्रमोहन जैन होतं. पुढे त्यांचे शिष्य त्यांना ‘रजनीश’ म्हणून संबोधू लागले आणि पुढे जग त्यांना ‘ओशो’ म्हणून ओळखू लागलं. ते एक भारतीय विचारवंत होते. त्यांचं संपूर्ण आयुष्य हे विवादास्पद राहिलं. त्यांचे विचार अतिशय क्रांतिकारी असल्याने सहजासहजी ते स्वीकारले जात नसत. पुढे त्यांचे विचार मान्य होत गेले, ती एक जगण्याची विचारसरणी बनली. ते एक आध्यात्मिक शिक्षक म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांचा जन्म मध्यप्रदेश इथल्या ‘रामसेन’ शहरातल्या ‘कुचवाड’ गावातला. ते तत्त्वज्ञानाचे विद्यार्थी होते. त्यांनी सहाशेहून अधिक पुस्तकं लिहिली पण ‘शिक्षा मे क्रांती’ हे त्यांचं पुस्तक शिक्षणक्षेत्रातील पालक-शिक्षक विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभाचं काम करतं.

ओशोंनी शिक्षकांसाठी खूप क्रांतिकारी विचार मांडले. त्यांच्या मते शिक्षक हा ‘विद्रोही’ असला पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये जो जिज्ञासा जागृत करतो तोच शिक्षक. ज्ञानरचनावादही हेच सांगतो की ‘शिक्षक हा फॅसिलेटरच्या भूमिकेत हवा.’ विद्यार्थी त्याचं ज्ञान स्वतः निर्माण करेल; त्या प्रक्रियेत शिक्षकाने सहाय्य करायचं आहे. त्याने विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करायची आहे; जेणेकरून विद्यार्थी स्वतः शिकेल.

ओशो म्हणतात, ‘विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर केला पाहिजे ही अपेक्षाच चुकीची आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा आदर केला पाहिजे. तसं झालं तर विद्यार्थी शिक्षकांवर प्रेम करेल.’ शिक्षक हा विद्रोही असला पाहिजे म्हणजे मूल्य विचारांत त्याने क्रांती आणली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. म्हणजे मूल्य कालातीत असली तरीही कालानुरूप त्यांना वळणं लावून ती उपयोगात आणता आली पाहिजेत.

ओशो म्हणतात, ‘शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवलं पाहिजे की ‘तू तूच हो, कोणासारखा बनू नको.’ कोणी सांगत रामासारखा हो, कोणी सांगतं कृष्णासारखा हो. आजपर्यंत कोणी कोणासारखा बनला आहे का? राम-कृष्णाच्या काळापासून आजतागायत कोणी राम नाही होऊ शकला ना कोणी कृष्ण. ते म्हणतात, सर्व खटपट नकली माणसं निर्माण करण्याची चालू आहे. कोणी कोणाला कॉपी करू शकत नाही. मी फक्त 'मीच' होऊ शकतो. जेव्हा दुसऱ्याला कॉपी करतो तेव्हा माणूस दोन चेहरे निर्माण करतो.’ अतिशय खोलात जाऊन त्यांनी हा विचार मांडला आहे. आज गरज आहे तरुणांना सांगायची की तुमची तुलना कोणासोबत होऊ शकत नाही. ‘तुम्ही तुम्हीच बना’ 

एका ठिकाणी रजनीश असं म्हणतात की, ‘विद्यार्थ्यांना शास्त्र गणित हे विषय गायन-नृत्याच्या माध्यमातून शिकवा.’ आज त्याचे अनेक प्रयोग चालू आहेत. सीबीएससी बोर्ड ने इंटिग्रेटेड करिक्युलम बाबत सूचना दिल्या आहेत. 

सांगायचा मुद्दा हा की ओशोंचे विचार खऱ्या अर्थी अंमलात आणले तर आपले विद्यार्थी इनोव्हेशनमध्ये, नवनिर्मितीमध्ये अग्रस्थानी राहू शकतात.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक

Sunday, 21 November 2021

स्वातंत्र्यपूर्व काळातील नाशिकमधील प्राथमिक शिक्षण

मागील वर्षी नाशिक जिल्ह्याची स्थापना होऊन 150 वर्ष झाले त्यानिमित्त स्वातंत्र पूर्व काळातील नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण यावर सकाळ दिवाळी अंकातील शिक्षण अभ्यास सचिन उषा विलास जोशी यांचा वाचनीय लेख.


 नाशिक जिल्ह्याची स्थापना होऊन दीडशे वर्षं झाली; पण नाशिकचा इतिहास पाच हजार वर्षांपेक्षा जुना आहे, पुराणकाळाशी निगडित आहे. रामायणातून असं कळतं की शूर्पणखेचं नाक या भूमीत कापलं, म्हणून ‘नाशिक’ हे नाव पडलं; अशी आख्यायिका आहे. नाशिकच्या आजूबाजूला नऊ शिखरं आहेत; म्हणजे नऊ टेकड्या आहेत म्हणून ‘नवशिखर’ या शब्दावरून ‘नाशिक’ नाव उदयास आलं. नाशिकमधली गुलाबाची शेती प्रसिद्ध होती. जेव्हा नाशिक औरंगजेबाच्या मोगल साम्राज्याखाली होतं तेव्हा त्याचं नाव ‘गुलशनाबाद’ होतं. पण जेव्हा पुन्हा ते मराठ्यांच्या अधिपत्याखाली आलं तेव्हा धार्मिक तीर्थस्थान असल्यामुळे त्याला ‘दक्षिणकाशी’ असं संबोधलं गेलं. वेगवेगळ्या काळात नाशिकला वेगवेगळी नावं मिळाली. नाशिकला जिल्हा म्हणून मान्यता मिळून दीडशे वर्षं झाली. या दीडशे वर्षांमध्ये प्राथमिक शिक्षणाची वाटचाल कशी होती हा इतिहास संशोधनाचा विषय आहे. शिक्षण अभ्यासक आणि नाशिकप्रेमी म्हणून मी आणि प्राचार्य डॉ.संदीप पाटील यांनी यावर संशोधन करायचं ठरवलं. प्राथमिक शिक्षणावर संशोधन मी करेन; तर उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणावर प्राचार्य डॉ.प्रशांत पाटील करतील असं ठरवून आम्ही दोघांनी अभ्यास चालू केला. आम्ही डॉ.कैलास कमोद, कै. स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर, सर डॉ. म.सो गोसावी, प्राचार्य व्ही. बी. गायकवाड, श्री. मधुकर झेंडे, श्री. बाळासाहेब वाघ सर, श्री. रमेश देशमुख सर , श्री. वैशंपायन, प्रा शंकर बोऱ्हाडे अशा बऱ्याच जणांच्या दीर्घ मुलाखती घेतल्या. यावर लवकरच पुस्तक येत आहे. पण 'थोडक्यात नाशिकच्या शिक्षणाचा इतिहास यावर सकाळ दिवाळी अंकात लिहा.' या विनंतीवरून हा लेख लिहीत आहे. पण या लेखात 1947 पर्यंत म्हणजे स्वातंत्र्यपूर्व नाशिकचा शिक्षणाचा आढावा घेत आहोत. स्वातंत्र्यनंतरचे प्राथमिक शिक्षण हा वेगळा लेख माझ्या येणाऱ्या पुस्तकात वाचायला मिळेल. आज समजून घेऊ 1947 पूर्वीची नाशिक जिल्ह्यामधील शिक्षणाची वाटचाल कशी झाली. 


असं म्हणतात, आपल्याला आपला भूतकाळ चांगला माहीत असेल तर भविष्यकाळ चांगला निर्माण करता येतो. 21 व्या शतकात नाशिकला जगाच्या पाठीवर एक उत्तम उच्चशिक्षित आणि मनुष्यबळ असलेलं आनंदी शहर म्हणून ओळख हवी असेल तर ती मिळेल उत्तम शिक्षणाने. माणसाची प्रगती त्याला मिळणाऱ्या शिक्षणावर अवलंबून असते. मग या संदर्भात नाशिकचा प्रवास कसा झाला? नाशिकमधील शिक्षणासंदर्भात दीडशे वर्षांचं सिंहावलोकन करायचं झालं तर सुरुवात ब्रिटिश साम्राज्यापासून करायची का त्या आधीपासून? ब्रिटिश येण्याआधी नाशिक भागात शिक्षण कसं होतं? 

ब्रिटिश साम्राज्याआधी प्रत्येक गावात ‘पंतोजींच्या शाळा’ होत्या. या ‘पंतोजींच्या शाळेत’ मूलभूत अंकज्ञान, मोडी आणि थोडंफार लिखाण शिकवलं जायचं. एवढं शिकलात म्हणजे तुम्ही शिक्षित झालात. तुमचं शिक्षण पूर्ण. सर्व शेतकऱ्यांना आकडेमोड आणि बालबोध लिखाण जमायचं. ब्रिटिश संसदेत जेव्हा भारतीय शिक्षणाबद्दल चर्चा झाली तेव्हा असं सांगितलं गेलं की भारतीय नागरिक ब्रिटिश नागरिकांपेक्षा आर्थिक दृष्ट्या अधिक साक्षर आहे .अगदी सामान्य शेतकऱ्याला कोणत्याही ब्रिटिश नागरिकापेक्षा अधिक वेगाने अंकगणित आणि दैनंदिन जीवनाकरता आवश्यक व्यावसायिक ज्ञान आहे. याचं मुख्य कारण प्रत्येक गावात शेकडो वर्षांपासून असलेल्या पंतोजीच्या शाळा आणि त्यातील जीवनाकरता आवश्यक असं शिकवलं  जाणारं अंक गणित आणि त्यानंतर प्रत्यक्ष व्यवसायाला सुरुवात होते.  शोकांतिका बघा, की ज्यामध्ये आपण उत्तम होतो त्यातच आज 2021 मध्ये आपण पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञानामध्ये मागे आहोत. इयत्ता पाचवीच्या 50% विद्यार्थ्यांना दुसरीचे अंकगणित येत नाही. असो.
पण या पंतोजीच्या ज्या शाळा होत्या त्या शाळा म्हणून आपण जी व्याख्या करतो त्यामध्ये ते सगळं येत नव्हतं. तशी व्यवस्था नव्हती. स्वतंत्र शाळेची इमारत नव्हती. बरीच वर्षं हे सर्व मंदिरांमध्ये किंवा शिक्षकांच्या घरी किंवा श्रीमंतांच्या घरी होत असे. शिक्षकांना त्या बदल्यात धान्य किंवा कपडे मिळायचे. त्यावेळी विशेष अभ्यासक्रमही आखलेला नव्हता, ना क्रमिक पाठ्यपुस्तकं होती. ब्रिटिशांना ही शिक्षणपद्धती अत्यंत अकार्यक्षम वाटली. शिक्षणक्षेत्रात ब्रिटिश प्रगत होते. पाश्चिमात्यांमध्ये विज्ञानशाखेचा बराच विकास झालेला होता. त्यांना इथली ही शिक्षणपद्धती निरुपयोगी वाटली. अर्थात, त्यात त्यांचा स्वार्थ सुद्धा होता. त्यांना त्यांच्या मोठमोठ्या उद्योगधंद्यांना, औद्योगिक वसाहतीत नोकर आणि कामगार हवे होते. शासन चालवण्यासाठी कारकून हवे होते. नोकर, कारकून, कामगार बनवणारी शिक्षणपद्धती रुजवण्यासाठी त्यांनी त्यांना हवी तशी शिक्षणपद्धती भारतात रुजवली. 

ब्रिटिश साम्राज्य 1818 ला पुण्याच्या शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकवून स्थापित झालं. म्हणून पुढे ब्रिटिश सरकारकडून नाशिक जिल्हा 1869 साली जाहीर झाला. पण नाशिकमध्ये पहिली प्राथमिक शाळा 1826 ला निर्माण केली गेली, ज्यामध्ये 167 मुलं शिकत होती. खरंतर ‘पंतोजी शाळा’ या विशिष्ट उच्च वर्गासाठी असल्यासारख्या होत्या. भारतीय व्यवस्थेत सुरुवातीला शिक्षण हे विशिष्ट उच्च वर्गासाठी मर्यादित होतं. ही मर्यादा नसती तर आज भारताची खूप प्रगती झाली असती; असो. पण इथे एक मुद्दा महत्त्वाचा, ब्रिटिशांनी त्यांच्या फायद्यासाठी नवीन शिक्षण सुरू केलं म्हणून किंबहूना त्यामुळे शिक्षणाचा हक्क सर्वसामान्य, तळागाळातल्या लोकांना मिळाला. त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचलं हेही तेवढंच खरं. ब्रिटिश आले आणि तेव्हा शाळा सुरू झाल्या. पण त्या शाळेतील शिक्षणाचा उद्देश फक्त सरकारी कारकून तयार करणं एवढाच होता आणि या उद्देशाचे परिणाम आपण आजही एकविसाव्या शतकात भोगतो आहोत.  'घोका आणि ओका' ही आपली शिक्षण पद्धती इथूनच निर्माण झाली. 

1840 मधला प्राथमिक शाळेतला अभ्यासक्रम बघितला तर त्यामध्ये मोडी, मूलभूत लिखाण, अंकगणित, बीजगणित, खगोलशास्त्र, निसर्गविज्ञान, भूगोल असे विषय होते. इतिहास म्हणजे हिंदुस्थानचा इतिहास आणि सोबत इंग्लंडचा गौरवशाली इतिहास यामध्ये प्रामुख्याने समाविष्ट होते. ज्यांना ब्रिटिशांकडे सरकारी नोकरी करायची होती त्यांच्यासाठी महसूल कायदे, दिवाणी आणि फौजदारी कायदे यांचाही अभ्यास होता. खरंतर ‘पंतोजी शाळा’ अतिशय व्यवस्थित चालू होत्या. नाशिकच्या बर्‍याच भागात त्या कार्यरत होत्या. सुरुवातीच्या या ब्रिटिशांच्या नवीन शाळेला लोकांनी प्रतिसाद दिला नाही याचं मुख्य कारण म्हणजे अतिरिक्त अभ्यासक्रम. अशा अभ्यासक्रमाची सवयच नव्हती. सरकारने दरमहा फी भरायला सांगितली. म्हणजे काही खर्च सरकार उचलेल, तर काही पालक. सुरुवातीचं सरकारी शिक्षण मोफत नव्हतं. पुढे महात्मा फुले, शाहू महाराज यांच्यामुळे शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं. सुरुवातीला हे ब्रिटिश सरकारी शिक्षण नाकारलं गेलं. म्हणजे 1879-80 मध्ये, नाशिकमध्ये सरकारी शाळा फक्त नऊ होत्या. त्या काळातील एकूण लोकसंख्येच्या 4.6 टक्के. या नऊ शाळांपैकी एक हायस्कूल; तर आठ व्हर्नाक्यूलर शाळा होत्या आणि आठ पैकी सात मुलांच्या आणि एक मुलींची शाळा होती. नाशिकमधली पहिली शाळा ‘प्राथमिक शाळा क्रमांक-1’ हिची स्थापना 1826 सालची. त्यावेळेला पटावरील मुलं होती 167 होती तर फी जमा होती 275 रुपये आणि सरकारी खर्च होता 405 रुपये. याचा अर्थ प्रत्येक विद्यार्थ्यांमागे सरासरी खर्च होता पाच रुपये सात आणे आणि नऊ पैसे. 
सध्या नाशिक महानगरपालिका अंतर्गत महानगरपालिकेच्या एकूण प्राथमिक 89 तर माध्यमिक 13 शाळा आहेत आणि त्यांचे बजेट आहे 126 करोड. सरकारी शाळेतील एका विद्यार्थ्यावर किमान 65 हजार रुपये खर्च करत आहे. जो पूर्ण पैसा सरकारचा किंबहुना टॅक्स पेअर चा आहे. 

त्यानंतर ‘शाळा क्रमांक दोन’ सुरू झाली. 1862-63 मध्ये. तिचं नाव होतं ‘पंचवटी शाळा’. ही ‘पंचवटी एज्युकेशन संस्था’ नव्हे. त्यामध्ये विद्यार्थी शिकत होते फक्त 94, फी जमा होती रुपये 91. त्याच दरम्यान इंग्रजीचा पगडा वाढत होता; म्हणून इंग्रजी शिक्षणासाठी चौथी पास होणं आवश्यक होतं. असा नियम केल्यावर प्राथमिक शाळेतली गर्दी वाढली. 1865-66 मध्ये अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आला आणि त्यातल्या विषयांची गर्दी कमी करण्यात आली. साधारण 1870 मध्ये सामान्य विद्यार्थ्यांना पेलवेल असा अभ्यासक्रम तयार केला गेला. बरेच विषय काढून टाकण्यात आले. 

पुढे ब्रिटिशांनी शाळा वाढवल्या. त्यामुळे 1881 मध्ये एकूण शाळा अकरा झाल्या. त्यावेळेस नाशिकची लोकसंख्या होती 24101. तर या सर्व शाळेत मिळून विद्यार्थ्यांची संख्या होती 1344. एकूण लोकसंख्येच्या 5.6 टक्के. ब्रिटिश सरकारचा नियम होता प्रत्येकी हजार लोकसंख्येला एक नवीन शाळा उघडायची. त्यानुसार किमान पंधरा ते वीस शाळांची गरज होती. पण अपेक्षित विद्यार्थी सरकारी शाळेत आले नाहीत. याचं मुख्य कारण फी आणि मिशनरी स्कूल. या मिशनरी स्कूलला सरकारी ग्रँट होती. 1879-80 मध्ये ज्या 9 सरकारी शाळा होत्या,त्यातल्या तीन खाजगी होत्या. ज्या चर्च मिशनरी सोसायटी चालवायच्या. 

खरंतर जसं ब्रिटिश साम्राज्य आलं त्यामागोमाग ख्रिस्ती मिशनऱ्यांचा प्रवेश झाला. नाशिकला 1822 मध्ये हे मिशनरी आले. त्यांनी शरणपूर इथे चर्च मिशन स्थापन केलं. ख्रिस्ताला शरण जाणं यावरून ‘शरणपूर’ हे नाव पडलं. त्यावेळेस नाशिक हे फक्त मेन रोडपर्यंत होतं, बाकी सर्व जंगल. कॅनडा कॉर्नर जिथे आता बी.एस.एन.एल.चं ऑफिस आहे, ते सर्व दाट जंगल होतं. तिथे कॅनडाचे मिशनरी हॉस्पिटल चालवायचे म्हणून त्याला ‘कॅनडा कॉर्नर’ म्हणतात. रेव्हरंड जॉर्ज डिक्सन यांनी मराठी भाषा शिकून शरणपूर इथे शाळा, दवाखाने बांधले. त्यांनी उपेक्षित आणि पीडित लोकांमध्ये आरोग्य आणि शिक्षणाविषयी जनजागृती केली. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मराठीमधून काही ग्रंथनिर्मितीही केली. या मिशनर्‍यांनी नाशिक शहरातील शिक्षणक्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी केली आहे. 

१८४० साली "सार्वजनिक वाचनालय" सुरू झाले. सुरुवातीला ते सरकार वाड्याच्या मागील भागात होते. याचा उद्देश ब्रिटिश सरकारी अधिकारी यांच्या वाचण्यासाठी होता.. पण पुढे विविध चळवळी होत नाशिकचं सांस्कृतिक केंद्र बनले. 

पूर्वी माध्यमिक शाळा नव्हती. इंग्रजी भाषेचं शिक्षण शरणपूरमधील प्राथमिक शाळेत होत होतं. 1861 मध्ये ‘ऍन्ग्लो व्हर्नाक्यूलर स्कूल’ या नावाची पहिली माध्यमिक शाळा सुरू झाली. नंतरच्या काळात म्हणजे 1871 मध्ये त्याचं रूपांतर ‘नाशिक हायस्कूल’ या माध्यमिक शाळेत झालं. पुढे नाशिक हायस्कूलमधले विद्यार्थी ‘मुंबई विद्यापीठा’च्या मॅट्रिकच्या परीक्षेला पाठवण्यात येऊ लागले. ‘नाशिक हायस्कूल’चा इतिहास हा नेहमी उज्ज्वल राहिला होता. या शाळेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर शिकले. तसेच भारताचे सरन्यायाधीश श्री.प्रल्हाद बाळाचार्य गजेंद्रगडकर शिकले. पण पुढे ही शाळा बंद झाली. 

1883-84 ला नाशिक नगरपालिकेकडून ‘उर्दू नॅशनल हायस्कूल’ सुरू झालं. पुढे यामध्ये इंग्रजी शिक्षण चालू झालं. ते मग बंद पडलं आणि 1928-29 ला फक्त उर्दू स्कूल राहिलं. 

त्या काळातील सर्व शाळांमध्ये इंग्रजांचं कौतुक करणार्‍या कविता असायच्या, वंदे मातरम म्हणण्यावर बंदी होती पण पुढे अठराव्या शतकाच्या अंताला ब्रिटिश साम्राज्याचा शाळांवरील पगडा कमी होत गेला. खाजगी शाळांना परवानगी मिळाली. तसंच, अनेक दानशूर व्यक्ती, समाजसुधारक, शिक्षणप्रेमी यांनी सर्वसामान्यांसाठी शाळा सुरू करण्यास सुरुवात केली. एकोणिसाव्या शतकाची सुरुवात ही नाशिकच्या शिक्षणाचा ‘टर्निंग पॉइंट’ ठरली. 

सर्व जाती धर्माच्या लोकांनी आपआपल्या जातीकरिता मोफत वसतीगृह 1890 नंतर स्थापन करायला सुरुवात झाली. ही सगळी माणसं समाजाकरता वाहून घेणारी होती. मुलांनी कपड्यानिशी यावं आणि यांनी त्यांचं संपूर्ण शिक्षण, होस्टेल, भोजन याची जबाबदारी घ्यावी. त्यातून ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झाला. त्याकाळी वसतीगृहाचे समाजसेवक ग्रामीण भागात फिरत आणि होतकरू, चुणचुणीत मुलांना शहरात घेऊन येत, त्यांच्या शिक्षणाची सोय करत, त्याबदल्यात गावकऱ्यांकडून मोफत धान्य आणि इतर चीजवस्तू मिळत. यातून मुलं शिकली, शहरात स्थिर झाली, त्यांनी आपल्या भावंडांना शिक्षणाकरताआणलं आणि समाजात नवीन प्रवाहाला सुरुवात झाली. 

अठराव्या शतकाच्या अखेरीस महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचे विचार रुजत चालले होते. मुलींची शाळा मागणी धरू लागली होती. ‘चर्च मिशन स्कूल’ तर्फे शरणपूरमध्ये मुलींची शाळा सुरू झाली. पण ती 1906 मध्ये बंद झाली. 

1918 साली ‘नाशिक शिक्षण प्रसारक मंडळा’ची स्थापना झाली. नाशिक येथील काही उत्साही तरुणांनी राष्ट्रीय विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजावेत आणि अतिशय अल्प खर्चात सामान्य जनतेला दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून 1 मे 1918 रोजी  या संस्थेची स्थापना केली. श्री.शंकरराव कर्डिले यांच्या वाड्यात ‘न्यू इंग्लिश स्कूल’ या नावाने शाळा सुरू झाली. तसं पाहिलं तर नाशिक मधील पहिली भारतीय शाळेचा मान या स्कूल ला द्यावा लागेल. याचे संस्थापक शि. रा. कळवणकर आणि त्यांचे सहकारी श्री. शि.अ. अध्यपाक, श्री.र.का.यार्दी, श्री.वा.वी पारशारे, श्री.ल.पा.सोमण हे. पुढे 1943 साली या शाळेचं नामकरण ‘रुंगठा हायस्कूल’ असं झालं. उत्तम क्रिकेटपटू बापू नाडकर्णी या शाळेचे माजी विद्यार्थी. नाशिकमध्ये या संस्थेने शिक्षणासाठी बरेच कष्ट घेतले आणि बरंच कार्य केलं. 1943 साली त्यानी रात्रीच्या शाळा सुरू केल्या. 1946 ला 'पुष्पावती कन्या विद्यालय' ही मुलींची शाळा काढली. 

महात्मा फुले, राजर्षीशाहू महाराज यांच्या प्रेरणेने नाशिकला विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह चालू करावं या उद्देशाने 1914 साली 'मराठा विद्या प्रसारक’ची स्थापना झाली. सुरुवातीला ‘उदोजी बोर्डिंग’ चालू झालं. 1936 साली ‘मराठा हायस्कूल’ सुरू झालं. पुढे शिक्षकांसाठी पहिलं बी.एड. कॉलेज सुद्धा चालू केलं. नाशिक जिल्ह्यात खेड्यातील मुलांसाठी शिक्षण पोहोचवण्याचा पहिला मान हा एम.व्ही.पी संस्थेकडे जातो. रावसाहेब थोरात, भाऊसाहेब हिरे, अण्णासाहेब मुरकुटे, आबासाहेब सोनवणे यांनी संस्था नावलौकिकास आणली. नाशिकमध्ये शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम ही संस्था आजतागायत करते आहे.
त्या काळात राजर्षी शाहू महाराजांनी स्किल बेस एज्युकेशनचं महत्त्व सांगितलं आणि रावसाहेब थोरात यांना ते  पटलं आणि त्यांनी त्यावेळेस स्किल बेस एज्युकेशनच्या शाळा सुरू करण्याचं ठरवलं. 

1913-14 ला ‘सेंट जॉर्ज स्कूल’ ही शाळा सुरू केली. पण हवे तसे विद्यार्थी या शाळेला मिळाले नाहीत. म्हणजे 1913-14 साली 104 विद्यार्थी होते. तर जेव्हा 1921-22 ला ही शाळा बंद पडली तेव्हा 134 विद्यार्थी होते. 

एका वर्षानंतर  1 एप्रिल 1923 ला ‘नाशिक एज्युकेशन सोसायटी’ ची स्थापना झाली. श्री रावसाहेब गुप्ते, श्री.जोशी, श्री.विंचुरकर श्री. तात्यासाहेब अभ्यंकर यांनी ही सेंट जॉर्ज स्कूल पुन्हा चालू केली. त्यावेळेस याचे पहिले मुख्याध्यापक होते श्री. गोडबोले. पुढे ही शाळा शिक्षणक्षेत्रात मैलाचा दगड ठरली. या शाळेला मुंबईचे दानशूर श्री.पेठे बंधू यांनी रुपये 20,001 देणगी दिली आणि शाळेचं नामकरण ‘पेठे हायस्कूल’ असं करण्यात आलं. तेव्हाचे वीस हजार म्हणजे आजचे किमान अकरा कोटी रुपये. 1946 ला राजेबहाद्दर वाड्यात नाशिक एज्युकेशन सोसायटीची शारदा मंदिर या नावाने फक्त मुलींची इंग्रजी माध्यमाची शाळा  सुरू झाली. पुढे या संस्थेने बऱ्याच शाळा सुरू केल्या. शारदा मंदिरला श्री.सारडा यांनी देणगी दिली म्हणून पुढे याचं नाव 'मातोश्री सारडा कन्या शाळा' झालं. 

1914 ला शाहू महाराज नाशिकला आले होते. त्यांनी रविवार कारंजावर मिटिंग घेतली आणि आवाहन केलं की ज्यांना शक्य होईल त्यांनी शिक्षणासाठी राहते वाडे मोकळे करून द्यावेत. या आवाहनाला प्रतिसाद मिळाला. बरेच वाडे सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी दिले गेले. श्री.टकले यांचा वाडा ग्रामीण मुलांसाठी देण्यात आला. 

पुढे 1920 मध्ये मराठा शिक्षण परिषदेकरता शाहू महाराज नाशिकला आले असता 15 एप्रिल 1920 ला वसतीगृहाची पायाभरणी त्यांनी केली. शाहू महाराजांनी संस्थेस देणगी दिल्याने त्या ठिकाणी शाहू छत्रपती बोर्ड निर्माण झालं. त्यावेळेस शाहू महाराजांनी तीन वसतीगृहांचं भूमिपूजन केलं.. वंजारी बोर्डिंग, मराठा बोर्डिंग आणि शाहू बोर्डिंग. 

मराठा विद्या प्रसारक समाजाचे सर्वश्री मुरकुटे, भाऊसाहेब हिरे, रावबहादूर वंडेकर, राजे धैर्यशील पवार, विठ्ठलराव गाढवे, काकासाहेब वाघ यांच्या अथक प्रयत्नातून या परिसरात शिक्षण सुरू झालं. वंजारी समाजासाठी वंजारी बोर्डिंगसाठी राजर्षी शाहू महाराजांनी सहकार्य केलं. त्यावेळेस श्री. दत्तू जायभावे, श्री. धात्रक श्री. सांगळे दाजी यांनी या बोर्डिंग उभी करण्यात मदत केली. उपेक्षित आणि सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण ही सुरुवात होती. 

‘नाशिक हायस्कूल’ बंद झाल्यावर श्री.राजेबहाद्दर यांच्या वाड्यामध्ये शाळा भरत होती. त्यांची सी.बी.एस.ची जागा सरकारी शाळेसाठी मागण्यात आली. स्त्री शिक्षणाचे महत्व समाजात रूजू होत होते म्हणून त्यांनी मुख्य अट घातली की जर शाळा फक्त मुलींसाठी असेल तर मी जागा देतो. त्यानुसार 1921 साली ‘गव्हर्मेंट गर्ल्स हायस्कूल’ची निर्मिती झाली. नाशिक हायस्कूल मधूनच गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल इमारत उभी राहिली. प्र.के. अत्रे यांच्या पत्नी या ‘गव्हर्नमेंट गर्ल स्कूल’च्या एकेकाळी मुख्याध्यापिका होत्या. या गव्हर्मेंट गर्ल हायस्कूल ला नेहमीच खूप छान मुख्याध्यापिका लाभल्या. त्यातील एक श्रीमती सीताबाई भागवत. ( साहित्यिक दुर्गा भागवत च्या आत्या) या सीताबाई भागवत देशप्रेमी, गांधीवादी होत्या. त्या वेळेस नुकतेच गर्ल स्काऊट ही संस्था सुरू होऊन शाळेमध्ये स्काऊट संकल्पना चालू झाली होती. त्या स्काऊटचे प्रशिक्षण साठी या मुख्याध्यापिकांना  जावे लागले. ट्रेनिंग घेऊन आल्यावर शाळेमध्ये स्काऊट सुरू करायचे होते. पण एक वर्ष होऊन सुद्धा सीताबाई भागवत यांनी स्काऊट उपक्रम गव्हर्मेंट गर्ल हायस्कूल ला सुरू नाही केला. तेव्हा इन्स्पेक्टरने रागात मुख्याध्यापकांना विचारले की, "अजून का स्काऊट मुलींना सुरू केले नाही?", तेव्हा सीताबाई या इन्स्पेक्टरला म्हणाल्या की, "यामध्ये एक शपथ घ्यायची आहे, जी मी घेणार नाही ना माझ्या मुलींना घेऊ देईल," इन्स्पेक्टर ने विचारले, "कुठली?" तेव्हा या म्हणाल्या, "मी माझ्या राजाची व देशाची इमानी राहील." त्या म्हणाल्या, "मी माझ्या देशाची इमानी राहिला पण ब्रिटिश राजांशी कसे?", "दोघांपैकी एकाच बरोबर मी एकनिष्ठ राहील, मी आणि माझी मुली हिंदुस्तानशी एकनिष्ठ राहणार आहे", हे उत्तर ऐकल्यावर इन्स्पेक्टरने भडकले व पुढे सीताबाई यांच्या नोकरी सेवेतील प्रमोशन थांबले. स्त्री शिक्षणास वाहून घेतलेल्या, नावाजलेल्या,अशा  "गव्हर्नमेंट गर्ल्स स्कूल" ह्या शाळेचा लौकिक पुढे अनेक वर्षे टिकून ठेवण्यात  मुख्याध्यापिका आशाताई राजदेरकर यांचे फार मोठे योगदान होते. 

नासिक मधील ब्रिटिश कालीन काही वास्तू नासिकची शान वाढवणा-या आहेत.
कोर्टाची दगडी इमारत, त्यास लागूनच कचेरी म्हणजे कलेक्टर ऑफिसची दगडी इमारत. आणि त्यांच्या समोर सरकारी मुलींची शाळा.
करड्या रंगाचे दगडी चिरे वापरून बांधलेल्या ह्या व्हिक्टोरियन स्टाईल वास्तू आज 150 वर्षानंतर सुध्दा लोकांचे लक्ष वेधून घेतात. 

याच दरम्यान 1923-24 मध्ये ‘बोर्डिंग स्कूल’ सुरू झालं. हे नाशिकमधलं पहिलं बोर्डींग स्कूल होतं ‘बॉईज टाऊन’. भारताचे भूतपूर्व क्रिकेट कप्तान नुरी कॉन्ट्रॅक्टर याच शाळेत शिकले. बॉईज टाऊन हे नाव सन 1940 ला दिलं. त्या आधी न्यू पारसी बोर्डिंग स्कूल म्हणून ते प्रसिद्ध होतं. याचे संस्थापक होते श्री.पावरा. 

बार्न्स स्कूलची स्थापना 29 जानेवारी 1925 रोजी आर्क-डिकॉन जॉर्ज बार्न्स यांच्या स्मरणार्थ करण्यात आली. ज्यांनी 1815 मध्ये बॉम्बे एज्युकेशन सोसायटी सुरू केली होती. त्या काळात बार्न्स स्कूलची स्थापना प्रामुख्याने अँग्लो-इंडियन मुले आणि मुलींसाठी केली गेली.. जिथे त्यांना चांगले संगोपन आणि योग्य शिक्षण घेता येईल. मुंबईतील क्राइस्ट चर्च सोबत ही शाळा संलग्न आहे. स्थानिक भारतीयांना तिथे प्रवेश नव्हता पण स्वातंत्र्यनंतर ही सर्वांसाठी खुली केली पुढे तर यामध्ये बॉलीवूड सिनेसृष्टीतील कलाकारांचे चे मुलं शिकायला होते. दिलीप कुमार, विनोद खन्ना याच शाळेचे विद्यार्थी. त्याचबरोबर एअर मार्शल अनिल टिपणीस, चीफ ऑफ नेव्ही करंबिर सिंग सुद्धा याच शाळेचे विद्यार्थी. 

नाशिकच्या बहुजन समाजाच्या जीवनात 1925 साल अतिशय महत्त्वाचं होतं. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नेतृत्वामुळे बहुजन समाजामध्ये प्रेरणा निर्माण झाली आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाद्वारे नवं सामर्थ्य मिळालं. याचा परिणाम शिक्षणक्षेत्रावर छान झाला. 

पुढे 1933-34 ला सरकारी कन्या शाळेव्यतिरिक्त ‘सेवासदन’ ही मुलींची शाळा सुरू झाली. ही पहिली खाजगी मुलींची शाळा. 1933-34 ला फक्त 56 मुली त्यात शिकत होत्या. पुढे ही शाळा पुण्यातल्या कन्या पुढे ही शाळा पुण्यातल्या कन्याशाळेत समाविष्ट झाली. 

नाशिक जिल्हा दलित शिक्षण प्रसारक मंडळातर्फे 1932-33 साली मनमाड येथे वसतिगृह बांधले गेले आणि याच संस्थेने 1947 साली रमाबाई आंबेडकर वस्तीगृह याची निर्मिती केली. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी याचा पुढाकार घेतला होता. त्यावेळेस बांधताना निधीची कमतरता होती त्यावेळेस त्यांच्या पत्नीने सोन्याच्या बांगड्या देऊन हे वसतिगृह पूर्ण केले. या वसतिगृहाचे उद्घाटन खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते. 

दरम्यान, विद्यार्थ्यांना शालेय जीवनात शारीरिक आणि लष्करी शिक्षण आवश्यक आहे या विचाराने डॉ. मुंजे यांनी 1938 साली ‘भोसला मिलिटरी स्कूल’ चालू केलं. डॉक्टर मुंजे यांनी सरकारकडे जागा मिळावी म्हणून अर्ज केला. जागा मिळायला उशीर होत होता. त्यावेळी नाशिकचा कलेक्टर चा नवीन बंगला बांधून झाला होता म्हणून जुना बंगला रिकामा पडला होता. या बंगल्याची मालकी ही श्री बाळासाहेब वैशंपायन यांच्याकडे होती. बाळासाहेबांनी त्यांचा बंगला 1935 ला डॉ. मुंजे यांना शाळेसाठी वापरायला दिला. 1937 ला विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे शाळा बाळासाहेब वैशंपायन यांच्या बंगल्यातून सुरगाणा चे महाराज पवार यांच्या वास्तूत गेली. पुढे डॉ. मुंजे यांना जागा मिळाली. त्यासाठी त्यांनी आनंदवली येथे प्रथम 90 एकर आणि पुढे 35 एकर जमीन विकत घेतली. 1937 मध्ये रामनवमीच्या शुभमुहूर्तावर भूमिपूजन झाले आणि शिवराज्याभिषेकाच्या शुभमुहूर्तावर दिनांक 15 जूनला लष्करी विद्यालय चे उद्घाटन झाले. हिंदुस्तान मधली ही पहिली लष्करी शाळा. या संस्थेचा भूमीला त्यांनी नाव दिले "रामभूमी" आणि विद्यार्थ्यांना नाव दिले "रामदंडी" व विद्यालयाला नाव दिले भोसला लष्करी विद्यालय.. राजे शिवछत्रपतींचे नाव. डॉ. मुंजे त्या काळात वयस्कर होते पण बरेच जण म्हणतात त्यांचा काम करण्याचा झपाटा हा एखाद्या सोळा वर्षाच्या तरुणाला लाजवेल असा होता. अतिशय उत्साहाने त्यांनी ही शाळा सुरू केली. या शाळेतील विद्यार्थी भारतीय लष्करात उच्च पदावर पोचले आहे. जसे लेफ्टनंट जनरल डॉ. एम. एल शिवार, लेफ्टनंट जनरल सरदेसाई, एअर मार्शल अजित भोसले, डॉक्टर श्रीकांत जिचकर.. 

पुढे 1940 साली श्री रा.ह. सावंत.पानसे,  पिंगळे, बर्वे, वैशंपायन, शुक्ल यांच्या पुढाकाराने ‘न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट’ची स्थापना झाली. ‘न्यू हायस्कूल’ ही माध्यमिक शाळा त्याच वर्षी ला सुरू झाली. त्यावेळेस विद्यार्थी होते 480. सुरुवातीला शाळेचं वसतीगृह होतं पण नंतर युद्धजन्य परिस्थितीमुळे हे वसतीगृह बंद करण्यात आलं. महात्मा गांधी रोडवर 'सरस्वती विद्यालय' ही त्यांची शाळा 1940 साली स्थापन झाली. 

1933 साली गुजराथी समाजाने ' श्री. पंचवटी एज्युकेशन सोसायटी' ची स्थापना केली.. सुरुवातीला या संस्थे ची शाळा सीतागुंफा शेजारी भरायची, मग पांजरपोळ येथे स्थलांतरित झाली. याचा मुख्य उद्देश गुजराती माध्यमातून शिक्षण देणे हा होता.  शेठ जीवनलाल मोतीचंद, श्री. नानालाल जोशी, श्री. कोठारी, श्री. हरीलाल देसाई, श्री. पटेल असे बऱ्याच जणांनी या संस्थे साठी पुढाकार घेतला.
1945-46 ला साधारण 175 विद्यार्थी होते. 

नाशिक जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर,पेठ, सुरगाणा, कळवण या आदिवासी तालुक्यांमध्ये भाऊसाहेब हिरे तसंच डांग सेवा मंडळ यांनी शेकडोंनी शाळा सुरू केल्या. त्यामुळे तो समाज हळूहळू शिक्षणाकडे वळला आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झाला. 1941 साली कर्मवीर दादासाहेब बिडकर यांनी डांग सेवा मंडळाची स्थापना केली. 

पुढे १ जून १९४५ रोजी आदिवासी सेवा समिती या संस्थेची स्थापना थोर सहकार महर्षी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी केली. सामाजिक आणि सेवाभावी दृष्टीने शैक्षणिकक्षॆत्रात आदिवासी सेवा समिती, संस्थेचे अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आहे. आदिवासी सेवा समिती, नाशिकच्या आजूबाजूच्या ज्या-ज्या भागात आपलं कार्य सुरू करायचं त्या-त्या भागात शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्यांकडे अधिक लक्ष देऊन त्यांचा विकास व्हायचा. त्यासाठी श्री. भाऊसाहेब हिरे यांनी प्रचंड मेहनत घेतली. 

पुढे फ्रान्सिसके सिस्टर यांनी 1946 साली फिलोमिना स्कूल नाशिक रोडला सुरू केली. 

नाशिक जिल्हा म्हणून जाहीर झाला तेव्हा साधारण 20 ते 25 हजार लोकसंख्या होती. आज ती लोकसंख्या 30 ते  40 लाखांच्या घरात आहे. नाशिक हे औद्योगिक शहर म्हणून नावाजलं. मंत्रभूमी ते तंत्र भूमीचा हा प्रवास शक्य झाला तो शिक्षणामुळे. सरकारी, निमसरकारी, मुख्य म्हणजे खाजगी संस्थेने शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवली. शिक्षणामुळे आजूबाजूच्या गावांमधून नाशिक शहरांमध्ये स्थलांतरं झाली. प्रत्येक गावातील घरांमधून एक तरी मुलगा मुलगी उच्च शिक्षणाकडे वळली.  हे शक्य झालं नाशिकमध्ये 1947 आधी ज्या खाजगी संस्थेने मेहनत घेतली त्या सर्व समाजसुधारकांमुळे. 

15 ऑगस्ट 1947 ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा नाशिक जिल्हाचं वय 78 होतं. स्वातंत्र्यानंतर या 75 वर्षात आजच्या घडीला नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा संख्या 3362 तर माध्यमिक संख्या 2 आहे. नाशिक शहरातील महानगरपालिका प्राथमिक शाळा संख्या 89 तर माध्यमिक 13 आहे. तर खाजगी अनुदानित शाळा संख्या 578 तर खाजगी विना अनुदानित शाळा संख्या 606 आहे. थोडक्यात सरकारी शाळा 3366 तर खाजगी शाळा 1064 आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण शाळा 4550 आहे. आज नाशिकची लोकसंख्या 61 लाख झाली. ब्रिटिशांनी जो शाळा परवानगी नियम लावला त्या नुसार प्रत्येकी 1000 लोकसंख्या वस्ती मागे एक शाळा उघडणे गरजेचे आहे. त्यानुसार अजूनही आपल्याला 1550 शाळा कमी पडत आहेत आणि खास करून माध्यमिक शाळा या फारच कमी आहेत. आठवी नंतर शाळा सोडण्याचे प्रमाण खूप आहे कारण की अजूनही गावांमध्ये सरकारी माध्यमिक शाळा हव्या तेवढ्या नाही. 

स्वातंत्र्यानंतर म्हणजेच 1947 नंतर नाशिकच्या प्राथमिक शिक्षणाच्या प्रगतीचा आढावा घेणारा लेख लवकर घेऊ. बरेच उत्तम दर्जाच्या शैक्षणिक संस्थांची निर्मिती झाली. साखर शाळेपासून तर विविध प्रयोगशील शाळा पर्यंतचा प्रवास हा सुद्धा खूप रंजक आहे.  1947 नंतरच्या नाशिक जिल्ह्यातील शाळेचा प्रवास हा पुढे कधीतरी समजून घेऊ. 
आता एवढंच सांगता येईल, 
समाजामधील दानशूर व्यक्ती, समाजसुधारक यांच्यामुळे नाशिकमध्ये शिक्षणाची गंगा वाहू लागली. ब्रिटिशांच्या विचारांनी मलीन झालेलीही शिक्षण गंगा आता स्वच्छ करण्याची वेळ आलेली आहे. भारताच्या 75 वर्षाच्या इतिहासात अजूनही थोड्याफार प्रमाणात ब्रिटिशांच्या शिक्षणपद्धतीची पकड दिसते. नवीन शैक्षणिक धोरण हे भारतीय जीवनमान, भारतीय विचार, भारतीय विद्यार्थी डोळ्यासमोर घेऊन आखलेलं आहे. या नवीन शैक्षणिक धोरणातून आपण एकविसाव्या शतकातील शिक्षणाकडे वाटचाल नक्कीच करू. 

स्वातंत्रपूर्व काळात नाशिकमध्ये ज्या ज्या व्यक्तींनी शिक्षणासाठी मेहनत घेतली त्या सर्व महान व्यक्तींना नाशिककरांकडून सलाम. 

(लेख नावासहित फॉरवर्ड करा )

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक

ओपन-बुक परीक्षा

ओपन-बुक परीक्षा: कालसुसंगत पाऊल महाराष्ट्र टाईम्स मधील प्रकाशित झालेला ओपन बुक परीक्षा म्हणजे नक्की काय? यावर शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास ...