Friday 30 August 2019

२१ व्या शतकातील स्किल..


सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख.


आता आपण एकविसाव्या शतकात आहोत प्रत्येक शतका मध्ये त्यांचे स्वतःचे असे उद्दिष्ट असतात... समाजा समोर नवीन आव्हाने असतात.. त्या शतकाच्या आव्हानांना पूर्ण करण्याचा काम शिक्षणाचे असते. त्या शतकातील आव्हानांना पूर्ण करण्यासाठी ज्या स्किल ची आवश्यकता असते ते स्किल येणाऱ्या नवी पिढी मध्ये निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षणाची असते.

आता प्रश्न हा आहे की २१ व्या शतकात सामोरे जाण्यासाठी या नवीन पिढीकडे कुठले कौशल्य असणे आवश्यक आहे? ज्याला आपण एकविसाव्या शतकातील कौशल्य म्हणू आणि ते कौशल्य निर्माण करण्याचा आशय त्या शिक्षणात आहे का? तसेच आपल्या पालकत्वाचा आहे का? ते पाहू..

या एकविसाव्या शतकामध्ये सर्वात महत्त्वाचे कौशल्य लागेल ते "प्रॉब्लेम सॉलव्हिंग स्किल्स".. समस्या निवारण याची कला. खरंतर शिक्षणाचे उद्दिष्टच मुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रॉब्लेम सॉलव्हिंग एटीट्यूड निर्माण होणे हा असला पाहिजे. या प्रॉब्लेम सॉलव्हिंग स्किल्स मध्ये सर्वात आवश्यक म्हणजे विविध माहितीचे पृथक्करण करणे.. व त्याच्या आधारावर समस्या सोडवता येणे.

दुसरे कौशल्य लागेल ते "निर्णय घेण्याची क्षमता." येणाऱ्या पिढीसमोर सातत्याने नव नवीन आव्हाने असणार आहेत. त्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी योग्य निर्णय कसा घेतला पाहिजे याचे प्रशिक्षण येणाऱ्या पिढीला मिळणे आवश्यक आहे. निर्णय क्षमता विकसित होण्यासाठी लहानपणापासून निर्णय घेण्याची सवय असणे.. उपलब्ध पर्यायांमधून योग्य पर्याय निवडता येणे.. या गोष्टींचा यात समावेश होतो.

तिसरे स्किल लागणार आहेत ते म्हणजे "संवाद साधण्याची कला". या मध्ये उत्तम पद्धतीने आपल्या भावना मांडता येणे त्याचबरोबर दुसर्‍याच्या भावना समजून घेऊन योग्य पद्धतीने आपली बाजू मांडता येणे आवश्यक आहे. यामध्ये सभाधीटपणा हा गुण अत्यंत गरजेचा असेल. एका सर्व्हेनुसार ज्या व्यक्तीला ७५ ते १०० लोकांना हाताळता येईल व त्यांना नेतृत्व करता येईल त्याला/तिला चांगल्या पगाराची नोकरी लागेल. शंभर लोकांना हाताळणे हे १९ व्या आणि २० व्या शतकात बऱ्याच जणांना शक्य होते. हे स्किल शिकण्यासारखे होते कारण की एकत्र कुटुंब पद्धतीचा संस्काराचा फायदा होत होता पण आता माणूस इतका आत्मकेंद्रित आणि भावना शून्य होत चालला आहे की ज्या व्यक्तींना दुसऱ्यांच्या भावना समजून हाताळता येतील त्याला कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराची नोकरी लागेल.

एकविसाव्या शतकात माणसं कंपनीमध्ये काम करतील पण त्या माणसांना मन असेलच असे नाही. यासाठी संवाद कौशल्य आणि सोबत स्वतःच्या आणि दुसर्‍यांच्या भावनांची हाताळणे आवश्यक आहे. या संवाद कौशल्याची नवीन भाषा म्हणजे सोशल मीडिया हाताळणं तसेच प्रेझेंटेशन स्किल, उत्तम भाषण करता येणे, समोरच्याचे ऐकणे व समजून घेणे, न दुखवता वाटाघाटी करता येणे यासारख्या अनेक गुणांचा समावेश होतो

पुढचे एकविसाव्या शतकातील स्किल असेल ते म्हणजे, 'एकत्र काम करण्याची सवय"..
आज-काल पालकांना एकुलता एक मुलगा असल्याने त्याला शेअरिंग ची सवय नसते. त्यातून येणारा समाज स्वतःपुरता विचार करणारा बनतो आहे. या पिढीमध्ये एकत्रित काम करणे, टीम मध्ये काम करणे.. यासारखे संस्कार नाही. शाळेत सुद्धा मुलं वैयक्तिक खेळ निवडतात. जसे बॅडमिंटन, स्विमिंग इत्यादी.. यश कधी ऐकट्याने मिळत नसते. ते सर्वांना साथ घेऊनच प्राप्त होते. म्हणूनच एकविसाव्या शतकामध्ये टीम बिल्डींग आणि टीम वर्क हे महत्त्वाचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे.

पूर्वी एकत्र कुटुंब म्हणजे आई-वडील, काका-काकू, आजी-आजोबा असे दहा पंधरा लोकांचे कुटुंब असायचे.. वीस वर्ष आधी एकत्र कुटुंब म्हणजे आजी-आजोबा आणि आई-वडील व त्यांचे मुलं इतके झाले.. आता एकत्र कुटुंब म्हणजे पती-पत्नी व त्यांचा मुलगा एकत्र राहतो त्याला एकत्र कुटुंब म्हणतात.. आणि पुढील तीस ते पन्नास वर्षात नवरा हा बायको कडे किंवा बायको जी नवऱ्या कडे महिन्यातील पंधरा दिवस एकत्र राहते त्या फॅमिली ला जॉइंट फॅमिली आहे असं संबोधलं जाईल.

अशा वेळेस ज्या तरुण-तरुणींना एकत्र राहण्याची सवय असेल त्यांचा विकास होईल. यात टीम बिल्डिंग स्किल, सहकार्य भावना, दुसऱ्यांचा आदर करणे, एकमेकांना समजून घेऊन यश मिळवणे, दुसऱ्याला मदत करणे, नेतृत्व करणे.. अशा सर्व गोष्टी यांचा समावेश आहे.

पुढचे स्किल आहे "नवनवीन विचार आयडिया सुचणे" व त्या आयडीया प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारी जिद्द. येणाऱ्या काही वर्षांत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच कुत्रीम बुद्धिमत्ता यांचे वर्चस्व जास्त असणार आहे. त्यामुळे त्याला नवनवीन संकल्पना सुचतील त्याला या कुत्रीम बुद्धिमत्तेचा विश्वात जास्त स्थान असेल. या नवनवीन आयडिया मध्ये सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि सर्वात महत्त्वाचे नवीन आयडिया डिझाइन करता येणे हे समाविष्ट असणार आहे.

पुढचं कौशल २१ व्या शतकात आवश्यक आहे ते "पर्यावरण संवेदनशीलता". पर्यावरणाबाबत संवेदनशीलता आणि या पृथ्वीवरील पर्यावरण समतोल साधण्यासाठी जे जे वैयक्तिक पातळीवर शक्य आहे ते सर्व येणाऱ्या पिढीला शिकावे लागेल. पाण्याचा योग्य वापर, कचराचे व्यवस्थापन, ऊर्जेचा योग्य वापर.. या सर्व गोष्टी संस्काराचा एक भाग बनणार आहे.

आता या एकविसाव्या शतकातील स्किल येणाऱ्या पिढीकडे तेव्हा येतील जेव्हा याचा आशय आपल्या शिक्षणात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या पालकत्व मध्ये असेल तेव्हा..

सचिन विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


No comments:

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...