Wednesday 11 September 2019

पाणी संस्कार

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. सर्वांना, सर्व जागी, सर्वांच्या हातून, समानतेसाठी "पाणी" पिण्याचा मूलभूत हक्क मिळण्यासाठी हा लढा होता. मला वाटते पुन्हा हा लढा लढण्याची वेळ येत आहे फक्त कारणे जरा वेगळी आहे.

पाणी याबाबत सध्या भारताची स्थिती खूपच गंभीर आहे.

• २०२० अखेरीस दिल्ली सहित वीस शहरांमध्ये ग्राउंड वॉटर शून्य असेल.

• सध्या दहा करोड घरांमधील लहान मुलांना प्यायला पाणी नाही आहे.

• नऊ माणसांमागे एका माणसाला प्यायला शुद्ध पाणी नाही.

• भारतात 21 टक्के आजार हे पाण्या संदर्भातील आहे.

• वर्ल्ड बँक नुसार पन्नास टक्क्यांहून अधिक झोपडपट्टी आणि ग्रामीण भागात प्यायला पाणी नाही.

• भारत हा जगातील दुसरा अधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून की काय सरकार सर्वांना पिण्याच्या पाण्याचे पाईप लाईन उपलब्ध करू देऊ शकत नाही.

हे सर्व वस्तुस्थिती आहे पाण्याबाबत. फेब्रुवारी ते मे या चार पाच महिन्यात रोज पेपरला बातम्या असतात की पाण्याचा हंडा भरतांना ग्रामीण महिलांचा मृत्यू झाला. या चार महिन्यात विहिरी आटतात. १०-१५ किलोमीटर पायी चालून सुद्धा हंडाभर पाणी मिळत नाही.

आता पाणी वाहते नदीमधून.. नदीमध्ये येथे पावसा कडून. आता नदी आणि एकूणच पर्यावरण संतुलन या बाबत सध्या आपली काय स्थिती आहे तर भारतातील बऱ्याच नद्या आजारी आहे. नदी आजारी म्हणजे शहर आजारी. जसे आधीच सांगितले २१% आजार भारतामध्ये पाण्याच्या संदर्भात आहे.

• यमुना नदी मध्ये दिल्लीचा 57% घाण कचरा यामध्ये जमा होतो.

• भारतातील मुख्य नदी गंगा ही जगातील सर्वात जास्त प्रदूषित झालेले नदी आहे.

• गंगा मध्ये प्रत्येक 100 लिटर मध्ये 60 हजार कॉलीफॉर्म बॅक्टेरिया सापडतात.

• जी गंगाची स्थिती आहे तीच भारताची दुसरी प्रमुख नदी गोदावरीची आहे. महाराष्ट्रातील ही मुख्य नदी गोदावरी टिकण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाला आदेश द्यावे लागले तरी आपण उदासीन आहोत.

• विविध फॅक्टरी औद्योगिक संस्थांच्या प्रदूषणामुळे गोदावरी नदी मरणाच्या स्थितीमध्ये आपण आणून ठेवली आहे.

• गोदावरी नदी ही भारतातील कदाचित पहिली नदी असेल जिला कॉंक्रिटीकरण केले. ज्याने तिच्यातला सर्व नैसर्गिक पाणी स्तोत्त संपुष्टात आला.

जी स्थिती नदीची ती स्थिती पावसाची. पाऊस हा निसर्गाची देण आहे पण ही निसर्गाची देणगी टिकवणे मानवाच्या हातात असते. कधी पाऊस जास्त होतो त्यामुळे पूर येतात तर कधी कमी पावसाने दुष्काळ पडतो.
आता हे का होते तर आपण निसर्गाचा समतोल घालून बसतोय. आता तर भारतामध्ये फक्त 21 टक्के जंगल आहे. दुसऱ्या देशांच्या मानाने हा आकडा फारच कमी आहे. परंतु सिमेंटचे जंगल वाढत आहेत. नदीच्या आजूबाजूचे सर्व झाडे कापून तिथे आलिशान बिल्डिंगी झाल्या आहे. नदीच्या किनार्‍यावरील झाड कापणे म्हणजे त्या शहराने आत्महत्या करण्यासारखे आहे.

• सर्वच प्रकारचे प्रदूषण बाबत जगामध्ये भारताचा पहिला क्रमांक आहे.

• WHO ने जगातील सर्वात 12 धोकादायक शहरे वायुप्रदूषण करतात याची यादी जाहीर केली. यामध्ये भारतामधील ११ शहरे आहे.

आता हे सर्व वाचून तुम्ही डिस्टरब होत नसाल तर काहीतरी तुमचं चुकतय.. हे सर्व ऐकून तुम्हाला काही करावसं वाटत नाही तर तुम्हाला तुमच्या येणाऱ्या पिढीवर प्रेम आहे की नाही याबाबत शंका निर्माण होते.. हे सर्व पाहून तुम्हाला स्वतःमध्ये काही मूलभूत बदल करावस वाटत नसाल तर तुम्ही भलतेच स्वार्थी असे वाटते.

आता वेळ आली आहे पाणी आणि एकूणच पर्यावरणाबाबत अधिक जागृत व्हायची. आणि ही जागृतता शाळेचे विद्यार्थी आणि पालक चालू शकतात भारतातील पाण्याची स्थिती बदलायची असेल तर शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यावर पाणी संस्कार व्हायलाच पाहिजे. पाणी बाबत आता आपण जागृत झालो नाही.. स्वतःवर तसेच येणाऱ्या पिढीवर पाणी संस्कार केले नाही.. तर आपला प्रवास हा पाणी हेच जीवन आहे पासून तर पाणी हे हे मृत्यू आहे असा होईल.

जगात पुढचं महायुद्ध झालं तर ते पाण्यावर होईल इतका हा विषय महत्त्वाचा आहे आणि या विषयाला हाताळणे म्हणजे पाणी वापराबाबत स्वतःमध्ये मूलभूत बदल करणे..हा विषय हाताळणे म्हणजे अधिक पर्यावरणाला साधेल अशी जीवनशैली आत्मसात करणे.

हे सर्व वाचून आपल्या मनात हे येत असेल की हे सर्व काम सरकारची आहे.. मी एकटा काय करू शकेल? तर स्वतःला विचारा कि, "मी पाणी पितो ना?" मग मी सुद्धा बदलू शकतो.. बदलावेच लागेल. जे जे संस्था या विषयावर काम करत आहेत त्यांना मदत करावी लागेल. स्वतःच्या विचारसरणीमध्ये, जीवनशैलीमध्ये पर्यावरण संतुलन हे प्रमुख आणि प्रधान मूल्य बनवावे लागेल. घरातील लहान मुला-मुलींना याबाबत अधिक संवेदनशील बनवावे लागेल.

ही पाणी बाबत संवेदनशीलता कशी आणावी?
पाण्याचा योग्य वापर करायला शिकणे, पर्यावरणपूरक अशी जीवनशैली आत्मसात करणे. सर्वात महत्वाचं घरातील लहान मुलांना पाणी आणि पर्यावरण या विषयाबाबत संस्कार देणे म्हणजेच पाणी विषयाबाबत आपण संवेदनशील होणे... स्वतःच्या जीवनशैलीत बदल करायला सुरुवात करणे..

काय काय बदल आपल्याला करता येऊ शकतात? जीवनशैलीबद्दल म्हणजे खूप मोठमोठ्या गोष्टी करणे नाही. छोट्या छोट्या गोष्टी पासून सुरुवात होते. अगदी दाढी करताना पाण्याचा नळ बंद ठेवणे, तोंड धुताना पाणी तांब्या मध्ये घेऊन गुळण्या करणे पासून ते प्लास्टिकची पिशवी काढून कापडी पिशवी बाजारात घेऊन जाणे इतके हे सोपे आहे. माझ्या घराजवळ माझ्या गावी किंवा विविध शाळेच्या आजूबाजूला झाडे लावणे आणि सर्वात महत्वाचं ते झाड टिकण्यासाठी जबाबदारी स्वीकारणे, भांडी धुण्यासाठी कमीत कमी पाण्याचा वापर करणे त्याबाबत आपल्याकडे घरात कामवाली बाई येत असेल तर तिला तसं प्रशिक्षण देणे, शकतो तिथे प्लास्टिक चा वापर असलेल्या वस्तू टाळणे. सण-उत्सव आला की प्लास्टिक थर्माकोल याच्या वस्तू टाळणे. यासारख्या अनेक सोप्या गोष्टी तुम्ही करू शकता.

वायु प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि पाणी प्रदूषण होणार नाही याबाबत जागृत राहणे आणि हे जे कुणी करत असेल त्यात याबाबत आवाज उठवणे. वैयक्तिक पातळीवर इतक्या गोष्टी केल्या तरीही आपण खूप गोष्टी साध्य करू शकतो. जसं थेंबाथेंबाने समुद्र बनतो तसंच व्यक्ती व्यक्तिने पर्यावरणाची जीवनशैली अमलात आणली तर भारत पर्यावरण प्रेमी बनू शकतो. हा जीवनशैली बदल जर केला नाही तर उद्याची पिढी आपल्याला माफ करणार नाही.

चला तर मग पाणी संस्काराने नाहून निघूया. शाळे शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यावर पाणी बचतीचे संस्कार घालूया. या वयातच बऱ्याच गोष्टी मनावर बिंबवता येतात.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक

No comments:

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...