Thursday 4 August 2022

कबिर: 21 व्या शिक्षणाचा पाया

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख

शिक्षकांचा शिक्षक, गुरूंचा गुरू म्हणून संत-विचारवंतांमध्ये कोणाचं नाव घेता येईल असं जर मला कोणी विचारलं तर मी 'कबीर' यांचं नाव घेईन. पंधराव्या शतकातील संत कबीर यांनी एकविसाव्या शतकातल्या शिक्षणाचा पाया घातला. पुढे अनेक शतकं त्यांचे दोहे विद्यार्थी, शिक्षक, पालकांना दिशादर्शक ठरणार आहेत. कबीर दास म्हणतात,

ऐसी वाणी बोलिएमन का आपा खोये ।
औरन को शीतल करेंआपहुं शीतल होएं ।।


हा दोहा म्हणजे एकविसाव्या शतकातील महत्त्वाच्या कौशल्याचा, म्हणजे संवाद कौशल्याचा पाया आहे. समोरच्याला ऐकताना वाईट न वाटता छान वाटेल अशी भाषा प्रत्येकाने वापरली पाहिजे.
जेवढी मधुर वाणी असेल तेवढं एकमेकांमध्ये प्रेम राहतं. आजकाल हे शाळेतल्या, कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना शिकवणं गरजेचं आहे. आजकालचे विद्यार्थी नेट फ्लिक्सवरचे अन सेन्सॉर शब्द भाषेत वापरतात. बोलण्यामध्ये हिंसा एवढी वाढली आहे की समोरची व्यक्ती दुखावते.

कबीरदासने देव कुठे असतो, त्याचं वास्तव्य कुठे असतं हे इतक्या सोप्या भाषेत समजावलं आहे की कबिरांचं हे भजन शाळा-शाळांमध्ये शिकवलं पाहिजे. विद्यार्थ्यांना अल्ला, ईश्वर, येशू, भगवान नक्की कुठे असतात हे समजलं तर मोठेपणी कोणी धर्माच्या नावाने द्वेष करणार नाही. मंदिर-मस्जिदच्या नावाने दंगल करणार नाही. कबीर या भजनात परमेश्वराच्या वतीने म्हणतात,

मोको कहां ढूंढे रे बंदे,
मैं तो तेरे पास में ।
ना तीरथ में ना मूरत में,
ना एकांत निवास में ।
ना मंदिर मेंना मस्जिद में,
ना काबे कैलाश में ।
मोको कहां ढूंढे रे बंदे,
मैं तो तेरे पास में ।
ना मैं जप मेंना मैं तप में,
ना मैं व्रत उपवास में ।
ना मैं क्रिया क्रम में रहता,
ना ही योग संन्यास में ।


मग देव कुठे राहतो तर या दोह्यात कबीर स्पष्ट करतात की

खोजी होए तुरंत मिल जाऊं,
एक पल की ही तलाश में ।
कहे कबीर सुनो भाई साधो,
मैं तो हूँ विश्वास में ।


म्हणजे देव हा आपल्या मनात, विश्वासात असतो. हीच देवाची संकल्पना गाडगेबाबांनी, महात्मा गांधींनी त्यांच्या भजनात मांडली.

कबिराने कितीतरी मानसशास्त्रीय संकल्पना चार ओळींत समजावल्या आहेत. उदा. REBT चे जनक डॉ. अलबर्ट एलिस म्हणतात, "आपण जसं मनात बोलतो तसं घडत जातो. आपला मनातला सेल्फ टॉक कसा आहे त्यावर माणसाचं मानसिक स्वास्थ्य ठरतं.

पंधराव्या शतकातले कवी कबीर मनातल्या गप्पा कशा अस
ता ते या दोह्यात सांगतात-

घट घट में पंछी बोलता,
आप ही दंडी, आप तराज़ू ,
आप ही बैठा तोलता है


म्हणजे मन हे पक्ष्यासारखं आहे. जे प्रत्येक सेकंदाला बोलत असतं.स्वतःच तराजूवर बसतं, स्वतःच त्याची दांडी पकडत, स्वतःच वजन करतं. याचाच अर्थ मन स्वतःच्या फायद्याचाच विचार करतं. मीच खरा असं स्वतःला समजावत.

गुरू-शिष्य नात्यावर तर कबिराचे असंख्य दोहे आहेत. पण मला आवडतो तो,

गुरु कुम्हार शिष कुंभ है, गढ़ि गढ़ि काढ़ै खोट।
अन्तर हाथ सहार दै, बाहर बाहै चोट॥  

म्हणजे शिक्षक हा कुंभार तर विद्यार्थी मडकं आहे. सुबक गोलाकार मडकं बनण्यासाठी कुंभार आतून हात घालून सपोर्ट देतो तर वरतून दुसऱ्या बाजूने फटके मारतो. म्हणजे आकार देतो. शिक्षकसुद्धा विद्यार्थ्याला भावनिक आधार आणि शिस्तीचा हात देतो; तेव्हा त्या विदयार्थ्याच्या आयुष्याला आकार येतो. ही गोष्ट आजकालच्या पालकांना समजली तर त्यांच्या पाल्याचं करिअर घडेल अन्यथा लडावलेले, बिघडलेले शहजादे बनतील.

शिक्षकांचा सन्मान करणं किती महत्त्वाचं आहे हे समजवण्यासाठी कबीर म्हणतात,

गुरु गोविन्द दोऊ खड़ेकाके लागू पाय |
बलिहारी गुरु आपनेगोविन्द दियो बताय ||


म्हणजे, जर गुरू आणि शिष्य दोघेही बरोबर उभे असतील तर तुम्ही प्रथम कोणाला नमस्कार कराल? तर कबीर सांगतात,पहिला गुरूला नमस्कार करा. कारण तो तुम्हा ईश्वरापर्यंत घेऊन जातो. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात गुरूचा सन्मान म्हणूनच महत्त्वाचा आहे. ज्या राष्ट्रात गुरूचा सन्मान होतो तेच राष्ट्र प्रगती करतं.

कबिरांनी आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगावर, भावभावनांवर भाष्य केलं. मनाचे जेवढे रंग आहेत त्या प्रत्येक रंगाच्या छटांवर दोहे लिहिले. एखादी व्यक्ती खूप मोठी झाली, यशस्वी झाली, पण तिचा समाजाला काही उपयोग नसेल तर अशा प्रगतीला काही अर्थ नाही. आजकाल भौतिकवाद प्रचंड वाढला आहे. 'It’s my life' हा संकुचित विचार वाढतोय. जो समाजाला घातक आहे. यावर कबीर दास म्हणतात,

बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर ।
पंथी को छाया नही फल लागे अति दूर ॥


खजुराचं झाड उंच असतं पण ना ते सावली देतं, ना त्याचं फळ तोडता येतं. फक्त 'स्व'चा विचार करणं या झाडाला जमतं.

कबीर एका ठिकाणी म्हणतात,

बुरा जो देखन मैं चला,
बुरा न मिलिया कोय ।
जो मन देखा अपना,
मुझसे बुरा न कोय ।

म्हणजे, आपण लोकांकडे कसं पाहतो हे महत्त्वाचं. आपण मनात वाईट विचार केला तर सर्व वाईटच दिसेल. बाहेर कोणी वाईट नाही. आतूनच आपण वाईट विचार करतो.

कबीर ही एक व्यक्ती नसून विचार आहे. कबीर ना हिंदू होते, ना मुसलमान. ते जातीधर्माच्या कैक पलीकडचे होते. ते माणूस होते आणि माणुसकी त्यांचा धर्म होता. संपूर्ण जगाला त्यांनी आरसा दाखवला. समाजातल्या चुकीच्या रूढी, समजुती, अंधश्रद्धा यांचं सत्य स्वरूप त्यांनी त्यांच्या दोह्यांमधून मांडलं.

कबीर एका भजनात म्हणतात,

मत कर माया को अहंकार
मत कर काया को अभिमान
काया गार से कांची
मत कर काया को अभिमान
काया गार से कांची
हो काया गार से कांची
रे जैसे ओसरा मोती
झोंका पवन का लग जाए
झपका पवन का लग जाए
काया धूल हो जासी


म्हणजे, माया, पैसा, सत्ता यांमुळे अहंकारी होऊ नका. स्वतःच्या रंगाचा, दिसण्याचा जातीचा गर्व करू नका. शरीर मातीसारखं आहे. हवेची झुळूक जरी आली तरी मातीची धूळ बनेल आणि उडून जाईल. जीवनाचं किती मोठं तत्त्वज्ञान कबीर सांगून गेले!

हे सर्व विद्यार्थ्यांना शाळेपासून शिकवलं तर त्यांचं मन अधिक उत्तम विचारांनी परिपूर्ण होईल. शाळेच्या प्रार्थनेमध्ये कबिरांचं भजन असलं पाहिजे. शाळा कॉलेजच्या थिममध्ये त्यांच्या कवितांचा समावेश असला पाहिजे. आमच्या इस्पॅलिअर शाळेत दरवर्षी कबिरांच्या गाण्यांचं सादरीकरण असतं. जेव्हा कबिरांचे दोहे विद्यार्थ्यांना पाठ होतील तेव्हा मोठेपणी ते समुपदेशनाचं काम करतील.

आजकाल प्रत्येकजण टेन्शनमध्ये जगत असतो. त्यातून बरं होण्यासाठी डॉक्टरकडे जातो. थोडे दिवस बरं वाटतं; पण पुन्हा धडधड होते, काळजी वाटते. यावर कबीरदास म्हणतात,

चिंता ऐसी डाकिनी, काट कलेजा खाए |
वैद बेचारा क्या करे, कहा तक दवा लगाए ||


म्हणजे चिंता तुमचं मनच खाऊन टाकते. वैद्यबुवा काय करतील? आजकाल हृदयरोग होतात. त्यामागची कारणं हीच!

पंधराव्या शतकातले कबिरांचे विचार आजही लागू होतात. संत कबीर यांचा जन्म इ.स 1398 मध्ये काशी इथे झाला असे काही जण मानतात. तर काही जणांचं संशोधन सांगत की त्यांचा जन्म 1149 मध्ये झाला. त्यांचा मृत्यू महगर इथे 1518 ला झाला. ते भारतातील महान कवी आणि समाजसुधारक होते. त्यांनी त्यांच्या दोह्यांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा प्रचार केला. चुकीच्या रुढींविरुद्ध समाजप्रबोधन केलं.

त्यांच्या दोह्यांचा पाया हा शास्त्रीय दृष्टिकोन विस्तारणारा आहे. मानसिक बळ वाढवणारा आहे. ते म्हणतात,

जिन खोजा तिन पाइयागहरे पानी पैठ,
मैं बपुरा बूडन डरारहा किनारे बैठ ।।


याचा अर्थ प्रयत्न करणाऱ्याच्या हाती काही ना काही येतंच. त्याचे प्रयत्न वाया जात नाहीत.
बुडण्याच्या भीतीने पाण्यात उतरलंच नाही तर कसं चालेल? फक्त किनाऱ्यावर बसून राहणाऱ्यांच्या हाती काहीच लागत नाही. आयुष्यात कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यावीच लागते. हेच कबीर समजवतात. हे "दोहे" जेव्हा भारतीय शिक्षणाचा भाग बनतील तेव्हा विद्यार्थी अधिक सर्जनशील, अधिक आत्मविश्वासपूर्ण, संविधानाला मानणाऱ्या माणुसकीने युक्त व्यक्ती बनतील; यात कोणतीही शंका नाही.

कबिरांचा एक उपदेश तर कोणत्याही काळासाठी प्रेरणादायक आहे. ते म्हणतात,

पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ |
पंडित भया न कोय |
ढाई आखर प्रेम का |
पढ़े सो पंडित होय ।


म्हणजे पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञान, अनुभव आवश्यक ठरतात. या ज्ञानाला जेव्हा प्रेमाच्या भावनेची जोड मिळते तेव्हा खऱ्या अर्थाने व्यक्ती घडते.
ज्ञानाने परिपूर्ण असूनसुद्धा, विचारांचं रूपांतर आचारात करता आलं नाही तर काय उपयोग? विचार-आचारांचा उत्तम ताळमेळ घालू शकतो तो परिपूर्ण माणूस!

कबीर नेमकं हेच सांगून गेले, म्हणूनच त्यांचे दोहे महत्त्वपूर्ण आणि कालातीत ठरतात.
एकविसाव्या शतकातील शिक्षणातील मूल्य व्यवस्थेसाठी त्यांचे दोहे हे आवश्यक आहे.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


No comments:

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...