Tuesday 23 August 2022

21 व्या शतकातील शिक्षण देणारे पॅनल हवे..

महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रेरणेने नाशिकच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालू करावं या उद्देशाने 1914 साली 'मराठा विद्या प्रसारक समाज' संस्थे ची स्थापना झाली. सुरुवातीला उदोजी बोर्डिंग चालू झालं. 1936 साली 'मराठा हायस्कूल' सुरू झालं. पुढे शिक्षकांसाठी पहिलं बी.एड. कॉलेजसुद्धा सुरू केलं. नाशिक जिल्ह्यात विशेषतः खेड्यांमधल्या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा पहिला मान हा "म.वि.प्र" संस्थेकडे जातो.

सर्वश्री रावसाहेब थोरात, भाऊसाहेब हिरे, अण्णासाहेब मुरकुटे, बाबुराव ठाकरे, विठ्ठलराव हांडे, काकासाहेब वाघ, आबासाहेब सोनावणे यांनी ही संस्था नावलौकिकास आणली. नाशिकमध्ये शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम ही संस्था आजतागायत करत आली. त्या संस्थेची आता पंचवार्षिक निवडणूक आली आहे. खरं तर ही निवडणूक मराठा समाजामधली प्रतिष्ठित निवडणूक; आणि मी अमराठा यावर लेख का लिहितोय असा प्रश्न वाचकांना पडला असेल. कारण शिक्षण हा माझा अभ्यासाचा विषय आहे. बऱ्याच वाचकांना माहिती आहे की मी जातीधर्माच्या पलीकडे विचार करणारा शैक्षणिक कार्यकर्ता आहे. नाशिक जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये म.वि.प्र संस्थेचा सिंहाचा वाटा आहे.

या संस्थेकडे आम्ही त्रयस्थ फार आशेने पाहत असतो. ही संस्था जरी मराठा समाजाने उभारली असली तरी त्याचा लाभ सर्व धर्मांतील विद्यार्थ्यांना होतो. आतापर्यंतची संस्थेची वाटचाल ही उत्तमच आहे; पण आता शिक्षण आणि शिक्षणपद्धती वेगाने बदलत आहे. हे बदल विधायक आहेत. असे बदल करणारे आणि हे बदल समजून घेणारे लोक, त्यांची टीम संस्थेवर यावी ही सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. 

शैक्षणिक धोरण येत्या वर्षात अंमलबजावणीसाठी सिद्ध झालं आहे. पुढची पाच वर्षं ही शिक्षण क्षेत्रासाठी आमूलाग्र बदलाची असणार आहेत. पुढील पाच ते दहा वर्षांमध्ये 60 % करिअर आणि जॉब असे उपलब्ध असतील जे आज अस्तित्वातच नाही; त्या जॉबना लागणारं कौशल्य मात्र ज्या शिक्षणातून येणार आहे; ते शिक्षण निश्चित झालं आहे. हे समजण्यासाठी संस्थेमध्ये अनुभवी, तरुण विचारसरणीच्या आणि सर्जनात्मक दृष्टिकोन असलेल्या व्यक्ती किंवा त्या व्यक्तींची टीम असावी लागेल. 

प्रगती पॅनेल येईल की परिवर्तन पॅनेल हे आम्हाला माहिती नाही....कोणीही येवो..आम्ही स्वागतच करू. पण आम्हा नाशिककरांना एकविसाव्या शतकातील शिक्षण हवं आहे. हे शिक्षण देण्याची धमक म.वि.प्र संस्थेमध्ये आहे.

मी स्वतः नीलिमाताईंना जवळून ओळखतो. आम्ही कितीतरी कॉन्फरन्सना एकत्र उपस्थित राहिलो आहोत. अनुभवाची शिदोरी त्यांच्याजवळ आहे. त्यांच्या 'प्रगती' पॅनेलमध्ये तरुण विचारसुद्धा आहे. डॉ.प्रशांत पाटील, डॉ.सुनील ढिकले, सचिन पिंगळे, डॉ.बच्छाव यांसारख्या तरुण आणि हिरीरीने काम करणाऱ्यांचा त्यात सहभाग आहे. स्वतः डॉ.प्रशांत पाटील डॉक्टर म्हणून 'इनोव्हेशन'ला महत्त्व देऊन काम करतात. 'डिफेन्स इनोव्हेशन हब' नाशिकला मिळवून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. निफाडच्या ड्राय पोर्ट मंजुरीमध्ये ते अग्रस्थानी होते. हेच सारं कौशल्य नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला लागणार आहे. 

कारण आता परीक्षापद्धती बदलणार, आर्टिफिशिअल इंटलिजन्सला महत्त्व प्राप्त होणार, अभ्यासक्रमात बदल होणार. हे बदल प्रचार्य, शिक्षणतज्ज्ञ करतील पण मंजुरीसाठी संस्थेच्या कमिटीकडेच प्रस्ताव येणार. तेव्हा त्यातलं  ज्ञान, नवं स्वीकारण्याची मानसिकता राखत त्या पद्धतीला दिशा देण्याचं काम नवीन पॅनेलला करायचं आहे. हे अनुभवी आणि तरुण विचारसरणीच्या लोकांनाच जमू शकेल. 

दोन्ही पॅनेल्सवर उत्तम उमेदवार आहेत. 

परिवर्तन पॅनेलमध्ये ऍड.नितीन ठाकरे हे अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. जिल्हा वकील संघाचे ते अध्यक्ष आहेत, कायद्याच्या ज्ञानासोबत संघटन कौशल्य त्यांच्याजवळ आहे. डॉ.प्रसाद  सोनावणे हे स्वतः सटाणा मध्ये उत्तम शाळा चालवता, संदीप गुळवे, अमित पाटील, हे तरुण विचारसरणीचे उमेदवार त्यांच्या सोबत आहेत. माणिकराव कोकाट्यांसारखं अनुभवी व्यक्तिमत्त्व आहे. खरं तर  निवडणूक नात्यागोत्यामध्येच आहे पण आम्हा नाशिककरांना संस्था कुठल्या पॅनेलकडे जाते हे महत्त्वाचं नसून आम्हा सर्वांना या म.वि.प्र संस्थेच्या कॉलेज, शाळा यांबद्दल जिव्हाळा आहे. जिथे शिक्षण पोहोचू शकत नाही तिथे ते पोहोचवणारी नाशिक जिल्ह्यामधली ही अव्वल दर्जाची संस्था आहे; तो दर्जा तसाच राहो ही इच्छा! 

या वेळेस सभासदांमध्ये तीन हजार नवीन सभासदांची वाढ झाली. ते सगळे नवीन पिढीचं प्रतिनिधित्व करतात. त्या सर्वांनासुद्धा शिक्षण नव्या पिढीचं म्हणजे एकविसाव्या शतकातलं द्यावं लागेल, ते तुम्ही द्यावं. जे पॅनेल निवडून येईल त्यांनी ते द्यायला हवं. खरं तर, निवडणूक झाली की हे सर्व उमेदवार संस्थेसाठी एकत्र काम करतील. भले ते निवडून येवोत की न येवोत.

शेवटी निवडणूक नात्यागोत्यांमध्येच आहे आणि आम्हा अमराठा लोकांना ही नातीगोती कळत नाहीत. पण संस्थेच्या वाटचालीकडे पाहिलं की आम्हाला आनंद वाटतो. कारण तो फक्त संस्थेचा विकास नसून नाशिक जिल्ह्याचा विकास असतो. हा सर्व बहुजनांचा हा विकास आहे. या विकासाबाबत नाशिककर नेहमी म.वि.प्र संस्थेचे ऋणी आहेत. जगाला उत्तम नेते, व्यावसायिक, आदर्श, उत्तम डॉक्टर्स, वकील, आर्किटेक्ट देणाऱ्या या संस्थेबरोबर नाशिककर नेहमीच आहेत आणि राहतील. म्हणूनच, प्रगती आणि परिवर्तन पॅनेलमधल्या उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा!

सचिन उषा विलास जोशी 

शिक्षण अभ्यासक



No comments:

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...