Sunday 27 November 2022

*सगळं काही आपल्याच हातात आहे!*

विद्यार्थ्याच्या अभ्यासातील त्रिकोण समजून घेण्यासाठी या लेखांमधील शेवटचा पॅराग्राफ महत्त्वाचा. 

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सर्व पालकांसाठी लेख

पॅरेंट्स टीचर मीटिंगमध्ये पालकांकडून एक प्रश्न हमखास उपस्थित केला जातो- *‘मुलं अभ्यास करत नाहीत.’* असं जेव्हा पालकांना वाटतं तेव्हा त्यांनी दोन गोष्टी तपासून पाहायला हव्या. आपल्या पाल्याची शाळेतली आणि घरातली वर्तणूक. त्याला अभ्यासात कितपत गम्य आहे याकडे बारकाईने बघायला हवं. 

खरं तर शाळेमध्ये शिक्षक आस्थेने विद्यार्थ्यांकडे लक्ष देत असतात तरीही असं का घडतं? *मुलं अभ्यासात का मागे असतात? याचं अनेक कारणातील महत्त्वाचे कारण मोबाईलमध्ये दडलेलं आहे.* अनेक पालकांची मुलं आज मोबाईलच्या आहारी गेलेली आहेत आणि या पालकांचं म्हणणं आहे की या प्रश्नावर शाळेने उत्तर शोधून काढावं. 

हे कसं काय शक्य आहे? मुलं दररोज शाळेत काही काळ असतात. उरलेला संपूर्ण वेळ ती घरी असतात. त्यामुळे या संदर्भात पालकांनीच कडक धोरण अवलंबण्याची गरज आहे. खरं तर मुलांचा ‘स्क्रिन टाईम’ हा चोवीस तासांत पस्तीस ते चाळीस मिनिटं इतकाच अपेक्षित आहे. तरच त्यांची वर्तणूक चांगली आणि हितकारक असू शकते. पण वस्तुस्थिती काय आहे? *एक तासापासून ते सहा-सात तासांपर्यंत मुलांच्या हातात मोबाईल दिसून येतो.* त्यांना लागलेल्या या सवयीला पालकच जबाबदार आहेत. सुरुवातीला आमच्या बाळ्याला किंवा बाळीला मोबाईलमधलं कित्ती कळतं म्हणून त्याचं कौतुक केलं जातं. नंतर बसलेत छान गप्प म्हणून दुर्लक्ष केलं जातं. मग जेवत नाही म्हणून जेवायच्या वेळेस मोबाईल किंवा टीव्ही लावला जातो. *हळूहळू पालक आपापल्या व्यापात इतके अडकत जातात की मुलांकडे आणि मुलांच्या प्रश्नाकडे लक्ष पुरवायला त्यांना वेळच नसतो.*

दुसरं म्हणजे आजच्या काळात आई-वडीलच मोबाईलच्या इतके आहारी गेलेले आहेत की कोण कोणाला काय बोलणार? ‘मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?’ आणि मुळात ‘मांजर’ कोण? 

अतिशय स्पष्टपणे आणि कडकपणेच मी हा लेख लिहीत आहे. पालकांचं म्हणणं राहील की आमची कामं असतात. आम्ही मोबाईल कामासाठी वापरतो. मग तेव्हा मुलं म्हणतात आम्ही अभ्यासासाठी वापरतो. यातलीही सत्यासत्यता पडताळून बघायला हवी आणि मुलांच्या हातातून मोबाईल आपणच काढून घ्यायला हवा. तत्पूर्वी विरंगुळ्यासाठी स्वत:च्या हातात असलेला मोबाईल दूर ठेवायला हवा. 

मुलांवर तुमचं खरं प्रेम असेल तर तुम्ही हे कराल. अन्यथा तुमचं प्रेम खोटं आहे असं म्हणावं लागेल. दोन ते तीस तासांच्यावर मुलांच्या डोळ्यांसमोर मोबाईल असेल तर *मुलांच्या मेंदूमध्ये ‘डोपोमाईन’ नावाचं रसायन वाहतं जे त्याला अति उत्साह देत असतं-त्यातून मुलं हायपरऍक्टिव्ह बनतात. ती गोष्ट त्यांना सतत हवीशी वाटू लागते. ती मोबाईलच्या पूर्णपणे आहारी जातात.* त्यांच्या वर्तणुकीत हळूहळू फरक पडू लागतो. ती चिडचिडी होऊ लागतात. इतरांशी संवाद साधण्यात ती कमी पडू लागतात. त्यांचे आई-वडिलांशी वाद होऊ लागतात. ग्राऊंडवर खेळायला जाण्याचं तर ती टाळूच लागतात. एकाग्रता नसल्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही. वर्गात काय शिकवलं जात आहे ते नीट समजत नाही. वर्गामध्ये ही मुलं नुसती बसलेली असतात. *पालकांची अपेक्षा मात्र असते की मुलं चांगल्या मार्कांनी पास होतील. तसं घडलं नाही तर त्याचं खापर शिक्षकांच्या माथ्यावर फोडलं जातं. शिक्षकच व्यवस्थित शिकवत नाही इथपर्यंत तो वाद जातो.* वास्तविक शिक्षक त्यांची जबाबदारी समर्थपणे पार पाडत असतात. तुम्हाला जर मुलांची खरी प्रगती अपेक्षित असेल तर तातडीने मुलांच्या हातातला मोबाईल काढून घ्या.

*दुसरं म्हणजे तुमच्या पाल्याला शाळेतली शिस्त पाळायला भाग पाडा.* शाळेतली, घरातली मुलांची वर्तणूक सुधारा. शिक्षकांशी उद्धटपणे बोलण्यापासून त्यांना रोखा. *आंधळ्या प्रेमापोटी केवळ मुलांच्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका. शिक्षकांची बाजूही पूर्णपणे ऐकून घ्या.* एकांगी केले जाणारे आरोप-प्रत्यारोप हे विकासाला घातक ठरतात. प्रत्येक गोष्टीचा सर्वंकषपणे विचार करणं हे आपलं कर्तव्य असलं पाहिजे. पालकांनी आठवड्यातून किमान दोनदा एक प्रश्न त्यांच्या मुलांना विचारायचा. तो म्हणजे वर्गात तू शिस्तीत वागतो ना? मित्रांना शिक्षकांना त्रास तर देत नाही ना? हमखास तुमचा पाल्य "हो" म्हणेल पण तिथं तेवढा विश्वास न ठेवता शाळेमध्ये क्रॉसचेक करणे गरजेचे.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या कारणांव्यतिरिक्तसुद्धा मुलं अभ्यासात मागे पडत असली तर शैक्षणिक घडामोडींकडे अधिक लक्ष द्या. मुलांचं अभ्यासातलं गम्य पारखा. *त्यांना शाळेतून दिला जाणारा होमवर्क रोजच्या रोज नीट करायला लावा.* त्याचा खूप उपयोग होतो. मुलांच्या अभ्यासाचं वेळापत्रक आखा. टाईमपास सदराखालच्या गोष्टी कमी करा. केवळ कॉपिंग करणं म्हणजे अभ्यास नव्हे. मुलं या वहीतून त्या वहीत उतरवात आणि अभ्यासाचं बेगडी वातावरण तयार करतात तसं अजिबात होता कामा नये. मुलं काय लिहितात हे बघणं आवश्यक आहे. या सगळ्या पालकांनी स्वत: जातीने करायच्या गोष्टी आहेत. *तुमचा पाल्य कितीही इंटरनॅशनल शाळेत शिकत असो.. आई वडील म्हणून जी जबाबदारी असते ती घ्यावीच लागते. घरामध्ये अभ्यासाचं वातावरण हे तयार करावंच लागतं.*

तुमच्याकडे मुलांसाठी वेळ नाही म्हणून कितीही लाखोंची फी क्लासेस लावले तरीही ब्रह्मदेव जरी खाली आले तरीही फक्त क्लास शाळा मुलांमध्ये बदल आणू शकत नाही. *आई-वडील म्हणून पाठीमागे उभे राहणं, मार्गदर्शन करणं, अभ्यासात मदत करणं, वेळ देणं, घरामध्ये अभ्यासाची शिस्त लावणं, अति लाड बंद करणं ही मध्यम आणि उच्च मध्यम वर्गातील पालकांची जबाबदारी आहे.*

बरेचदा पालकांची तक्रार असते की मुलांचं गणित खूप कच्चं आहे. यावर एकच उपाय आहे. तो म्हणजे *रोजच्या रोज कमीतकमी तीन आणि जास्तीत जास्त पाच गणितं विद्यार्थ्यांनी स्वतंत्रपणे सोडवली पाहिजेत.* गाईडमध्ये वगैरे बघून नाही. मुलांना त्यांच्या स्वत:च्या चुकांमधूनच शिकू द्या. गणितातल्या प्रत्येक बरोबर पायरीगणिक ती पुढे जाणार आहेत. लेखनाच्या बाबतीतही तीच गोष्ट आहे. आठवड्यातले तीन ते चार दिवस प्रतिदिवशी एकेका विषयाचं म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी इत्यादी एकेक पान जरी मुलांनी लिहिलं आणि लेखन तपासून घेतलं तर त्याचाही चांगला परिणाम दिसून येईल. 

या सगळ्या विद्यार्थी आणि शिक्षण या संदर्भातल्या मुलभूत गोष्टी आहेत. आपल्याला त्या मान्यही असतात. परंतु वेळ नाही या सबबीखाली आपण त्या दुर्लक्षित करतो. शाळेच्या हजारो, लाखो रुपयांच्या फी पलीकडून ही कर्तव्यं डोकावत असतात आणि ती पार पाडायलाच हवी. शिक्षणाचं गणित केवळ शाळेच्या तासांशी निगडित नाही. शिक्षणाचा घरातल्या शैक्षणिक वातावरणाशी फार मोठा संबंध असतो. ते पालक म्हणून आपण हसत-खेळतही निर्माण करू शकतो. त्यासाठी धाकदपटशाचेही उपाय वापरण्याची काही गरज नाही. घरातले चांगले नियमच मुलांना पुढे नेत असतात. 

शाळा केवळ मुलांना प्रेरणा देत असते. त्यांना अभ्यासक्रम शिकवत असते, त्यांच्याकडून अभ्यास करून घेत असते. बहुतांशी प्रमाणात या सगळ्या घडामोडी सामूहिक स्वरूपाच्या असतात. पालकांच्या सान्निध्यात मुलं स्वतंत्रपणे असतात. तेव्हाच्या त्यांच्या गरजा वेगळ्या असतात. शिक्षण ही एक मानसिक प्रक्रिया असते. या प्रक्रियेकडे अधिक लक्ष देणं ही पालकांची जबाबदारी असते. मुलांच्या या सर्व मानसिक प्रक्रियेकडे लक्ष पुरवणं म्हणजे केवळ *त्यांचे लाड करणं आणि हो ला हो म्हणणं नाही. त्यांनी तुमचं ऐकायला हवं. ऐकतच नाही हे जर उत्तर असेल तर आपल्या पालकत्वाच्या भूमिकेमध्ये काहीसा बदल गरजेचा ठरतो.* तुमचं त्यांच्याशी मृदू वागणं काहीसं कडक होऊ द्या. ते त्यांच्याच हिताचं आहे. 

‘तू म्हणतोस/तू म्हणतेस तेवढंच खरं किंवा तेवढंच करू ही भूमिका मुलांची योग्य नव्हे. मुलांच्या हट्टी पणा समोर तुम्ही शांत बसून राहता याचा अर्थ त्याला बिघडवायला मदत करत असतात. ही बिघडण्याची प्रक्रिया थांबवा.

*ही थांबवण्याची प्रक्रियेची सुरुवात पालकहो कृपया मोबाईलपासून करा. एकणूच मुलांचा स्क्रिन टाईम कमी करा. म्हणजेच केवळ मोबाईल नव्हे तर कम्प्युटर, टी.व्ही., व्हिडिओ गेम्स इत्यादी उपकरणांपासून त्यांना लांब ठेवा. मोबाईल, कम्प्युटरचा वापर सकारात्मक पद्धतीने अभ्यासासाठी करायला त्यांना शिकवा. अगदी थोडा काळ या साधनांचा वापर विरंगुळ्यासाठी होऊ द्या. मुलांना पुस्तकवाचनाकडे वळवा. ई-बुक्सबरोबरच खरी पुस्तकंही त्यांच्या हातात द्या. नेटवर उपलब्ध असलेल्या माहितीपेक्षा मूळ मसुद्यावर लक्ष केंद्रित करायला त्यांना शिकवा. घरी शैक्षणिक वातावरण तयार करून त्यांच्या अभ्यासाचं वेळापत्रक आखा.*

आणखी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आठवड्यातून एकदा तरी त्यांच्या शिक्षकांना भेटा. त्यांच्याशी नीट संवाद साधा. कोण कुठे चुकतंय याची चर्चा न करता सहकार्याने जर एकत्र पुढे गेलो तरच मुलांची प्रगती साधता येईल. आपण हे सगळं जमवून आणलं तर कुठलाही ऍव्हरेज विद्यार्थी सहजपणे 90-95 टक्के गुण मिळवू शकतो. *परीक्षेत मिळणारे मार्क हेच केवळ जगण्याचे निकष नसतात* हे जरी खरं असलं तरी पालकांना शेवटी मार्कच दिसतात. म्हणून हे मार्क सर्वांच्या सहकार्यातूनच हे साध्य होऊ शकतं. त्यामुळे एकमेकांवर आगपाखड न करता शिक्षक आणि पालकांना सामंजस्याचं धोरण आखायला हवं. *शिक्षकांचा खरं कौतुक करणे आवश्यक आहे. जे पालक त्यांच्या पाल्याच्या शिक्षकांशी प्रेमळ बोलतात.. त्यांना समजून घेतात अशा वेळेस शिक्षक आणि पालक एकत्र टीम बनून विद्यार्थ्यांवर अधिक विधायक काम करतात.*

जे पालक ओपन हाऊस मध्ये पॅरेंट टीचर मीटिंगमध्ये सर्वांसमोर शिक्षकांची सातत्याने नकारात्मक बोलतात अशातून शिक्षकांचा उत्साह कमी होतो. तो किंवा ती कर्तव्य म्हणून तुमच्या पाल्याकडे लक्ष देतो पण आतून तो/ ती दुखावलेली असते. *दुखावलेले शिक्षक बदल घडुवू शकत नाही.* त्यामुळे पालक, शिक्षक आणि विद्यार्थी हे शिक्षणातील त्रिकोण आहे.  हा त्रिकोण सुसंवादी असणे आवश्यक. 


*सचिन उषा विलास जोशी*

शिक्षण अभ्यासक 

*(लेख नावासहित फॉरवर्ड करू शकता)*

No comments:

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...