Saturday 17 August 2019

आपली शिक्षण पद्धती शास्त्रज्ञ केव्हा निर्माण करेल?

जगातील सर्वात प्रभावशाली शास्त्रज्ञ कोण? ते कोणत्या देशाचे आहेत? आणि यात भारतीय किती? असे प्रश्न जर तुमच्या मनात येत असेल तर त्याचे उत्तर नुकतेच क्लॅरिव्हेट अ‍ॅनॅलिटिक्स या माहितीच्या विश्लेषणाच्या शेत्रातील महत्त्वाच्या कंपनीने दिले आहे.

सर्वात जास्त शास्त्रज्ञ देणाऱ्या पाहिल्या दहा देशामध्ये म्हणजेच टॉप टेन मध्ये पहिल्या क्रमांकावर अमेरिका मग ब्रिटन, चीन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, कॅनडा, फ्रान्स, स्विझर्लांड आणि स्पेन आहे.

आपल्या मनात विचार आला असेल की भारत का नाही या यादीत? कारण या यादीत यायला किमान शंभर शास्त्रज्ञ तरी त्या देशाचे लागतात. जसे अमेरिकेचे 2639 शास्त्रज्ञांचा या यादीत स्थान मिळाले आहे, ब्रिटनचे 546, चीनचे 482 शास्त्रज्ञांचा समावेश आहे आणि भारताचे फक्त दहा शास्त्रज्ञांचा या यादीत समावेश आहे. म्हणजे किमान शंभर शास्त्रज्ञांची तरी यादी हवी आणि त्याच्या जवळपास पण आपण भारतीय नाही आहोत.

मागील वर्षी नारायण मूर्ती यांनी एक विधान केले होते, "गेल्या साठ वर्षात आपण असा एक तरी असा शोध लावला आहे का की जेणेकरून जग बदलले आणि आपली आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली" काय कारण असेल याचे? 120 कोटी देशांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शंभर शास्त्रज्ञांचे नाव सुद्धा आपल्याला देता येत नाही याचे मूळ कारण शोधले तर आपली शिक्षण पद्धती. लॉर्ड मेकॉले पासून चालत आलेली आपली शिक्षण पद्धती ही घोका आणि ओका या तत्वावर चालते.

आपण शिक्षणाचा अर्थ माहितीचा संग्रह करणे असा काढतो. आपल्या सर्वांना रेडीमेड उत्तराची सवय झाली आहे आणि जी शिक्षण पद्धती ही उत्तरांवर अवलंबून असते ती नवं काही शोधत नाही.

शिक्षणपद्धती ही प्रश्नांवर आधारित हवी. विद्यार्थ्यांना दररोज नवनवीन प्रश्न पडले पाहिजे. प्रश्न निर्माण होण्यासाठी शाळा-कॉलेजमध्ये तसे वातावरण हवे. विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण करावा लागतो.

शास्त्र विषय शाळेत कॉलेजमध्ये शिकवणे वेगळे आणि शास्त्रीय दृष्टिकोन बाळगणे वेगळे. त्यासाठी शिक्षणात अर्थात वर्गात जिज्ञासा, कुतूहल याला भरपूर वाव हवा. शिक्षणामध्ये अंधश्रद्धा दूर करणारे विचार हवे, कारण अंधश्रद्धा केवळ अज्ञान नाही तर एक प्रक्रिया आहे. तिचा देव धर्माशी संबंध नसतो. अंधश्रद्धा म्हणजे शब्दप्रामाण्य. अमुक अमुक सांगतो म्हणून ते खरंच असलं पाहिजे. त्याचे शब्द हेच प्रमाण. असे आपण घराघरातून, शाळेतून विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवतो. इथूनच त्याची विचार करण्याची प्रक्रिया खुंटते आणि हळूहळू त्याला किंवा तिला प्रश्नच पडत नाही.

जोपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये चिकिस्ता करण्याची प्रवृत्ती निर्माण होत नाही तोपर्यंत शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण होत नाही. जर पुढील काही वर्षात भारतीय शास्त्रज्ञांची यादी 10 वरून 100 वर न्यायची असेल तर आज शाळेतील विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची मुभा दिली पाहिजे. शाळेमध्ये असे काही वातावरण निर्माण करावे लागेल की विद्यार्थी सातत्याने हात आणि मेंदू याचा वापर करतील. अर्थात कृतिशील उपक्रम मुलांना करायला मिळाला हवे. त्यातून त्यांना असंख्य प्रश्न पडतील त्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा ते स्वतःच शोधतील.

आपण सर्वांनी त्याच्या अवतीभवती जिज्ञासा, कुतूहल आणि प्रश्न निर्माण होतील असे इकॉ सिस्टीम म्हणजेच वातावरण निर्माण करायचे आहे. पहिले ही इकॉ सिस्टीम घरातून शाळेत, शाळेतून कॉलेज, कॉलेज ते विद्यापीठ आणि विद्यापीठातून संपूर्ण समाजात निर्माण व्हायला हवे. चला आजपासून शिक्षणात सृजनशीलतेला वाव देऊ. लहान मुलांच्या प्रत्येक निरर्थक प्रश्नांची उत्तरे देऊ कारण आइन्स्टाइन यांनी म्हटले आहे की The Important things is not to Stop Questioning.
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक

1 comment:

Unknown said...

Very nice and thoughtful writing as always

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...