Saturday 17 August 2019

जीवनासाठी जीवनातून शिक्षण देणारी ‘नई तालीम शाळा’


सन १९३७ मध्ये महात्मा गांधीनी म्हटले, होते कीनई तालीमशिक्षणपध्दती जगाला दिलेली आपली अखेरची आणि सर्वात मोठी देणगी आहे. महात्मा गांधी जेव्हा सेवाग्राम आश्रमात राहू लागले, तेव्हा त्यांनी ब्रिटीश कालीन शिक्षण पध्दती नाकारली स्वदेशी शिक्षणपध्दती आणण्यासाठी त्यांनी काही विचार मांडले. पुढे ते विचार नई तालीम किंवा बुनियादी  म्हणून ओळखले जावू लागले आणि भारतभर त्याचा प्रसार आणि प्रचार झाला. गांधीजीनी शिक्षणाची नवी व्याख्या बनविली. जीवनासाठी जीवनातून शिक्षण त्यांची ही जीवनाविषयाची संकल्पना अधिक व्यापक सर्वसमावेशक होती. महात्मा गांधीच्या नई तालीम या संकल्पनेला पुढे नेण्यासाठी शिक्षणतज्ञ . डब्ल्यू. आर्यनायकम यांनी शिक्षणशास्त्रातच न्यूयार्क विद्यापीठाची पी.एच.डीची पदवी घेतली होती आणि रविंद्रनाथ टागोरांच्या सहवासात शांतीनिकेतन मध्ये प्राध्यापक होते. .डब्ल्यू . आर्यनायकम यांनी खर्या अर्थाने नई तालीम शिक्षणपध्दती रुजविली. त्यांनी वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमातच  प्राथमिक शाळा सुरु केली. जी आता आनंद निकेतन म्हणून ओळखली जाते. आणि नुकताच या शाळेलाहेरीटेज स्कूलचा दर्जा मिळाला आहे.

   
जेव्हा मी या शाळेत भेट द्यायला गेलो होतो तेव्हा सरकारी खात्यामध्ये त्याची नोंद सुध्दा नव्हती पण मुख्याध्यापिका सुशमाताई यांनी या शाळेचे महत्व जगाला पटवून दिले. आणि ही शाळा भारतातील हेरीटेज स्कूल म्हणून एनसीईआरटी कडून घोषीत झाली मी जेव्हा वर्ध्याला या शाळेत गेलो तेव्हा या शाळेमध्ये बालसभा सुरु होती. दर आठवड्याला या शाळेत बालसभा भरविली जाते आणि विदयार्थी त्यांच्या समस्या तक्रारी सुचना त्यांना सांगतात. त्या लोकशाही पध्दतीने यावर उत्तरे शोधता. तुम्हाला कदाचित खोटे वाटेल पण जेव्हा गेलो होतो तेव्हा बालसभेत काही ताईंची (शिक्षकांची) तक्रार करत होते. सुशमा ताई त्यांना विचारत होते. की शिक्षक चुकले आहेत हे प्रथम दर्शनी लक्षात आले. तर तुम्हीच सांगा पुढे आपण काय केले पाहिजे?

   
यावरुन बालसभेतून तूम्हाला लक्षात आलेच असेल की ही शाळा आगळीवेेगळी प्रयोगशील शाळा आहे ज्या शाळेला गांधीजींच्या विचारांचा वारसा आहे या शाळेत शिपाई नाही विद्यार्थीच शाळा आणि शाळेचा परीसर स्वच्छ करतात. विद्यार्थी शेती करतात, वाफ्यांना पाणी देतात, चरखा चालवितात, सुत कताई करतात थोडक्यात महात्मा गांधी . डब्ल्यु आर्यनायकम यांचे बुनियादी शिक्षणाचे विचार अजून या शाळेत जीवंत आहेत. हे पाहून खूप आनंद झाला. नई तालीम मध्ये ज्ञान आणि काम हातात हात घालून चालतात. किंबहूना ते एकच आहेत. कामामुळे ज्ञान प्राप्त होते असे गांधीजीना वाटत होते. म्हणून गांधीजी नेहमी म्हणत ज्ञान काम यांच्यातूनच बुध्दीचा विकास होतो. हा जगातील सर्व शिक्षणतज्ञ, मानसोपचारतज्ञ, मज्जामानसशास्त्रज्ञ सांगतात की, मेंदूचा विकास अनुभवातून होत असतो. महात्मा गांधीनी स्वातंत्रपूर्व काळात हे सिध्द केले होते. म्हणून ते म्हणत नई तालीम ही माझी अखेरची सर्वात्तम जगाला देनगी आहे. आज वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमातील आनंदनिकेतन शाळा खर्या अर्थाने विद्यार्थी घडवत आहे. ही  शाळा मुलांना श्रमाचे महत्व पटवून देतेच. पण शिक्षणाचे आणि दैनंदिन जीवनाचे नातेही जोडून देते. मुक्त स्वातंत्र प्रेम आणि प्रत्येक विद्यार्थ्यावर कामाची जबाबदारी यातून या शाळेतला विद्यार्थी घडत आहे. गांधीजींच्या काळात जशी शाळा होती तशी आजही सांभाळली आहे. भरपूर झाडे, अंगण, प्रत्येकाचे शेत, कौलारु वर्गखोल्या सर्व शाळेत विदयार्थ्यांचे काम प्रदर्शित केलेले उत्साही शिक्षक असे वातावरण आहे.

   
या शाळेने जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अभय बंग, वासंती सौर असे अनेक दिग्गज व्यक्तिमत्व दिले. नाशिकचे मुर्तीकार स्वर्गीय गर्गे यांच्या पत्नी अरुणा गर्गे सुध्दा याच शाळेच्या माजी विद्यार्थीनी त्यांच्याशी बोलतांना त्यांनी असे सांगितले की, आम्हाला शिक्षक प्रत्येश अनुभवातून शिकवत असत. खरी राणी माशी घेवून येत. डासांची निर्मीती कशी होते. हे शिकवण्यासाठी शिक्षक बाटली मध्ये गटारीचे पाणी आणत त्यात अळी कशी बनत, कोश कसा बनतो त्यापासून डास कसे निर्माण होतात. हे प्रत्यक्ष शिकवायचे. वाचकाहो ५०-६० वर्षापूर्वी शिक्षक ज्या पध्दतीने शिकवत होते तोच वारसा आत्ताचे त्या शाळेतील शिक्षक चालवत आहेत.

मी गेलो तेव्हा मुले लसून सोलत होती. तर काही जण चिंचोक्याची मदतीने गणित शिकत होते. सुषमा ताई खर्या अर्थाने नई तालीम शिक्षण प्रणाली पुढे चालवत आहेत  याच शाळेकडून मी खादी निर्मीती आणि खादीच्या जास्त वापराचे महत्व समजवून घेतले. म्हणून इस्पॅलियर शाळेत सहावी सातवीला अंबर चरख्याचे प्रशिक्षण सुरु केले. सध्या या शाळेला सेवाग्राम आश्रम वर्धा, सर रतन टाटा ट्रस्ट मुंबई, ग्राममंगल, पुणे अशा विविध संस्था सहकार्य करतात.


ही शाळाआगळी वेगळी का?
  •      महात्मा गांधीजींच्या नई तालीम अंतर्गत शाळा.
  •      शाळेत श्रमाला महत्व
  •       विद्यार्थी विविध उत्पादक सर्जनशिल श्रम करतात. जसे शेती करणे, साफ सफाई करणे, शौचालय

·                         स्वच्छ करणे.
  •             अनुभवातून शिक्षण देणे
  •                     लोकशाहीचे धडे देणे
  •          शिक्षकांना ताई दादा संबोधणे.
  •          हेरीटेज स्कूल म्हणून मान्यता
  •          सर्व विद्यार्थी जवळच्या परीसरातील गरीब आणि मध्यम वर्गातील.
  •          जीवनासाठी जीवनातून शिक्षण देणारी शाळा.
  •          शाळेत विद्यार्थ्यांची ऐकमेकांशी तुलना केली जात नाही.
  •          गुणांमध्ये मुलांना अडकविले जात नाही.
  •          मातृभाषेतूनच शिक्षण.
  •          दर आठवड्याला सर्व विद्यार्थी एकत्रित स्वयंपाक करतात.
  •          मूर्तिकला, चित्रकला, विविध कला हे महत्वाचे विषय.

     सचिन उषा विलास जोशी 
शिक्षण अभ्यासक





No comments:

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...