Friday 11 October 2019

महात्मा गांधी यांची शिक्षण प्रणाली अर्थात नई तालीम


130 कोटी असलेल्या देशांमध्ये नोबेल विनर कमी, ऑलम्पिक मध्ये मिडल मिळवणारे कमी, शास्त्रज्ञांची संख्या बोटावर मोजण्याइतकी.. म्हणजे इतके कमी की जास्त शास्त्रज्ञ देणाऱ्या पहिल्या दहा देशांमध्ये भारत नाही. कारण या यादीत यायला किमान त्या देशाचे 100 शास्त्रज्ञ तरी लागतात. भारताचे फक्त दहा शास्त्रज्ञांची नावे या यादीत आहे. म्हणून म्हटले 130 कोटी लोकसंख्या देशांमध्ये आपण शंभर शास्त्रज्ञ सुद्धा निर्माण करू शकत नाही. याचे कारण ब्रिटिशांनी लादलेली शिक्षण पद्धती. "शिक्षण पद्धती" या शब्दांमध्ये 'पद्धती' हा शब्द फार महत्त्वाचा आहे. याला इंग्रजीमध्ये सिस्टीम म्हणतात. ब्रिटिश अधिकारी सिस्टीम लावण्यात माहिर होते. एकदा सिस्टीम लागली की ती तोडणे मुश्कील. म्हणून तर त्यांनी जगातल्या बहुतांश देशावर राज्य केले. ही सिस्टीम कशी तोडायची याचे सखोल ज्ञान महात्मा गांधी यांना होते. हिंसा करून स्वातंत्र्य मिळू शकतं नाही.. ब्रिटिशांची सिस्टीम तोडता येणार नाही.. म्हणून अहिंसा हे सूत्र स्वातंत्र्यासाठी त्यांनी वापरले. तसेच शिक्षणा बाबत होते. ब्रिटिशांना मेंदू न वापरणारे.. सांगू ते काम करणारे.. मनुष्यबळ हवे होते. म्हणून मेकॉले ने तशी शिक्षण पद्धती आणली. जी शिकेल सगळे पण विचार करू शकणार नाही. हे गांधीजींना माहिती होते म्हणून त्यांनी "नई तालीम" ही भारतीय शिक्षण प्रणालीची वैचारिक बैठक केली. त्याचे काही प्राथमिक प्रयोग केले. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर त्यांना या नई तालीम ची शिक्षण पद्धती आणायची होती.  जी शंभर टक्के भारतीय शिक्षण व्यवस्थेला धरून होती. पण आपले दुर्दैव की स्वातंत्र्यानंतर गांधी दंगली विझवण्यात अडकले आणि पुढे त्यांचा खून करण्यात आला. गांधी किमान पुढील दहा वर्ष जरी जिवंत राहिले असते तर आज भारताचे किमान शंभर शास्त्रज्ञ तरी असते. अशी नक्की काय होती नई तालीम शिक्षण प्रणाली? 
खरतर महात्मा गांधी यांची 151 वी जन्मशताब्दी आपण साजरे करतोय. महात्मा गांधी म्हटलं की मनामध्ये पहिले अहिंसा, शांती हे विचार येतात.. तर डोळ्यासमोर गांधीजींचे तीन माकडे येतात.. आपण सर्वजण समजतो की महात्मा गांधी यांची सर्वात उत्तम भेट ही "सत्याग्रह" आहे. हे खर आहे आहे की सत्याग्रह तूनच लोक तंत्राचा पाया मजबूत झाला पण सत्याग्रही सर्वोत्तम भेट नाही. मग महात्मा गांधी यांची सर्वोत्तम भेट कुठली?

टाइम मॅगझिनने विसाव्या शतकातला अद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणून गांधीजींना जाहीर केले. सत्याग्रहाच्या माध्यमातून भारताला स्वातंत्र्य देणारी महान व्यक्ती पण या व्यक्तीचे शिक्षणात का योगदान? आणि ते सत्याग्रह पेक्षा सर्वश्रेष्ठ कसे? 1938 साली महात्मा गांधी यांनी स्वतः काँग्रेस अधिवेशनात शिक्षणाचे विचार मांडले. हे मांडतांना स्वतः गांधीजी म्हणाले, "मी आज या देशात समोर आणि संपूर्ण विश्वास समोरच काही नवे विचार मांडण्याचा दावा करीत आहे. आत्तापर्यंत ज्या ज्या विचारांची देणगी जगाच्या चरणी अर्पण केली आहे त्यापैकी सर्वाधिक क्रांतिकारी आणि म्हणूनच अत्यंत महत्त्वपूर्ण असा विचार आहे. याहून अधिक मूल्यवान व महत्त्वाची अशी दुसरी कोणती देणगी मी जगासमोर ठेवू शकेल असे मला वाटत नाही. या विचारांमध्ये माझ्या सार्‍या रचनात्मक कार्यक्रमांना व्यावहारिक मूर्तरूप देण्याची क्षमता समावलेली आहे. ज्या प्रकारच्या नव्या जगासाठी माझी सारी धडपड चाललेली आहे ती यामधून निर्माण होऊ शकेल. हा माझा अखेरचा वारसा ठेवत आहे."

म्हणजे स्वतः महात्मा गांधींनी म्हटले आहे की ही माझी अखेरची सर्वोत्तम जगाला भेट आहे. या सर्वोत्तम भेटीचे नाव आहे "नई तालीम". महात्मा गांधी यांच्या शिक्षण प्रणाली त्यांनी नाव दिले नई तालीम म्हणजे नवे शिक्षण. खरंतर सर्वात प्रथम फिनिक्स आणि टेलस्टॉय आश्रमात गांधीजीने शिक्षणाचा विचार केला. आश्रमात राहणारे त्यांचे कार्यकर्ते, सत्याग्रही, अनुयायी त्यांच्या मुला-मुलींचे कळत नकळत शिक्षणाची जबाबदारी गांधीजींवर आली आणि आश्रमातच शिक्षणाचे प्रयोग सुरू झाले. तिथे त्यांना शाळा चालवल्या. भारतामध्ये गांधीजी जेव्हा आले तेव्हा ते म्हणाले, स्वतंत्र भारतासाठी शिक्षण सुद्धा स्वतंत्र हवे आणि त्यासाठी त्याचे स्वरूप कसे असावे यासाठी वर्धा मध्ये शिक्षण परिषद बोलवली गेली. जमनालाल बजाज यांनी याचा पुढाकार घेतला. या शिक्षण परिषद मध्ये जाकीर हुसेन, आचार्य विनोबा भावे, आचार्य काकासाहेब कालेलकर, जगतराम देवीप्रसाद आणि शिक्षणातली अतिशय महत्त्वाची व्यक्ती ई. डब्ल्यू. आर्यनायकम आणि आशादेवी. यांनी त्याकाळी लंडनमध्ये शिक्षण शास्त्र मध्ये पीएचडी केली होती. ते जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा पासून रवीनं रवींद्रनाथ टागोर सोबत शांतिनिकेतन संपूर्ण काम पाहत होते. या शिक्षण परिषदेचे मुख्य नेतृत्व करत होते महात्मा गांधी. 1938 मध्ये त्यांनी नई तालीम चा विचार मांडला.

महात्मा गांधी यांचा नई तालीम हा काय शिक्षण विचार होता? नक्की महात्मा गांधी यांनी शिक्षणाची काय व्यवस्था जगाला दिली? आजच्या एकविसाव्या युगातील सर्व प्रश्नांची उत्तरे गांधीजींच्या शिक्षण प्रणालीमध्ये आहे का? याचे उत्तर समजण्याची कींवा नई तालीम समजून घेण्याआधी आजच्या शिक्षणाची काय अवस्था आहे ते समजून घेतले पाहिजे. नॅशनल एम्पलोयाबिलिटी रिपोर्ट ऑफ इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट सर्व्ह रिपोर्ट सांगतो की, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल शाखेतील फक्त ७% विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त होण्याची साठी लागणारे स्कील कौशल्य कला अवगत आहे. 93 टक्के विद्यार्थी इंजिनिअर होतात पण इंजिनिअरिंग केल्यानंतर जे कौशल्य यायला हवे ते येतच नाही. भारतामध्ये पंधराशे हून अधिक इंजिनिअरिंग कॉलेज आहे.. दरवर्षी चार लाखांहून अधिक इंजिनीयर बाहेर पडतात पण वर्ल्ड क्लास टायलेंट म्हणून ज्यांची निवड व्हायला हवी यांची संख्या वीस ते पंचवीस हजार विद्यार्थ्यांची आहे. एवढ्या वाईट परिस्थिती मध्ये भारताचे तरुण आहेत. इंडस्ट्रीमध्ये इंजिनीयरला जॉब नाही असे नाही पण ज्या कॉलिटी चे विद्यार्थी हवे ते मिळत नाही. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती नाही.. विधायक विचार नाही.. नवं असं काही करण्याची हिम्मत नाही.. कारण आपली शिक्षण पद्धती नवा असा कुठलाच विचार मांडत नाही. कारण "घोका आणि ओका" ही आपली शिक्षण पद्धती झाली आहे. 21 अपेक्षित, गाईड यामधून रेडीमेड उत्तरं परीक्षेच्या आधी पाठ करायची आणि परीक्षेच्या दिवशी ते उतरवायचे आणि परीक्षा झाली की विसरायचे. ते रोजच्या व्यवहारात कुठे वापरले जाते याची कसलीही तसदी घेत नाही. या सगळ्यातून स्मृतीकेंद्रित शिक्षण पद्धती निर्माण झाली. महात्मा गांधी यांच्या नई तालीम मध्ये स्मृतीकेंद्रित शिक्षण मुळीच नव्हते. नई तालीम संपूर्ण पाया हा अनुभवातून शिक्षण यावर होता.

"एज्युकेशन फोर लाइफ एज्युकेशन थ्रू लाइफ", ही नवी व्याख्या महात्मा गांधी यांनी शिक्षणाला दिली. गांधी यांचे दोन गोष्टी वर खूप भर होता.. एक राष्ट्राचे मूलभूत गरजा भागवेल तसे शिक्षण आणि शिक्षणात विद्यार्थ्यांना स्वावलंबन हे शिकवलेच पाहिजे. समाजाला उपयोगी पडेल असे कुठलेही काम हे शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या हाती असले पाहिजेत असे त्यांचे विचार होते.

शिक्षणात शारीरिक श्रमाला प्रचंड महत्त्व त्यांनी दिले. मुलांनी रोजच शारीरिक श्रमाची कामे करावी.. मग त्यामध्ये बागकाम, फळ झाडांची देखभाल, स्वयंपाकाच्या कामात मदत, लाकूड तोडणे, खड्डे करणे, सुतारकाम, डोक्यावरून ओझी वाहणे असे बरेच काम शिक्षणात असावी. आता तुम्ही म्हणाल की शेतीकाम बांधकाम सारखे कामे मुलांनी का करावे? किंवा स्वाबलंबन ला गांधीजीने एवढे महत्त्व का दिले? तर आजचे बाल मानसशास्त्र सांगते की मुलांचा मेंदू घडतो कसा..मुलं शिकतात कसे..

एकविसाव्या शतकातला शिक्षण-क्षेत्रा मधला सर्वात मोठा शोध हा आहे की, लहान मुलांचा मेंदूचा विकास कसा होत असतो? पहिल्या बारा वर्षांमध्ये त्यातही पहिल्या आठ वर्षांमध्ये लहान मुलांच्या मेंदूची जडणघडण होत असते. बारा वर्षानंतर किमान पाचशे मिलियन मज्जापेशी या नष्ट पावतात. जितक्या जास्त मज्जापेशी जिवंत राहतील, सर्व मज्जापेशी यांची एकमेकांशी जेवढी खट्ट जुळणी होईल, त्यांच्यात सिन्याप्स निर्मिती होईल.. तेवढे बाळाचे विविध क्षमता विकसित होतील. तेवढे बाळ अधिक बुद्धिमान बनेल. सर्वात महत्त्वाचे ही जुळणी बालवयातच होत असते. ही जोडणी होते कशी तर लहानपणी त्याला किती विविध अनुभव मिळतात आणि त्याहूनही महत्त्वाचे हे सर्व अनुभव पाच इंद्रियांद्वारे तो किंवा ती कसे घेते म्हणजे लहान मुलं लहानपणी जेवढे विविध कामे करतील अर्थातच अनुभव येतील तेवढे त्याच्या मेंदूला स्टीमुलेशन मिळेल व त्यातून विविध मज्जापेशी घट्ट जुळणी होईल. महात्मा गांधी आपल्या आपल्याला ऐंशी वर्षांपूर्वी म्हणाले की मुलांना स्वावलंबन शिकवा.. बागकाम, शेतीकाम शिक्षणाचा भाग असुद्या. थोडक्यात मुलांच्या मेंदूचा विकास यातून होतो. बागकाम शेती काम हे त्यांनी दिलेली उदाहरणे आहेत. स्वावलंबन या शब्दात सर्व अनुभव हे येतात.

गांधीजी म्हणतात पहिला आठ वर्षात मुलांना स्नायू विषयक शिक्षण असावे आणि ते शिक्षणातील तज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखाली व्हावे. याचा अर्थ बालवाडीला ज्या शिक्षणा शिक्षका हव्या त्या ट्रेन उच्चशिक्षित हव्यात कारण पहिले आठ वर्ष हे व्यक्तिमत्त्वाचा पाया पडण्याची असतात. भारतामध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिकवायला उच्चशिक्षित असतात आणि बालवाडीला बारावीचे पास शिक्षक.. जपान, फिनलँड या सर्व देशात प्री-प्रायमरीच्या शिक्षकांना सर्वात जास्त पगार सन्मान असतो. ते उच्चशिक्षित, बालमानसशास्त्र तज्ञ असतात. गांधीजींनी असे शिक्षक अपेक्षित होते.

गांधीजीं पुढे म्हणतात की शिक्षणाचा निसर्गाशी आणि जीवनाशी सुसंवादी व घनिष्ठ संबंध असता पाहिजे. शेतीशी जोडले न गेलेले जीवन अपूर्ण होय. या शिक्षण तत्त्वाची सध्या तर खूपच आवश्यकता आहे. जीवनाच्या प्रश्नांना जी भिडते ते शिक्षण. आता सि.बी.एस.ई बोर्डाने लाईफ स्किल नावाचा सब्जेक्ट काढला आहे. गांधीजी हे सर्व 80 वर्षा पूर्वीच सांगत होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी रुद्र स्वरूप धारण केले कारण शेती हा विषय शिक्षणात नाही त्यामुळे शेतकऱ्यांबद्दल आपुलकी संवेदना नाही. शेती विषयाने मुलांचे मेंदू मज्जापेशी सर्वात जास्त विकासीत होतात.

आज आपण इमोशनल कोशन (EQ), सोशल कोशन (SQ) या संकल्पना वर चर्चा करतो ते नई तालीम मध्ये आधीच सर्व समावेश केले आहे. नई तालीम हे नवे शिक्षण आहे म्हणून गांधी म्हणतात काळ जसा बदलेल तसा याचा ढाचा बदलणे आवश्यक असेल. म्हणजे गांधी कधीच म्हणत नाही की नई तालीम चे शिक्षण हे एक कायमस्वरूपी ठेवा. ते त्या-त्या शतकांच्या गरजांनुसार बदलत गेले पाहिजे विज्ञान आणि अध्यात्म याची त्याला जोड असणे आवश्यक आहे. आज गांधी अवतरले असते तर कदाचित त्यांनी हातात चरखा नसता दिला वेगळे काही साधन हातात दिले असते. जे आजच्या काळाला अनुरूप असेल. शिक्षणात सतत प्रयोग होत राहिले पाहिजे यावर त्यांची श्रद्धा होती. गांधीजी म्हणतात नई तालीम हे शिक्षण अहिंसे चे शिक्षण आहे. स्वातंत्र आणि सहकार हा त्याचा पाया आहे. ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांन मध्ये स्पर्धा लागली आहे की त्या स्पर्धेमधून विद्यार्थी नैराश्यामध्ये जात आहे. एकमेकांचा द्वेष करत आहे. कारण स्पर्धेमधून कधीच प्रेम निर्माण होत नाही.. निर्माण होते ते फक्त द्वेषभावना. सहकार ही भावना एकविसाव्या शतकातील पहिल्या पाच कौशल्या मधली आहे. ज्यानंच्यामध्ये ही भावना कौशल्य असेल त्याला सर्वात जास्त पगाराची नोकरी मिळेल असे विविध रिपोर्ट सांगतात. नई तालीम मध्ये असे बरेच तत्व आहे की जे एकविसाव्या शतकातील प्रत्येक प्रश्नांवर उत्तर आहे.

गांधींचा आग्रह होता तो म्हणजे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कुठल्या तरी एका ग्रामीण हस्त उद्योगाशी जोड दिली पाहिजे.. शिकवले पाहिजे.. आज आपण सर्वजण प्रक्टिकल ट्रेनिंग जे म्हणतो किंवा विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी जे शिक्षण लागते ते शाळेपासूनच असले पाहिजे असा त्याचा अर्थ होतो.
महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांचे शिक्षणाचे माध्यम कुठले असावे यावर वैचारिक मतभेद होते. रवींद्रनाथ टागोर यांचा आग्रह असायचा की मातृभाषेतून शिक्षणाचे माध्यम असावे तर महात्मा गांधी याला पूर्णतः सहमत नव्हते. महात्मा गांधी स्वतःलाच प्रश्न विचारतात की ज्ञान मिळवण्याचे माध्यम कुठले असते? त्यांनी माहिती आणि ज्ञान यात फरक केला आणि त्यांनी या प्रश्नाचे उत्तर स्वतः दिले. ज्ञान हे अनुभवातूनच मिळते त्यामुळे शिक्षणाचे माध्यम हे अनुभव असले पाहिजे. मग भाषा ही तुम्ही कुठलीही वापरा. ते म्हणायचे की इंग्रजी ही इतर भाषां सारखीच एक भाषा म्हणून शिकवावी.

थोडक्यात काय महात्मा गांधी यांनी पुस्तकाचा संबंध रोजच्या व्यवहाराशी जोडला. श्रमनिष्ठा हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी शिक्षणात आणला. नई तालीम चे बरेच शिक्षण तत्व आहे त्यातील महत्त्वाचे तीन-चार तत्वे आणि मुद्दे मी या लेखात मांडले आहे. पण या सर्व तत्वांचा सार हा आहे की विद्यार्थ्यांना अनुभवातून शिक्षण द्यावे. जीवनातल्या सर्व प्रश्नांना ते भिडणारे हवे. श्रमनिष्ठा, अहिंसा, सहकार हे मूल्य मुलांमध्ये रुजावे.

आता प्रश्न येत असेल जर हे सर्व त्यांनी सांगितले मग ते शिक्षण धोरणांमध्ये का नाही आले? २००५ च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये हे सर्व समावेश आहे, त्या आधीच्या ही शैक्षणिक धोरणांमध्ये आहे तसेच या नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये सुद्धा अनुभवाधारित शिक्षण पद्धती असावी याच्यावर लक्ष केंद्रित केले पण तरी हे सर्व व्यवहारात का येत नाही? कारण आपण एक गोष्ट विसरतो की, ती म्हणजे ब्रिटिशांनी आपल्यावर दीडशे वर्षे राज्य केले.. त्याचे महत्वाचे कारण ब्रिटीश सिस्टीम बसविण्यात अतिशय कुशल होते. त्यांनी शिक्षणाचे अशी पद्धती बसवली किती आपण तोडु शकत नाही आहे. त्यांना डोकं वापरणारे, डोकं चालवणारे नको असल्याने त्या पद्धतीची शिक्षण पद्धती आपल्यामध्ये रुजवली. ती इतकी इतकी घट्ट रुजली आहे की स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली तरीही ती आपण मोडीत काढू शकत नाही. अजूनही "घोका आणि ओका" याच पद्धतीने शिकवले जाते. आता घोका आणि ओका हे आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांमध्ये मुळीच नाही तरीही शाळां शाळांमध्ये कॉलेजमध्ये असे शिकवले जाते कारण ब्रिटिशांनी लावून दिलेली सिस्टीम ती आपण तोडण्या मध्ये असमर्थ ठरलो आहे. ती तोडून आज खऱ्या अर्थाने अमलात आणू शकणारे महात्मा गांधी होते.

स्वातंत्र्य मिळाल्यावर ते म्हणाले होते स्वतंत्र भारतासाठी स्वतंत्र शिक्षण हवे. ते त्यावर काम सुरूच करणार होते पण त्यांची १९४८ ला हत्या करण्यात आली. नई तालीम चे प्रयोग सर्वदूर पसरले नाही. गांधीजींच्या हत्येने भारताच्या असंख्य पिढ्यांचे नुकसान झाले. शिक्षणात आपण मागे पडलो. जगातील सर्वात उत्तम शिक्षण पद्धती ही फिनलँड देशाची मानली जाते. त्या देशाचे शिक्षण तत्त्वे जर तुम्ही अभ्यासले तर ते सर्व तत्त्वे नई तालीम या महात्मा गांधीजींच्या शिक्षण तत्त्वाशी मिळतेजुळते दिसतील. यावर आपल्याला अंदाज येऊ शकतो की महात्मा गांधी यांची नई तालीम शिक्षण प्रणाली किती परिणामकारक होती. अजूनही वेळ गेली नसून नई तालीम चे प्रयोग शाळाशाळांमध्ये व्हायला हवे.
ज्यांना कोणाला नई तालीम या महात्मा गांधीजींच्या शिक्षण प्रणाली बद्दल अधिक समजून घ्यायचे असेल तर ज्येष्ठ शिक्षणतज्ञ रमेश पानसे सरांचे यावरील ग्रंथ जरूर वाचावे. एकविसाव्या शतकातील शिक्षणाचे सूत्र नई तालीम मध्येच आहे असं मला वाटतं.

सचिन विलास जोशी
शिक्षण अभ्यासक

No comments:

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...