Saturday, 28 August 2021

या 'कोव्हिड ' मध्ये सर्वांत जास्त नुकसान कोणाचं झालं?

सकाळ वृत्तपत्रांमधील शिक्षण अभ्यासक सचिनच्या विलास जोशी यांचा लेख

कोव्हिड-19 ही जागतिक महामारी आली आणि त्याचा परिणाम सर्व मानवजातीवर, सर्व क्षेत्रावर, जगातील प्रत्येक देशावर झाला. जेव्हा आपण याचा परिणामाची चर्चा करतो तेव्हा प्रत्येकाला वाटतं की, माझ्या व्यवसायावर.. माझ्या कुटुंबावर.. माझ्या जॉबवर.. माझ्या उत्पन्नावर जास्त परिणाम झाला आहे. दुकानदार म्हणतो , दुकान बंद होतं म्हणून तोटा, कंपनीवाले म्हणतात , सर्व स्टाफला कामावर बोलवता येत नाही म्हणून तोटा, शाळा संस्थाचालक म्हणतात, शाळा बंद म्हणून तोटा, पर्यटन बंद म्हणून टूर्स कंपनीवाले तोट्यात. प्रत्येक जण पैशाचं नुकसान सांगतोय. ते अगदी खरं आहे.. पण कोणी मानसिक नुकसानीबाबत चर्चा करत नाही. काही जण म्हणतील की कुटुंबामध्ये ताण तणाव वाढलेला दिसतोय.. एंग्जाइटीचं प्रमाण वाढलं, एकूणच सामाजिक स्वास्थ सुद्धा बिघडलं आहे.. पण तरीही सर्वात जास्त नुकसान मला हे वाटत नाही.
आर्थिक तोटा कसाही भरून काढता येतो, गेलेली नोकरी परत मिळू शकते, तोट्यामधील व्यवसाय पुढील पाच वर्षात फायद्यामध्ये आणता येऊ शकतात, सामाजिक स्वास्थ्याबाबतीत सुद्धा लोकांची वाढलेली एंग्जाइटी, ताण-तणाव याला समुपदेशनाने आणि योग्य ट्रीटमेंटने सुरळीत करता येऊ शकतं. "हॅपिनेस इंडेक्स" वाढवता येऊ शकतो.. पण एक क्षेत्र असं आहे , त्याचं नुकसान ना मोजता येतं ना आपण भरून काढू शकतो. या कोव्हिड-19 मुळे सर्वात जास्त नुकसान कोणाचं झालं असेल तर ते म्हणजे 0 ते 8 वर्षाखालील मुलांचं.
शून्य ते आठ हे वय बाल मेंदू जडणघडणीचं वय असतं. आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा पाया पहिल्या आठ वर्षातच घातला जातो. जशी बिल्डिंग उंच आणि भक्कम दिसते कारण तिचा पाया तेवढाच भक्कम आणि खोल असतो..तसाच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा पाया हा पहिल्या सहा ते सात वर्षातच घातला जातो. म्हणूनच जगातील सर्व मानसशास्त्रज्ञ सांगतात की या वयात मुलं जे काही ऐकतात, पाहतात, अनुभवतात त्यातून त्यांचं भावनिक आणि मानसिक स्वास्थ्य ठरत असतं.

आता या दोन वर्षात या वयोगटातील मुलं घराच्या बाहेर पडली नाही. त्यांनी विविध अनुभव घेतले नाही. खेळ खेळले नाही.. त्यामुळे त्यांच्या बाल मेंदूच जडणघडणीवर कायमचा परिणाम झाला आहे. वर वर हे मूल आनंदी आणि स्वस्थ दिसत असलं तरी मेंदूच्या पातळीवर पेशींचा विकास कमी पडला आहे. खेळण्यातून, उड्या मारण्यातून, मित्रमैत्रिणींशी सोबत मैदानी खेळातून पेशींना जी चालना मिळते त्यातून सिनॅप्सची निर्मिती होत असते. मेंदूमध्ये जितके जास्त सिनॅप्स बनतील तेवढे भविष्यात ते मूल भावनिक, मानसिक आणि शारीरिक पातळींवर सुदृढ होतं.. सोप्या भाषेत हुशार होतं. 

छोटं उदाहरण देतो, आपल्या मेंदूचे तीन भाग असतात. लेफ्ट हेमिस्फिअर, राइट हेमिस्फिअर आणि मध्ये असतो कॉर्पस कॅलोसम. पहिल्या आठ वर्षात हा कॉर्पस कॅलोसम विकसित होतो. मुलं जेवढं मुक्त खेळतील, उड्या मारतील, पळतील, धावतील मैदानावर मनसोक्त खेळतील तेवढा हा कॉर्पस कॅलोसम ताकदवान बनतो, त्याचा विकास होतो. या कॉर्पस कॅलोसम काम तेव्हा सुरू होतं जेव्हा आपण वयाची "साठी" गाठतो. म्हातारपणी चालताना तोल सांभाळायचं कार्य कॉर्पस कॅलोसम करतो. जो विकसित पहिल्या आठ वर्षाच्या आत होतो. याचा अर्थ या वयोगटातील मुलांवर किती दूरगामी परिणाम झाला आहे याचा हा नमुना. 

या वयात मुलं ग्रुपमध्ये खेळतात, विविध अनुभव घेतात.. त्यांच्यातून त्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेचा पाया घातला जातो. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता (E.Q) वाढलेली हवी. पण मुलं या सगळ्यांपासून वंचित आहेत. प्राथमिक शाळेतील मुलं म्हणजे इयत्ता तिसरी- चौथीपासून पुढील सर्व विद्यार्थ्यांचा लर्निंग लॉस होतोय, जो पुढे भरून काढता येऊ शकतो. त्यांच्या सामाजिक भावनिक बुद्धिमत्तेचं एवढं नुकसान नाही. पण शून्य ते आठ वर्षाच्या मुलांचा लर्निंग लॉस तर आहेच ,सोबत पायाच तकलादू बनतो आहे. मेंदूची जडणघडण याचा हा काळ निघून जात आहे. त्यामुळे या कोव्हिड-19 मुळे सर्वात जास्त नुकसान या वयोगटातील बालकांचं झालं. पूर्वप्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचं झालं. या मुलांना ऑनलाइन शिक्षणसुद्धा आपण परिणामकारक नाही देऊ शकत. हे मर्यादित स्वरूपाचं द्यावं लागतं. अतिरिक्त स्क्रीन टाईममुळे या वयातील मुलांची कल्पनाशक्ती नष्ट होण्याची शक्यता आहे. 

मग प्रश्न हा आहे की अशा परिस्थितीमध्ये काय करू शकतो? आपल्या हातात हे नुकसान कमीत कमी कसं करता येईल हे पाहणं एवढंच आहे. त्यासाठी पालकांनी जबाबदारी घेणं गरजेचं आहे. पालक म्हणजे आई आणि वडील दोघांनी मुलांना ठरवून किमान दोन तास क्वालिटी टाइम द्यावा. ज्यामध्ये मोबाईल बाजूला ठेवून एक तास विविध गोष्टींचे अनुभव देणं. यामध्ये हाताने करायचे उपक्रम हे जास्तीत जास्त असतील आणि किमान एक तास मुलांना मनसोक्त खेळू देणं, उड्या मारण्यापासून ते धावणं लपाछपी खेळण्यापासून ते सायकल चालवणं असे अनेक शारीरिक खेळ मुलांसोबत खेळणं खूप महत्त्वाचं आहे. या बिकट काळातही पुढच्या पिढीचं भविष्य आपणच घडवायचं आहे, ती आपलीच जबाबदारी आहे.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


Saturday, 21 August 2021

सुचतं कसं?

प्रत्येकाने वाचावा असा शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रातील लेख

'सुचणं' ही एक जन्मजात असणारी कला आहे का? की ती ठरवून विकसित करता येते? 

आजचं शास्त्र छातीठोकपणे सांगतं की सुचणं ही कला आहे जी विकसित केली जाते. 

मग प्रश्न निर्माण होतो ती केव्हा विकसित करता येते?

तर, ती वयाच्या कुठल्याही टप्प्यावर विकसित करता येते पण जर लहानपणी पालकांनी जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेकडे लक्ष पुरवलं असेल, त्यांना त्यासाठी वाव दिला असेल तर मोठेपणी सुचण्याची प्रक्रिया अधिक जलद गतीने होते. सर्वांत महत्त्वाचं त्या सुचण्यामध्ये नावीन्य असतं.

कोणतीही समस्या विविध पद्धतींनी सोडवण्यासाठी विविध उत्तरं शोधण्याचं सामर्थ्य या नावीन्यामुळे मिळतं. 

त्यासाठी लहानपणापासूनच शोधक वृत्ती निर्माण करायला आणि व्हायला हवी. तर सुचण्याचा उपयोग प्रश्न सोडवण्यासाठी करता येऊ शकतो. 

सुचणं म्हणजे जगताना विविध समस्या सोडवण्यासाठी लागणाऱ्या कल्पना..आयडिया.. सृजनात्मक विचार आणि बरंच काही.. 

आता एखादा विचार जेव्हा सुचतो तो तुमच्या बुद्धीची किंवा मेंदूची जडणघडण कशी झाली त्यानुसार. त्या जडणघडणीमधून तुमच्या विचारांची व्याप्ती..खोली कळते. तुम्ही लहानपणापासून किती अनुभव घेता.. त्या अनुभवात किती समृद्धी आहे.. तुम्ही किती पुस्तकं वाचता.. कोणत्या प्रकारची वाचता.. तुम्ही किती मनमोकळं व्यक्त होता.. चर्चा करता.. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुमचा जीवनाकडे, लोकांकडे, स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे..त्यानुसार तुम्हाला 'सुचतं'. 

सुचतं सगळ्यांनाच. पण त्या सुचण्यामध्ये विचारांची खोली किती.. समस्या सोडवण्याची ताकद किती.. आणि वास्तवाला धरून किती.. याची मोजपट्टी महत्त्वाची असते.

जे पालक लहानपणी त्यांच्या पाल्यावर जाणीवपूर्वक मेहनत घेतात, त्यांच्या विचारांवर काम करतात.. त्यासाठी त्याला/तिला विविध गोष्टी वाचून सांगतात, अभिव्यक्ती होण्यासाठी चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देतात, भावना व्यक्त होतील असं घरात खेळीमेळीचं वातावरण ठेवतात, पाच इंद्रियांचे विविध अनुभव देतात, त्यासाठी निसर्गाशी नातं जुळवतात, घरात वाचनसंस्कृती रुजवतात अशा घरातील मुलं अधिक समृद्ध पद्धतीने वाढतात. मोठेपणी ही समृद्धी 'सुचण्या'तून व्यक्त होते. 

या सुचण्याचा शत्रू जर कोणी असेल तर अतिरिक्त स्क्रीन टाईम. 

या स्क्रीन टाईममधून येणारी जास्तीची बिनकामाची माहिती आणि जगण्यातला ताणतणाव. या दोन्ही गोष्टींमुळे आपल्याला लवकर सुचत नाही. 

कम्प्युटरच्या भाषेत बोलायचं झालं तर आपला मेंदू हँग होतो. 

जसे मोबाईलवर खूप सारे अँपलिकेशन बँकेण्डला चालू राहिले की मोबाईल स्लो होतो.. तसं आपल्या मेंदूवर सातत्याने माहिती आदळत राहिली, मग ती फिल्म असो, युट्यूब व्हिडिओ असो, फेसबुक.. व्हाट्सअँप.. व्हिडिओ गेम..नेटफ्लिक्सपासून तर सातत्याने झूम वेबिनार असो..या सर्व माहितीमधून आपल्या उपयोगाची माहिती कोणती आणि बिनकामाची कोणती हे मेंदूला ठरवावं लागतं. या सर्व क्रियांमध्ये मेंदू थकतो. थकल्यावर त्याला झोपेची आवश्यकता असते. 

पण झोपेची सवत जर कोणी असेल ती म्हणजे स्क्रीन.

म्हणजे एकीकडे आपली, मुलांची सर्वांचीच झोप कमी होते. त्यात अतिरिक्त माहितीच्या जाळ्यांमध्ये आपला मेंदू अडकतो म्हणून तो हँग होतो. याचे दूरगामी परिणाम म्हणजे नैराश्य, उत्साहाची कमी, चिडचिडेपणा, मुलांबाबत एडीएचडी.. असं सर्वकाही चालू होतं. 

असं व्हायला नको असेल तर मुलांचा, आपला, सगळ्यांचाच स्क्रीन टाईम कमी व्हायला हवा. मुलांचा शाळेपुरता स्क्रीन टाईम ठेवावा. त्यानंतरचा अतिरिक्त स्क्रीन टाईम कमी करावा. मोठ्यांनी सोशल मीडियावर केव्हा जायचं.. त्याचा वेळ.. त्याचं टाईमटेबल करावे. अतिरिक्त स्क्रीन टाईम होत नाही ना याचं भान पालकांनी स्वतः बाळगणं अत्यंत गरजेचं आहे कारण याचा संबंध प्रत्यक्ष आपल्या विचारप्रक्रियेशी आहे.. सुचण्याशी आहे.. सुचणं अधिक जलद आणि नावीन्यपूर्ण असण्याशी आहे. 

ही क्रिया अधिक उत्तम व्हावी असं तुमच्याबाबत आणि आपल्या पाल्याबाबत वाटत असेल तर मुलांना विविध अनुभव द्या, निसर्गाशी नातं जुळवा, विविध कला सोबतीला द्या, विविध पुस्तकं वाचायला द्या, गोष्टी स्वतः वाचा, त्यांना वाचायला द्या. त्याकरता स्वतःसाठी आणि मुलांसाठी वेळ काढा. या सगळ्यातून मुलांची विचारप्रक्रिया अधिक चांगली होईल आणि भविष्यात त्यांना जलद, नावीन्यपूर्ण आणि सृजनात्मक सुचेल.

टीप: कोविडमुळे तुम्ही मुलांना भरपूर वेळ दिला आहे पण स्वतःला प्रश्न विचारा या वेळेमध्ये 'क्वालिटी टाईम' किती होता? आणि त्यात आपण स्क्रीनच्या किती आहारी गेलो? 

सचिन उषा विलास जोशी 

शिक्षण अभ्यासक



Sweden Scales Back on Screens in Education, While India Leans In: A Tale of Two Systems

Sweden Scales Back on Screens in Education, While India Leans In: A Tale of Two Systems By Sachin Usha Vilas Joshi, Education activists  For...