Monday, 16 May 2022

शिक्षकांचे शिक्षक: जे.पी.नाईक

सकाळ वृत्तपत्रांमधील शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा जागतिक विचारवंत, शिक्षणतज्ञ जे. पी नाईक यांच्यावरील लेख

भारतीय स्वातंत्र्यासाठी गांधीजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या सत्याग्रहाच्या चळवळीत अनेकांनी तुरुंगवास सोसला. पहिल्या दर्जाचे विद्यार्थी म्हणून नावलौकिक असलेल्या जे.पी. नाईकांना तत्कालीन इतर विद्यार्थ्यांप्रमाणे आय.सी.एस. होण्याचा मार्ग मोकळा होता, ते आय.एस अधिकारी सहज होऊ शकत होते. मात्र तो सुखाचा मार्ग त्यांनी स्वीकारला नाही. त्यांनी सत्याग्रहाच्या चळवळीत उडी घेतली. त्यांनी तुरुंगवास भोगला. अन्याय सहन करणं त्यांच्या रक्तातच नव्हतं. गांधीजींच्या सत्याग्रहाच्या चळवळीचं त्यांना आश्चर्य वाटलं नसतं तरच नवल.


5 सप्टेंबर 1907 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी या आडगावी त्यांचा जन्म झाला.

ज्यांच्या नावे शिक्षकदिन साजरा केला जातो त्या माननीय माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मही 5 सप्टेंबर रोजीचाच; हा एक योगायोगच म्हणावा लागतो. राधाकृष्णन यांचा वाढदिवस ‘शिक्षकदिन’ म्हणून साजरा करण्याची शिफारसही जे.पी. नाईक यांनीच केली होती.

लहानपणी कौटुंबिक दारिद्र्य आणि मागास परिसर यांचा सामना जे.पीं. ना करावा लागला. वयाच्या पाचव्या वर्षांपासून त्यांनी शेती, गुरं चारणं, मोलमजुरीची कामं केली आहेत. बालपणातल्या या अनुभवांचा खोल ठसा त्यांच्या मनावर आयुष्यभर उमटलेला राहिला. सातव्या वर्षी बहिरेवाडीच्या चौथीपर्यंतच्या शाळेत त्यांना दाखल करण्यात आलं.

अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे त्यांनी चार वर्षांचा अभ्यासक्रम दोन वर्षांतच पूर्ण केला. विलक्षण बुद्धिसामर्थ्य आणि प्रचंड मेहनतीची तयारी ही त्यांची वैशिष्ट्य होती; आणि ती आयुष्यभर चढत्या आलेखानिशी सिद्ध होत आलेली आहेत.

दरम्यान त्यांच्या मेहुण्यांनी या मुलाची असामान्य हुशारी ओळखली आणि त्याला आपल्याकडे नेलं. बेळगावजवळच्या बैलहोंगल गावातल्या शाळेत पाचवीत दाखल केलं. ती कानडी माध्यमाची शाळा होती. ही भाषा तर याच्यासाठी पूर्ण नवीन. मात्र जिद्द नि बुद्धिमत्ता यांच्या जोरावर जे.पी. कानडी शिकले, कानडीतून परीक्षा दिली आणि पहिला नंबर पटकावला. इतकंच नाही, तर तो शेवटपर्यंत टिकवला. माध्यमिक शिक्षण त्यांनी बेळगावला पूर्णवेळ नोकरी करून घेतलं. मॅट्रिक परीक्षेत संस्कृतचं 'अखबारनवीस' पारितोषिक मिळवलं. 1927 मध्ये इंटर परीक्षेत फर्स्टक्लास.1929 मध्ये गणित विषय घेऊन बी.ए. (ऑनर्स) पदवी त्यांनी प्राप्त केली. राजाराम कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून काम केलं. नंतर सरकारी नोकरी सोडून असहकाराच्या चळवळीत झोकून दिलं. तेव्हा भूमिगत असताना त्यांनी जयंत पांडुरंग नाईक हे नाव घेतलं. त्यांचं जन्मनाव होतं-विठ्ठल हरी घोटगे.

1932 ला ते तुरुंगातून बाहेर आले तेव्हा त्यांनी धारवाडला मागासवर्गीयांसाठी प्राथमिक शाळा काढली. जे.पी. यांचे शिक्षणविषयक विचार खूप प्रभावी आणि संशोधनातून सिद्ध झालेले होते. बी.जी. खेर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई प्रांतात 1937 मध्ये काँग्रेसचे सरकार आल्यावर त्यांना शैक्षणिक क्षेत्रातल्या कल्पक विकासासाठी आमंत्रित करण्यात आलं. जे.पीं.नी भारतातल्या प्राथमिक शिक्षणावर मूलभूत संशोधन केलं. शासकीय कमिटीचे अहवाल लिहिले. शैक्षणिक इतिहास लिहिण्याची तयारी केली. त्यांनी ब्रिटिश काळातील भारतीय शिक्षणाचा सहाशे पृष्ठांचा चिकित्सक इतिहास लिहिला. 7 जून 1943 ला तो मॅकमिलन कंपनीने प्रसिद्ध केला. जागतिक  पातळीवर तो अहवाल महत्त्वाचा ठरला.

जे. पी नाईक यांनी स्वतंत्र भारताच्या शिक्षणाचं धोरण आणि स्वरूप यावर संशोधन करण्यासाठी 1 जानेवारी 1948 रोजी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन या संस्थेची मुंबईत स्थापना केली. शिक्षण मंत्रालयाने त्यांच्या साहाय्याने एन. सी.इ.आर.टी आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड अडमिनिस्ट्रेशन या संस्था स्थापन केल्या.

नाईकसाहेबांचं शिक्षणक्षेत्रातलं वैचारिक योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. भारतीय शिक्षण आयोगाची गरज त्यांनीच तत्कालीन शिक्षणमंत्री बॅरिस्टर छागला याना पटवून दिली. दोन वर्षांच्या मुदतीसाठी 14 जुलै 1964 रोजी त्याची स्थापना झाली. डॉ.डी.एस. कोठारी त्याचे अध्यक्ष आणि जे.पी. नाईक सचिव झाले. नाईकसाहेबांनी 80 संशोधनात्मक प्रकल्प आयोगासाठी करवून घेतले. आयोगाने सामान्य शिक्षणाबरोबरच शेती, अभियांत्रिकी आणि इतर शैक्षणिक प्रवाहाचं परिशीलन केलं. जे.पी.नी दिवसरात्र परिश्रम करून सुमारे एक हजार पृष्ठांचा 'शिक्षण आणि विकास' हा अहवाल लिहिला. त्यातल्या शिफारशींसह तो अंमलात आणला जावा यासाठी बरेच प्रयत्न झाले. हा इतर विकसनशील देशांसाठी लागू पडला मात्र आपल्याकडे अजून हा आयोग लागू झालेला नाही.

जे पी नाईक यांना अपेक्षित असलेल्या शिक्षणखर्चाएवढा खर्च अजूनही आपण पूर्णपणे देशासाठी करत नाही. आता जेमतेम 4% पर्यंत खर्च करतो आहे. जी पी ने सांगितलं शिक्षणामध्ये बदल आणायचा असेल तर एकूण GDP च्या किमान 6% खर्च अपेक्षित आहे.

जे.पी. नाईक अनेक समित्यांवर, अनेक पदांवर नियुक्त होते. त्यांनी विपुल साहित्यनिर्मिती केली. 32 पुस्तकं लिहिली. त्यांनी मांडलेले शैक्षणिक विचार आणि योजना, उपक्रम हे सारं मोजमाप करण्यापलीकडचं आहे.

जे. पी नी पहिली पदवी मिळवली त्यावेळेस महात्मा गांधींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय असहकार चळवळीच्या अंतर्गत सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. त्यात तुरुंगवास भोगल्यावर त्यांनी ग्रामीण भागातल्या कार्याला स्वत:ला वाहून घेतलं. साक्षरतेसाठी त्यांनी मोलाचं काम केलं.

युनेस्कोने 1990 साली ‘थिंकर्स ऑफ एज्युकेशन’ या शीर्षकाखाली 2500 वर्षांतील 100 जागतिक शिक्षणतज्ज्ञांवर एक लेखमाला प्रकाशित केली. त्यात कन्फ्युशिअस, ऍरिस्टॉटल, प्लेटो असे विचारवंत आहेत आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे एका भारतीय विचारवंताचा म्हणजे जे.पी. नाईक यांचा युनेस्कोने समावेश केला आहे.

अत्युच्च पातळीवर असं भारताचं वैचारिक प्रातिनिधित्व करणारा हा माणूस वागा-बोलायला एकदम प्रांजळ आणि साधा होता. पु.ल. देशपांडे त्यांना ‘शिक्षकांचे शिक्षक’ म्हणतात. पु.ल. ते त्यांना गुरू मानत असत. पु.ल. म्हणतात,
“डॉ.केतकरांनी ‘ज्ञानकोश’ लिहिला पण ते खिशात भजी घालून रस्त्यातून खात खात जात; ही आख्यायिका अधिक लोकप्रिय होती. तशाच जे.पीं.विषयीही अनेक आख्यायिका आहेत. घर-संसार नसल्याने ते कचेरीतल्या टेबलावरच रात्री शेंगदाणे खाऊन झोपतात आणि उठून परत शेंगदाणे खात रस्तारुंदीकरणाच्या कामासाठी घरं पाडण्याच्या ऑर्डरी देत फिरतात…”

मात्र, अशा आख्यायिकांमागे एक प्रकारचं कौतुक आहे. असा हा साधासुधा माणूस भारताच्या शिक्षणक्षेत्रासाठी अखंड कार्यरत राहिला.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नव्या सरकारसमोर समस्यांचा डोंगर उभा होता. शिक्षण ही सर्वांत मोठी समस्या होती. हा समस्यांचा डोंगर उचलण्यात जे.पी. नाईक यांची महत्त्वाची भूमिका होती. राष्ट्रीय शिक्षण आयोगाचे सदस्य-सचिव म्हणून जे.पीं.नी जी मेहनत घेतली आणि स्वतंत्र भारताच्या शैक्षणिक प्रणालीचं स्वरूप बनवलं ते अद्वितीय कार्य आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा पहिली ते आठवीपर्यंतच्या वयोगटातली मुलं शाळेत येण्याची संख्या वीस ते पंचवीस टक्के होती. जे.पीं.नी पुढील वीस वर्षांत ती 75 टक्क्यांपर्यंत आणली. आज भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षं झाली. आज 97% विद्यार्थी शाळेत दाखल आहेत; तीन ते पाच टक्के विद्यार्थी शाळेत आलेच नाही आणि शाळाबाह्य असण्याचा प्रमाण 15 ते 20 टक्के आहे पण स्वातंत्र्यानंतर हे आव्हान फार मोठं होतं. हे आव्हान पेलले जे पी नाईक या शिक्षण प्रेमी ने.

1959 मध्ये दिल्लीच्या शिक्षणमंत्रालयात केंद्र सरकारचे शैक्षणिक सल्लागार म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आलं. त्या पदावर आणि त्यानंतरच्या अनेक पदांवर त्यांनी कोणतंही वेतन न घेता काम केलं. शिक्षण सल्लागार पदावर असताना त्यांनी ज्या महत्त्वाच्या नवीन संस्था स्थापन केल्या त्यात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एन.सी.ई.आर.टी.), जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जे.एन.यू.), राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था (एन.आय.ई.पी.ए.) या प्रमुख आहेत.

युनेस्को आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संघटनांबरोबर त्यांनी स्वतःला झोकून देऊन गरीब जनतेच्या शिक्षणाला सहाय्य केलं. झोकून देऊन आणि पूर्ण होईपर्यंत काम करत राहणं हा त्यांचा खाक्या होता. अखंड आयुष्य त्यांनी भारताच्या शैक्षणिक विचारासाठी वाहून घेतलं होतं.

शिक्षणसंस्था आणि जनता यांचा सहयोग हा शैक्षणिक व्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी उपाय आहे. असं जे.पीं.ना वाटे. याबबत 1959 साली त्यांनी एक अहवाल सुद्धा बनवला होता. जनता विद्यालय तसंच जनता महाविद्यालय याबाबत त्यांनी बरंच काम केलं. जे.पी. नाईक यांनी प्राथमिक शिक्षणात ग्रामपंचायतीची भूमिका काय असली पाहिजे यावर अमाप संशोधनपर रिपोर्ट बनवले आणि काम केलं. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांना वाटे की प्रौढ साक्षरता आणि शिक्षण व्हायला हवं. जेव्हा पालक किमान साक्षर असतील तेव्हा ते त्यांच्या मुला-मुलींना शाळेत पाठवतील. म्हणून जे.पीं.नी प्रौढ साक्षरता अभियान सुरू केलं.

शैक्षणिक संस्थेबाबत त्यांचं शेवटचं कार्य म्हणजे 1976 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन या संस्थेचं पुणे इथे पुनरुज्जीवन आणि 1981 पर्यँत तिचा जिवाच्या कराराने सांभाळ.या अखेरच्या प्रकल्पात त्यांचा जीव गुंतला होता.

शैक्षणिक क्रांती हे नाईकसाहेबांनी डोळस दृष्टीने पाहिलेलं स्वप्न होतं. त्यासाठी ते झटले. त्यांना ही क्रांती नेपोलियनसारखी सक्तीने नव्हे तर मनं वळवून घडवून आणायची होती.

जागतिक पातळीवर शिक्षण तज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जे.पी. नाईक यांचं 30 ऑगस्ट 1981 रोजी देहावसान झालं.

भारताच्या शिक्षणक्षेत्रात नाईक चार दशकांपेक्षा जास्त काळ कार्यरत होते आणि 1960 पासून पुढे वीस वर्षं या क्षेत्राच्या केंद्रस्थानी होते. या काळात भारतीय शैक्षणिक संशोधन, शिक्षणक्षेत्रातील अभिनव उपक्रम आणि सुधारणा या सर्वांचा आरंभ आणि प्रगती यांवर त्यांचा एकट्याचाच सर्वांधिक प्रभाव पडला आहे.

त्यांना खूप सारे पुरस्कार मिळाले. कर्नाटक विद्यापीठाची D.Lit पदवी, पद्मभूषण पुरस्कार, पॅरिस इथल्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थेच्या कार्यकारिणीवर नियुक्ती.

या सर्व पुरस्कार आणि मानस्मानांच्या पलीकडून डोकावत असलेल्या जे.पी. नाईक यांच्या कमालीच्या प्रांजळ व्यक्तिमत्त्वाबाबत भारतीयांना अतिशय आदर असला तरी जोवर त्यांनी मांडलेल्या, सुचवलेल्या शिक्षणविचाराची कास धरून भारतीय शैक्षणिक धोरण पुढ़े जात नाही तोवर सारं काही अपूर्णच म्हणावं लागतंय.

ब्रिटिशांनी दीडशे वर्षं आपल्यावर राज्य केलं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ठोस असं शैक्षणिक धोरण आपल्याकडे नव्हतं. गांधींची हत्या झाली होती. अशा वेळी जे.पी. नाईकांनी गांधींच्या विचारांची ‘नई तालीम’ म्हणजे नवं शिक्षण हे शैक्षणिक धोरणात आणण्याचा प्रयत्न केला. भारतीय इतिहासाचा अभ्यास करून, आर्थिक स्वरूप लक्षात घेऊन त्यांनी शैक्षणिक विकासाच्या योजना देशासमोर मांडल्या. खरं तर देशासमोर संकटं बरीच होती. बराच निरक्षर असलेला देश साक्षर करण्यात पुढाकार घेणारे, शाळा प्रत्येक खेड्यात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणारे जे.पी. नाईक हे पहिले भारतीय होते. स्वातंत्र्यानंतर पुढ़ील पंचवीस वर्षं जे.पीं.नी एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या भारतातल्या प्रत्येक राज्याला प्राथमिक शिक्षणात पुढे आणलं. म्हणूनच युनेस्कोने जाहीर केलेल्या जगातल्या टॉप शंभर शिक्षणतज्ज्ञांमध्ये जे.पी. नाईक यांचा समावेश केलेला आहे. अशा जे.पी नाईक सरांना शतशः नमन

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


No comments:

The Empty Classroom: India's Silent Education Emergency

Article by Sachin Usha Vilas Joshi India has made remarkable strides in expanding access to education—almost every village has a primary sch...