Wednesday, 30 March 2022

नाशिकचे संभाव्य प्रगतीपुस्तक


पुढील पाच वर्षांमध्ये नाशिक जिल्ह्याचं शिक्षणाचं प्रगतीपुस्तक कसं अपेक्षित आहे? तुम्ही म्हणाल पाच वर्षांचंच का? तर आता निवडणुका येत आहेत. निवडणुकीमध्ये मोठमोठी आश्वासनं दिली जातील. पण त्याही पेक्षा मला माझ्या शहराची शैक्षणिक प्रगती जास्त महत्त्वाची वाटते. त्या प्रगतीची दिशा सर्वांना समजणं गरजेचं आहे. त्यानुसार निवडून आलेले सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हापरिषद विविध एनजीओज, शिक्षक, शिक्षणमंडळ हे सर्व एकत्रितपणे त्यावर काम करतील जेणेकरून प्रगतीपुस्तकामध्ये शहराची खरोखरची शैक्षणिक प्रगती दिसेल. 

सर्वांत पहिलं म्हणजे येत्या जूनपासून शाळा नव्या जोमाने सुरू होतील. दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा प्रचंड लर्निंग लॉस झाला. एका सर्व्हेनुसार पाचवीच्या साठ टक्के विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरीचं अंकज्ञान येत नाही. म्हणून शिक्षणव्यवस्थेने पायाभूत साक्षरतेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्या त्या भागातील नगरसेवकर, एनजीओज, शिक्षणमंडळ यांनी एकत्रित येऊन शाळांना भेटी देऊन असे विद्यार्थी शोधून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी काम करणं गरजेचं आहे. प्रत्येक पुढाऱ्याकडे ग्रॅज्युएट झालेले कार्यकर्ते असतात. त्यांच्याच भागातील नगरपालिकेच्या शाळेतील तीन-चार विद्यार्थ्यांची जबाबदारी त्यांनी उचलली आणि किमान रोज एक तास अंकगणित आणि वाचन शिकवलं तरी तीन महिन्यांत प्रगती दिसून येईल. 

दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की सरकारी शाळेच्या इमारती, बाथरूम्स आणि शैक्षणिक साहित्य यांची दुरुस्ती होणं आवश्यक आहे. सर्वांत महत्वाचं म्हणजे त्या शाळेवर या आधी किती वेळा दुरुस्ती झाली याचा तक्ता शाळेच्या बाहेर लिहिलेला हवा. नाही तर एकाच शाळेवर अनेक वेळा सरकारकडून तर कधी लोकसहभागातून काम केलं जाईल. शाळा व्यवस्थित नसेल तर त्यासाठी सरपंच, नगरसेवक, सामाजिक संस्था यांनी शाळा दुरुस्ती करून ती जागा शिकण्यायोग्य करणं गरजेचं ठरतं. भारताच्या पंचाहत्तर वर्षांच्या अमृत महोत्सवात आपण किमान तेवढी अपेक्षा तरी स्थानिक स्वराज्य संस्थांत निवडून येणाऱ्या प्रतिनिधींकडून करू शकतो. 

येत्या पाच वर्षांत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. राज्य सरकारला ते बंधनकारक असेल. पण त्यासाठी नाशिक तयार आहे का? तयार आहे का याचा अर्थ नाशिक शहरातील सर्व शिक्षक, संस्थाचालक, महानगर पालिकेमधले सर्व नगरसेवक, प्रशासन अधिकारी आणि मुख्य म्हणजे पालक यांना प्रशिक्षणाची गरज लागेल. आपल्याला शैक्षणिक धोरण सर्वांना समजावून सांगणं, त्याच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घ्यावा लागेल. 'घोका आणि ओका' या मानसिकतेतून सर्वांना बाहेर काढावं लागेल. यासाठी शहरात जनजागृती करावी लागेल. राजकीय पुढारी, वृत्तपत्रं, शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ, शिक्षण विभाग, संस्थांचे   मुख्याध्यापक यांनी पुढची दोन वर्षं दररोज जनजागृती कार्यक्रम घेणं गरजेचं आहे. कारण प्रश्न भावी पिढीचा आहे. 

नाशिक शहरामध्ये वाचनासाठी लायब्ररी वाढवायला हव्या. नगरसेवकांनी किमान एक लायब्ररी आणि अभ्यासिका निर्माण करणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी शैक्षणिक उद्दिष्टासाठी, शाळेसाठी महानगरपालिकेने ओपन स्पेस सोडली आहे. त्याच्या बांधकामाचा एफएसआय वाढवणं गरजेचं आहे. 

शाळेला जी घरपट्टी लावली जाते तिचा दर कमी करून संस्थेला दिलासा द्यायला हवा. वीज बिलासंदर्भात सुद्धा वीज दराचा फेरविचार व्हायला हवा. यांतून जे पैसे वाचतील त्या पैशांची गुंतवणूक संस्था अधिक उत्तम सोयीसुविधांसाठी करतील. 

मित्रांनो, शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र बदल जागतिक पातळीवर होतायत. नाशिक यामध्ये मागे नको. यासाठी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना हवं असलेलं मनुष्यबळ आणि कॉलेज देत असलेलं शिक्षण यांत कोऑर्डिनेशन होण्यासाठी स्थानिक पातळीवर समिती नेमावी. जी महिन्यातून किमान दोनदा भेटून शहरातल्या मनुष्यबळाला कौशल्य प्राप्त होण्यासाठी मार्गदर्शन करेल. 

थोडक्यात काय, पुढील पाच वर्षांत शिक्षणाचा पाया भक्कम करायचा. त्यासाठी पायाभूत अंकज्ञान आणि वाचन कौशल्यावर भर द्यायचा, उच्च शिक्षणामध्ये व्यावसायिक कौशल्यं विद्यार्थ्यांना अधिक उत्तम रीतीने प्राप्त होतील यासाठी इंफ्रास्ट्रक्स्चर्स, अभ्यासक्रम, तज्ज्ञांचं मार्गदर्शन सध्याच्या शैक्षणिक संस्थांमध्ये उपलब्ध करून द्यायचं आहे. 

पुढील पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर नाशिकला आणण्यासाठी नाशिकला एज्युकेशन हब म्हणून विकसित करण्याचा अजेंडा आपण समोर ठेवू शकतो. त्यासाठी नाशिकमध्ये शैक्षणिक गुंतवणूक वाढवण्यासाठी डीम्ड युनिव्हर्सिटीजना प्रस्ताव देणं, फिनिशिंग स्कुल, मल्टि डिसिप्लिनरी कॉलेज, लिबरल आर्ट कॉलेज निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कृषी विद्यापीठ आणण्यासाठी सरकारी पातळीवर दबाव गट बनवणं आवश्यक आहे पण त्याआधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान्यता मिळालेले कॅम्पस चालू करणं अशा बऱ्याच गोष्टी नाशिकच्या शिक्षणासंदर्भात आपण करू शकतो; जेणेकरून येत्या पाच वर्षांत नाशिकला  शैक्षणिक प्रगतीपुस्तकात पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील आणि नाशिक अव्वल ठरेल.

सचिन उषा विलास जोशी

शिक्षण अभ्यासक

Friday, 25 March 2022

स्वामी विवेकानंदांची शिक्षणाची व्याख्या

स्वामी विवेकानंद यांनी भारताला बरेच अप्रतिम विचार दिले पण मला जर विचारलं की विवेकानंदांनी जगाला सर्वांत उत्तम काय दिलं? तर मी सांगीन “शिक्षणाची व्याख्या.” 

शिक्षण म्हणजे नक्की काय? शिक्षणाची व्याख्या काय? तर जगात प्रत्येक विचारवंतानी, शिक्षणतज्ज्ञांनी, संशोधकांनी, मोठमोठ्या विद्यापीठांनी शिक्षणाची वेगवेगळी व्याख्या सांगितली; पण या सर्वांत आजही स्वामी विवेकानंदांची शिक्षणाची व्याख्या सर्वश्रेष्ठ आणि परिपूर्ण ठरते. 

ते म्हणतात, ‘Education is manifestation of the perfection already in man.’ 


प्रत्येक व्यक्तीमध्ये जे दडलेलं आहे ते बाहेर काढणं म्हणजे शिक्षण. बाहेर आहे ते आत कोंबणं म्हणजे शिक्षण नव्हे. विवेकानंद माहिती आणि ज्ञान यामध्ये फरक करतात. बाहेरून मिळवून दिली जाते ती माहिती. आतून जे येतं ते ज्ञान. माहिती घ्यावी लागते या गोष्टीला त्यांची ना नाही पण माहितीलाच शिक्षण समजणं हे योग्य नाही. माहिती ही प्रसंगी तात्कालिक स्वरूपाची असू शकते पण ज्ञान कायमस्वरूपी तर असतंच आणि ते कालातीत असतं. माहिती कधी व्यापक असू शकते तर ज्ञान सखोलतेकडे नेतं. उत्तम शिक्षक हा माहिती देतो पण त्या विद्यार्थ्यांच्या मनात जे दडलेलं असतं ते त्याच्या कलेने बाहेर काढतो. त्याच्यातला/तिच्यातला वेगळेपणा जोखतो. प्रयत्नपूर्वक त्याची जोपासना करतो. त्या वेगळेपणाला बहर येण्यासाठी प्रयत्न करतो. या सर्व प्रक्रियेला ‘शिक्षण’ म्हटलं पाहिजे. प्रत्येक माणसामध्ये पूर्णत्व असतं. त्या पूर्णत्वाचं प्रकटीकरण होणं. त्याच्या कौशल्यांचा विकास होणं. त्याच्या/तिच्या सगळ्या शक्यता व्यक्त होऊ देणं म्हणजे शिक्षण होय. 


विवेकानंदांचे धर्म आणि विज्ञान हे जिव्हाळ्याचे विषय. शिक्षणात धर्माचं स्थान काय असं जर मला विचारलं तर मी म्हणेन, “विवेकानंदांचे धर्माबाबत जे विचार होते ते शिक्षणात आणायला काही हरकत नाही.” विवेकानंदांना माणूस घडवणारा धर्म अपेक्षित होता. माणसाला माणूसपण देण्यात किमान धर्माची भूमिका त्यांना महत्त्वाची वाटे. त्यासाठी सर्वधर्मसमभावाचा आग्रह असायचा. धर्मातील कालबाह्य रूढी नाकारल्या पाहिजेत आणि त्यासाठी प्रामाणिकपणे बुद्धी वापरून जे तत्त्व आजच्या विज्ञानयुगात लागू होत नाही ते धर्मातून काढून टाकलं पाहिजे असं विवेकानंदांना वाटे. कदाचित या पध्दतीची मांडणी करणारे ते पहिले ‘धर्मगुरु’ असतील. 

विवेकानंद धर्मावर बोलले. विज्ञानावर बोलले. धर्म आणि विज्ञान यांच्या समन्वयाची गरज त्यांनी सांगितली. हा समन्वय शिक्षणात फार महत्त्वाचा आहे. विवेकानंद विज्ञानवादी होते. ते म्हणायचे, “आपण फक्त स्वत:पुरतं अंधश्रद्धांना नाकारून भागणार नाही. तर आपण सार्वजनिकपणे विरोध करायला हवा. शालेय शिक्षणाचं एक प्रमुख उद्दिष्ट मुलांना अंधश्रद्धेपासून मोकळं करणं हे असलं पाहिजे. आजूबाजूच्या प्रत्येक घटनेतला कार्यकारणभाव समजावून घेऊन स्वतंत्रपणे मुलांना विचार करायला शिकवलं पाहिजे.” त्यांचे हे विचार अंमलात आणणं फार गरजेचं आहे.


विवेकानंदांचं एक वाक्य मी वाचलं आणि त्यातून माझ्या शैक्षणिक प्रवासाला सुरुवात झाली. त्यांनी एका ठिकाणी लिहून ठेवलं आहे की, ‘If poor child cannot come to education then education must go to him.’ जर एखादा गरीब मुलगा/मुलगी शाळेत पोहोचू शकत नसेल तर शिक्षणाने त्याच्या/तिच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. या वाक्यातून मला प्रेरणा मिळाली. माझ्या डोक्यात कल्पना आली की विवेकानंदांचा हा विचार प्रत्यक्ष अंमलात आणता येऊ शकेल आणि मी भारतातील पहिली फिरती शाळा सुरू केली. ‘चाकं शिक्षणाची’ अर्थात ‘Education on Wheels’ ही संकल्पना विवेकानंदांच्या वाक्यातून निर्माण झाली. मी बसची चेचिस विकत घेतली आणि त्यावर शाळेचा वर्ग बांधला. ही फिरती शाळा नाशिकमधल्या वस्तीमध्ये जाते आणि गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या दारी मोफत शिक्षण देते. शाळाबाह्य मुलांसाठी ही फिरती शाळा काम करते. 


विवेकानंदांचा प्रत्येक विचार हा युवकांना प्रेरणा देणारा आहे. त्यांनी बरीच व्याख्यानं दिली. जगभर फिरले. मनाची ताकद असते ते युवकांना समजावून सांगत. ते ठासून सांगायचे की “या जगातील सर्व ताकद तुमच्यामध्ये आहे. तुम्ही ठरवलं तर सर्व काही करू शकता.” हा जो आत्मविश्वास आहे तो आजही एकविसाव्या शतकातल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगायची गरज आहे. याची भारताला जाणीव आहे म्हणूनच त्यांचा जन्मदिन 12 जानेवारी हा ‘राष्ट्रीय युवक दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या प्रेरणेने यादिवशी सुरू करण्यात येणारे उपक्रम अखंड चालू राहणं महत्त्वाचं आहे. त्यात सातत्य टिकवून ठेवणं आपल्या हातात आहे आणि ते आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. संपूर्ण शिक्षणाचा पाया हा असला पाहिजे की ‘मी करू शकतो/मी करू शकते’. विद्यार्थ्यांमध्ये जी मरगळ आलेली असते ती दूर करण्यासाठी विवेकानंदांची भाषणं, विचार अभ्यासक्रमात समाविष्ट करायला हवेत. 


12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता इथे त्यांचा जन्म झाला. फक्त 39 वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. पण एवढ्या कमी वयात त्यांनी जगभर खरा हिंदूधर्म जागवला, जगवला, समजावला. ते फक्त धर्मगुरु किंवा एक प्रवचनकार नव्हते. परिवर्तनवादी विचारांचे पुरस्कर्ते होते. त्यांचे अनेक विचार हे आजच्या शिक्षणपध्दतीला लागू होतात. रामकृष्ण परमहंसांसारखे अत्यंत प्रगल्भ आणि परिपूर्ण गुरु त्यांना लाभले. शक्य तिथून सगळ्यांकडून काही ना काही शिकायची सवय नरेंद्राने अंगी बाणवली होती. त्यांच्या संदर्भात अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून त्याची प्रचिती आपल्याला येते. एकदा गुरु पत्नी स्वयंपाकघरात कामात असताना त्यांनी नरेंद्राकडे कात्री मागितली. त्यांनी स्वत:च्या हातात मूठ धरून उघडी टोकं गुरुपत्नींच्या दिशेने ठेवत कात्री त्यांना दिली. तेव्हा गुरुपत्नींनी त्यांना समजावलं “अशी कात्री, सुरी इ.सारखी टोकेरी वस्तू देताना नीटपणे टोक आपल्या हातात धरून मूठ समोरच्याकडे असावी.” ही बाब नरेंद्रानी आत्मसात केली त्यामुळे त्यांच्या कितीही तीव्र विचारांनी समोरच्याला कधी दुखापत झाली नाही. कारण प्रक्रियेतला संयमपणा त्यांनी कधी सुटू दिला नाही. संयम हा तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा आहे. विवेकानंद म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर जी प्रतिमा उभी राहते. अत्यंत ताठ, स्वभावातली दृढ़ता दर्शवणारी हाताची घडी, तेजस्वी चेहरा आणि परिधान केलेली संन्याशाची वस्त्रं….त्यांचा निश्चयी आणि तटस्थ स्वभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून परिपूर्ण रीतीने व्यक्त होत असे.


शिकागोला झालेल्या धर्मपरिषदेमध्ये त्यांनी भाषणाची सुरुवात ‘My Brothers and Sisters of America’ अशी केली आणि पुढची दोन मिनिटं टाळ्या वाजत होत्या. या दोन शब्दांत हिंदू संस्कृतीचं उत्तूंग असं प्रतिकात्मक दर्शन त्यांनी उपस्थितांना घडवलं. आपल्या राज्यघटनेमध्ये अधोरेखित केलेला बंधुभाव प्रत्यक्षात कसा उतरवायचा याचं हे उदाहरण प्रत्येक विद्यार्थ्यासाठी उपयुक्त आहे.

चांगला विद्यार्थी घडवण्यासाठी विवेकानंद कायम प्रयत्नशील राहिले. त्यासाठी ते विद्यार्थ्यांच्या, विचारवंतांच्या, शिक्षकांच्या कायम संपर्कात असत. व्यासंग हा तर त्यांचा प्राण होता. फार मोठ्या चिकित्सेतून त्यांनी आपली मतं मांडलेली आहेत. शिक्षणाविषयक भाष्य करताना ते वारंवार सांगत असत, “केवळ घोकंपट्टी म्हणजे शिक्षण नाही. मानवी शक्तींचा, व्यक्तिमत्त्वाचा विकास झाला पाहिजे. असं शिक्षण उपयोगी पडतं. शिक्षणामुळे नकारात्मकता दूर झाली पाहिजे. शिक्षण तेव्हाच सार्थकी लागेल जेव्हा विपरित प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याचा उपयोग करून समस्येतून बाहेर येता येईल. आपल्या शिक्षणाचा उपयोग केवळ कुटुंबाला नाही तर समाजाला, देशाला, देशहितासाठी झाला पाहिजे.” 


अनुभवाधारित शिक्षणाला ते खूप महत्त्व देतात. ते म्हणतात, “आपण पुस्तकं वाचू शकतो. व्याख्यानं ऐकू शकतो. बराच वेळ बोलू शकतो. पण अनुभव हा आपला दृष्टिकोन निर्माण करणारा डोळा आहे. तो अंत:चक्षू आहे.” हे अगदीच खरं आहे. अनुभवाने शहाणं होणं म्हणजे दुसरं काय? 

शरीर, स्वास्थ्य, संस्कृती, मूल्य, शिक्षण, ज्ञान, विज्ञान, भाषा, सौंदर्यशास्त्र आणि माणसाला जे उदात्त, उन्नत, मंगल करील अशा धार्मिक शिक्षणाचा ते पुरस्कार करतात. माणसाचं स्वत्व जागं करणारं शिक्षण ते महत्त्वाचं मानतात. स्त्री शिक्षणाला त्यांनी खूप महत्त्व दिलं. स्त्री शिक्षणाचं महत्त्व विशद करताना त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की स्त्रियांचं जीवन विशादमय असेल तर कोणत्याही कुटुंबाची किंवा देशाची उन्नती होण्याची आशाच नको. स्त्रियांपुढचे अनेक गंभीर प्रश्न शिक्षणाने अगदी सहज सुटू शकतील असा त्यांचा विश्वास आहे. सर्वसाधारण समाजाचं शिक्षण आवश्यक आहे. त्याकडे दुर्लक्ष करणं हे आपलं राष्ट्रीय पातक असून घोर अध:पतनाचं मूळ कारण आहे. त्यामुळे आपल्या अंत:करणाला पीळ पडतो.” असं त्यांनी आवर्जून नमूद केलं आहे.


शिक्षणविचाराच्या आपल्या तात्त्विक विवेचनात ते म्हणतात, “आपलं चारित्र्य बनवा. आपलं ज्योतिर्मय स्वयंप्रकाशित नित्य, सुद्ध, वास्तविक स्वरूप प्रकट होऊ द्या.” एकदा विद्यार्थ्यांशी शिक्षण म्हणजे काय? या विषयावर चर्चा करत असताना हे सारे विचार त्यांनी सोप्या शब्दांत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यावर विद्यार्थी म्हणाले, “स्वामीजी, आपण सांगितलेल्या मार्गाने जनजागृती करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने उचित शिक्षण घेऊन आम्ही ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.”

विवेकानंद म्हणाले, “या गोष्टीला प्रारंभ झाल्यास भारत विश्वगुरु बनेल! तो दिवस दूर नाही. भारत विज्ञान, साहित्य, कला, संस्कृती आणि तंत्रज्ञान यांत अखंड प्रगती करेल आणि भारतीयांच्या कर्तृत्वाची दखल जागतिक स्तरावर घेतली जाईल.

हे नक्कीच घडेल कारण तेव्हा सर्व सीमारेषांच्या पलीकडे जात भारतीय माणसाचा माणूस म्हणून वैश्विक पातळीवर विचार करत असेल.

सचिन उषा विलास जोशी 

शिक्षण अभ्यासक




Friday, 11 March 2022

हे रवींद्रनाथा, माझ्या देशाला जागृत होऊदे!

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख

जगातल्या उत्तम शिक्षणतज्ज्ञांच्या यादीत ज्यांचं नाव अग्रस्थानी असतं ते म्हणजे रवींद्रनाथ टागोर. ते लहानपणी शाळेत कधी रमलेच नाहीत. पालकांनी त्यांच्या बऱ्याच शाळा बदलल्या पण ते शाळेच्या बाहेरच दिसायचे. तेव्हा रवींद्रनाथ मॅट्रिक परीक्षा पास होऊ शकले नाहीत पण ही निसर्गाची कृपाच म्हणायची की त्यांचे आईवडील, शिक्षक त्यांना वाढवणारी नोकरमंडळी त्यांना पास करण्यात कधी सफल झाले नाहीत...नाही तर त्यांनी त्यांच्या अभ्यासाच्या, गणिताच्या मागे लागून केव्हाच परीक्षेत पास करून सोडलं असतं आणि जग साहित्यातील एका महान नोबेल पुरस्कार विजेत्या कवीला मुकलं असतं.

रवींद्रनाथ शाळेतल्या चार भिंतींमध्ये बसायला तयार नसल्याने त्यांच्या आई वडिलांनी त्यांना शिकवायला सुरुवात केली. त्यांच्या घरी खूप लहान मुलं होती. प्रत्येक मुलाबाबत एका नोंदवहीत नोंद करायची प्रथा त्यांच्या घरात होती. त्या वहीत रवींद्राच्या आईने लिहिलं आहे की, “बाकी सारी मुलं ठीक आहेत पण या रवींद्रनाथाविषयी मात्र आशेला अजिबात जागा दिसत नाही.” 

लहानपणी ज्याच्याकडून शिक्षणाबाबत कसलीच आशा नव्हती त्या रवींद्रनाथांनी पुढे जगाला उत्तम शिक्षणपद्धती प्रदान केली. ‘शांतीनिकेतन’सारखं शिक्षणाचं मॉडेल दिलं. या ‘शांतीनिकेतन’ने जगाला सत्यजित रे, इंदिरा गांधी, अमर्त्य सेन, रामकिंकर बैज यांसारख्या महान व्यक्ती दिल्या. 

रवींद्रनाथांना लहानपणी चित्र काढ़ायला आवडायचं, निसर्गात रमायला आवडायचं. त्यांच्या मनात काव्याचे झरे वाहत होते. म्हणूनच टागोरांनी स्वत: शाळा सुरू केली तेव्हा त्यांच्या शाळेत चार भिंतींचा एकही वर्ग नव्हता. मी काही वर्षांपूर्वी ‘शांतीनिकेतन’ला भेट दिली होती. तीन दिवस तिथे राहून तिथली शिक्षणपद्धती समजून घेत होतो. सर्व वर्ग झाडाखाली भरायचे. पावसाळ्यात छत असलेल्या पण चार भिंती नसलेल्या गझिबो मध्ये विद्यार्थी बसत असत. ‘शांतीनिकेतन’ मध्ये कला, संगीत, विज्ञान आणि गणित एकमेकांमध्ये असे समरस झाले आहेत की ते पाहणं म्हणजे एक विलक्षण अद्भुत अनुभव होता.

आज ‘इंटिग्रेटेड करिक्युलम’ बद्दल एवढी चर्चा होतेय त्याचं प्रात्यक्षिक टागोरांच्या शाळेत पाहायला मिळतं. आपल्या हाताचे ठसे, हस्तरेषा व्यक्तिनुरूप वेगळ्या असतात. कोणत्याही दोन माणसांच्या हस्तरेषासुद्धा समान आढळत नाहीत. तसंच प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व भिन्न असतं. प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये त्याचं स्वत:चं असं काही दडलेलं असतं. ते वेगळेपण टिकवणं म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांचे विचार प्रत्यक्षात उतरवणं होय. आपण "मास्क एज्युकेशन" देतो हे टागोरांना पटायचं नाही म्हणून ते कधी शाळेत रमले नाहीत आणि मोठेपणी त्यांच्या ‘शांतीनिकेतन’ शाळेत विद्यार्थी मात्र रमत गेले. 

रवींद्रनाथ टागोर यांनी 1901 मध्ये शंभर एकर जागेत ‘शांतीनिकेतन’ सुरू केली. मुलांना आनंदी ठेवणं आणि त्यांची सर्जनशीलता फुलवणं हे त्यांचं ध्येय होतं. त्याकरता शाळेत पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी ते प्रयत्नशील असत. मुलांनी वर्गात बसून न शिकता निसर्गाच्या सान्निध्यातच शिकलं पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा. आज मज्जामेंदूशास्त्र हेच सिद्ध करतं की विद्यार्थ्यांच्या मेंदूची जडणघडण, मेंदूच्या पेशींची वाढ विद्यार्थी निसर्गात जेवढा जास्त राहील तेवढी जास्त मेंदूच्या पेशींची घट्ट बांधणी होत असते. 

रवींद्रनाथ टागोरांना भानुसिंह ठाकूर (भोणिता) म्हणूनही ओळखलं जातं. ते आयुष्यात अल्बर्ट आइनस्टाईनसारख्या थोर शास्त्रज्ञाला तीनदा भेटले जे रवींद्रनाथ टागोर यांना रब्बी टागोर म्हणून संबोधत असत.

रवींद्रनाथांचा जन्म 7 मे 1861 रोजी कलकत्ता इथे झाला. त्यांचा मृत्यू 7 ऑगस्ट 1941 रोजी कलकत्त्यातचं झाला. दरम्यानचा त्यांचा प्रदीर्घ जीवनकाळ हा अनेक क्षेत्रातल्या वैचारिक घडामोडींनी व्यापलेला होता. आपल्या स्वतंत्र प्रज्ञेने आणि उत्तुंग प्रतिभेने त्यांनी अनेक क्षितिजं पादाक्रान्त केली. हाताळलेल्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी स्वत:चा असा ठसा उमटवला आहे. रवींद्रनाथ टागोर हे लेखक, चित्रकार, कवी, नाटककार, गीतकार होते. त्यांचं लेखन मनाला भिडणारं, विचार करायला लावणारं आणि भावनांच्या विविध पातळींवर घेऊन जाणारं आहे. 

1913 मध्ये साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले भारतीय होते. रवींद्रनाथ यांची गीतं भारत आणि बांगलादेश या दोन राष्ट्रांनी राष्ट्रगीत म्हणून स्वीकारली आहेत. त्यांचं ‘जन-गण-मन’ हे भारताचं राष्ट्रगीत आहे तर ‘अमर सोनार बांग्ला’ हे बांगलादेशाचं राष्ट्रगीत आहे. त्यांचे विचार आजही शिक्षणपद्धतीला तंतोतंत लागू होतात. त्यांचा ब्रिटिशांनी लादलेल्या मॅकोलेच्या शिक्षणपद्धतीला विरोध होता. खुल्या, मुक्त, आनंदी, सर्जनात्मक, पुरोगामी, मातृभाषेतील शिक्षणपद्धतीवर त्यांचा विश्वास होता. भारताचं दुर्दैव की आपण त्याची अंमलबजावणी करू शकलो नाही. स्वातंत्र्यानंतरही आपण मॅकोलेची शिक्षणपद्धती सुरू ठेवली. माहिती, अभ्यासक्रम बदलला पण माहिती द्यायची पद्धत नाही बदलली. त्याचे परिणाम आपण आजही भोगतो आहोत. आपल्या देशात असामान्य प्रतिभा असूनही तिचा प्रवास नीट मार्गाने होऊ शकत नसल्याने विविध क्षेत्रांत ती दडपली जात आहे. उत्फुल्लपणे तिचा विकास होताना काही दिसत नाही. याला कारणीभूत फक्त शैक्षणिक क्षेत्रातला अजूनही नीटपणी स्वीकारला न गेलेला सजग दृष्टिकोन आहे. म्हणूनच भारत संशोधनात, नवीन काही शोधण्यात, कलेमध्ये मागे आहे. ‘शांतीनिकेतन’चं सार्वत्रिकरण होऊ शकलं नाही. पण आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याच प्रकारची वैचारिक मांडणी करत आहे. रवींद्रनाथ टागोरांचा असा विश्वास होता की शिक्षणाचा हेतू आत्मसाक्षात्कार आहे. ते स्वत: एक संत होते. त्यांनी स्वानुभवाने, कल्पनेने निसर्गातला वैश्विक आत्मा ओळखला होता. ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये जागृत होणं हाच शिक्षणाचा हेतू असला पाहिजे याविषयी ते ठाम होते. 

आपण आज पर्यावरणाला, निसर्गाला समजून घेण्यासाठी, निसर्गाच्या संवर्धनासाठी विविध अभ्यासक्रम आखतोय. शिक्षणात खास वेगळा विषय म्हणून पर्यावरणावर भर देतोय हेच टागोर साहित्य-अध्यात्म-कलेच्या माध्यमातून सांगायचे. टागोरांच्या शिक्षणपद्धतीमध्ये शिक्षणाचं माध्यम मातृभाषा हे असे. तिथे बंगालीमधूनच सगळे विषय शिकवले जात. जेव्हा मी ‘शांतीनिकेतन’ला गेलो होतो तेव्हा काही परदेशी विद्यार्थी त्या शाळेत शिकत होते. त्यांना सुद्धा बंगाली भाषेतूनच शिकवलं जात होतं. टागोर विविध भाषांचे पुरस्कर्ते होते पण भावनिक आणि संकल्पना स्पष्ट होण्यासाठी मातृभाषेतूनच शिकवलं पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा. ज्या ग्रंथासाठी त्यांना नोबेल मिळालं तो ‘गीतांजली’ ग्रंथसुद्धा बंगाली भाषेतला आहे. 

यावर्षी म्हणजे 2021-22 च्या अर्थसंकल्पामध्ये शिक्षणातील ई-कंटेन्ट मातृभाषेतून बनवण्यासाठी आर्थिक तरतूद केलेली आहे. म्हणजे महान शिक्षणतज्ज्ञ निर्माण करणारा आपला देश आपल्याच शिक्षणतज्ज्ञाचे विचार पचवू शकलेला नसला तरी आता निदान नवीन विचारांच्या दिशेने आपण पावलं टाकू लागलो आहोत. टागोरांची संकल्पना मुक्त मन, मुक्त जात आणि मुक्त राष्ट्राची होती. या तिन्हीमधून राष्ट्राचा विकास साधला जाऊ शकतो असं ते म्हणत. त्यांना शाळा म्हणजे एक मृत दिनचर्या आणि निर्जीव वस्तू वाटायची. ते म्हणायचे, ‘सर्जनशीलतेला वाव किंवा स्वातंत्र्य नसलेल्या शाळांना शाळा म्हणू नका. त्या गिरण्या आहेत.’ 

शिक्षणाचा प्राथमिक उद्देश हा एखाद्याचं वैयक्तिक जीवन आणि बाह्य जग यांच्यामध्ये सिम्फनी जतन करणं असला पाहिजे. आज आम्ही इस्पॅलिअर स्कूलमध्ये मुक्त वर्ग, निसर्गवर्ग याद्वारे सर्जनशीलतेला प्रथम स्थान देतो. ते सर्व जपतो. त्याची शिकवण हे टागोरांचं शिक्षण-तत्त्वज्ञान आहे. टागोरांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानात चार मूलभूत विचार आहेत. निसर्गवाद, मानवतावाद, आंतरराष्ट्रीयवाद आणि आदर्शवाद. हे चार विचार म्हणजे शिक्षणाचा पाया आहे. जो त्यांनी ‘शांतीनिकेतन’ आणि ‘विश्वभारती’ विद्यापीठांमध्ये अंमलात आणला. नैसर्गिक वातावरणात शिक्षण दिलं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता तसंच विद्यार्थ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यावर त्यांचा भर होता. शैक्षणिक संस्था या मृतपिंजरा असू नयेत. त्या विद्यार्थ्यांच्या हाताला काम देणाऱ्या, कलेला आणि मनाला प्रोत्साहन देणाऱ्या आध्यात्मिक जागा असाव्यात. 

त्यांची गाजलेली कविता Where the mind is without fear…ही अभ्यासक्रमात आली पण आपण सर्वांनी ती प्रत्यक्ष जीवनात उतरवण्याची गरज आहे. शेवटी रवींद्रनाथ टागोरांची ही कविता राजेश्वरी पांढरी पांडे यांनी अनुवादित केली विचारात घेणं खूप गरजेचं आहे. 

जिथं मन नेहमी निर्भय असतं आणि मान अभिमानाने ताठ उभी असते. 

जिथं ज्ञान सगळ्या बंधनाच्या पलीकडे असतं

जिथं घरांच्या छोट्या छोट्या भिंती विश्वाला तुकड्या तुकड्यात विभागत नाहीत

जिथं सत्याच्या पायावर शब्दांची शिखरं बांधली जातात. 

जिथं दिशादिशांतून अविरत प्रयत्नांचे हजारो स्रोत न थकता परमोत्तम आदर्शाकडे वाहतात.

जिथं शुद्ध, सर्जनशील विचारांचा झरा अंध परंपरांच्या शुष्क वाळवंटात सुकून जात नाही, हरवून जात नाही.

जिथं तो जेता आहेस, तू मनाला विचारांच्या आणि कर्माच्या नित्य विस्तारत जाणाऱ्या क्षितीजांची ओळख करून देतोस. 

हे पितृदेवा! त्या सदामुक्त स्वर्गात माझ्या देशाला जागृत होऊदे! 

इथे मी शेवटी एवढंच म्हणेन रवींद्रनाथ टागोरांच्या शैक्षणिक विचारांनी माझ्या देशाला जागृत कर.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक




Tuesday, 22 February 2022

मंदिराबाहेर दीनदुबळ्यांमध्ये देव शोधणारे: संत गाडगेबाबा

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख.

संतांच्या शिक्षणासंदर्भातल्या विचारधनाचा मागोवा घेताना संत गाडगेबाबांचे विचार दिशादर्शक तर ठरतातच पण ते कालातीत अशा मूल्यव्यवस्थेची अखंड पाठराखण करत सध्याच्या शिक्षणपद्धतीचा पाया ठरतात.

नाशिकमध्ये गाडगेबाबांना प्रत्यक्ष पाहिलेली, भेटलेली अनेक माणसं आजही समक्ष रीतीने आणि सक्षमपणे मूर्तिमंत गाडगेबाबा आपल्यासमोर उभे करतात. त्यांपैकी एका आजोबांनी एक किस्सा सांगितला- 

हे आजोबा तेव्हा लहान होते. शाळेत जात असत. सहावी-सातवीत असतील. नाशकात होस्टेलमध्ये राहत असत. अनेकदा दुपारी मित्रांबरोबर पुस्तकं घेऊन समोरच्या बागेत अभ्यासाला जात. एक दिवस अभ्यास करताना सगळयांना खूप झोप आली. म्हणून "दहा मिनिटं आराम करूया" म्हणत हे सगळे मित्र डोळ्यांवर आपापलं पुस्तक ठेवून स्वतःपुरता अंधार करत आडवे झाले. पाहा बरं! जी पुस्तकं प्रकाश देतात, त्यांच्या आधारे या मुलांनी स्वतःपुरता चक्क काळोख निर्माण केला. काही क्षणांतच काय झालं, खराट्याचे सपासप फटके त्यांच्या अंगावर बसू लागले. खडबडून जागे होत उठून बसतात तो काय, साक्षात गाडगेबाबा त्यांना जागं करत होते; "झोपा कसल्या काढताय? उठा, जागे व्हा. बाकी काही करायचं नसेल तर हा झाडू घ्या-चला, स्वच्छता करा." चौथी नापास इतकं शिक्षण घेतलेल्या या डेबूजीने या झोपी गेलेला मुलांना जागं केलं.. त्यांना मेहनतीचा अर्थ समजावले कारण त्यांनी अखंड कामात असण्याचा वसा घेतलेला होता. या बाबाचा दशसूत्री संदेशच मुळी हा होता- 

भुकेलेल्यांना : अन्न,

तहानलेल्यांना: पाणी, उघड्यानागड्यांना: वस्त्र,

गरीब मुलामुलींना: शिक्षण, 

बेघरांना: आसरा,

अंध, पंगू, रोग्यांना: औषधोपचार,

बेकारांना: रोजगार,

पशु, पक्षी, मुक्या प्राण्यांना: अभय,

गरीब तरुण तरुणींचं : लग्न,

दुःखी आणि निराशांना : हिंमत,

यांची ही दशसूत्री खरा भारत घडवण्याची गुरुकिल्ली आहे. यामध्ये सामाजिक बांधिलकीला स्थान आहे. आजकालचं विद्यार्थ्यांचं आयुष्य हे व्यक्तिकेंद्रित झालं आहे. ‘इट्स माय लाईफ’ या चुकीच्या मूल्यावर आपण सगळे चाललो आहोत. या ठिकाणी गाडगेबाबांचं ही दशसूत्री जेव्हा शिक्षणव्यवस्थेत उतरवली जाईल तेव्हा येणारा समाज स्वत:पुरता विचार न करता तो इतरांसाठी विचार करेल. आनंदी समाजाचा हा पाया आहे. हाच आजचा रोकडा धर्म आहे. बाबा म्हणायचे, "गोरगरीब आदिवासी मुलांना शिक्षण द्या. पैसे नाही म्हणाल तर जेवणाचं ताट मोडा.हातावर भाकरी खा,बायकोले लुगडं कमी भावाचं घ्या,पण मुलाले शाळेत घातल्याविना राहू नका. एवढं सगळं झालं की समाज प्रगतीच्या मार्गावरून चालू लागलाच म्हणून समजा की! लागतंच काय दुसरं?"

गाडगे बाबांनी साक्षर आणि निरक्षर समाजामधील फरक पाहिला. त्यांनी हेरले की जनसामान्यांच्या दारिद्र्याच्या मुळाशी निरक्षरता आहे.. अज्ञान आहे. बाबा स्वतः शिकले नव्हते. वडील वारल्यानंतर त्यांना लहानपणी आपल्या आईसोबत मामाच्या घरी आश्रयाला राहावे लागले. मामाही निरक्षर होते. त्यांचा शेतीचा व्यवसाय होता, शेतीसाठी सावकारांकडून कर्ज काढावे लागत असेल तर या संबंधित सावकारांच्या दिवाणजी कशावर तरी अंगठा घेत, हा अंगठा कशावर घेतला हे समजत नसे, मामांचा सावकार व दिवानजी वर पूर्ण विश्वास होता. मामांनी प्रामाणिकपणाने कर्जाचे हप्ते फेडले तथापि सावकारी विचाराने मामांची सर्व जमिनी कर्जात गेली. निरक्षरपणा मुळे बाबांवरील झालेला भयंकर दुष्परिणाम बाबाने अनुभवला म्हणून बाबांनी मानवी जीवनात शिक्षणाला फार महत्त्व दिले. 

संत गाडगे महाराज आपल्या कीर्तनातून सतत सांगायचे की जे लोक दरिद्री आहेत त्यांचे मूळ कारण त्यांना शिक्षण नाही. आता प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क मान्य केला पण आजही शाळावाह्य मुलांची समस्या मोठी आहे. इयत्ता पाचवी, आठवीला शाळा मध्येच सोडून द्यायचं प्रमाण खूप मोठं आहे. आता तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्येच लिहिले आहे की इयत्ता आठवी मध्ये शाळा सोडण्याचे प्रमाण तीन कोटी हुन अधिक मुलांचे आहे. अशा वेळेस गाडगेबाबांचे विचार प्रत्यक्षात उतरवणं किती महत्त्वाचं हे समजतं. शिक्षणाचं महत्त्व ते अतिशय सोप्या पद्धतीने जनतेला पटवून देण्यात ते माहीर होते.

एका गाडग्यात सारी हिंमत एकवटून कृतिशील समाजकार्याचा वसा कळत्या वयापासून पुढे आयुष्यभर निभावणाऱ्या या डेबूजी झिंगराजी जानोरकरचा जन्म अमरावती जिल्ह्यातल्या कोतेगाव (शेंणगाव) इथे 23 फेब्रुवारी 1876 रोजी झाला आणि 20 डिसेंबर 1956 ला अमरावतीत गाडगेबाबांचं निधन झालं. 

दरम्यानचा जीवनकाल दीनदुबळ्यांच्या गरजा भागवण्यात, शिक्षणाचा जीव तोडून प्रसार करण्यात आणि वणवण करून जनसमूहापर्यंत पोहोचून चार खडे बोल सुनावत लोकांना शहाणं करण्याचा प्रयत्न करण्यात गेला. 'सेवा परमो धर्म:' म्हणत खऱ्या धर्माची-माणुसकीची शिकवण देणाऱ्या संत गाडगेबाबांचे शिक्षणविषयक विचार अभ्यासताना आपण बौद्धिक पातळीवर पुनःपुन्हा शहाणे होतो. ते म्हणत, “मी कोणाचा गुरु नाही, माझा कोणी शिष्य नाही.” स्वच्छता हा देव मानणारा, हा त्या परमेश्वराचा परमभक्त कधीही देवळात गेला नाही. मूर्तिपूजा त्यांना मान्यच नव्हती. "स्वच्छतेला देव मानणं", हा विचार खरं तर विद्यार्थ्यांवर शाळेपासूनच बिंबवला पाहिजे. त्यांनी माणसात देव शोधला. शिक्षणावर त्यांची अढळ श्रद्धा होती. शिक्षण हे समाज परिवर्तनाचं साधन आहे असं ते म्हणत. शिक्षणामुळे आपण या जगात कशासाठी आलो आहोत ते कळतं. अंधश्रद्धेवर त्यांनी आपल्या वाणीने अखंड प्रहार केले. कृतीने त्या उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला. 

एकदा गंगेवर ते ओंजळीत पाणी घेऊन घेऊन डोक्यावरून पाठी फेकत होते. 

लोकांनी विचारलं, "बाबा, हे काय करताय?" 

"माझ्या अमरावतीतल्या शेताले पाणी देतो."

"असं कसं पोचल बाबा इतक्या दूर?"

"का बरं?" म्हणे, "तुम्ही देता ते अन्न, पाणी पार स्वर्गात तुमच्या पितराले पोहोचतं तर माझ्या शेताले का न्हाई पोहोचणार?"

असा अंधश्रद्धेचा पार इस्कोट करून टाकी बाबा! ते नेहमी कीर्तनात म्हणत, "मंदिरात देव नाही, पुजाऱ्याचं पोट असतं."  त्यांनी देव नाकारला नाही. पण देवाचा खरा अर्थ शोधला. ज्यांच्यापाशी जराही भोंदूपणा नव्हता अशा सगळ्या खऱ्या संतांनी हेच केलं. देव ही संकल्पना फार सोप्या पद्धतीने उलगडून दाखवली. हे विचार मुलांपर्यंत पोहोचले पाहिजेत. नाहीतर विद्यार्थी डॉक्टर, शास्त्रज्ञ होतील पण प्रॅक्टिस चालत नाही म्हणून वेगवेगळ्या पूजा करतील. वैज्ञानिक दृष्टिकोन हा शिक्षणाचा पाया आहे. राज्यघटनेतच तसं नमूद केलं जे गाडगेमहाराज कृतीतून करून घ्यायचे.

"सत्यनारायण कुठून आला?" विचारत गाडगेबाबा. त्याला लोकांनी तयार केलेला देव म्हणत. 

ते कीर्तनात म्हणत, "मघाशी तुम्ही ती पोथी ऐकलीच असंल. त्या कलावती का लीलावतीच्या साधुवाण्याची बोट समुद्रात बुडाली. पार गेली रसातळाला. त्या बाईने सत्यनारायणाचा प्रसाद खाताच झटकन ती बोट आली सुकीठाक ठणठणीत पाण्यावर. काय?" उपरोधाने विचारत, "आहे का न्हाई हा देवाचा चमत्कार? गेल्या दोन महायुद्धात फ्रान्स-अमेरिकेच्या शेकडो मोठमोठ्या बोटी महासागरात बुडाल्या आहेत. त्या बाहेर काढण्याची ही सोपी युगत अजून त्यांना कुणी सांगितली कशी न्हाई कोण जाणे! बंदरावर एक मोठा सत्यनारायण केला की त्याचा प्रसाद सगळ्यांनी खाल्ला की भराभर बुडालेल्या बोटी बाहेर येतील की नाही? सांगा तुम्ही. विलायतची भानगड लांबची. मुंबई बंदरात बुडालेली रामदास बोट तरी पूजा घालून कोणा भगताने बाहेर आणून दाखवावी. बाबांनो, भोळसटांना ठकवून पैसे काढण्याचा हा एक लबाडीचा धंदा आहे. त्याच्या नादी लागू नका.” असं कळकळीने सांगत असत. 

प्रबोधनकार ठाकरे यांनी गाडगे महाराजांचं एक छोटेखानी चरित्र लिहिलं आहे. त्यात गाडगेबाबांचं विचारसंचित उलगडून दाखवताना त्यांनी अनेक दाखले दिले आहेत. सत्यनारायणाचा दाखलाही यात वाचायला मिळतो.

‘आपल्या नजरेसमोर शेकडो अमंगल, अनीतिमान आणि अन्यायी गोष्टी घडतात. चालायचंच हे असं, त्याला कोण काय करणार? अशा बेदरकार वृत्तीने आपण कानाडोळा करून पुढे जातो. डेबूजी तसल्या घटनेचं निरीक्षण, चिंतन-मनन करत तिथेच उभा राहायचा आणि चटकन हवा तो धोका पत्करून ती घटनेची गाठ सोडायला, फोडायला किंवा तोडायला धावायचा. 

‘एका नाक्षर बौद्धाचा मुलगा मुंबईला कामावर गेला होता. पुष्कळ दिवस त्याचे खुशालीचे पत्रच नव्हते. एकदा ते आले. खेड्यात वाचणारा शहाणा कोण? तर, कुळकर्णी महाराज! 

‘दादा पाया पडतो, वाचून दाखवा.’ त्याचे ते पत्र कुळकर्ण्यांनी घेतले. 

‘ही माझी लाकडे फोड, मग दाखवतो वाचून.’ 

‘पण पोरगा खुशाल तर आहे ना दादा?’

‘आधी लाकडे फोड मग सांगेन पत्र वाचून.’ 

तास-दीड तास खपून त्याने दीड-दोन गाडाभर लाकडे फोडून रचली. 

‘पोरगा खुशाल आहे ना दादा तेवढं तरी सांगा.’ पण प्रत्येक विनवणीला शिवी हासडली जात होती आणि काम पुरे करण्याची दटावणी. जीव कासावीस होऊन तो घामाघूम होऊन वैतागून खाली बसला. ‘पत्र परत द्या.’ म्हणाला. त्याने दिले नाही. तेवढ्यात डेबूजीची स्वारी तिथे आली. त्याने सगळे पाहिले होते. 

‘आण रे बाबा इकडे तुझी कुऱ्हाड’ डेबूजीने पुढची सारी लाकडे फोडली आणि कुळकर्णी महाशयांकडे नजर रोखून म्हटले, ‘काय देता का न्हाई पत्र त्याचे त्याला परत?’ त्यांनी पत्र परत केले. डेबूजी त्या माणसाला म्हणाला, ‘आपण दोघेही गाढव. आपण शिकलो असतो तर आपली ही अवस्था झाली असती का? शिक्षणाशिवाय माणूस धोंडा.' या वेळेपासून डेबूजीने आपल्या कीर्तनात शिक्षणाच्या माहात्म्यावर जोरदार प्रवचनं करण्याचा सपाटा चालू ठेवला.’

त्यांची व्याख्यानं द्यायची पद्धत तर आजच्या शिक्षकांनी खरंच शिकली पाहिजे. ते लोकांना प्रश्न विचारून विचारून प्रबोधन करत असत. लोकांना प्रश्न विचारायचे आणि त्यांच्याकडून उत्तरं काढून घ्यायची. 

शिक्षणाच्या संदर्भात समाजमन जागृत करताना गाडगेबाबांच्या अखेरच्या कीर्तनातला पुढील संवाद लक्षवेधी आहे -

हे लोक का गरिबीत राहिले? 

एक तर याहिले नाही विद्या. 

काय नाही?

- वि ऽ द्या. ..

ज्याले विद्या नसेल त्याले खटाऱ्याचा बैल म्हटलं तरी -

- चाले ऽ ल. ... !

या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीतून ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ तयार होतो. त्यातून ते ‘जिज्ञासा’ जागृत करत असत. हा वैज्ञानिक दृष्टिकोन तयार करण्याचा पाया आहे. हे चौथी शिकलेला बाबा ने कृतीतून समजावून दिले. शिक्षणाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा. हा त्यांचा ध्यास आणि अट्टाहास होता. गाडगेबाबांच्या सगळ्याच कृती आणि सगळेच प्रयत्न कायम यशस्वी होत आले कारण त्यामागे फार मोठा विचार आणि चिंतन असे. प्रश्नोत्तरातून प्रबोधन’ ही पद्धत फ्रॉईडपासून मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी मांडली. रॅशनल इम्होटिव्ह थेरपीचे जनक डॉ.अल्बर्ट आलीस यांचा आरईबीटीचा पायाच मुळी प्रश्नोत्तराचा आहे. याच्यातूनच माणूस विचार करू लागतो. वास्तविक दोघांचा दुरान्वयानेही काही संबंध नाही. पण तुलना यासाठी की गाडगेबाबांनी किती मोठी विचार करण्याची पद्धत आपल्याला दिली आहे. हे विचार जर आज शिक्षणपद्धतीत आणले तर आपली शिक्षणपद्धती खऱ्या अर्थाने प्रगत होईल.

बऱ्याच समाजसुधारकांनी त्यांचं मार्गदर्शन घेतले होते. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांनीही त्यांची भेट घेतली होती. गाडगेबाबांच्या नावाने अमरावती विद्यापीठ आहे.

खरंतर गाडगेबाबा हा सगळा प्रत्यक्षात उतरवायचा विषय आहे. भावनिक बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता, बुद्ध्यांक यांबद्दल अलीकडे बरीच चर्चा सुरू असते. गाडगेमहाराजांचा माणूस समजून घेण्याचा आभाळाएवढा प्रयत्न पाहिला की या सर्व संकल्पनांचा त्यांनी किती सहजपणे विचार केला होता हे प्रकर्षाने लक्षात येतं. त्या अनुषंगाने पायाभूत अशी सगळी मूल्यं त्याकाळी लागू होती पण ती जास्त प्रमाणात आत्ताच्या काळात लागू होतात. आता उलट आंतरराष्ट्रीय अंधश्रद्धा मोडीत काढायचं आधुनिक आव्हान आपल्या समोर आहे. 

बाबा हे कर्ते सुधारक होते, त्यांनी केवळ शिक्षणाचा प्रचार केला नाही तर शिक्षण संस्था व गरीब अनाथ विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृह काढलेत व लोकांना प्रेरणा दिली. इतकेच नव्हे तर त्यासाठी लागणारा निधी गोळा करून दिला. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांची शैक्षणिक कार्याबाबत बाबा नेहमी भेट घेत असत. १९३९ मध्ये सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केलेल्या शाळेच्या उद्घाटन समारंभ होता, त्यादिवशी रात्री तिथे बाबांच्या किर्तनाला अपार जनसमुदाय लोटला होता. बाबांनी कीर्तनात सांगितले मुलांना निरक्षर ठेवणे पाप आहे आणि दुसरं पाप म्हणजे नशा करणे.  भाऊराव लोकांचे भले करावयास निघाले, त्यांना मदत करा, शैक्षणिक कार्याला मदत करणे हीच देवाची खरी भक्ती आहे.. हीच देवाची महापूजा होय.. यादुसरे पुण्य नाही.

बाबा कधीच देवळात गेले नाही. त्यांनी शिक्षणालाच, स्वच्छतेला, गरिबांच्या मदतीला देव कार्य मानले.

अशा या फकिराने पैसा उभा करून शंभरहून अधिक धर्मशाळा बांधल्या हे सर्वज्ञात आहे. सर्व धर्मशाळातून गाडगे महाराज मिशनतर्फे आजही रोज मोफत दुपारी चार वाजता जेवण मिळतं; ही चार ची वेळ का.. महिती आहे? कारण दोन्ही वेळचं एकदम मिळावं म्हणून. आपल्या विद्यार्थ्यांना हे सगळं माहीत व्हावं या हेतूने इस्पॅलियर स्कूलकडून दरवर्षी एक उपक्रम राबवला जातो. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सेंड-ऑफच्या दिवशी ठीक चार वाजता आम्ही मुलांना घेऊन गाडगेबाबा धर्म शाळेत जातो, गाडगेबाबांचे विचार त्यांना समजावून सांगितले जातात. मुलांच्या हातून तिथे अन्नदान करून गोर गरिबांचा आशीर्वाद घेतला जातो. 

हा आशीर्वादही कृतिशील व्हावा आणि संत गाडगेबाबांनी फार पूर्वीच सुचवलेल्या शैक्षणिक वैज्ञानिक मार्गावरून आधुनिक भारताची ही वाटचाल व्हावी ही सदिच्छा!

सचिन उषा विलास जोशी

शिक्षण अभ्यासक




Monday, 21 February 2022

चला कोरोनाला विसरून परीक्षेला सामोरे जाऊ..

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वाचावा असा शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी लेख

विद्यार्थ्यांनो तुम्ही वर्षभर या कोरोना काळात अभ्यास केला, त्याबद्दल तुमचे अभिनंदन. परीक्षेपूर्वी ची तयारी मनासारखी झाली असली तरीही प्रत्यक्ष परीक्षेला सामोरे जाताना अनेकांना अडचणी येतात. मुख्य अडचण म्हणजे लिखाणाचा सराव झाला नाही त्यामुळे वेळेत पेपर पूर्ण होईल की नाही याची भीती.. पण मित्रांनो बोर्ड परीक्षा मंडळ ने तुम्हाला परीक्षेसाठी अधिकचा वेळ दिला आहे. त्यामुळे वेळेत पेपर पूर्ण होईल की नाही ही चिंता आता बंद करा आणि परीक्षेच्या तयारीला लागा.

विद्यार्थी मित्रांनो परीक्षा अटळ आहे, तिला धीराने सामोरे जायला हवे. त्यासाठी अभ्यास करून जय्यत तयारी करायलाच हवी. परीक्षेला सामोरे जाताना सहजतेने, निर्भयपणे, योग्य निर्णय घेत वाटचाल करावी लागते.... कारण परीक्षा ही फक्त मार्कंची, तुमच्या अभ्यासाची चाचणी नसते तर मानसशास्त्रीय शक्तींची ही चाचणी असते. तुमच्या मनाची ताकद, स्मरणशक्ती, एकाग्रता याची सुद्धा ही चाचणी असते.

काही विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाताना खंतावलेले, धास्तावलेले आणि अति भीती बाळगतात त्यामुळे त्यांच्या हातून पेपर सोडवताना छोट्या छोट्या चुका होतात. त्या चुका टाळण्यासाठी काही गोष्टी पाळायला हव्यात आणि काही गोष्टी टाळायला हव्यात.

परीक्षेमध्ये कुठल्या गोष्टी पाळायला हव्यात आणि कुठल्या टाळायला हव्यात त्या पुढीलप्रमाणे....

१. परीक्षा जवळ आल्यानंतर नवीन कोणताही अभ्यास करू नये. त्यामुळे नवीन टॉपिक समजून घेण्यात वेळ वाया जाईल आणि तो टॉपिक समजला नाही तर टेन्शन घेऊन आत्मविश्वास कमी होईल.

२. परीक्षा जवळ आल्या नंतर झालेल्या अभ्यासातील उजळणी करावी. नमुना सराव प्रश्नपत्रिका सोडवाव्यात.

३. परीक्षेच्या आदल्या दिवशी पुरेशी झोप घ्या. किमान सहा तास झोप हवी. सर्वात महत्त्वाचं परीक्षेच्या आदल्या दिवशी टप्प्याटप्प्याने झोपू नका. जसं रात्री दहा वाजता झोपलात आणि बारा वाजता उठला.. पुन्हा एक दीड तास अभ्यास केला मग पुन्हा झोपलात.. पुन्हा तीन चार वाजता उठलात आणि पुन्हा झोपलात..मग सकाळी उठलात.. असं मुळीच करू नका. परीक्षेच्या काळात तुमच्या मेंदूला सलग पाच ते सहा तास झोप हवी. जेवढा मेंदू तुमचा रिलॅक्स असतो तेवढं स्मरणशक्ती साथ देत असते. परीक्षेत भराभर तेव्हाच आठवतं जेव्हा तुमचा मेंदू रिलॅक्स असतो आणि रिलॅक्सेशन साठी रात्रीची सलग झोप अत्यंत आवश्यक.

४. ज्या विषयाचा पेपर आहे. त्या विषयाची धावती उजळणी करावी, उजळणी करताना केवळ लघु मुद्द्यांची नोंदीची वही नजरेखालून घाला. अमुक प्रश्न येईल, तमुक प्रश्न येईल म्हणणाऱ्या कडे पूर्ण दुर्लक्ष करा.

५. परीक्षेच्या काळात आणि परीक्षेच्या दिवशी चिडखोर , संतापी आणि अप्रसन्न वृत्तीच्या व्यक्तींना भेटण्याचे टाळावे. आपला मूड आनंदी उत्साही राहणे अत्यंत आवश्यक.

६. परीक्षेचे जे सेंटर आले आहे त्या शाळा-महाविद्यालयांमध्ये गेल्यावर जेथे शांत वातावरणात आणि सावली आहे अशा जागी थांबावे. कोरोनामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच सेंटर मिळालेले आहे. त्यामुळे जसं क्रिकेट खेळताना होम पिच असेल तर आपण शतक मारतो तसंच तुमच्या परीक्षेबाबत होईल. तुमच्या शाळेमध्ये परीक्षा द्यायची असल्याने तुमचा आत्मविश्वास अजून नक्की वाढेल याची खात्री आहे.  

७. एन वेळी घरी फोन करावा लागला आणि तुमच्या जवळ मोबाईल नसेल किंवा मोबाईल ची जवळ ठेवण्याची मान्यता नसेल तर वडील आई यांचा मोबाइल नंबर आणि शाळेतील मुख्याध्यापकांचा मोबाइल नंबर आपल्याजवळ हवा. बऱ्याच मुलांना घरचे नंबर सुद्धा पाठव नसतात कारण की त्यांच्या मोबाईल मध्ये नंबर सेव्ह असतात म्हणून एका कागदावर कंपास बॉक्स मध्ये ते नंबर लिहिलेले हवे. 

८. आपण ज्या भागाची जय्यत तयारी केली आहे त्याचीच आठवण परीक्षेच्या काही मिनिटे आधी करावी म्हणजे आत्मविश्वास कायम राहण्यास मदत होते.

९. काही अपरिहार्य कारणांमुळे मनावर ताण असल्यास जवळच्या मित्रांशी, घरच्यांशी बोलून मन मोकळे करा. कुढत बसू नका.

१०. परीक्षा काळातील घरातील, परिसरातील वादविवाद, भांडणे यांच्याकडे दुर्लक्ष करा. तुमच्या मित्र-मैत्रिणींनी काय टोमणे मारले असतील, चेष्टा केली असेल तर लगेच विसरा. या काळात तुमची परीक्षा आणि तुमचं मानसिक स्वास्थ्य तेवढच महत्त्वाचा आहे. परीक्षा नंतर मित्राने केलेली चेष्टा आठवणार सुद्धा नाही पण त्याने तुमचा गेलेला मूड हा डायरेक्ट कायमस्वरूपी परीक्षेवर परिणाम करतो म्हणून या गोष्टी हसण्यावर नेऊन लगेच विसरणे.

११. वेळेचे नियोजन करताना शेवटची 10 मिनिटे उत्तरपत्रिका तपासण्यासाठी मोकळे सोडा.

१२. पेपर संपला की सरळ घरी या. मित्रांबरोबर चर्चा करू नका. तुमचे उत्तर बरोबर असले तरी तुमचा स्वतःवर विश्वास नसतो. मग उगाचच मनामध्ये शंका निर्माण होते. काय बरोबर काय चुकलं हे तपासू नका. सर्व पेपर झाल्यानंतर त्याची चर्चा करायची असेल तर करा पण तीन तासाच्या पेपर नंतर लगेच नको.

१३. बोर्डाच्या धोरणानुसार प्रत्येक प्रश्नपत्रिकेतील 20% प्रश्न सोपे असतात. 60 % प्रश्न सर्वसाधारण व विद्यार्थ्याना सोडविता येण्यासारखे असतात तर उरलेले 20%  प्रश्न हे कठीण असतात. त्यामुळे उत्तीर्ण होणे अजिबात अवघड नाही. आणि खरं सांगतो कोव्हिड मुळे परीक्षा थोडी सोपी असणार आहे पण तुमचा अभ्यास होणे अत्यंत आवश्यक.

१४. परीक्षेचा अर्थ एवढाच आहे की ठराविक कालावधीत निश्चित माहिती अचूक वेळी आठवून लिहिणे. विद्यार्थ्यांनो मनावर खूप ताण आला तर त्यावेळी आकलन शक्ती, निर्णयशक्ती यावर विपरीत परिणाम होतो. 

१५. जर तुम्ही मेडीटेशन करत असाल तर दहा ते पंधरा मिनिटाचे मेडिटेशन तुम्ही करू शकतात किंवा दहा मिनिट डोळे शांत बंद करून.. श्‍वासावर लक्ष देऊन.. कल्पनाशक्तीच्या जोरावर visualization करायचे की तुम्ही परीक्षा हॉलमध्ये चालला.. तुम्हाला भराभर आठवतंय.. तुम्ही फास्ट लिहित आहात.. तुमचा पेपर वेळेत पूर्ण होत आहे आणि समाधानाने परीक्षेच्या हॉल मधून बाहेर आलात. असं मनाच्या पातळीवर डोळे बंद करून visualization करायचे. याने तुमच्या सुप्त मनामध्ये पेपर उत्तम लिहाण्याचे प्रोग्रामिंग होते.

१६. परीक्षाकाळात अभ्यासात वेळ घालवण्याऐवजी मंदिरात जाऊन नवस करणे, बुवा बाबांना भेटणे, एक एक तास पूजा मंत्र म्हणणे टाळावे. परीक्षा काळात चुकून सुद्धा स्वतःचे भविष्य अजिबात वाचू नये.

१७. विद्यार्थ्यांनी सोबत पाण्याची बॉटल आणि त्यात ग्लुक्लोज टाकून नेला तर अधिक उत्तम. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डिहायड्रेट होणार नाही याची काळजी घ्यावी.

१८. उत्तरपत्रिका लिहिताना अचानक विसरायचे झाले, किंवा शब्द निसटणे, मुद्दा विसरणे असे झाले तर घाबरू नका. हे स्वाभाविक आहे पण अडचण कुठे होते तर त्यानंतर तुम्ही तुमच्या मनात नकारात्मक विचार करतात आणि पुढे मग आठवत नाही. म्हणून अशी वेळ आली तर अजिबात नकारात्मक विचार न करता मनामध्ये पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करावा. जसे, "मला आठवेल..नक्कीच आठवेल.. मी आठवण्याचा प्रयत्न करतो आहे", असं मनात विचार आला की तुम्हाला आठवायला नक्कीच लागेल.

१९. सर्वात महत्त्वाचं, परीक्षा काळामध्ये पालकांनी आपल्या पाल्याला किती मार्क अपेक्षित आहे याची चर्चा करू नये. हा वेळ टार्गेट ठरवण्याचा नसून तर भावनिक आधार देण्याचा असतो.

२०. अचानक आठवलं नाही तर काय कराल? 
काही विद्यार्थ्यांना पेपर लिहिता लिहिता एखादा मुद्दा आठवेल की नाही याची भीती असते तर काही विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरं आठवत नाही आणि तिथेच अडकून बसतात त्यानंतर त्यांची लिखाणाची गाडी पुढे जात नाही. त्यात त्यांनी तिथे नकारात्मक विचार सुरू केला तर पुढे येत असलेल्या प्रश्नाच्या उत्तरांना सुद्धा ते गोंधळतात, आत्मविश्वास कमी होतो.

मित्रांनो, उत्तर पत्रिका लिहिता-लिहिता अचानक ब्लँक होणे, शब्द निसटणे, मुद्दा विसरणे, हे स्वाभाविक आहे. पण अडचण कुठे होते तर त्यानंतर तुमच्या मनात नकारात्मक विचार घोळू लागतात आणि पुढे काहीच आठवत नाही. अशा विद्यार्थ्यांनी खालील पद्धतीने विचार केला तर त्यांना नक्की आठवायला लागते. समजा जर असे झाले की परीक्षा हॉलमध्ये उत्तरपत्रिका लिहिताना अचानक आठवले नाही तर मनातल्या मनात स्वतःला खालील पद्धतीने प्रश्न विचारा आणि विधायक विचार करा. 

सर्वप्रथम घाबरून भांबावून जाऊ नका. दोन मिनिटे शांत बसा, थोडे पाणी प्या. चुकून सुद्धा डोक्याला हात लावून बसू नका. ही नकारात्मक देहबोली आहे. मनावरचा ताण हलका करण्यासाठी स्वतःशी मनातल्या मनात बोला.. "आठवेल मला नक्की आठवेल", "मी आठवण्याचा प्रयत्न करून पाहतो".. मग थोडा विचार करा तुम्ही शाळेत कसे जातात? किती विषय आहेत? आज कोणत्या विषयाचा पेपर आहे? तो विषय कोण शिकवतो? जे प्रश्न येत नाही तो धडा कोणता? शाळेत.. कॉलेजला तो कसा शिकवला होता? क्लासमध्ये तो कधी शिकवला होता का? कसा शिकवला होता? त्या धड्याचे प्रश्न लिहिले ती वही कोणती? व्यवसाय मला सोडवली होती का? असे प्रश्न कुठल्या परीक्षेत सोडवला होता का? कधी मित्रमैत्रिणींबरोबर चर्चा झाली होती का? धड्याच पान आठवण्याचा प्रयत्न करा.. अतिशय शांतपणे तुम्ही स्वतःला असे प्रश्न विचारले तर हळूहळू तुम्हाला आठवू लागते. मुद्दे स्पष्ट होऊ लागतात आणि संपूर्ण धड्याचा धडा आठवतो. या पद्धतीने विचार केला तर केवळ पंधरा वीस सेकंदात तुम्हाला आठवायला मदत होते. प्रश्नांचे उत्तर आठवेल परंतु तुम्ही जमणार नाही.. आठवणार नाही.. मी विसरून गेलो.. असे नकारात्मक विचार करतात. नकारात्मक विचारांनी नकारात्मक भावना आणि आचार निर्माण होतात आणि तुम्हाला खरच आठवत नाही. यापुढे कधीही उत्तरपत्रिका लिहिताना अचानक आठवले नाही तर मुळीच नकारात्मक विचार करायचा नाही. मनातल्यामनात बोलायचे.. "आठवेल, नक्कीच आठवेल", "माझी स्मरणशक्ती चांगली आहे", "माझा अभ्यास झालेला आहे", वरील दिलेले प्रश्न स्वतःला विचारावेत. नक्कीच तुम्हाला संपूर्ण उत्तर भराभरा आठवतील.

सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.

सचिन उषा विलास जोशी


शिक्षण अभ्यासक

Friday, 11 February 2022

कृतिशील शिक्षणाचे पुरस्कर्ते- आचार्य विनोबा भावे

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्र मधील लेख

जर तुम्हाला तुमची जमीन कोणी दान करायला सांगितली तर कराल का? मग तो किंवा ती कितीही मोठी प्रतिष्ठित व्यक्ती असो...तुम्ही एकतर देणार नाही किंवा त्यात तुमचा फायदा शोधाल किंवा ज्याला दान देणार त्याच्या संस्थेला निदान तुमचं दान द्यायला सांगाल, पण जगात एक अशी व्यक्ती होऊन गेली की जिने चाळीस लाख एकरपेक्षा अधिक जमीन श्रीमंतांकडून घेऊन गरीब आणि गरजूंना शेतकऱ्यांना मोफत वाटली. या चळवळीला नाव होतं 'भूदान चळवळ' जगात एवढ्या प्रमाणात दान मागून वाटलेल्या जमिनीचा विक्रम एका व्यक्तीच्या नावावर आहे आणि ती व्यक्ती म्हणजे भारतीय आध्यात्मिक विचारवंत, तत्त्वज्ञानी आचार्य विनोबा भावे. जमीनदारांना आचार्य म्हणायचे की, ''तुम्ही तीन भाऊ असाल तर चौथा भाऊ मला समजा आणि माझ्या वाटणीचा जमिनीचा हिस्सा मला द्या.'' त्यावेळेस दान देणारी व्यक्ती विनोबांच्या नावे जमीन करून देत असे आणि विनोबा गरजू शेतकऱ्यांना जमीन त्यांच्या नावे करून द्यायचे. हे फक्त व्हायचं विनोबांच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या जोरावर. त्यांचा भारतीय संस्कृती आणि वेद, भगवद्गीता यांचा सखोल अभ्यास होता. 

त्यांना आपल्या सर्वांसाठी भारतीय विचारसरणीची शिक्षणपद्धती आणायची होती. जिच्यात भावनिक बुद्धिमत्तेला प्रथम स्थान असलं पाहिजे असं त्यांना वाटायचं. त्यांची इच्छा होती की १५ ऑगस्ट १९४७ ला जसा झेंडा बदलला त्याच वेळी शिक्षण सुद्धा बदललं पाहिजे. त्यावेळी तसं घडलं नाही आणि त्याचे परिणाम आपण आजपर्यंत भोगतोय. इंग्रजांची 'घोका आणि ओका' शिक्षणपद्धती अजूनही आपण कमी अधिक प्रमाणात अवलंबतो आहोत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणते की आय.क्यु.बरोबर शिक्षणात इ.क्यु.ला महत्त्व देण्याची गरज आहे; हेच विनोबा सांगत. 

आचार्य विनोबा म्हणायचे की, ''शिक्षण हे दानकार्य आहे. ज्यामध्ये अहंकाराला अजिबात स्थान नको. विद्यार्थ्यांना शिकवणारा शिक्षक नम्र हवा आणि विद्यार्थीसुद्धा नम्र हवा. जेव्हा दोघंही नम्र असतात तेव्हा शिकण्या-शिकवण्याची प्रक्रिया चालू होते. शिक्षण-विद्यार्थ्यांनी एकाच वेळी देवाला प्रार्थना करायची 'तेजस्वी नावधीतमस्तु' याचा अर्थ आमच्या दोघांचं शिक्षण तेजस्वी बनो.'' ते पुढे म्हणतात, ''या प्रार्थनेत शिक्षक हे 'मी तुला शिकवतोय' असं म्हणत नाहीत. 'आपण दोघंही शिकत आहोत' असं म्हणतात.'' आजचा ज्ञानरचनावाद हेच सांगतो की 'टीचर्स हे फॅसिलेटर्स' आहेत. शिक्षकाने शिकवायचं नाही विद्यार्थ्यांबरोबर एक्स्प्लोर करायचं. तेजस्वी नावधीतमस्तु सारखे. 

विनोबांचा आग्रह होता की, ''शिक्षणामध्ये परिश्रमाला विशेष महत्त्व असलं पाहिजे. परिश्रमाच्या अवतीभवती शिक्षण असलं पाहिजे.'' खासकरून लहान विद्यार्थ्यांच्या बाबतीत ते खूप आग्रही होते. हा मुद्दा आजच्या शिक्षणपद्धतीत असणं आवश्यक आहे. आजकालच्या मुलांना शारीरिक श्रमच घ्यावे लागत नाहीत. चाईल्ड ओबेसिटीचं प्रमाण वाढलं आहे. विनोबा म्हणायचे, ''मुलांना शारीरिक कामं करायला द्यावीत.'' इथे शारीरिक कामं आणि मैदानी खेळ यांत फरक आहे. आजचं विज्ञान सांगतं की पहिल्या सहा ते आठ वर्षात मुलं जेवढे पाच इंद्रियांचे अनुभव घेतील तेवढी मेंदूची उत्तम जडणघडण होईल. हेच सगळं विनोबा भारतीय अध्यात्माच्या आधारे समजावून सांगायचे. 

विनोबांनी 'शिक्षा के मूलभूत तत्त्व' या नावाने पुस्तक लिहिलं. त्यामध्ये ते लिहितात की शिक्षण त्रिसूत्रीयुक्त असलं पाहिजे. शिक्षणामध्ये तीन गोष्टी हव्या. एक योग, दुसरा उद्योग आणि तिसरा सहयोग. 

ते म्हणतात, ''योगाचा अर्थ केवळ आसन करणं, व्यायाम करणं असा नसून आपल्या मनावर नियंत्रण करायला शिकणं हा आहे.'' सध्या बऱ्याच शाळांमध्ये योग शिकवले जातात पण मनावर नियंत्रण करायला विद्यार्थ्यांना शिकवत नाहीत. ‘अतिरिक्त स्क्रिन टाईम’च्या या युगात मनावर नियंत्रण आणायला शिकवणं ही काळाची गरज आहे. त्यासाठी मेडिटेशन-ध्यान हा उत्तम उपाय असल्याचं विनोबांनी कधीच सांगून ठेवलं आहे. 

शिक्षणामध्ये दुसरा महत्त्वाचा विषय ते सुचवतात उद्योग. विद्यार्थ्यांमधल्या गुणांचा विकास करायचा असेल तर अभ्यासाबरोबर काही उद्योग विद्यार्थ्यांना करायला देणं गरजेचं आहे. प्रॅक्टिकल ट्रेनिंग्जवर भर द्यायचे. अनुभवातून शिक्षणाला ते खरं शिक्षण समजायचे. उद्योग म्हणजे फक्त चरखा चालवायला देणं नाही असा त्यांचा विचार होता. त्यांच्या मते आधुनिक यंत्र, वर्कशॉप हे प्रत्यक्ष चालवणायचा अनुभव विद्यार्थ्यांना देणं. ते म्हणायचे, ''श्याम' हा हिंदुस्थानचा वर्ण आहे. आपण सगळे 'श्यामवर्ण' आहोत. भगवान कृष्णाचा वर्ण 'श्याम' होता. म्हणून 'श्यामसुंदर' वर्ण भारतात प्रचलित आहे. 'कृष्ण' या शब्दाचा अर्थ होतो 'शेती करणारा....शेतकरी' जो शेती करतो त्याच्या शरीराचा रंग जो आहे तो वर्ण कृष्णाचा आहे. म्हणून आपली शिक्षणव्यवस्था अशी हवी की विद्यार्थ्यांचा शाळेपासून शेतीशीही संबंध हवा. शाळेला लागून २-३ एकर शेती हवी इथे विद्यार्थी एकत्रित शेती करतील.'' हे समजावताना ते पंडित नेहरुंचं वाक्य सांगतात. नेहरु इंग्रजीमध्ये म्हणतात 'नेशन्स डिके व्हेन दे लूज कॉन्टॅक्ट विथ नेचर' राष्ट्र जेव्हा निसर्गाशी असलेल्या नात्यापासून, त्याच्या स्पर्शापासून दूर जातं तेव्हा ते क्षीण बनतं. म्हणून विनोबा म्हणतात, ''शेती ही शाळेपासून शिकवली तर विद्यार्थी नेहमी निसर्गाशी संपर्कात राहतील.'' 

पाहा..किती मोठी गोष्ट विनोबा समजावतात. आज शेतकऱ्यांची परिस्थिती आपण सर्वच जाणतो. निसर्गाशी नाळ तुटत आली आहे. विनोबांचं हे तत्त्व आपण धरून ठेवलं असतं; त्याचा ऱ्हास होऊ दिला नसता तर आज शेतीची अवस्था एवढी वाईट झाली नसती. दुसरा महत्त्वाचा मुद्दा. जेव्हा लहान मुलं मातीला स्पर्श करतात, शारीरिक कष्ट करतात तेव्हा मेंदूमानसशास्त्र सांगतं की, त्यांच्या मेंदूच्या पेशींची घट्ट जुळणी होत असते. विनोबांचा जो आग्रह आहे की उद्योग शिकवताना प्रत्येक व्यक्तीचा संबंध शेतीशी यायलाच हवा. तो आपण आज प्रत्यक्ष शिक्षणात आणूया. शाळेत जागा नसेल तर गच्चीवर छोटी बाग बनवा. पण विद्यार्थ्यांना निसर्गाशी संपर्कात आणा. 

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा रिपोर्ट प्रसिद्ध झाला त्यामध्ये शाळेत विद्यार्थ्यांना कोलॅबरेशन शिकवा असं सांगितलं आहे. खास प्रेस कॉन्फरन्स घेऊन सर्व जगातील शाळेच्या प्रिंसिपल्सना आव्हान केलं आहे की जगात शांती हवी असेल तर शाळेत कोलॅबरेशन म्हणजेच सहकार्य शिकवा. विनोबा भावे याचा आग्रह १९४७ पासून धरतायत. ते म्हणतात, ''शिक्षणामध्ये तिसरी महत्त्वाची गोष्ट आणा ती म्हणजे सहयोग-सहकार्य. आपल्या सर्वांना एकत्र जगायचं आहे. एकत्र आनंदी जगण्यासाठी एकमेकांना सहकार्य करायला शिकवा. मी महाराष्ट्रीय, मी तमीळ, मी पंजाबी असं न शिकवता 'मी भारतीय' असं शिकवा. 'मी भारतीय आहे' हे सर्वांत छोटी मागणी आहे. सर्वांत मोठी मागणी म्हणजे विद्यार्थ्यांना 'विश्वमानुष:' मी विश्वमानव आहे हे शिकवा. आपण आज भारताचं, त्याच्या प्रांतांचं गीत म्हणतो पण वेदांमध्ये पृथ्वीसुक्त आहे, भारतसुक्त नाही. नाना धर्माणां पृथिवीं विवाचसमू'- ही पृथ्वी आपल्या सर्वांची मातृभूमी आहे. यामध्ये अनेक धर्म आणि अनेक भाषा आहेत. या वास्तविकतेला समोर ठेवून विद्यार्थ्यांनी 'विश्वमानुष:' बनलं पाहिजे.'' हे सांगताना विनोबा एक जयजयकार द्यायला सांगतात. 'जयजगत्।' आणि पुढे म्हणतात, ''जय जगत्' ही माझी सर्वांत मोठी मागणी आहे पण किमान तुम्ही 'मी भारतीय आहे' एवढं तरी म्हणा.'' 

याचाच अर्थ विनोबांची इच्छा होती की 'भारतीय' शब्दाहून वेगळा विचार नको. भारतीयांच्या खाली उतरू नका जसे मी मराठी, मी हिंदू, मी मुसलमान...

अतिशय महत्त्वाचा आणि एकविसाव्या शतकाला लागू होणारा मुद्दा ते शिक्षणात आणायला सांगतात. नुसताच सांगत नाहीत तर 'सहयोग' गुण कसा आणायचा यासाठी ते सर्वांना सुचवतात की, ''विद्यार्थ्यांना आधीपासून दुसऱ्यांमधले फक्त गुण शोधायला शिकवा. मनुष्य म्हणजे गुण-दोषांनी भरलेला आहे. समोरच्यातले फक्त गुणच दिसतील असं शिक्षण विद्यार्थ्यांना द्या.'' भावनिक बुद्धिमत्तेचा महत्त्वाचा मुद्दा विनोबा शिक्षणात आणायला सांगतात. अजूनही वेळ गेलेली नाही. विनोबांचे शिक्षण विचार आजही एकविसाव्या शतकात लागू होतात. 

विनोबांचा म्हणजे विनायक नरहरी भावे यांचा जन्म ११ सप्टेंबर १८९५ रोजी कोकणातल्या पेणजवळील गोगादे गावात झाला. ते भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि 'भूदान चळवळी'चे प्रणेते होते. त्यांना महात्मा गांधींचे उत्तराधिकारी म्हणूनही ओळखलं जातं. १९४० मध्ये गांधींनी वैयक्तिक सत्याग्रह पुकारला होता. त्यावेळी 'पहिले सत्याग्रही' म्हणून महात्मा गांधी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली होती. आचार्यांचं गीताप्रवचन प्रसिद्ध आहे. ते जिथे भाषण करायचे तिथे लगेच त्याचं लिखित स्वरूपात रूपांतर व्हायचं.

त्यांचे शिक्षणविषयक विचार हे खरंच व्यावहारिक आणि आजच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला लागू होणारे आहेत. शिक्षणाच्या माध्यमासाठी त्यांचा मातृभाषेचा आग्रह होता. त्यामागे एक व्यावहारिक दृष्टिकोनही होता. ते म्हणायचे, ''विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत मातृभाषेतून शिकवा. फक्त विज्ञानातल्या ज्या संकल्पना आहेत त्यासाठी इंग्रजीतले शब्द तात्पुरते वापरा. हळूहळू त्या शब्दांना मातृभाषेतले शब्द येतील.'' हे समजावताना ते म्हणतात, ''आपली भाषा ही विस्कळीत भाषा आहे आणि पुढे अजून विकसित होईल. ज्ञानेश्वरांनी बाराव्या शतकात 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ लिहिला आणि इंग्लडच्या 'कँटरबरी टेल्स'शी तुलना केली तर 'ज्ञानेश्वरी'मध्ये जेवढे शब्द आहेत त्याच्या एक चतुर्थांश म्हणजे चौथा हिस्सा पण 'कँटरबरी टेल्स'मध्ये नाही. 

आत्ताच अर्थसंकल्प जाहीर झाला ज्यामध्ये e-content  मातृभाषेतून बनवण्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे. हाच मुद्दा विनोबा त्याकाळी सांगत होते. 

१९४७ साली जे महात्मा गांधी म्हणाले, विनोबांनी ज्याचा आग्रह धरला तो मातृभाषेतून शिक्षण हा विचार जर आपल्याकडे राबवला गेला असता तर आज भारत विज्ञानात, इनोव्हेशनमध्ये पुढे गेला असता. 

विनोबा हे गांधीवादी होते. महात्मा गांधींच्या 'नयी तालीम' या शिक्षणप्रणालीचे पुरस्कर्ते होते. फक्त त्यांचा जोर भारतीय अध्यात्मावर अधिक होता. आचार्य म्हणायचे, ''शिक्षक हा सर्वोत्तम सल्ला देणारा असावा. वैयक्तिक आयुष्यात जेव्हा समस्या येतात तेव्हा आपण आईवडील, भाऊ-बहीण, पती-पत्नी, इतर यांच्याकडे सल्ला मागतो पण आपल्या शिक्षकांकडे सल्ला मागायला जात नाही. भारतीय समाज उत्तम सल्ला देणारी शिक्षक ही व्यक्ती हरवून बसत आहे.'' ते म्हणतात, ''शिक्षकामध्ये तीन गुण असावेत. प्रेम, ज्ञान आणि तटस्थता.''

आचार्य विनोबा भावे हे स्वतः असे राष्ट्रीय शिक्षक होते. त्यांचे शिक्षण विचार प्रत्येक पालक, शिक्षक आणि शिक्षणप्रेमी यांनी वाचून अंमलात आणायला हवेत. 

सचिन उषा विलास जोशी

 शिक्षण अभ्यासक



Friday, 28 January 2022

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि शैक्षणिक विचार

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधल लेख

भारताला संत आणि विचारवंतांची फ़ार मोठी परंपरा लाभली आहे. आपण या संतांनी, विचारवंतांनी, समाजसुधारकांनी जो विचार मांडला तो आजच्या शिक्षणक्षेत्राला कितपत लागू पडतो ते पाहणं ही एक रंजक गोष्ट आहे. जीवनशिक्षण, लोकशिक्षण, समाजशिक्षण, क्रमिक शिक्षण, अक्षरशिक्षण..अशी अनेकानेक बिरुदं गरजेनुसार मिरवत मूल्यांचा प्रवास एका फार मोठ्या वैचारिक अभिव्यक्तीद्वारे अगदी वैश्विक पातळीवर आधुनिकतेपर्यंत येऊन ठेपलेला आहे. त्यातल्याच काही मोजक्या संतांच्या-विचारवंतांच्या उद्बोधनाचा शिक्षण आणि पालकत्वाचा विचारवेध आपण इथे घेत आहोत.


महाराष्ट्रात ग्रामपातळीवर भजन-कीर्तनाच्या माध्यमातून अखंडपणे लोकशिक्षणासाठी ज्यांच्या चिपळ्या थिरकल्या, आवाज कडाडला आणि त्यातून त्यांची उद्बोधनाची तळमळ अतिशय प्रभावीपणे जनमानसापर्यंत पोहोचली त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा वेध घेऊया.

आजच्या आधुनिक अशा विज्ञानयुगातल्या विचारांची आणि पर्यायाने शिक्षणाची नाळ या राष्ट्रसंतांच्या वैचारिक प्रक्रियेशी कशी जुळलेली आहे हे पडताळून पाहणं मोठं उद्बोधक ठरतं. त्यांचं सामाजिक भान अनुभवणं गरजेचं ठरतं. तुकडोजी महाराजांचं पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे.  त्यांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी विदर्भात अमरावतीतल्या यावली इथे झाला. 1968 मध्ये त्यांचं देहावसान झालं. समाजातील मूलभूत समस्यांना जाणून त्यावर उपाय करणं हे तुकडोजी महाराजांच्या कार्याचं वैशिष्ट्य होय. त्यामुळे तत्कालीन राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद यांनी ‘गुरुकुंज’ आश्रम इथे त्यांना ‘राष्ट्रसंत’ ही उपाधी दिली.

संत परंपरा बघता तुकडोजी महाराजांचा काळ तसा अलीकडचा. म्हणजे त्यांच्याच काळात भारत स्वतंत्र झाला. त्यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असे दोन्ही काळ अनुभवले. ब्रिटिशांच्या काळातच विद्यालय-महाविद्यालय-विद्यापीठ यांची ओळख भारताला झाली होती. पुढे हा शैक्षणिक प्रवास खरं तर अनेक दिशांनी प्रगती करत राहिला. क्रमिक शिक्षण, ठरावीक अभ्यासक्रम, इंग्रजीबरोबर इतर स्थानिक भाषांतूनही शिक्षण या गोष्टींकडेही भारत वळला. तरीही संत परंपरेची नस पकडून विचारांच्या अभिव्यक्तीसाठी तुकडोजी महाराजांनी भजन-कीर्तनाचा उपयोग का केला? तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जिथे अगदी सांदीकोपऱ्यात खेड्यापाड्यात माणसं राहत होती तिथे ही संतमंडळी पोहोचून जनतेला आपल्या भजन-कीर्तनातून चार उद्बोधक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असत. त्यांनी मराठी, हिंदी भाषेत रचना केलेल्या आहेत. 

आपल्या गद्य-पद्य लेखणीतून चिपळ्या किंवा खंजिरी या वाद्यांच्या सहाय्याने भजनाच्या माध्यमातून परंपरागत अनिष्ट रूढी, जातिधर्मपंथभेद, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, हरिजन मंदिर प्रवेश बंदी अशा समाजघातक रूढींवर कठोर प्रहार करून त्यांनी ईश्वराचं विशुद्ध स्वरूप लोकांसमोर मांडलं. त्यामुळे सर्वधर्मीय, सर्वपंथीय लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले. 

गावं स्वयंपूर्ण बनून तिथले लोक उद्यमशील आणि निर्व्यसनी कसे होतील याचं प्रात्यक्षिकच त्यांनी करून दाखवलं. गावागावात शिक्षणाचं महत्त्व पटवून सांगितलं. त्याबरोबर बलसंवर्धन, शिक्षण, आयुर्वेद आणि कृषिसंवर्धनाचे धडे दिले. त्यांनी आदर्श समाजरचनेला सहाय्यभूत अशी संघटना निर्माण केली. महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिलं. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात आणि दास्यात ठेवणं कसं अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे सांगितलं. विद्यार्थीदशेतील मुलं-मुली यांच्या विकासावर त्यांचा कायम भर राहिला. ते म्हणतात, 
“नुसते नको उच्चशिक्षण आता व्हावा कष्टिक बलवान, सुपुत्र भारताचा.’
आजचा शिक्षणाचा कृतिशील विचार तरी दुसरं काय सांगतो, सुचवतो? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पूर्वीच ही संकल्पना मांडून ठेवली आहे.
अनेक नवनवीन कल्पना, संकल्पना आपल्या रचनांमधून ते मांडताना दिसतात. आपले सगळे विचार समाजाला समजावून सांगण्यासाठी भजन-कीर्तनाला बळ देणारं त्यांचं शब्दसामर्थ्य त्यांना चांगलंच उपयोगी पडलं. मनःपूर्वक, अगदी आतून तुकडोजी महाराज भजन करू लागले की अवघं वातावरण त्यांच्या खड्या आवाजाने दुमदुमून जाई. ते असे तल्लीन होत, भजनी एकरूप होत, इतक्या वेगात जलदगतीने भजन करत की त्यांच्या हातातल्या दोन्ही चिपळ्या जणू एक होत. सगळीच एकतानता साधत असे; विचारांची आणि अभिव्यक्तीचीही. असं प्रत्यक्ष त्यांचं भजन ऐकलेले सांगतात.
ते एका भजनात म्हणतात:
"विठ्ठल रखुमाई घरी दारी
पुंडलिक ही मुलं गोजिरी
त्यांना सेवेचं फूल मी वाहिलं
त्यांना प्रेमाचं फूल मी वाहिलं
माझं गावच मंदिर शोभलं."
याचा अर्थ घरीदारी विठ्ठल रखुमाई असल्याचं ते सांगतात. गोजिऱ्या मुलांना त्यांनी देव मानलं आहे. त्यांनाच सेवेचं फूल वाहिलं आहे. सारं गावच या मुलांमुळे मंदिर झालेलं आहे. 

आजचा ज्ञानरचनावाद नेमकं हेच सांगतो, ‘शाळा विद्यार्थीकेंद्री असावी’ हाच विचार तुकडोजींनी आपल्या विचारांत मांडला आहे. ‘मुलांना सेवेची फुलं वाहिली’ म्हणजे दुसरं काय? आजचा अर्थ हाच आहे की शाळेतल्या विद्यार्थ्यांना मन लावून शिकवलं तर इतर कुठे देव शोधायला जायची गरजच नाही. देवाच्या चरणी फुलं वाहणारे पुजारी हेच फक्त पुजारी नाहीत तर कष्टकरी पुजारी, शेतकरी पुजारी, मजूरही पुजारी, कलावंत पुजारी, गावातले शिक्षकही पुजारी. म्हणजे थोडक्यात, ते कर्मयोगच आचरायला सांगतात.
ज्याने इमानदारीने आपलं काम केलं त्याला वेगळं देवाचं नाव घ्यायची गरज नाही. ज्याने प्रामाणिकपणे काम केलं तो मंदिरात गेला काय..नाही केला काय..फरक पडत नाही..म्हणून ते भजनात म्हणतात: 

"सच काम किया जिसने जग मे , उसने प्रभु नाम लिया…न लिया..."

आजच्या शिक्षकांनी हे सर्व लक्षात घ्यायची निश्चित गरज आहे. सगळे शिक्षक म्हणतील, “आम्ही करतोच आमचं काम मनापासून.” तरीही मग आज पाचवीतल्या साठ टक्के मुलांना दुसरीचं ज्ञानही प्राप्त झालेलं नाही. असं का बरं? म्हणजेच आपण आपले प्रयत्न वाढवायला हवे आहेत. तुकडोजी महाराजांनी सुचवल्याप्रमाणे गावाला मंदिराचं रूप आणायचं असेल तर गावातला प्रत्येक माणूस शिकला पाहिजे, शहाणा झाला पाहिजे.
जीवनशिक्षणही माणसाला शहाणं करतं पण अक्षरशिक्षण त्याची पहिली पायरी आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, “शिक्षण देऊन केली दिवाळी.” म्हणजे आपण लाडू, पेढे, जिलबी खाऊन-वाटून दिवाळी साजरी करतो मात्र गावाला शिक्षण देऊन साजरी होते ती खरी दिवाळी. ‘जीवाभावाने जवं मी पाहिलं माझं गाव.’ तेव्हा कळलं की ‘ज्याच्या ह्रदयात प्रकाश पडला आहे तोच दिवाळी करू शकतो आणि हा प्रकाश शिक्षण देतं.’ म्हणूनच तुकडोजी महाराज म्हणतात,
"शिक्षण देऊन केली दिवाळी, अज्ञानाची करूनी होळी, तुकड्या म्हणे मन रंगलं, आता खोटंनाटं नाही राहिलं, माझं गावच मंदिर शोभलं".

असा गावखेड्यांनीच आपला देश घडलेला आहे, खरा भारत खेड्यात आहे हे समजून उमजून त्यांनी ‘ग्रामगीता’ लिहिली. केवळ आध्यात्मिक उन्नतीवर भर न देता मनुष्याच्या सर्वांगीण विकासावर भर देणं हे राष्ट्रसंतांचं वैशिष्ट्य. ‘ग्रामगीता’ ही त्यासाठी लिहिलेली सर्मसमावेशक सूची आहे.

मनुष्याने देवाच्या भरवशावर स्वस्थ बसणं तुकडोजी महाराजांना मान्य नाही. भविष्य बघणं, बुवाबाजी करणं हे सारं थोतांड आहे असं ते म्हणतात. चांगलं कर्म करणं माणसाचं भविष्य बदलू शकतं हा त्यांचा विचार आहे. महाराजांनी प्रयत्नवादी कर्मच श्रेष्ठ मानलं आहे. ते ‘ग्रामगीते’ त म्हणतात,
क्रियेवीण मार्गचि नाही | कर्तव्य नरा देवपद देई |
तुकड्या म्हणे बना निश्चयी | प्रयत्नवादी ||
त्यांना ईश्वरसत्ता मान्य असली तरीही देवभोळेपणा, अंधश्रध्दा यांच्या ते तीव्र विरोधात होते. अंधश्रद्धा निर्मूलनाबद्दलचे त्यांचे व्यक्त होणारे विचार हे आता शालेय शिक्षणात आले आहेत. आज विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करायला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सांगतं. त्याचा पाया तुकडोजी महाराजांनी घातला.

तुकडोजी महाराजांनी जपानसारख्या देशात जाऊन विश्वबंधुत्वाचा विचार मांडला. आजचं आपलं नवं शिक्षण 'ग्लोबल सिटीजन' हाच विचार मांडतं. तुकडोजी महाराजांची स्वतःची वैचारिक बैठक अगदी पक्की होती आणि विचार अर्थातच प्रगल्भ होते. २००५ मध्ये नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव देऊन विद्यापीठाचा नामविस्तार केला गेला. त्यांनी गावोगाव ‘गुरुदेव सेवामंडळं’ स्थापन केली. त्यांद्वारे आजही अनेक कार्यकर्ते मानवतेचा वसा घेऊन काम करत आहेत.
राष्ट्रसंत हे अध्यात्म क्षेत्रातील विज्ञानवादी संत होत. ‘मानवतेचा संबंध हा मानवाच्या जगण्याचा मूलाधार आहे.’ असं ते जनतेला ठणकावून सांगत. आपला परिचयही त्यांनी- 
"मानवता है पंथ मेरा
इन्सानियत है धर्म मेरा"
असाच करून दिला आहे. हा विचार आज शाळेमध्ये शिकवण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कारण मोठेपणी आपण जाती-धर्मांवर भांडतो आणि मानवता हाच धर्म आहे हे विसरतो.

पुढे ते म्हणतात,
"है जिसकी जुबा मे प्रेम भरा कटुता पटुता का गर्व नही"
हे खरं जगणं, ही खरी माणुसकी. इथे दुसऱ्याचा विचार येतो आणि स्थितप्रज्ञ वृत्तीही.
त्यांनी जनतेला आत्मजागृत केलं. ‘जनसेवेतच ईश्वरसेवा आहे आणि ही मानवतेची उपासना आणि राष्ट्रसेवा आहे.’ अशी शिकवण त्यांनी जनतेला दिली. 
नवं शैक्षणिक धोरणही याच सर्व मूल्यांना धरून आहे. स्वत्वाचा शोध घेऊन त्याचा विकास साधणं महत्त्वाचं असतं. शिक्षणपद्धतीचा उद्देश मुलाच्या आत काय दडलं आहे ते शोधण्याचा आहे. वैश्विक मानवतेची कास धरण्याआधी स्वतःला नीट समजून घ्यायला पाहिजे. सिद्ध करायला हवं. त्यासाठी स्वतःची ओळख पटायला हवी. 
गुलाब गुलाब असतो. मोगरा मोगरा असतो. आपल्याला त्याचा गुलाब करता येणार नाही किंवा गुलाबाचा मोगरा; आणि तशी गरजच नाही. प्रत्येकाचं काही ना काही वैशिष्ट्य असतं. ते त्याच्या आत दडलेलं असतं. पालक शिक्षकांचं काम ते हुडकून काढण्याचं असतं. 
विवेकानंदही हेच म्हणतात, “बाहेरची माहिती आत कोंबणं म्हणजे शिक्षण नाही. ते ज्ञानाशी निगडित असतं आणि ज्ञान हे आत असतं. त्याचा शोध घ्यायला पाहिजे.”
तो शोध घेणं फक्त मानवालाच जमतं. 

माणसाच्या या वैशिष्ट्याकडे तुकडोजी महाराज सर्वांचं लक्ष वेधतात-
" खाना पिना सोना मजा करना पशु भी जानते ।"
एकविसाव्या शतकातला विचार हाच आहे. आता साक्षरता हे शिक्षण राहिलेलं नाही. कौशल्य हे शिक्षण नाही; आत दडलेलं हुडकून काढणं हाच आता शिक्षणाचा अर्थ उरला आहे. सर्वांगीण विकासाचा तो पाया आहे. नवीन शैक्षणिक धोरणात याची अतिशय व्यवस्थित मांडणी केलेली आहे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी नेमकं हेच म्हटलेलं आहे-
मानव जनम कुछ और है,
बिरले इसे पेहेचान ले..।।

सचिन उषा विलास जोशी 
शिक्षण अभ्यासक




Friday, 14 January 2022

शिक्षणाबाबत 'ओशों'चे क्रांतिकारी विचार

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधल लेख

आपल्याकडे बरेच मोठे विचारवंत, समाज सुधारक, संत होऊन गेले. महाराष्ट्रात तर संतांची परंपराच आहे. या सर्वांनी विविध विषयांवर त्यांचे परखड मत मांडले. त्याच्यातील जे मत.. विचार हे शिक्षण संदर्भात होते किंवा त्यांच्या प्रबोधनातील जे विचार आजच्या शिक्षणाला लागू होतात अशा सर्व भारतीय विचारवंतांचा, संतांचा, समाजसुधारकांचा आणि त्यांच्या विचारांचा आपण अभ्यास करणार आहोत.

शिक्षणाबाबत भारतीय विचारवंतांचे विचार आणि नवं शैक्षणिक धोरण यांच्यातला ताळमेळ अभ्यासताना रजनीश ओशो यांचे शिक्षणविषयक क्रांतीकारी विचार ठळकपणे लक्षात येतात. ‘गुलाब ‘गुलाब’ असतो, मोगरा ‘मोगरा’ असतो. गुलाबाला मोगरा करता येत नाही; तर मोगऱ्याला गुलाब. एकमेकांशी तुलनाच होऊ शकत नाही. माळ्याचं काम एवढंच असतं उत्तम खत-पाणी घालणं. मुलांच्या शिक्षणाबाबत पण असंच असतं.’ हा प्रभावी विचार मांडला रजनीश ओशो यांनी.
ओशो हे अशा काही दुर्मिळ तत्त्वज्ञानांपैकी एक असतील ज्यांनी शिक्षणाचा इतका खोलात जाऊन विचार केला. त्यांनी सांगितलं की, ‘जगात अनेक प्रकारच्या क्रांती झाल्या पण मनुष्य आत्तापर्यंत आनंदी होऊ शकला नाही. आता एकच क्रांती व्हायची शिल्लक आहे ती म्हणजे ‘शिक्षणक्रांती.’ त्यांनी शिक्षण या विषयावर अनेक भाष्यं केली, व्याख्यानं दिली. त्यावर ‘शिक्षणक्रांती’ नावाचं त्यांचं पुस्तक सुद्धा प्रसिद्ध आहे. जे नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आज सांगतं ते रजनीश ओशोंनी चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी सांगितलं. 

त्यांच्या शिक्षणाबाबत विचारामागे फक्त तत्त्वज्ञान नसून बालमानसशास्त्र आहे. जे प्रत्यक्ष अंमलात आलं तर प्रत्येक व्यक्ती एक अद्भुत होऊ शकते. ते म्हणतात, ‘पहिल्या पाच-सहा वर्षांत माणसाचं पन्नास टक्के शिक्षण पूर्ण होतं.’ आता हाच त्यांचा विचार व्यक्त करत मज्जामेंदूशास्त्र सांगतं की पहिल्या आठ वर्षांत माणसाच्या ऐंशी टक्के मेंदूची जडणघडण होते. जितकी मेंदूच्या पेशींना चालना मिळेल तेवढा मेंदू तल्लख होतो. हाच विचार ते तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र यांच्या सहाय्याने लोकांना समजावून देत असत. 
ओशो म्हणतात, ‘आत्तापर्यंत शिक्षक यावरच जोर देत आले आहेत की बांधीव उत्तरंच द्या; कारण तेच बरोबर आहे.’ पुढे ते म्हणतात, ‘भविष्यातील शिक्षकांना उलट जोर यावर द्यावा लागेल की मेहेरबानी करून बांधीव उत्तर देऊ नका. नवीन उत्तर शोधा.’ आता हेच त्यांचे विचार हा ज्ञानरचनावादाचा पाया आहे. शिक्षणातलं ज्ञानरचनावादाचं महत्त्वाचं सूत्र आहे की ‘विद्यार्थी त्यांची ज्ञाननिर्मिती स्वतः करतील.’ म्हणजे जे ओशोंनी सांगितलं की ‘भविष्यातील शिक्षक विद्यार्थ्यांना स्वतःचं उत्तर सांगायला प्रोत्साहित करतील.’ ते आजच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट आहे.

ओशो त्यांच्या एका भाषणात म्हणतात की, ‘भूतकालीन ज्ञान देणं ही तांत्रिक गोष्ट आहे आणि भविष्यातला नागरिक घडवणं ही सर्जनात्मक प्रक्रिया आहे.’ हे अगदी खरं आहे की आज सर्व भूतकालीन माहिती-ज्ञान गुगलवरून मिळतं पण भविष्यातले नागरिक घडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यावर खूप सर्जनात्मक काम करणं अपेक्षित असतं. त्यासाठी ओशो म्हणतात की,मेमरीला-स्मृतीला शिक्षणाच्या केंद्रापासून हटवावं लागेल.’ याचाच अर्थ घोका आणि ओका ही शिक्षणपद्धती बंद करून संकल्पना समजण्यावर आपल्याला भर द्यावा लागेल. ते म्हणतात, ‘आपल्या साऱ्या परीक्षा या निव्वळ स्मरणशक्तीच्या परीक्षा आहेत. विविध स्तरांवर बुध्दितमत्तेचा कस लागणाऱ्या परीक्षा नाहीत. परीक्षांमधून आम्ही फक्त याच गोष्टीची माहिती करून घेतो की कोणती व्यक्ती बरोबर पुनरावृत्ती करू शकते पण नुसती पुनरावृत्ती करणारा माणूस प्रत्यक्ष जीवनात हरवूनच जाईल कारण जीवन रोजचं नवे नवे प्रश्न उभे करत असतं.’ 
थोडक्यात, ओशोंना म्हणायचं होतं की ‘विद्यार्थ्यांना जीवनाच्या प्रश्नांचा थेट सामना करू द्या.’ 21 अपेक्षित’ सारखं जीवन नसतं. हेच नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सांगतं. त्याच्या उद्दिष्टातच म्हटलं आहे की ‘विद्यार्थ्यांमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिन्ग स्किल-समस्या सोडवण्याचं कौशल्य-विकसित करणं हे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे.’ हेच तर ओशो सांगतात. 

मी जसं सुरुवातीला म्हटलं की ओशोंनी शिक्षणावर खोलात भाष्य केलं याचा अजून एक नमुना म्हणजे ते म्हणतात, ‘या जगात एवढा द्वेष आणि तिरस्कार कुठून आला तर त्याची सुरुवात वर्गात पहिल्या येण्याच्या स्पर्धेने होते.’ ते म्हणतात, ‘आमचं शिक्षण चेहरे दुःखी बनवतं, पराभूत बनवतं; उदास बनवतं.’ वर्गात एका विद्यार्थ्यांला सन्मानित करण्यासाठी तीसपैकी एकोणतीस विद्यार्थ्यांना आपण हरणं शिकवतो. ‘तू नाही येऊ शकत पहिला.’ या विचाराने त्याच्यामध्ये हिनतेची भावना निर्माण होते. त्याला अपयशी होणं कंडिशनल केलं जातं. एका विद्यार्थ्याला वर्गात पहिलं आणून इतर विद्यार्थ्यांच्या मनात स्पर्धा निर्माण होते. स्पर्धेमधून कधीही प्रेम निर्माण होत नाही, निर्माण होतो तो फक्त द्वेष. किती खोलात ओशोंनी सगळा विचार केला आहे. मानसशास्त्रीयदृष्ट्या हा विचार अगदी बरोबर आहे म्हणून बरेच शिक्षणतज्ज्ञ म्हणतात ‘मेरिट लिस्ट काढून टाका.’ ओशोंनी द्रष्टेपणाने शिक्षणाबद्दलचे विचार मांडले म्हणून त्या संदर्भातही ओशो महत्त्वाचे ठरतात.

ओशोंच खरं नाव चंद्रमोहन जैन होतं. पुढे त्यांचे शिष्य त्यांना ‘रजनीश’ म्हणून संबोधू लागले आणि पुढे जग त्यांना ‘ओशो’ म्हणून ओळखू लागलं. ते एक भारतीय विचारवंत होते. त्यांचं संपूर्ण आयुष्य हे विवादास्पद राहिलं. त्यांचे विचार अतिशय क्रांतिकारी असल्याने सहजासहजी ते स्वीकारले जात नसत. पुढे त्यांचे विचार मान्य होत गेले, ती एक जगण्याची विचारसरणी बनली. ते एक आध्यात्मिक शिक्षक म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांचा जन्म मध्यप्रदेश इथल्या ‘रामसेन’ शहरातल्या ‘कुचवाड’ गावातला. ते तत्त्वज्ञानाचे विद्यार्थी होते. त्यांनी सहाशेहून अधिक पुस्तकं लिहिली पण ‘शिक्षा मे क्रांती’ हे त्यांचं पुस्तक शिक्षणक्षेत्रातील पालक-शिक्षक विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभाचं काम करतं.

ओशोंनी शिक्षकांसाठी खूप क्रांतिकारी विचार मांडले. त्यांच्या मते शिक्षक हा ‘विद्रोही’ असला पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये जो जिज्ञासा जागृत करतो तोच शिक्षक. ज्ञानरचनावादही हेच सांगतो की ‘शिक्षक हा फॅसिलेटरच्या भूमिकेत हवा.’ विद्यार्थी त्याचं ज्ञान स्वतः निर्माण करेल; त्या प्रक्रियेत शिक्षकाने सहाय्य करायचं आहे. त्याने विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करायची आहे; जेणेकरून विद्यार्थी स्वतः शिकेल.

ओशो म्हणतात, ‘विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर केला पाहिजे ही अपेक्षाच चुकीची आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा आदर केला पाहिजे. तसं झालं तर विद्यार्थी शिक्षकांवर प्रेम करेल.’ शिक्षक हा विद्रोही असला पाहिजे म्हणजे मूल्य विचारांत त्याने क्रांती आणली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. म्हणजे मूल्य कालातीत असली तरीही कालानुरूप त्यांना वळणं लावून ती उपयोगात आणता आली पाहिजेत.

ओशो म्हणतात, ‘शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवलं पाहिजे की ‘तू तूच हो, कोणासारखा बनू नको.’ कोणी सांगत रामासारखा हो, कोणी सांगतं कृष्णासारखा हो. आजपर्यंत कोणी कोणासारखा बनला आहे का? राम-कृष्णाच्या काळापासून आजतागायत कोणी राम नाही होऊ शकला ना कोणी कृष्ण. ते म्हणतात, सर्व खटपट नकली माणसं निर्माण करण्याची चालू आहे. कोणी कोणाला कॉपी करू शकत नाही. मी फक्त 'मीच' होऊ शकतो. जेव्हा दुसऱ्याला कॉपी करतो तेव्हा माणूस दोन चेहरे निर्माण करतो.’ अतिशय खोलात जाऊन त्यांनी हा विचार मांडला आहे. आज गरज आहे तरुणांना सांगायची की तुमची तुलना कोणासोबत होऊ शकत नाही. ‘तुम्ही तुम्हीच बना’ 

एका ठिकाणी रजनीश असं म्हणतात की, ‘विद्यार्थ्यांना शास्त्र गणित हे विषय गायन-नृत्याच्या माध्यमातून शिकवा.’ आज त्याचे अनेक प्रयोग चालू आहेत. सीबीएससी बोर्ड ने इंटिग्रेटेड करिक्युलम बाबत सूचना दिल्या आहेत. 

सांगायचा मुद्दा हा की ओशोंचे विचार खऱ्या अर्थी अंमलात आणले तर आपले विद्यार्थी इनोव्हेशनमध्ये, नवनिर्मितीमध्ये अग्रस्थानी राहू शकतात.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक

ओपन-बुक परीक्षा

ओपन-बुक परीक्षा: कालसुसंगत पाऊल महाराष्ट्र टाईम्स मधील प्रकाशित झालेला ओपन बुक परीक्षा म्हणजे नक्की काय? यावर शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास ...