Thursday, 28 July 2022

कर्मवीर भाऊराव पाटील आणि रयत शिक्षण संस्था

‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ असं म्हणतात. कर्मवीरांच्या बाबतीत तर हे अगदीच खरं ठरलं. अगदी बालवयापासूनच ते अन्यायाविरुद्ध दंड थोपटून उभे राहत असत. त्यांचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या आजोळी म्हणजेच कोल्हापूरमधल्या कुंभोज इथे झालं. वडिलांची कामानिमित्त कायम बदली होत असे, त्यामुळे भाऊरावांना एका ठिकाणी राहून शिक्षण घेता आलं नाही. त्यातही अनेक अडचणी येत गेल्या. दहिवडी, विटा या ठिकाणी शाळेत त्यांचं पटावर नाव होतं पण वर्गाशी काही त्यांचा फारसा संबंध आला नाही. विटा इथे एका ठिकाणी अस्पृश्य आणि दलित समाजातल्या लोकांना पाणी भरण्यास मज्जाव केला गेला. हा अन्याय सहन न होऊन भाऊरावांनी तिथला विहिरीवरचा रहाट मोडून टाकला होता.अन्यायाविरुद्ध बंड पुकारण्याची सवय त्यांच्या पुढच्या कार्याचा पाया ठरली. 


निडर आणि निर्भीड अशा भाऊराव पाटलांचा जन्म कोल्हापुरातल्या कुंभोज गावी ऐतवडे बुद्रुक येथे पाटील घराण्यात 22 सप्टेंबर 1887 रोजी झाला. पाटील घराणं सुसंस्कृत आणि धार्मिक प्रवृत्तीचं होतं. त्यांच्या दोन पूर्वजांनी दिगंबर जैन मुनी बनण्याचा निर्णय घेतला होता. भाऊराव पाटील यांची राहणी अत्यंत साधी होती. खादीचा साधा सदरा आणि नेहरु शर्ट असा त्यांचा पोशाख असे.  खांद्यावर घोंगडी घेत पण नंतर घोंगडी जाऊन हातात काठी आली.


1902 ते 1909 या कालावधीत भाऊराव शिक्षणासाठी कोल्हापुरात आले. जैन बोर्डिंगमध्ये राहून ते शिक्षण घेत होते. त्यांचा  चळवळ्या स्वभाव काही त्यांना स्वस्थ बसू देत नसे. जोडीला त्यांची स्वतंत्र बुद्धी होतीच. सामाजिक क्षेत्रातला त्यांचा वावर वाढत होता. एकदा अस्पृश्य मुलांसाठी मिस क्लार्क हॉस्टेलच्या एका कार्यक्रमात ते सहभागी झाले. तेव्हा परत आल्यावर पुन्हा आंघोळ करण्याचा आदेश जैन बोर्डिंगच्या अधीक्षकांनी दिला. मात्र भाऊरावांनी स्पष्टपणे नकार दिला. अर्थातच जैन बोर्डिंगमधून त्यांना काढून टाकण्यात आलं. 


नंतर ते कोल्हापूरमध्ये राजवाड्यात राहू लागले. राजवाड्यातलं त्यांचं राहणं त्यांच्या आयुष्याची दिशा ठरवणारं ठरलं. राजवाड्यात राहायला गेल्यावर भाऊरावांना शाहू महाराजांचा खूप सहवास लाभला. त्यांच्यावर महाराजांचा खूप मोठा प्रभाव पडला. शाहू महाराजांच्या उपेक्षितांसाठी चालू असलेल्या कार्याने ते प्रभावित झाले. त्यांच्याही मनात उपेक्षितांबद्दल करुणा निर्माण झाली आणि त्यांनी जणू त्यांच्यासाठी संघर्ष करण्याचा पण केला.


भाऊराव स्वतः सहावीच्या पुढे शिकू शकले नव्हते पण मोठं होताना शिक्षणाचं महत्त्व त्यांना चांगलं लक्षात येत गेलं होतं. शिक्षण पूर्ण न झाल्याने त्यांनी स्वतः आयुष्यात उभं राहण्यासाठी अनेक ठिकाणी हातपाय मारण्याचा प्रयत्न केला होता. काही काळासाठी त्यांनी मुंबईही गाठली होती. तिथे मोती पारखण्याची कला शिकण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण ते काम काही त्यांना फारसं जमलं नाही, रुचलं नाही, आवडलं नाही.


दरम्यान त्यांचा विवाह झाला होता. कौटुंबिक जबाबदारी वाढली होती. त्यांनी नीट कामधंदा करावा अशी त्यांच्या वडिलांचीही इच्छा होती. मग ते साताऱ्याला खाजगी शिकवण्या घेऊ लागले आणि तिथे पाटील मास्तर म्हणून ओळखले जाऊ लागले. 1909 मध्ये भाऊरावांनी दूधगाव इथे ग्रामस्थांच्या मदतीने ‘दूधगाव विद्यार्थी आश्रम’ सुरू केला. हा एक चांगलाच यशस्वी प्रयोग तर ठरलाच पण भाऊरावांना त्यांच्या आयुष्याची जणू नस सापडली आणि पुढची दिशा अधिकच स्पष्ट झाली. तरी अडचणी येतच होत्या. त्यांच्यावर खोटेनाटे आरोप करण्यात आले. खरंतर त्यात तथ्य काही नव्हतं पण भाऊरावांचा मात्र काही प्रमाणात छळ करण्यात आला. त्यामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. ते खूप निराश झाले होते. आयुष्याची दिशा सापडली असं वाटत असतानाच ते संपवण्यासाठी प्रयत्न करण्याचे टोकाचे विचार त्यांच्या मनात येऊ लागले.  मात्र त्या खोट्या आरोपातून ते सहीसलामत सुटले. मग काही काळ त्यांनी नोकरीही केली.मग मात्र ते पुन्हा त्यांच्या मूळ कार्याकडे ओढले गेले. 


शाहू महाराजांच्या आणि महात्मा फुले यांच्या प्रभावाखाली असलेल्या भाऊराव पाटलांनी कराड तालुक्यातल्या काले या ठिकाणी झालेल्या सत्यशोधक समाजाच्या परिषदेत बहुजनांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक संस्था स्थापन करण्यासंबंधीचा ठराव मंजूर करून घेतला आणि चार ऑगस्ट 1919 रोजी 'रयत शिक्षण संस्थे'ची स्थापना झाली. काले इथेच संस्थेमार्फत एक वसतिगृह, एक प्राथमिक शाळा आणि एक रात्रशाळा सुरू करून शैक्षणिक कार्याला प्रारंभ करण्यात आला. 1924 मध्ये संस्थेचं सातारा इथे स्थलांतर करण्यात आलं. तिथे सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह सुरू करण्यात आलं.  इथे सगळ्या जाती-धर्मांची मुलं एकत्र राहतात, जेवतात, एकत्र शिक्षण घेतात हे पाहून गांधीजींनी या गोष्टीचं खूप कौतुक केलं होतं. आजच्या काळात ही गोष्ट काही नवलाची राहिली नसली, सवयीची झाली असली तरी तो काळ लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तेव्हा समाजाचा फार मोठा विरोध  पत्करून या गोष्टी धाडसाने घडवून आणाव्या लागत होत्या.


गांधीजी त्यावेळी भाऊराव पाटलांना म्हणाले होते, "बाबुराव साबरमती आश्रमात मला जे जमलं नाही ते तुम्ही इथे यशस्वीरित्या करून दाखवलंय. तुमच्या कार्याला माझे आशीर्वाद." पुढे भाऊरावांनी संस्थेचा विस्तार केला. तूर्त संस्थेमार्फत शंभरएक वसतिगृह चालवण्यात येतात. अनाथ आणि बालगुन्हेगार म्हणून गणल्या गेलेल्या मुलांसाठी वेगळी व्यवस्था नसावी असं त्यांना वाटत असे. वेळप्रसंगी राज्य शासनालाही त्यांनी आपलं म्हणणं पटवून दिलेलं आहे. म्हणजे एखाद्याच्या प्रखर विचारात आणि परखडपणे ते मांडण्यात तथ्य असेल तर ती बाब फलद्रूप झाल्याशिवाय राहत नाही. शिवाय त्याला कृतीची जोड हवी. ती इथे होतीच. मनात आलेली चांगली आणि स्तुत्य अशी हितकारक गोष्ट कृतीत उतरवायला भाऊरावांसारखी माणसं मागेपुढे पाहत नाहीत.


शाळेशिवाय एकही खेडं असू नये आणि प्रशिक्षित शिक्षकाविना एकही शाळा असू नये हा विचार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं. त्यासाठी भाऊरावांनी शिक्षण अध्यापक विद्यालयं सुरू केली. इथे शिक्षक घडवले जाऊ लागले. प्रश्नाच्या मुळापर्यंत जाण्याची आणि ते सोडवायला घेण्याची कर्मवीरांची सवय इथे कामी आली. पुढे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण देणारी अनेक महाविद्यालयं निर्माण झाली. आज राज्यातल्या खेड्यापाड्यांत अजूनही शैक्षणिक क्षेत्रातले प्रश्न पूर्णपणे सुटलेले नाहीत; पण आता ग्रामीण भागातल्या बहुसंख्य घरातून मुलांच्या शिक्षणाचा विचार केला जातो. भाऊराव पाटील यांच्यासारख्या प्रयोगशील व्यक्तींनी या कार्यासाठी अथक यशस्वी प्रयत्न केले नसते तर ही प्रगती झालीच नसती. त्यासाठी त्यांचे ऋण मानावे तेवढे थोडेच आहेत. आज ग्रामीण भागात शिक्षण पोचले याचं श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील यांना जाते.


भाऊरावांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनीही त्यांना समाजकार्यात मोलाची साथ दिली. त्यांनी कधी कुटुंबाचा उदारनिर्वाह ही बाब अडचण म्हणून मध्ये आणली नाही. त्यामुळे भाऊरावांना सामाजिक आणि शैक्षणिक कार्याला स्वतःला वाहून घेणं शक्य झालं. भाऊराव पाटील यांना जनतेने ‘कर्मवीर’ ही उपाधी दिलीच पण इतरही अनेकानेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.

1959 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना ‘पद्मभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुणे विद्यापीठानेही डि.लिट. पदवी देऊन त्यांचा सन्मान केला आहे. आयुष्यभर अथक परिश्रम आणि प्रवास यामुळे प्रकृतीचं तानमान ढासळत गेलं आणि अखेर 9 मे 1959 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांची प्राणज्योत मालवली.

मात्र ‘रयत शिक्षण संस्थे’च्या द्वारे त्यांचे शिक्षणासंदर्भातले विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. ‘रयत शिक्षण संस्थे’च्या अध्यक्षपदी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष श्री.शरद पवार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते ही जबाबदारी पार पाडतात. संस्थेच्या 739 शाखा आहेत. 16,172 कर्मचारी तिथे काम करतात. 437 शाळा; त्यातल्या 26 मुलींच्या, 17 शेतकी शाळा, 42 महाविद्यालयं, 80 वसतिगृह, त्यात 29 मुलींची, 8 आश्रम शाळा आहेत.  सुमारे 4 लाख 50 हजार विद्यार्थी संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतात.


शिक्षणातून पोषण, बुद्धिवादाने रुढीवादाचा पराभव, समतेच्या आचरणाने विषमतेचं निर्दालन, श्रमाला प्रतिष्ठा ही भाऊरावांची तत्त्वप्रणाली होती.

 

त्यांच्या या सामाजिक-शैक्षणिक कार्याबद्दल गाडगे महाराजांना अतीव प्रेम होतं. विनाशाळेचं एकही गाव महाराष्ट्रात असू नये, प्रत्येक नांगरापाठी एक पदवीधर मनुष्य उभा राहिला पाहिजे असं भाऊरावांचं स्वप्न होतं. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता. 


एकदा कर्मवीर सुट्टीत इस्लामपूरला आले. त्यावेळी कर्मवीरांचे आई-वडील तिथे राहत होते. रिकाम्या वेळेत कर्मवीर शाळेकडे गेले. पावसाळ्याचे दिवस होते. हवेत गारवा होता. सर्व मुलं वर्गात बसलेली होती आणि एक मुलगा बाहेर कुडकुडत बसला होता. गुरुजींना विचारल्यानंतर तो इतर जातीचा असल्याने बाहेर बसवल्याचं कर्मवीरांना समजलं. ते त्या मुलाला घरी घेऊन आले. घरात स्वतःजवळ बसवून जेवू घातलं. नंतर कोल्हापूरला नेऊन मिस क्लार्क हॉस्टेलला दाखल केलं. तो पुढे विधिमंडळाचा सभासद झाला.


भाऊरावांनी देशात ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारं पहिलं ‘फ्री अँड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा इथे सुरू केलं; आणि त्याला नाव दिलं ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’. आज नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांना व्होकेशनल ट्रेनिंग दिलं जातं. तसंच शिक्षण घेता घेता करिअरमध्ये पार्टटाईम अनुभव घेण्यासाठी कंपनीमध्ये पाठवलं जातं. या सगळ्याची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 'कमवा आणि शिका' या संकल्पनेतून केली होती.


‘रयत शिक्षण संस्था’ आता आधुनिक काळाशी जुळवून घेत डिजिटलायझेशन, क्रीडा-कौशल्य, सामाजिक एकोपा या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जात आहे. तांत्रिक प्रगतीच्या संदर्भात संस्था कुठेही मागे राहिलेली नाही. ही तर आजच्या आधुनिक काळात अगदीच अपरिहार्य आणि आवश्यक अशी गोष्ट झालेली आहे. लक्षणीय बाब म्हणजे आधुनिक काळाशी जुळवून घेत संस्थेने फार मोठं तारतम्य दाखवलेलं आहे. 


102 वर्षं अव्याहत एखादी संस्था चालवणं, चालणं इतकंच नाही, तिचा विस्तार होणं, तो डोलारा तकलुपी नसणं या अतिशय लक्षणीय गोष्टी आहेत. स्पर्धेच्या युगात ‘रयत शिक्षण संस्थे’चं 102 वर्षं टिकून राहिलेलं अस्तित्व आणि विस्तार या बाबी कमालीच्या प्रशंसनीय आहेत.  याचंही श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील यांना जाईल. त्यांच्या विचारांच्या व्यक्तींची त्यांनी फौजच बनवली. त्यात महत्त्वाचं नाव म्हणे ऍड.रावसाहेब शिंदे. 


रावसाहेब शिंदे हे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, थोर विचारवंत आणि कृतिशील शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांच्यावर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा पगडा होता. त्यांनी कर्मवीरांना अभिप्रेत असणारी सामाजिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी जीवनभर ध्यास घेतला.


9 मे 1978 रोजी म्हणजे कर्मवीरांच्या पुण्यतिथी दिवशी 'रयत शिक्षण संस्थे'चे मॅनेजिंग काऊन्सिल सदस्य म्हणून त्यांची निवड झाली आणि पुढे ते 'रयत शिक्षण संस्थे'चे उपाध्यक्ष झाले. संस्थेतर्फे ग्रामीण भागात खेड्यापड्यातल्या 2 लाख 37 हजार विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेऊन तो कार्यान्वित करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. थोडक्यात काय, व्यक्ती येतात आणि जातात. त्या व्यक्तींचे विचार पुढच्या पिढीत जात असतील तर ती व्यक्ती अजरामर होते. 


कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार 'रयत शिक्षण संस्थे'द्वारे आजही मार्गदर्शन करतात. महाराष्ट्रात तळागाळामध्ये शिक्षण पोहोचवण्यात यशस्वी झालेली संस्था म्हणजे 'रयत शिक्षण संस्था'.

सचिन उषा विलास जोशी

शिक्षण अभ्यासक



Tuesday, 19 July 2022

श्रीमॉंचे शिक्षणविचार: व्हाया श्री अरबिंदो

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख.

"मुलांमध्ये मूलतः असलेल्या गोष्टींना घासून पुसून उजळवणं, विकसित करणं म्हणजे खरं शिक्षण देणं होय. ज्याप्रमाणे फूल सूर्यप्रकाशात फुलतं, त्याप्रमाणे मुलं आनंदात उमलतात, फुलतात!"

हे उद्गार आहेत श्रीमॉंचे.

पॉन्डेचरी आणि श्री अरबिंदो यांच्याबद्दल जगभर सगळ्यांना माहिती आहे. अरबिंदो हे फार मोठे तत्त्वज्ञानी होते. त्यांच्यावर या श्रीमॉंची कमालीची छाप होती.

श्रीमॉंचं मूळ नाव मीरा अल्फासा. फ्रान्समध्ये पॅरिस इथे 21 फ्रेबुवारी 1878 रोजी श्रीमती मॅथिल्ड इस्मलालून आणि बँकर मॉरिस अल्फासा या आईवडिलांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. त्यांचं नाव 'मीरा' असं ठेवण्यात आलं. मीरेच्या जन्माच्या वर्षभर आधी मॉरिस आणि कुटुंबीय इजिप्तमधून फ्रान्सला आले होते. मीरेचं प्राथमिक शिक्षण घरीच झालं. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्यांना आपल्या कार्याची जाणीव होती. कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय आणि मदतीशिवाय त्यांना ईश्वरी अस्तित्वाशी एकत्व पावणं शक्य झालं होतं. पुढे श्रीमद्भगवद्गीता आणि स्वामी विवेकानंदांचं ‘राजयोग’ या पुस्तकांमधून त्यांना मार्गदर्शन मिळालं. इ.स.1893 मध्ये त्यांनी आर्ट स्टुडिओमध्ये जायला सुरुवात केली. तिथे त्यांनी चित्रकलेचं प्रगत अध्ययन केलं. त्या एक प्रतिभावंत चित्रकार म्हणून गणल्या जात होत्याच; त्या उत्तम पिआनोवादकही होत्या. पुढे पॉल यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

पॉल आणि श्री अरबिंदो यांच्या भेटीच्या शेवटी निघताना पॉल म्हणाले, “माझी पत्नी माझ्यापेक्षाही अध्यात्मात अधिक प्रगत आहे. पुढच्या वेळी भारतात येईन तेव्हा तिला बरोबर घेऊन येईन.”

वयाच्या छत्तीसाव्या वर्षी श्रीमॉं त्यांचे पती पॉल रिचर्डस यांच्यासमवेत पॉन्डेचेरीला आल्या.

खरं तर त्या अरबिंदोंच्या शिष्या. त्यांचा कार्यकाळ 1878 ते 1973. 29 मार्च 1914 रोजी श्रीमॉं आणि श्री अरबिंदो घोष यांची प्रथम भेट झाली. त्यानंतर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला. अरबिंदो त्यांना माता म्हणून संबोधत त्यामुळे दुसरे अनुयायीही त्यांना 'श्रीमॉं' म्हणू लागले.

श्रीमॉंचे शिक्षणविषयक विचार कालातीत ठरणारे आहेत. वैश्विक पातळीवर अखंड उपयोगी पडणारे आहेत. अरबिंदोंनी पर्यावरणावर खूप काम केलं आहे. श्रीमाताजी, त्यांचे पती पॉल रिचर्डस आणि श्री अरबिंदो हे तिघं मिळून त्या काळात ‘आर्य मासिक’ चालवत असत. फ्रेंच आणि इंग्रजी भाषेत प्रकाशित होणाऱ्या या मासिकाची व्यवस्थापकीय जबाबदारी मीरा अल्फासा सांभाळत असत. भारत, इंग्लंड, अमेरिका आणि फ्रान्स इथे ते प्रसृत होत असे.

पॉन्डेचरीत श्री अरबिंदोंचा आश्रम आहे. शाळासुद्धा आहे. तिथल्या सगळ्या कार्यामागे श्रीमॉंचा दृष्टिकोन आहे ही महत्त्वाची बाब आहे. माताजींच्या तत्त्वज्ञानावर आधारित मिराम्बीका ही शाळा अरबिंदोंनी नवी दिल्ली इथे सुरू केली. या शाळेला मी प्रत्यक्ष भेट दिली आहे. या शाळेचं तत्त्वज्ञान आणि अभ्यासक्रम यावर त्यावेळेस लेखसुद्धा लिहिला होता. मिराम्बीका शाळा कुठलीही बोर्ड परीक्षा घेत नसून विद्यार्थी स्वत:च स्वत:चं परीक्षण करतात. या शाळेच्या धर्तीवर टीचर्स ट्रेनिंगसुद्धा होत असतं. नुकताच श्री अरबिंदो सोसायटीतर्फे वर्षभराचा शिक्षक अभ्यासक्रम कोर्स सुरू झाला. आधी हा फक्त दिल्लीला उपलब्ध होता. तो आता सर्व राज्यांत सुरू झाला आहे.

भौतिक ऐषोरामाच्या पलीकडे जाऊन आत्म्याचा विचार मांडणारं तत्त्वज्ञान हा श्रीमॉंच्या वैचारिकतेचा गाभा राहिला. सगळी भौतिक सुखं, पैसाअडका पायाशी लोळण घेत असताना पाश्चिमात्य देशांमध्ये माणसं सुखी, समाधानी, आनंदी का नाहीत? या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्या आत्म्यापर्यंत पोहोचतात. विवेकानंद, टागोर अशा विचारवंतांनी मांडलेल्या भारतीय तत्त्वज्ञानाचा अत्यंत डोळसपणे अभ्यास आणि विचार करतात.

आत्मा म्हणजे तरी काय? 'माईंड'. हे माईंड मानवी जगण्याच्या मुळाशी आहे. या साऱ्या अभ्यासातूनच त्या विवेकापाशी पोहोचतात. आणि विवेकवादाचं महत्त्व जाणून ते अनुयायांना विशद करतात.  

मूलगामी पद्धतीने श्रीमॉं शिक्षणाचा विचार करतात. शिक्षण हे विद्यालय, महाविद्यालय, विद्यापीठ यांपुरतं बिलकुल मर्यादित नाही. तो एक अखंड असा प्रवाह आहे; ज्या आधारे मनुष्याचा जीवनप्रवास बहरतो. त्याची सुरुवात अगदी माणसाच्या जन्माच्या आधीपासून होते आणि हा प्रवास जीवनभर सुरू राहतो. व्यक्तीच्या वाढ आणि विकासातून तो सिद्ध होतो.

ज्ञान आपल्या आतच असतं. ते हुडकून काढण्याची आणि अंमलात आणण्याची आस तेवढी हवी.

श्रीमॉं म्हणतात, "सर्वांगीण शिक्षणाचे पाच पैलू असतात; भौतिक, प्राणिक, मानसिक, आंतरात्मिक  आणि आध्यात्मिक. आणि ते क्रमाने येत नाहीत तर, हातात हात घालून असतात. असं सर्वांगीण शिक्षण घेणारा माणूस उच्चतम श्रेणीचं जीवनशिक्षण प्राप्त करत असतो आणि ते ठायी ठायी अंमलात आणत असतो.

"मात्र ही सगळी प्रक्रिया घडायला सुरुवात होण्यापूर्वी मुलांच्या आईवडिलांनी म्हणजेच विद्यार्थ्यांच्या पालकांनी फार सखोल विचार करण्याची गरज आहे. मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांची देखभाल करणं, भोजनप्रबंध करणं, त्यांच्या वेगवेगळ्या भौतिक गरजा पूर्ण करणं म्हणजे त्यांना वाढवणं नव्हे. मुलांना शाळेत घातलं, शिक्षकांच्या हाती सोपवलं म्हणजे आपलं काम संपलं असं समजून मोकळं होणं ही तर फार मोठी चूक आहे. या टप्प्यावर कर्तव्य संपत नाही तर, ते एक नवं वळण घेऊन सज्ज होतं. मुलांना शिक्षण देण्याची योग्यता स्वतः प्राप्त करणं हे इथे प्रथम कर्तव्य ठरतं. आपल्या विवेकी वर्तणुकीवर इथे भर द्यावा लागतो.

"मुलांसमोर आपल्या वागणुकीतून कोणतंही वाईट उदाहरण जाणार नाही याची कायम दक्षता घ्यावी लागते. सच्चाई, इमानदारी, स्पष्टवक्तेपणा, साहस, निष्काम-भाव, निस्वार्थता, धैर्य, सहनशीलता, शांती, स्थिरता, आत्मसंयम हे गुण मुलांच्यात असावेत अशी जी आपली अपेक्षा असते, ते गुण प्रथम स्वतःत बाणवावे लागतात; कारण मुलं अनुकरणातून शिकत असतात. पालकांमध्ये दोष, दुर्बलता, आत्मसंयमाचा अभाव या गोष्टी असतील तर त्यांचा फार मोठा वाईट प्रभाव मुलांवर पडतो. तसं होऊ न देण्याचं भान पालकांनी बाळगलंच पाहिजे."

त्या म्हणतात, "एखादं आख्यान, एखादी गोष्ट मुलांवर नकळत संस्कार करून जाते. त्यातून खूप चांगलं शिक्षण त्यांना मिळत असतं. मुलांना ओरडू मारू नका; पुन: पुन्हा एखादी चूक मुलं करणार नाही, त्यासाठी योग्य शब्दात त्यांना समजावा; चूक कबूल करायला लावा. मग त्यांना क्षमा करा. भीती दाखवू नका; तो मार्ग खूप खतरनाक ठरू शकतो. तो छलकपट आणि असत्य यांच्या जवळ असतो, जणू त्यांचा तो जनकच असतो. चांगलं शिक्षण प्राप्त होण्यासाठी पाल्याचा तुमच्याप्रति विश्वास निर्माण व्हायला हवा."

श्रीमॉंचे अनुयायी त्यांना सातत्याने विविध प्रश्न विचारत असत. त्यातला एक प्रश्न असा, "माताजी, छोट्या मुलांसाठी आम्हाला काय करायला पाहिजे?"
उत्तरादाखल माताजी हसून म्हणतात, "अगदी छोट्या मुलांकडे शब्द नसतात; पण बाकी खूप काही असतं. ती फार चैतन्यपूर्ण असतात. त्यांच्यासाठी काही करायचं तर हे पुरेसं आहे. त्यांच्याभोवती खूप सार्‍या वस्तू ठेवा आणि त्यांना एकटं सोडून द्या; आणि अत्यावश्यक नसेल तर अजिबात मध्ये पडू नका, व्यत्यय आणू नका; रागावू नका. स्वयंशिक्षण त्यांना मिळू देण्याचा हा सगळ्यात सुंदर मार्ग आहे. प्रेम आणि मृदू वातावरणातच मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे."

हे झालं छोट्या मुलांच्या संदर्भात. थोडी मोठी जी मुलं त्यांच्या प्रश्नांनाही श्रीमॉं समर्पक उत्तर देतात.

-काही गोष्टी माझ्या प्रगतीसाठी गरजेच्या असल्या तरी मला त्या नीरस वाटतात. उदाहरणार्थ, गणित मला अजिबात आवडत नाही. मला त्यात रुची कशी निर्माण होईल?

श्रीमॉं सांगतात, "खूप साऱ्या आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी अनिवार्य असतात. त्या आपण करतो; त्यातलाच एक गणित विषय. त्याविषयी प्राथमिक माहिती असणं क्रमप्राप्त आहे. जीवनाचा सफलतापूर्वक सामना करण्यासाठी असे अनिवार्य विषय समजून घेणं हेच या प्रश्नाचं उत्तर."

भारतीय शिक्षणाचा विषय निघाल्यावर माताजी फार परखडपणे आपली मतं मांडतात. त्यांच्या मते पाश्चिमात्यांना भौतिक तत्त्वांचं ज्ञान आहे; पण त्यांनी आत्म्याला नाकारलं आणि त्यांची अस्वस्थता वाढली. शांती ढळली. थोड्याफार फरकाने सगळ्या देशात शिकवता येईल ते सर्वांगीण शिक्षण होय. भौतिक तत्त्वांना अनुसरताना आत्मा लक्षात घ्यावाच लागेल. अंतरंगाचा विकास, अंतरंगाची प्रगल्भता हा या सगळ्याचा अर्थ. शुद्धता आणि शांतता यांचा वास मनात खोलवर असावाच लागतो. तरच आपलं जीवन अर्थपूर्ण बनू शकतं.

“भारताच्या वर्तमान आणि भावी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जीवनाचा विचार करता भारताने शिक्षणासंदर्भाने कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात?”

असं एका अनुयायाने विचारल्यावर श्रीमॉं उत्तर देतात, “मुलांना मिथ्यत्वाचा त्याग करून सत्याचा सहर्ष स्वीकार करायला आणि ते सत्य अभिव्यक्त करायला तयार करायला हवं.”

“भारताची खरी प्रतिभा कोणती आणि तिची नियती काय?"

आत्म्याची अभिव्यक्ती झाल्याशिवाय सर्व भौतिक हे मिथ्या आहे.”

एकाने विचारलं, "शिक्षण हे साक्षरता आणि सामाजिक स्तरात गुरफटलं आहे. शिक्षणाला आंतरिक मूल्यं कशी प्रदान करायची आणि त्यातून मूळ आनंद कसा मिळवायचा?"

श्रीमॉं म्हणतात, "परस्परातून त्यांना बाहेर काढून अंतरात्म्याच्या विकासावर भर द्यायचा."

श्रीमॉंना 15 ते 20 भाषा येत असत. त्यामुळे त्यांचं कार्य जागतिक स्तरावर जायला खूप मदत झाली. पॉन्डेचरी इथे फ्रेंच इन्स्टिट्यूटचा उद्घाटन समारंभ होता. त्याप्रसंगी त्यांनी एक संदेश दिला; तो आजच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील मुद्द्यांशी मिळताजुळता आहे.

"शाळेमध्ये म्हणजे सर्व शाळांमध्ये आपल्या देशाच्या संस्कृतीबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली जावी. त्यामुळे शिक्षण अस्सलतेशी जोडलं जाईल."

ही गोष्ट आहे 1955 सालातली. भारतात नवशैक्षणिक धोरण लागू होतंय आज 2022 च्या दरम्यान. या धोरणानुसार आता पुढे भारतविषयक ज्ञान हा शंभर मार्कांचा पेपर शालेय स्तरावर अनिवार्य असणार आहे. श्रीमॉंनी अनेक वर्षांपूर्वी हा मुद्दा मांडला; हा काही केवळ योगायोग नाही. त्यांचा अभ्यास पूर्ण व्यासंग त्यांना या विचारापर्यंत घेऊन आलेला आहे.


श्री अरबिंदो आश्रमातल्या शारीरिक शिक्षण विभागाच्या निर्मितीसाठी माताजींनी सक्रिय भाग घेतला होता. शारीरिक शिक्षणाचं महत्त्व त्या जाणत होत्या. तिथल्या सगळ्या उपक्रमांची आखणी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्या स्वतः तंदुरुस्ती आणि व्यायाम या संदर्भात फार सजग असायच्या.

‘शिक्षा’ या हिंदी भाषेतल्या ग्रंथामध्ये श्रीमॉंचे विचार समाविष्ट आहेत. अनेक अनुयायांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांची, विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली. तीही या पुस्तकात सविस्तरपणे वाचायला मिळतात. या साऱ्या त्यांच्या विचारांतूनच श्रीमॉंच्या व्यक्तिमत्त्वाबरोबर सर्वांगीण विकास म्हणजे काय सर्वांगीण शिक्षण म्हणजे काय हे आपल्याला उलगडत जातं.

मुख्य म्हणजे, त्यांचे विचार आजच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जेव्हा समाविष्ट झालेले आपल्याला बघायला मिळतात तेव्हा श्रीमांच्या द्रष्टेपणाचा प्रत्यय येतो.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


Monday, 11 July 2022

ज्ञानदेवे रचिला शिक्षणाचा पाया

“ज्ञानदेवे रचिला पाया 

तुका झालासे कळस” 

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख

असं म्हटलं जातं आणि ते अगदी खरं आहे. अनेक बाबतींत ते सत्य आहे. एक तर त्या दोघांचा काळ वेगळा त्यामुळे ज्ञानदेवांनी ज्या ज्या गोष्टींची भक्कम सुरुवात केली त्या सगळ्यांवर तुकारामांनी कळस चढवला असं म्हणता येतं; अगदी वाड.मयापासून ते समाजपरिवर्तनापर्यंत. पैकी या लेखात आपल्याला ज्ञानदेवांच्या कार्याचा आढावा घ्यायचा आहे. आणि आजच्या शिक्षणातलं त्याचं महत्त्व समजून घ्यायचं आहे. का हे करायचं? संत ज्ञानेश्वरांचा आजच्या शिक्षणाशी काय संबंध? तेराव्या शतकातल्या गोष्टी आज का विचारात घ्यायच्या? गरज आहे का त्या विचारात घेण्याची? 

तर या प्रश्नाचं उत्तर आहे, अर्थात आहे. नितांत गरज आहे. अगदी खरं तर एकच फार मोठी गोष्ट हे समजायला पुरेशी आहे, ज्ञानेश्वरांनी जेव्हा ज्ञानेश्वरी ही 'गीताटीका' प्राकृतात लिहिली तेव्हा त्यांचे गुरू श्री निवृत्तीनाथ हे मार्गदर्शक म्हणून तिथे हजर होते. ज्ञानेश्वरांनी सांगितलेल्या नऊ हजार ओव्या श्री सच्चिदानंदबाबांनी लिहून घेतल्या म्हणजे ते त्यांचे लेखनिक झाले. या प्रक्रियेतला एकूण एक घटक फार महत्त्वाचा आहे; अगदी आजच्या आधुनिक काळाच्या दृष्टीनेही! 

शिक्षणाच्या विशिष्ट टप्प्यावर विद्यार्थ्याला नेमकं कुठे, काय आणि कसं मार्गदर्शन करायचं याचं भान शिक्षकांना असावं लागतं; आणि हेच तीव्र भान असल्याने ज्ञानेश्वरांच्या बाबतीत निवृत्तीनाथांनी मार्गदर्शकाची भूमिका चोख बजावली. यालाच आजच्या काळात टीचर्सनी फॅसिलेटर होणं म्हणतात. सगळ्या प्रक्रियेत निवृत्तीनाथ साक्षीभावाने असल्याचे दिसतात. विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेत ढवळाढवळ न करता दिशादर्शन करणं नीटपणे जमावं लागतं. ते कसं जमवायचं याचं हे उत्तम उदाहरण.

निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताबाई या समाजाने वाळीत टाकलेल्या भावंडांच्या अतुलनीय कर्तृत्वाची  गोष्ट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे.

ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वरांनी विशद केलेले विविध योग मग ते भक्तियोग-कर्मयोग-ज्ञानयोग-विभूतीयोग... हे सोप्या भाषेत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. 

ज्ञान अगदी माणसाच्या आत दडलेलं असतं. आपल्या आतलं ज्ञान हुडकून तिथपर्यंत पोहोचणं म्हणजे अध्ययन आणि ते बरोबर घेत उपयोगात आणणं म्हणजे जीवन. आपल्या सगळ्या ज्ञानप्रक्रियेतून, साहित्यनिर्मितीतून ज्ञानेश्वरांनी हेच मांडलं आणि या मांडणीलाच आजच्या शिक्षणाची व्याख्या म्हटलं जातं. 

ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव इथे तेराव्या शतकात, १२७५ मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचं नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. त्यांचे वडील विरक्त संन्यासी होते पण गुरूंच्या सांगण्यावरून त्यांनी पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारल्याने या कुटुंबाला समाजाने वाळीत टाकलं होतं. इतकंच नाही तर त्या दोघांना देहान्त प्रायश्चित घ्यावं लागलं. नंतर सर्व भावंडं पैठणला गेली आणि तिथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली. 'ज्ञानेश्वरी', 'अमृतानुभव', 'चांगदेव पासष्टी' हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांनी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी पुणे जिल्ह्यातल्या आळंदी इथे इंद्रायणी नदीच्या काठी इ.स. १२९६ मध्ये संजीवन समाधी घेतली. 

आपल्या जीवनकाळात त्यांनी स्वतःच्या अलौकिक प्रतिभेच्या सहाय्याने जे लेखन केलं ते समाजाला मूलतत्त्वांकडे घेऊन जाणारं ठरलं. 

विवेकावर माझं फार प्रेम आहे असं ते म्हणतात हे फार महत्त्वाचं आहे. बुद्धिप्रामाण्यवादही नेमकं हेच सांगतो. बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे तर्कबुद्धीला प्रमाण मानणं; बुद्धीच्या कसोटीवर तत्त्व पारखून घेणं. हा कोणता इझम किंवा वाद किंवा भांडण नाही. ती एक अभ्यासप्रक्रिया आहे. बुद्धिप्रामाण्यवादाला विवेकवाद, वास्तववाद, भौतिकवाद असंही म्हटलं जातं. सगळ्या वादांमधलं सार लक्षात घेत जीवन कसं जगायचं हे ज्ञानेश्वरी या गीताटीकेमध्ये ज्ञानेश्वरांनी पदोपदी सांगितलेलं आहे आणि अशा या मार्गदर्शनपर ग्रंथाला आजच्या आधुनिक युगात शिक्षणाच्या दृष्टीनेसुद्धा योग्य ते स्थान मिळण्याची गरज आहे. 

मुख्यत: शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवर विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरीच्या शेवटी मागितलेल्या पसायदानाचा अर्थ उलगडून सांगण्याची नितांत गरज आहे. तो शालेय उपक्रमातल्या परिपाठाचा भाग व्हायला हवा. ज्ञानेश्वरी आणि त्यातलं पसायदान समजून घेणं या बाबी प्रौढपणात किंवा जीवनाच्या उत्तरार्धात समजून घेण्याच्या आहेत असा एक गैरसमज समाजात रुजलेला आहे. तो पहिला दूर करण्याची गरज आहे. जीवनसूत्र शिकण्याच्या प्रारंभीच्या काळातच जर या गोष्टी समजल्या तरच त्यांचा खरा उपयोग आयुष्यभर होणार आहे. 

मात्र, ही गोष्ट अंमलात आणण्यासाठी पालकांनी, शिक्षकांनी पसायदानाचा अर्थ लक्षात घेणं, तो आपल्या जगण्यात मुरवणं खूप महत्त्वाचं आहे. हे पसायदान अनेक कार्यक्रमांच्या शेवटी म्हटलं जातं; पण नेमका अर्थ काय या पसायदानाचा? जो समजून घेऊन आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. यासाठी पालकांनी प्रथम पाऊल उचलणं आवश्यक आहे. आपल्या मुलांना याचा अर्थ सांगायला हवा.

पसायदान
ज्ञानेश्वरी सांगून झाल्यानंतर त्यांनी हे पसायदान मागितलं. 

आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||

‘पसाय’ म्हणजे प्रसाद. ज्याला नमन करून त्यांनी ज्ञानेश्वरीचा प्रारंभ केला त्या विश्वात्मक ईश्वराकडे त्यांनी पसायदान मागितलं. आपल्या वाग् यज्ञाने म्हणजे वाणीरूपी कथनाने प्रसन्न होऊन हा प्रसाद द्यावा असं ते म्हणतात.  कोणता हा प्रसाद? हा चांगल्या विचारांचा प्रसाद आहे.

जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||

ज्ञानेश्वरांनी संपूर्ण समाजाच्या सत्प्रवृत्तींचं म्हणजे चांगल्या वागण्याचं पोषण केलं. त्यामुळे ‘खळांचि व्यंकटी सांडो’ म्हणजे दुष्ट माणसांचा दुष्टपणा नाहीसा होवो; अशी मागणी ते करतात. त्यांचा माणसाच्या माणूसपणावर दृढ विश्वास आहे. वाईटातल्या वाईट माणसांमध्ये सुद्धा चांगल्या गोष्टी दडलेल्या असतात. ज्ञानेश्वर त्या चांगल्या गोष्टींकडे आपलं सर्वांचं लक्ष वेधतात. मुळात माणूस दुष्ट म्हणून जन्माला येत नाही. त्याची वाढत गेलेली दुष्ट प्रवृत्ती नष्ट व्हायला हवी. हे कसं होईल? सतत सत्कार्य म्हणजे चांगलं काम करत राहणं त्याच्या सवयीचं होईल तेव्हा. तेव्हा आपोआप त्याची नजर वाईट गोष्टींवरून हटेल असा त्यांचा विश्वास आहे. आजकाल बरेच मॅनेजमेंट गुरू म्हणतात की कुठलीही गोष्ट 21 दिवस सतत करा म्हणजे तिची सवय होऊन तो तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनतो. हेच ज्ञानेश्वर वेगळ्या पद्धतीने मांडत आहे. ते म्हणतात, ‘भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे’ दुष्टही चांगुलपणाकडे वळले की जगातले सगळे जीवमात्र एकमेकांवर प्रेम करायला लागतील. 

दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||

दुरितांचा म्हणजे पापांचा अंधार नाहीसा होवो. म्हणजेच एका अर्थी पुण्याचा प्रकाश पसरो. समाजामधील नकारात्मकता निघून विधायकता वाढो. चुकीच्या गोष्टी समाजातून निघून जावो. ज्ञानेश्वरांच्या पाप-पुण्याच्या संकल्पना या कृतीशी निगडित आहेत. सत्कर्माकडे ते सतत सगळ्यांचं लक्ष वेधतात. पाप म्हणजे वाईट. हे कसं आणि कधी नाहीसं होईल? ‘विश्व स्वधर्माचा सूर्य पाहील तेव्हा’. म्हणजे जगभरात माणसं स्वत:चं कर्तव्य चोख बजावतील तेव्हा. 
इथे विद्यार्थ्यांना आपण समजावून सांगू शकतो की प्रत्येकाने स्वतःचं कर्तव्य बजावणं म्हणजे वेळेवर अभ्यास करणं, खेळणं, सायकल चालवताना ट्रॅफिकचे नियम पाळणं, चांगलं बोलणे, घरात सर्वांना मदत करणं, वेळेवर अभ्यास करणं, गृहपाठ करण्यापासून तर मोबाईल न पाहणं.. टीव्ही कमी पाहणं इत्यादी. 
प्रत्येकाला आपापल्या धर्माचं ज्ञान झालं, भान आलं की तो स्वत:चं कर्तव्य बजावत राहील. इथे धर्माचा अर्थ स्वभाव असा होतो.  पापाचरणातून म्हणजे वाईट करण्यापासून त्याचं ध्यान स्वकर्माकडे वळेल; म्हणजे तो स्वत:ला नेमून दिलेल्या चांगल्या कामाकडे लक्ष देईल. वाईट काम हे कोणाचं नियतकर्म म्हणजे कोणाला नेमून दिलेलं काम असूच शकत नाही. म्हणूनच स्वकर्माची, स्वधर्माची ओळख होणं महत्त्वाचं. तो कसा ओळखायचा? प्रसंगानुरूप चांगलं आचरण करत गेलं म्हणजे चांगलं वागत गेलं की तो आपोआप कळत जातो. आता वाईट इच्छा मनी उरतच नाही. 

मग ते पुढे म्हणतात, ‘जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात’ म्हणजे ज्याला जे हवं ते त्याला मिळो. याचा अर्थ हव्या त्या वस्तू, हवे ते पदार्थ मिळो असा नाही. भौतिक वस्तू मिळो असं ते म्हणत नाहीत. प्रत्येकाच्या मनात चांगलं वागण्याची, इतरांच्या उपयोगी पडण्याची; मैत्रीची इच्छा निर्माण होवो आणि ती पूर्ण होवो. सगळं शत्रुत्व मिटून मैत्र वाढ़णं महत्त्वाचं. वृत्ती निकोप आणि दृष्टी विशाल झाली पाहिजे. नजरेतून सर्वांसाठी मैत्रच पाझरलं पाहिजे. हे तर विद्यार्थ्यांना वर्गामध्ये अतिशय व्यवस्थित समजावून सांगू शकतो की वर्गातील मित्रांना कशी मदत करायची. नाश्त्याचा डबा शेअर करण्यापासून ते मैदानावर खेळण्यापर्यंत सगळ्यांशी मैत्रीपूर्ण कसं वागायचं.

वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||

म्हणजे काय? तर संपूर्ण जगावर मांगल्याचा वर्षाव करणारे ईश्वरनिष्ठ लोक दाटीवाटीने उत्पन्न होवोत. (म्हणजे जशी संत मंडळी) त्यांची अगदी विश्वात गर्दी झाली पाहिजे. ‘अनवरत’ म्हणजे अखंड, अविरत ओघ राहिला पाहिजे त्यांचा. त्यांचे अगदी मेळावे भरले पाहिजेत. हे दुर्मीळ असतात पण त्यांची ‘मांदियाळी’ ज्ञानेश्वरांना अपेक्षित आहे. हा ज्ञानेश्वरांचा ईश्वर आहे. हे ठायीठायी लक्षात घेणं गरजेचं. तो एखाद्या मूर्तीत सामावलेला नाही; तो चराचरांत सामावलेला आहे. 

पुढ़े ते म्हणतात,

चला कल्पतरूंचे आरव, चेतनाचिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||

‘कल्पतरूंचे बगिचे’ त्यांना अपेक्षित आहेत आणि ‘चिंतामणीरत्न’ त्यांचं जणू गावच असावं. मागेल ते देणारं झाड म्हणजे ‘कल्पतरू’ आणि ‘चिंतामणी’ म्हणजे चिंता हरणारं रत्न. खरं म्हणजे हे सारं आपल्यापाशी असतं त्याच्या शोध घ्यावा लागतो. चिंतामणीने भारलेलं आणि भरलेलं सारं गाव म्हणजे सारा आनंदी-आनंद. अमृताचे संजीवक समुद्र…ज्ञानेश्वरांच्या अलौकिक कल्पनाशक्तीची सावली जणू संपूर्ण विश्वावर शांततेची शाल पांघरते आहे. 

चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||

कोणताही डाग नसलेल्या चंद्राची शीतलता आणि सूर्याची तापहीन तेजस्वीता ते अपेक्षितात. खरं तर हे अशक्य आहे. चंद्रावर डाग आहे आणि सूर्याची तेजस्वीता ही तापहीन असूच शकत नाही; पण असं व्हावं अशी ज्ञानेश्वर अपेक्षा करतात. याला प्रचंड आशावादी असणं म्हणतात. म्हणजे काय तर, अशक्य ते शक्य करून दाखवण्याची किमया साधली पाहिजे. सदा सज्जन असलेल्याला ते जमतं. ते सर्वांचे ‘सोयरे’ असतात; म्हणजे आप्त असतात, जवळचे असतात, नातेवाईक असतात. सगळ्यांना आपलं म्हणतात. असं वागणं कठीण आहे पण ते माणसाला जमलं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे. माणसाचं जगणं कसं असलं पाहिजे हे कळकळीने सांगणाऱ्या ज्ञानदेवांच्या या सगळ्या अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्याचं सामर्थ्य माणसाला मिळावं अशी ते ईश्वराकडे प्रार्थना करतात. आजच्या काळात सदा सज्जन राहणं हे दुर्मिळ झालं आहे. काहीजण तर आजकाल याला चांगला गुण समजत नाहीत, पण या पृथ्वीवर शांतता, प्रेम आणि आनंद हवा असेल तर प्रत्येकाने सज्जन राहणं हे महत्त्वाचं आहे. त्यासाठीच ज्ञानेश्वर पसायदानातून ईश्वराकडे प्रार्थना करतात. फार मोठं सामाजिक भान जर प्रत्येकाने आपल्या मनात जागवलं तर आणि तरच त्यांचं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकतं. 

किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||

तिन्ही लोकांत परिपूर्णतेचे अनुभव घेत जे आदिपुरुषाची अखंड उपासना करतात, अशांचं चित्र ज्ञानेश्वर उभं करतात. अखंड उपासना म्हणजे आंधळेपणाने केलेलं कर्मकांड नव्हे तर, विचारपूर्वक केलेलं डोळस आचरण. म्हणजे आपल्या चांगल्या वागण्यातूनच देवाची पूजा करणं. अर्थशास्त्रामध्ये कार्ल मार्क्सपासून बऱ्याचजणांनी आदर्श समाजाचं स्वरूप कसं असलं पाहिजे हे त्यांच्या ग्रंथात मांडलं आहे. तोच मुद्दा ज्ञानेश्वर तेराव्या शतकात आदर्श समाजाचं चित्र रंगवताना मांडतात. आदर्श समाजरचनेचा जणू हा पाया आहे. एक भव्य स्वप्न त्यांनी पाहिलं आणि आपल्या प्रतिभेने ते शब्दांत मांडलं. 

आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्टविजये, होआवेजी ॥८॥

हा ग्रंथ ज्यांचं जीवन होईल, विशेषत: या भूलोकावर; त्यांनी विश्वातील दृश्य आणि अदृश्य भोगांवर म्हणजे दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या परंतु असणाऱ्या आकर्षणांवर विजय मिळवावा. कोणत्याही आकर्षणांमध्ये गुंतून राहू नये. हे ज्ञानेश्वरांनी मांडलं ते भारतीय तत्त्वज्ञान आहे. यामुळेच कितीही वाईट प्रसंगात माणसं समाधानी आणि आनंदाने जगू शकतात.

येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला ||९||

घडेल का हे? असं त्यांनी विचारल्यावर निवृत्तीनाथांनी आशीर्वाद दिला, ‘हो घडेल..’  ‘हा होईल दानपसावो’ हे ऐकताच ज्ञानेदव मनोमन सुखावले. अतिशय निर्मळ मनाने ज्ञानेश्वर विचारतात आणि जेव्हा निवृत्तीनाथांच्या आशीर्वादाने ते आनंदी होतात कारण की त्यांच्या संकल्पनेतला 'आदर्श समाज' चांगल्या विचाराने प्रेरित होऊन तो आदर्शवाद प्रत्यक्षात उतरेल असा त्यांचा आशावाद असतो.

जगाने वाळीत टाकूनही त्यांनी विश्वाला आपलं म्हटलं आणि सगळ्या विश्वासाठी त्यांनी ‘विश्वात्मक देवा’कडे म्हणजे जगाला व्यापून असलेल्या देवाकडे हे ‘पसायदान’ मागितलं. यामागे खूप मोठं सामाजिक भान आहे. ज्यावर आधुनिक काळात आपण मुलांचा एस.क्यू. ठरवत असतो. सामाजिक बुद्धिमत्ता ठरत असते. ही गोष्ट कधींची? तर सातशे वर्षांपूर्वीची. म्हणजे अनेक वर्षांपूर्वीच ज्ञानेश्वर कायम उपयोगी पडणारं तत्त्वज्ञान सांगून गेले आहेत. जे आजच्याही नवीन शैक्षणिक धोरणाचा पाया ठरतं किंबहुना उद्याही आपल्याला पुढच्या पिढ्यांनाही हेच शिकवायचं आहे. 

ज्ञानदेवांनी रचलेल्या अपेक्षांच्या आणि शिकवणुकीच्या पायावरच मानवी जगण्याचा सगळा डोलारा अवलंबून आहे आणि हे आपल्याला मुलांना समजेल अशा पध्दतीने सोप्या भाषेत वारंवार समजावून सांगायचं आहे.
हे सांगणं थोडं कठीण वाटेल पण अशक्य मुळीच नाही. कारण हा लेख लिहायला मलाच खूप दिवस लागले, खूप तज्ज्ञांशी बोलावं लागलं
खूप संदर्भ घेत लिहिले. शाळेत किंवा कुठलाही कार्यक्रम झाला की पसायदान म्हणतात पण त्याचा अर्थ हा बऱ्याच जणांना माहितीच नसतो. तो ज्या क्षणी समजेल त्यावेळेस शिक्षणातील भावनिक बुद्धिमत्ता.. सामाजिक बुद्धिमत्ता यांचा विद्यार्थ्यांमध्ये विकास होईल. म्हणून म्हटलं ज्ञानदेवे रचिला शिक्षणाचा पाया.

सचिन उषा विलास जोशी 
शिक्षण अभ्यासक

Thursday, 7 July 2022

खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे

साने गुरुजी म्हटल्यावर डोळ्यांसमोर त्यांचं संवेदनशील व्यक्तिमत्त्व उभं राहतं. शिक्षकाने कसं आणि किती संवेदनशील असलं पाहिजे याचं ते मूर्तिमंत उदाहरण होते. इतकी संवेदनशीलता आली कुठून? ती आली त्यांच्या आईने कळत-नकळत केलेल्या संस्कारातून; तिने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यांच्याशी सातत्याने साधलेल्या संवादातून.


साने गुरुजींच्या लहानपणची एक छोटी; पण फार मोठा आशय घेऊन येणारी घटना इथे आठवते.

साने गुरुजी बाहेरगावी शिकायला असताना ते वार लावून जेवायचे. वार लावून जेवणं म्हणजे गरीब परिस्थितीमुळे जेवणाची मेस न लावता आठवड्यातील प्रत्येक दिवशी दानशूर लोकांकडे जेवायला जाणं; जसं सोमवारी एका व्यक्तीकडे तर मंगळवारी दुसऱ्या व्यक्तीकडे. हे वार लावून जेवणाचे दिवस ठरलेले असायचे. पूर्वीच्या काळी खूप सारे विद्यार्थी या व्यवस्थेचा फायदा घेत असत. त्यामुळे त्यांना परगावी किंवा शहरात राहून शिक्षण घेणं शक्य होत असे.

एक दिवस काय झालं, गुरुजींचं ज्यांच्याकडे जेवण ठरलं होतं ते कुटुंब अचानक बाहेरगावी गेलं आणि त्यादिवशी त्यांना उपाशी राहायची पाळी आली. ते जेव्हा त्यांच्या घरी गेले तेव्हा घराला कुलूप होतं. बाहेर जेवणासाठी पैसे नव्हते. त्यांनी मनात विचार केला की, रस्त्यामध्ये विठ्ठलाचं मंदिर लागतं. रात्री पुजारी नसतो. मंदिरातील ताम्हनात कोणी ना कोणी पैसे टाकत असतं. ते मंदिरातील पैसे घेऊ आणि त्यामधून काही खायला विकत घेऊ. त्या विचाराने मंदिरात जाऊन त्यांनी ताम्हनातले पैसे काढण्यासाठी त्यांनी हात पुढे केला. तेवढ्यात आवाज ऐकू आला. हा आवाज आईचा होता. ते दचकले, हात आपोआप पाठी आला. नक्कीच हा भास होता. पण आई म्हणाली,  "थांब, तू चोरी करतो आहेस!" गुरुजी तिथेच थांबले आणि पैसे न घेता घराच्या दिशेने चालू लागला. आई मनातून त्यांना सांगत होती,

"तू चुकत होतास बाळा, अरे कितीतरी लोक आयुष्यभर उपाशी राहतात. एक वेळचं जेवतात. तुझ्यावर तर फक्त एक रात्र उपाशी राहण्याची वेळ आली. सहन कर ना रे."

म्हणजे जिथे जिथे मुलगा चुकत होता तिथे तिथे त्याला पाठीशी न घालता साने गुरुजींची आई अतिशय कणखरपणे त्यांना योग्य मार्गदर्शन करत आली. म्हणूनच साने गुरुजींची भावनिक बुद्धिमत्ता अफाट होती. त्याचआधारे पुढे त्यांचा सर्वांगीण विकास योग्य मार्गाने झालेला दिसतो. मुलांच्या याच भावनिक बुद्धिमत्तेची आज आपण चर्चा करत असतो.

भावनिक बुद्धिमत्तेच्या मुळाशी असलेल्या या संवेदनशीलतेतूनच साने गुरुजी जगाकडे प्रेमाच्या नजरेने पाहायला शिकले. ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ साने गुरुजी म्हटलं की त्यांच्या या ओळी निश्‍चितपणे आठवतात. भारतीय संस्कृतीचे नव्हे खरं तर मानवतेचं द्योतक असणारे हे शब्द.

प्रेमाचा खरा अर्थ उमगल्यामुळेच साने गुरुजींमध्ये एक हळुवारपणा निर्माण झाला होता; पण तो कणखरपणाच्या आड येणारा दुबळेपणा नव्हता. शांततेचा मार्ग होता, जगण्याचा खरा अर्थ उमगल्याने जगानेही त्याच मार्गावरून चालावं अशी अपेक्षा बाळगून असणाऱ्या साने गुरुजींचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या पालगड इथे झाला, तिथे त्यांचे वडील ‘खोत’ होते. खोत म्हणजे श्रीमंत घराणं. साने गुरुजींच्या आजोबांपर्यंत अशी श्रीमंती होतीही. मात्र, त्यांच्या वडिलांच्या काळात त्या श्रीमंतीला आणि वैभवाला उतरती कळा लागली. साने गुरुजींचा म्हणजे पांडुरंग सदाशिव साने यांचा जन्म झाला तेव्हा कुटुंबाची परिस्थिती अगदीच बेताची होती.

पांडुरंगावर लहानपणापासून त्याच्या आईचे उत्तम संस्कार झाले. त्या संस्कारांचा त्या अनुभवांच्या
ठसा साने गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वावर उमटत होता. ते स्वतः अतिशय प्रेमळ होते. वात्सल्याची मूर्ती जणू! ते मातृहृदयी होते; त्यामुळे जगाकडे ते वात्सल्याच्या नजरेने बघू शकत. त्यांच्या संस्कारांचा, त्यांच्या संवेदनशीलतेचा, अनुभवांचा ठसा पुढे साने गुरुजींनी लिहिलेल्या ‘श्यामची आई’ पुस्तकातून उमटलेला पाहायला मिळतो. त्या पुस्तकातला बालनायक श्याम आणि स्वतः पांडुरंग यांच्यात फार मोठं साम्य आढळतं. स्वतः बालपणात अनुभवलेली आई त्यांनी तंतोतंत त्यात उभी केली आहे.

श्यामची आई कधी त्याच्यावर कसलीच सक्ती करत नाही. ती त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते; हे आजच्या पालकांनी लक्षात घ्यायला हवं. प्रेम आणि तटस्थता यांचं एक मिश्रण श्यामच्या आईच्या ठायी आहे. ती फारशी शिकलेली नाही पण ती त्याला नवनवीन अनुभव देण्याचा सतत प्रयत्न करते आणि हे तिचं वागणं अगदी सहज आहे. त्यात कुठलीही कृत्रिमता नाही. ती त्याला रामायण, महाभारतापासून कथा सांगते. ती त्याला वेळ देते ही खूप महत्त्वाची गोष्ट. जी आजही लागू पडते आणि उद्याही पडेल. पालकांनी मुलांना पुरेसा वेळ द्यायला हवा. सतत संवाद साधायला हवा.

मुलं अनुकरणप्रिय असतात हे आपल्याला ठाऊक आहे. श्यामच्या आईची संवेदनशीलता आणि समर्पित वृत्ती त्याच्या कृतीतून श्याममध्ये उतरत गेली. भाऊबीजेला भावाने साडीसाठी दिलेल्या पैशातून आमच्या वडिलांना धोतर आणते. स्वतःला साडी आणत नाही. नंतर पैसे साठवून श्याम भावाला कोट घेतो. पालकांचं वागणं हा मुलांच्या वागण्याचा मूळ स्रोत असतो.

गुरुजींचं नाव घेताच महाराष्ट्राला आठवते ती ‘श्यामची आई’. हे पुस्तक महाराष्ट्रातल्या घराघरांत पोहोचलेलं आहे. त्यावर पुढे चित्रपटही निघाला.

‘श्यामची आई’ हे पालकत्वाचं ‘रोल मॉडेल’ आहे. सर्व पालकांसाठीही ‘श्यामची आई’ एक प्रेरक शक्ती ठरते. मुलाशी संवाद साधते. श्यामने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला तिच्या कुवतीप्रमाणे उत्तर देण्याचा प्रयत्न करते. श्यामची आई एकदा समुद्राला नमस्कार करून पाच पैशाचं नाणं वाहते. तो विचारतो, “समुद्राच्या पोटात इतकी रत्नं असताना तू पाच पैसे का दिलेस?”

तेव्हा ती म्हणते, “सूर्याला आपण काडवातीने ओवाळतोच ना. प्रश्न भावनेचा असतो.”

एकीकडे अशा संस्कारांनी परिपूर्ण असणारे साने गुरुजी उच्चशिक्षित होते. ते एम.ए. ‘गोल्ड मेडलिस्ट’ होते. मुंबई विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेतलं होतं. त्यांना मुंबईच्या एका कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळत होती; पण ती न स्वीकारता अमळनेरला तत्त्वज्ञान मंदिरात एक वर्ष फेलो म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर तिथे जी शाळा निघाली त्या शाळेत त्यांनी 1924 ते 1930 अशी सहा वर्षं नोकरी केली. 1930 साली त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घ्यायचं ठरवलं. एकूण या ना त्या कारणाने 80 दिवस त्यांनी तुरुंगात काढले आहेत. त्या काळात त्यांनी झपाट्याने लेखन केलं.

गुरुजींनी ‘श्यामची आई’ व्यतिरिक्त इतरही अनेक पुस्तकं लिहिली आहेत. जवळजवळ शंभरच्यावर पुस्तकं लिहिली आहेत. त्यातील काही अनुवादित आहेत. एक फ्रेंच, एका तमिळ संतांचं पुस्तक त्यांनी अनुवादित केलं. तुरुंगात त्यांनी लेखन केलं त्याचं कारण असं होतं तुरुंगातल्या आजूबाजूच्या कैद्यांची परिस्थिती पाहून, त्यांच्या घरच्यांची परिस्थिती पाहून गुरुजींचा हृदय हेलावलं. भेटायला आलेल्या भावाला त्यांनी एक वही आणायला सांगितली. त्याला कळेना ही कशासाठी मागवली आहे? त्या वहीत गुरुजींनी ‘बापूजींच्या गोड गोष्टी’ लिहिल्या. पुन्हा भावाला सांगितलं, “ढवळे प्रकाशनाकडे
जा. हे छापायला दे आणि मानधनातून आलेल्या पैशांतून या कैद्यांच्या घरच्यांच्या खाण्या-जेवणाची थोडीफार व्यवस्था कर.”

गुरुजींच्या बाबतीत एक गोष्ट फार लक्षणीय वाटते ती म्हणजे ते घरी असो, शाळेत असो, वस्तीगृहात अधीक्षक म्हणून वावरत असोत; कवीचा पिंड असलेले साने गुरुजी कायम एक माणूस आणि कार्यकर्ता म्हणून जगले. शिक्षक म्हणून तर ते अद्वितीय होते. अमळनेरच्या शाळेत मराठी, इतिहास आणि संस्कृत असे तीन विषय ते शिकवत. एकदा वर्ग चालू झाला की तास संपल्याच्या बेलचं त्यांना भान राहत नसे; आणि मुलांनाही इतर वर्गातली मुलं खिडकीपाशी येऊन त्यांचं शिकवणं ऐकत. ‘आई’वरची कविता शिकवताना त्यांच्या डोळ्यांत पाणी येई. एकदा बाहेर पाऊस पडत असताना अख्खा वर्ग त्यांनी पावसात भिजायला नेला होता. वसतीगृहातील अधीक्षक म्हणून काम करताना त्यांनी एक दिवस विद्यार्थ्यांबरोबर कळीचा वाढदिवस साजरा केला होता; फुगेबिगे लावून. आज आपण अनुभवाधिष्ठित शिक्षणाची आणि ज्ञानरचनावादाची चर्चा करतो. साने गुरुजींनी त्या काळात तो अंमलात आणला होता. ते ‘छात्रालय’ नावाचं भीत्तिपत्रक चालवत. सकाळी रोज मुलं उठण्यापूर्वी भिंतीवर आठ पानं लावलेली असत. ते स्वतः पहाटे चार वाजता उठून वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या, वेगवेगळी माहिती लिहून काढत आणि भिंतीवर चिकटवत. हा उपक्रम दोन वर्षं चालू होता.

तेव्हा गुगलची माहिती उपलब्ध नव्हती; जुना काळ होता तो. कोणत्याही गोष्टीसाठी, प्रयोगासाठी अधिक कष्ट घ्यावे लागत. अनेकविध क्षेत्रांतली, अनेकविध देशांतली माहिती त्यात असे. स्वातंत्र्यसंग्रामाची माहिती असे, विनोद असायचे; नाटुकली असायची. त्यासाठी गुरुजींना आधी खूप वाचन करावं लागे. एक शिक्षक विद्यार्थ्यांसाठी काय काय आणि किती अभिनव असं काही करू शकतो; किती वेगवेगळे उपक्रम राबवू शकतो; वेळ देऊ शकतो याचं साने गुरुजी म्हणजे उत्तम उदाहरण होते. अत्यंत समर्पित वृत्ती होती त्यांची. पगार कधी स्वतःसाठी वापरत नसत; मुलांमध्ये वाटायचे. वसतिगृहाचे अधीक्षक म्हणून त्यांनी पाच वर्षं काम केलं. त्या काळात वसतिगृहाचे नियम कडक असत. त्यात शिस्त लावण्यासाठी मुलांना मारणंही समाविष्ट होतं; पण गुरुजींनी कधीच कोणत्याही मुलाला मारलं वगैरे नाही. त्यांची प्रेमावर भिस्त होती. आजारी विद्यार्थ्यांची ते शुश्रूषा करत असत. छोट्या-छोट्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष असे. कोणी मुलांच्या घरून काही पदार्थ आले तर सर्वांनी वाटून घेण्यावर त्यांचा भर असे. संस्कारातून सहकार्याची भावना वाढीस लागत असे. महाराष्ट्रातल्या सर्व अधीक्षकांनी त्यांचं उदाहरण समोर ठेवलं पाहिजे! अधीक्षकाचं कामच असतं शिस्त लावणे आणि शिस्त लावण्यासाठी मुलांना रागवणे मारणे हे आलंच अशा धारणेमध्ये आपला समाज होता. आशा वेळेस साने गुरुजींनी प्रेम देऊन विद्यार्थ्यांना जिंकलं. कदाचित शिक्षण क्षेत्रात आत्तापर्यंत एवढा प्रेमळ अधीक्षक लाभला नसेल.

आज प्रश्न वेगळे, आव्हानं वेगळी; पण प्रेम, करुणा आणि समर्पण वृत्ती नेटवरून प्राप्त करता येत नाही. म्हणूनच साने गुरुजींची मूल्यं खूप महत्त्वपूर्ण ठरतात. त्यांच्यासारखंच शिक्षकाच्या व्यक्तिमत्त्वातून प्रेम पाझरलं पाहिजे. दोन मुलांची मारामारी झाली तर साने गुरुजी दोघांनाही एक एक ठेवून देत नसत. तर ते दोघांच्याही पाठीवर हात ठेवून दोघांनाही सांगायचे,
“असं नसतं करायचं. अरे, असं नसतं करायचं.”
स्वतःच्या संतापाला पूर्णपणे आवर घालणं हे शिक्षकांचं परमकर्तव्य आहे. मुलांना समजून घेणं हे गुरुजी फक्त कर्तव्य समजत नसत आपोआप ती गोष्ट त्यांच्याकडून घडत असे.

एकविसाव्या शतकातील सर्वात महत्त्वाचं कौशल्य ते म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. ही भावनिक बुद्धिमत्ता इंटरनेट च्या माध्यमातून विकसित होत नसते. इथे आवश्यक असतो शिक्षकाचा प्रेमळ हात. हा प्रेमळ हात ज्या विद्यार्थ्यावर पडतो त्या विद्यार्थ्यांमध्ये आयुष्यात पुढे जाण्याचा एक स्पार्क
निर्माण होतो. भावनिक विचार करण्याची मेंदूत जडणघडण सुरू होते. म्हणून आज साने गुरुजी यांचे विचार जास्त गरजेचे आहे.

ते गोष्टी सांगण्यात पारंगत होते त्यामुळे मुलांना त्यांचं अनोखं आकर्षण वाटत असे.

सामाजिक भान मुलांच्यात रुजलं पाहिजे असं आपण म्हणतो. गुरुजींनी कृतीतून ते घडवून दाखवलं. त्यांच्या रोजच्या तासिकेतली शेवटची पाच मिनिटं ते विद्यार्थ्यांशी सामाजिक, राजकीय घडामोडींविषयी चर्चा करत. यातून वैचारिक गोष्टी ऐकायची सवय विद्यार्थ्यांना लागत असे. ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते; म्हणूनच त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडल्यावर मुलं आणि शिक्षकसुद्धा अक्षरश: रडले होते. नंतर त्यांनी स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला तेव्हा त्यांचे माजी विद्यार्थी त्यांच्याबरोबरीने चळवळीत सहभागी झाले होते कारण ते त्यांच्या या शिक्षकाला ‘ओळखत’ होते.

महात्मा गांधींच्या विचारांचा विलक्षण प्रभाव साने गुरुजींवर होता. त्यांना तमिळ आणि बंगाली भाषा येत असे. कारागृहात ते त्या भाषा शिकले होते. भाषांचं महत्त्व ते जाणत असत. भाषांविषयी त्यांना आस्था होती. भाषा खूप काही घडवून आणू शकते याविषयी त्यांना विश्वास होता. भाषांच्या आदान-प्रदानासाठी त्यांनी ‘आंतरभारती’ चळवळ सुरू केली.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस खेडेगावात; मुख्यत्वे खानदेशात रुजवण्यात गुरुजींचा मोठा वाटा आहे. त्यांनी ‘राष्ट्र सेवादला’ची स्थापना केली. ‘साधना साप्ताहिक’ सुरू केलं. समाजातल्या अनिष्ट रूढी, परंपरा, अस्पृश्यता यांना कायम विरोध केला.

15 ऑगस्ट 47 भारत स्वतंत्र झाल्यावर काँग्रेस सोडून समाजवादी पक्षाचं कामकाज पाहण्यास त्यांनी सुरुवात केली. स्वत:चा संसार न थाटता आयुष्यभर सामाजिक कार्यात स्वत:ला वाहून घेणाऱ्या साने गुरुजींनी पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत आपल्या हृदयातली जितीजागती प्रेमाची ज्योत अखंड प्रज्वलित ठेवून 11 जून 1950 रोजी या जगाचा निरोप घेतला. पन्नास वर्षाच्या एवढ्या छोट्या आयुष्यात पहिले वीस वर्षे सोडले तर तीस वर्षांमध्ये ही व्यक्ती एवढे अफाट कार्य करते ही तमाम शिक्षण क्षेत्रातील लोकांनी प्रेरणा घ्यायची गोष्ट आहे. अर्थातच त्यांनी रुजवलेली मूल्यं आज आणि उद्याही माणूस म्हणून जगण्यासाठी जगात सगळ्यांना प्रेरक ठरत आहेत, ठरणार आहेत.

साने गुरुजी विद्यार्थ्यांना गोष्टी सांगायचे. गोष्टीचे पुस्तक लिहायचे. आजही त्यांच्या विचारावर चालणारे असंख्य कार्यकर्ते महाराष्ट्रात जागोजागी "साने गुरुजी कथामाला" चालवतात. त्याच्यातूनच साने गुरुजींचे मूल्य आजही समाजात रुजत आहे आणि ते अधिक रुजले पाहिजे तेव्हा एकविसाव्या शतकातील कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये या गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्यात झिरपतील.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


Sweden Scales Back on Screens in Education, While India Leans In: A Tale of Two Systems

Sweden Scales Back on Screens in Education, While India Leans In: A Tale of Two Systems By Sachin Usha Vilas Joshi, Education activists  For...